Dnamarathi.com

Loksabha Election 2024 : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

यावेळी लोकसभा निवडणुकीत देशात 19 एप्रिलपासून एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर या सातपैकी पहिल्या पाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे. मात्र अद्याप देखील राज्यात सत्तेत असणारी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरू शकलेला नाही.

 काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात आले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा केली होती. मात्र महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरू शकला नाही.

दुसरीकडे, भाजपने राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 25 जागा लढवल्या होत्या. यावेळीही त्यापैकी 20 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

ताज्या वृत्तानुसार भाजप आणि शिवसेना यांच्यात चार जागांवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत या चारही जागा शिवसेनेने (अविभक्त) जिंकल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मतदारसंघातील खासदारांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला होता.

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या 13 खासदारांची तिकिटे कापू नयेत, अशी मागणी केली आहे. ते मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची विनंतीही शिंदे यांनी शहा यांना केली होती. मात्र त्यानंतरही भाजप त्या चार जागांसाठी आग्रही आहे. जागावाटप जिंकण्याच्या क्षमतेच्या आधारे व्हायला हवे, असा युक्तिवाद भाजप करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या जागांवर भाजपचा डोळा?

वृत्तानुसार भाजपने रामटेक, यवतमाळ-वाशीम, कोल्हापूर आणि उत्तर पश्चिम मुंबईच्या जागांवर दावा केला आहे. सध्या या चार जागांवर शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र यावेळी भाजपला या मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे आहेत. 

प्रत्यक्षात शिंदेंच्या खासदारांना पुन्हा तिकीट न मिळाल्यास पक्षात अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता असून अनेक नेतेही शिंदे यांची साथ सोडू शकतात. त्यामुळे कोणत्याही पक्षात नाराजी नको म्हणून जागावाटपाच्या अशा सूत्रावर चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *