DNA मराठी

राजकीय

mahesh landge

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे

Mahesh Landge : महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे. या निवेदनात महेश लांडगे म्हणाले की, ”दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहरात ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि शहराच्या प्रगतीसाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही राज्याची मोठी हानी आहे, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून शहरवासी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे, असल्याचे लांडगे यांनी सांगितले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देत राहील. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे म्हणाले.

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे Read More »

new chapter in the power struggle within the nationalist party

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड यामुळे ‘दादा’ हे केवळ एक व्यक्तिनाम न राहता एक राजकीय प्रवाह बनले होते. मात्र त्यांच्या पार्थिवाचे विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जी घाई सुरू झाली, ती केवळ अस्वस्थ करणारीच नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरते. स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे चार नेते अचानक केंद्रस्थानी आले. प्रश्न असा की, इतक्या वेगाने निर्णय घेण्याची गरज नेमकी कुणाला आणि का भासली? शोक, आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक संवाद याऐवजी सत्तेची घाई दिसणे, हेच या साऱ्या प्रक्रियेचे भयावह वास्तव आहे. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र यावेत, ही इच्छा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती. त्या दिशेने प्रयत्नही झाले होते. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्यास या चौघांचा ठाम विरोध होता, हे आता उघडपणे समोर येत आहे. मग प्रश्न उरतो हा विरोध राजकीय मतभेदांचा होता की वैयक्तिक भीतीतून जन्मलेला? आज सुमित्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही जाऊ शकते. अजित पवार यांचा कणखरपणा, निर्णयातील ठामपणा आणि संघर्ष करण्याची वृत्ती सुमित्रा पवार यांच्यात कितपत उतरते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढे निश्चित की त्यांच्यासमोरचा रस्ता सोपा नाही. या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक गोंधळात टाकणारा मुद्दा म्हणजे या चार नेत्यांना नेमकी कसली भीती वाटते? अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत यासाठी पडद्यामागे प्रयत्न झाले, भाजपाचा हात धरला गेला, हेही आता लपून राहिलेले नाही. दादांचा निर्णय मात्र वेगळा होता. पक्ष स्वबळावर उभा राहावा, हीच त्यांची भूमिका होती. आज मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात नेतृत्वाचा ठोस चेहरा दिसत नाही. उलट पक्ष ‘कोणी चालवत आहे’ यापेक्षा ‘कोणाच्या दबावाखाली चालतो आहे’ असा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतो. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाच्या राजकीय चौकटीबाहेर जाण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, हा पक्ष स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याऐवजी भाजपाच्या छायेत चालेल, अशी भीती वाटणे साहजिक आहे. दरम्यान, सुमित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीची माहिती शरद पवार यांना नव्हती, असा त्यांचा दावा आहे. हे खरे असेल तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या तरी पडदा पडतो. संवादाऐवजी अविश्वास, समन्वयाऐवजी सत्तासंघर्ष आणि वारशाऐवजी स्वार्थ अशी ही सध्याची स्थिती आहे. अजित पवार यांचा राजकीय वारसा केवळ पदांनी जिवंत राहत नाही;तो मूल्यांमधून, निर्णयांमधून आणि स्वाभिमानातून पुढे जातो. तो वारसा टिकवायचा असेल तर घाई नव्हे, धैर्य लागेल. अन्यथा, राष्ट्रवादीतील ही घडामोड इतिहासात एका संधीच्या अपव्यय म्हणूनच नोंदली जाईल.

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; संध्याकाळी शपथविधी ?

