DNA मराठी

ताज्या बातम्या

election

Election Commission: ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, मुंबईत होणार तपासणी

Election Commission: भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. “हा एक ऐतिहासिक आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील निकालाचा संदर्भ देत नसीम खान म्हणाले की, “या निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ टक्के ईव्हीएममधील म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT मधील ‘बर्न झालेली मेमरी’ (burnt memory) किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.” मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, EVM उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत केवळ ‘निदान चाचणी’ (diagnostic check) करण्यास परवानगी दिली जाईल. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये EVM आणि ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (VVPAT) युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘INDIA’ विरोधी आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी EVM च्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली होती.

Election Commission: ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, मुंबईत होणार तपासणी Read More »

samarjeetsinh ghatge

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

Samarjeetsinh Ghatge : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सौ. सारिका बारड, नगरसेविका साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश Read More »

eknath shinde

Eknath Shinde: काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

Eknath Shinde: निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झालाय. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली. नुकताच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा व मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवावा तो मी स्वतः बघणार, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या ‘एसआयआर’ मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या? याची विचारणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना केली. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार, असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला. मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए’सोबत रोज बैठक घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. संपर्क प्रमुखांना केलेल्या सूचना – मतदार संघाचा दौरा करणे, बैठका घेणे – मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करा – ‘एसआयआर’साठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत – ‘बीएलए’सोबत दररोज बैठक घेणे – लोकसभा संपर्कप्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेणे – बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठवणे नुकताच केली होती संपर्क प्रमुखांची घोषणा शिवसेनेने विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुखांची, लोकसभा संपर्क प्रमुखांची नुकताच घोषणा केली होती. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत आमदार निलेश राणे, आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते, आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Eknath Shinde: काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम Read More »

farmers

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर…

E Pik Pahani : उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील व ती नंतर भरता येणार नाही. परिणामी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत, पीक विमा तसेच शासकीय अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासन निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावर ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावर २५ मे ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पिकांची नोंद करण्यात येईल. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू स्थितीत पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत मोबाईलद्वारे पीक नोंदणी पूर्ण करावी, असे‌ आवाहनही आशिया यांनी केले आहे.

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर… Read More »

donald trump

Donald Trump on Iran War : अखेर युद्धबंदी! इराण अमेरिका एकमत; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump on Iran War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाचा आज शेवट झाला आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत पुढील 15 दिवसांसाठी युद्धबंदीची घोषणा केली आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, त्यांनी मला विनंती केली आहे की आज रात्री इराणवर होणारी लष्करी कारवाई थांबवावी. इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे आणि सुरक्षितपणे उघडण्याचे मान्य केल्यास, मी पुढील दोन आठवडे इराणवरील बॉम्बफेक आणि हल्ले थांबवण्यास तयार आहे. हा दोन्ही बाजूंनी पाळला जाणारा युद्धविराम असेल! ​हे पाऊल उचलण्याचे कारण म्हणजे, आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत. इराण आणि मध्य पूर्वेमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या कराराच्या आम्ही खूप जवळ आहोत. आम्हाला इराणकडून १० मुद्द्यांचा एक प्रस्ताव मिळाला असून, तो चर्चेसाठी योग्य वाटतोय. अमेरिका आणि इराणमधील वादाचे जवळपास सर्व मुद्दे सुटले आहेत, फक्त हे दोन आठवडे आम्हाला हा करार अधिकृतपणे पूर्ण करण्यासाठी लागतील. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य पूर्वेतील देशांचा प्रतिनिधी म्हणून, हा जुना प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!

Donald Trump on Iran War : अखेर युद्धबंदी! इराण अमेरिका एकमत; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा Read More »

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा

VBA on Gas Cylinder : वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले यावेळी वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव म्हणाले की सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत. ९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे असे म्हणाले तातडीच्या मागण्या 1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करण्यात यावा. 2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 3. जादा दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. 4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 5. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून देण्यात यावा. जर वरील मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही, तर जनतेचा तीव्र रोष उफाळून येईल आणि हे आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असा ईशारा अरुण जाधव यांनी देऊन जामखेड तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन दिले.

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा Read More »

ashok kharat

Ashok Kharat: वादात असलेली ‘ती’ जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

Ashok Kharat: भोंदू अशोक खरात याच्या विरोधात उघड होत असलेल्या विविध प्रकरणांनी आता गंभीर वळण घेतले आहे. महिलांचे शोषण, आर्थिक फसवणूक, तसेच सावकारकीसारखे अनेक गुन्हे आधीच त्याच्यावर दाखल झालेले असताना, आता जमीन व्यवहारातील नवे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगमनेर शहरालगत अकोले बायपास शेजारी आणि गुंजाळवाडी हद्दीत असलेल्या सर्व्हे नंबर १३५/१६७ मधील सुमारे १७ गुंठे जागा अशोक खरात याने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ही जमीन मणियार यांची असल्याचे सांगितले जात असून ती सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांना विकण्यात आल्याचे समजते. या व्यवहारात सुनील नावाच्या व्यक्तीने एजंट म्हणून भूमिका बजावल्याचेही उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित जमिनीवर आधीपासूनच वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही खरात याने ही जमीन खरेदी केल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे हा व्यवहार जाणूनबुजून केला गेला का, याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुंड नावाच्या व्यक्तीने या जमिनीवर दावा करत मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी या ठिकाणी अशी कोणतीही जमीन अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जमीन अस्तित्व, मालकी हक्क आणि व्यवहाराची वैधता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप जोडला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे गुन्ह्यांची मालिका आणि दुसरीकडे वादग्रस्त जमीन व्यवहार — अशा दुहेरी संकटात सापडलेल्या अशोक खरात याच्याभोवतीचे वर्तुळ अधिकच घट्