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहे. सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी बारामतीला जाताना अजित पवार यांचे विमान कोसळले, त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवारांशी बोलून त्यांना जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शविली आहे.   महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे, जिथे सुनेत्रा पवार यांना नेतेपद देण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय मिळेल, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते राहील. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि भविष्यात त्या अजित पवारांच्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने यावर निर्णय घेतला तर शनिवारीच त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाला त्यांना कोणतीही अडचण नाही. भुजबळ म्हणाले, “राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी बोलावली जाईल, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना नेते बनवले जाईल. अनेक नेत्यांना वाटते की त्यांना उपमुख्यमंत्री बनवावे.” ते म्हणाले की, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळ पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्रीपदाचे रिक्त पद भरणे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिस सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या अपघातासंदर्भात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 194 अंतर्गत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सरकारने पुणे ग्रामीण पोलिसांना आतापर्यंत गोळा केलेले प्रकरणाचे तपशील आणि पुरावे राज्य सीआयडीकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; संध्याकाळी शपथविधी ? Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीकडून मोठी मागणी

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. या मागणीमुळे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, दादांनी हा पक्ष रक्ताचं पाणी करून उभा केला. आज तो टिकवायचा असेल तर पवार कुटुंबातील व्यक्तीच पुढे हवी. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री करणे ही कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांना राज्य राजकारणात आणून उपमुख्यमंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकजूट आणि भावनिक लाट निर्माण होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यामुळे महायुतीला मिळालेला नवीन वोट बँक टिकवण्यासाठी देखील लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार राजकारणात एन्ट्री करणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीकडून मोठी मागणी Read More »

maharashtra election comission

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आता 7 फेब्रुवारीला मतदान; कारण काय?

Zilla Parishad Election: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आता 7 फेब्रुवारीला मतदान; कारण काय? Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation: महापौर निवडीसाठी नाशिकसह, धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला निवडणूक

Ahilyanagar Municipal Corporation : नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तर मालेगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धुळे महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांच्या प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींचे पालन करुन सभेचे कामकाज पार पाडावे तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: महापौर निवडीसाठी नाशिकसह, धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला निवडणूक Read More »

ajit pawar

Ajit Pawar Death: शब्द अंतिम असायचा, म्हणूनच तो नेता वेगळा ठरला

Ajit Pawar Death: बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. पाटील (आबा) यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या राहिलेल्या पोकळीची जाणीव आधीच तीव्र होती. त्या परंपरेतील अजित पवार यांचे जाणे ही केवळ एका नेत्याची अनुपस्थिती नाही, तर एका विशिष्ट राजकीय संस्कृतीचा अस्त होत चालल्याची खंत आहे. ही खंत अधिक बोचरी ठरते कारण अशा नेतृत्वाचा पर्याय आजच्या राजकारणात सहज दिसत नाही. एक काळ असा होता की राजकीय भाषण ऐकण्यासाठी सर्वसामान्य माणूस स्वतःच्या पैशातून प्रवास करून मैदानात येत असे. त्या भाषणांतून केवळ घोषणा नव्हे, तर विश्वास आणि दिशा मिळायची. आज भाषणे होतात, गर्दीही जमते; मात्र त्या गर्दीचे रूपांतर विश्वासात आणि मतांमध्ये होताना दिसत नाही. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आजही आहेत. त्यांच्या भाषणांना मोठी गर्दी होते, पण राजकीय समीकरणे जुळवण्यात आलेल्या मर्यादांमुळे ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. वक्तृत्व आणि सत्तेची गणिते यातील ही दरी आजच्या राजकारणाचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे नेतृत्व वेगळ्या ठिकाणी उभे राहते. ते भाषणांपेक्षा कामातून ओळखले गेले. कामातील तत्परता, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्णयक्षमतेचा ठामपणा ही त्यांची ओळख होती. कार्यक्रमाचा वेळ म्हणजे वेळ कुणी उपस्थित असो वा नसो, काम ठरलेल्या क्षणीच सुरू होणार, हा त्यांचा स्वभाव होता. राजकारणात जिथे शब्द फिरवणे आणि भूमिका बदलणे सहज स्वीकारले जाते, तिथे अजित पवार यांचे स्पष्ट आणि थेट बोलणे अनेकांना अस्वस्थ करणारे ठरले. अजित दादा हे राजकारणात स्पष्ट आणि खरं बोलणारे नेते होते. मात्र आजच्या राजकारणात एवढी प्रामाणिकता अनेकदा अडचणीची ठरते. इथे कपटी शब्दांची, अर्थ बदलण्याची आणि मनात एक-ओठांवर एक ठेवण्याचीच चलती असते. अजित पवार यांना त्यांच्या खरं बोलण्याचा फटका अनेकदा बसला. मनात एक आणि बाहेर दुसरे असे वागणे त्यांना कधी जमले नाही. त्यामुळे तोटा होतो आहे, याची जाणीव असूनही त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. राजकारणात फायदा-तोट्याच्या गणितांपेक्षा कामाला आणि शब्दाला महत्त्व देणारा हा स्वभाव आज दुर्मीळ झाला आहे. याच प्रामाणिकपणामुळे ते ‘महाराष्ट्राचे न झालेले मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले गेले. पद मिळाले नाही, पण लोकांचा ओघ कधी थांबला नाही. मंत्रालयात गर्दी दिसली, तर सहज समजायचे – अजित पवार आपल्या कार्यालयात आहेत. सत्तेच्या खुर्चीशिवायही प्रभाव निर्माण करणारा नेता म्हणजे काय, याचे ते जिवंत उदाहरण होते. अजित पवार यांचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि विशेषतः सर्वसामान्य माणसासाठी मोठे नुकसान आहे. आजचे राजकारण प्रतिमा, प्रचार आणि तात्कालिक फायद्यांभोवती फिरत असताना, शिस्त, स्पष्टता आणि शब्दाची किंमत ही मूल्ये मागे पडत चालली आहेत. म्हणूनच हा प्रश्न व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही; तो काळाचा आणि राजकीय संस्कृतीचा आहे. आजच्या राजकीय वास्तवात असा नेता पुन्हा घडेल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे, आणि हीच या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

Ajit Pawar Death: शब्द अंतिम असायचा, म्हणूनच तो नेता वेगळा ठरला Read More »

विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी

Vijay Wadettiwar on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. पहाटेपासून कामात व्यग्र असणारे, प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते “दादा” होते. एकदा शब्द दिला की ते काम पूर्ण करणारे, प्रामाणिक आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्रासाठी अजून मोठे कार्य त्यांच्या हातून व्हायचे असताना नियतीने हा घात केला. अजित दादा यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे धैर्य लाभो. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी Read More »

sanjay raut

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये घेऊन जाणारे विमान अपघात बातमी समजली. ⁠दुर्दैवाने ही बातमी कानावर आली. त्यांची गरज आज महाराष्ट्राला होती मात्र आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल. रोखठोक दिलखुलास कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. बारामती आणि त्यांच नात होत त्याच बारामती मध्ये मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. ⁠उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे कॅबिनेट ला पूर्ण अभ्यास करून येणार नेता. ⁠शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. ⁠त्या नेत्याचा असा अकाली मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ⁠त्यांच्या कामाची दृश्य नेहमी पाहायली उत्तम वक्ते होते रोख ठोक बोलणारे मिश्किल टिपणी करून आपलेसे करणे असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उमद्या वयात असे नेते अनेक गेले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा होती. ⁠दुर्दैवाणे मुख्यमंत्री झाले नाही. महाराष्ट्राला अजून काय पहाव लागेल माहिती नाही. टीका आम्ही एकमेकांवर करत होतो मात्र त्यांनी शांत राहून उत्तर दिले. ⁠महाराष्ट्राला अजून त्यांच्याकडून काम करून घेता आले असते. ⁠काका पुतण्या एकत्र लढतात याचा आनंद होता मात्र तो फार काळ टिकला नाही. पवार कुटुंबावरच हा मोठा आघात आहे.

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले? Read More »

ajit pawar

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बारामती येथे झालेल्या या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार बारामतीला जात असतात हा अपघात झाला. विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान शेतात कोसळले. सुरुवातीला या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती तर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू Read More »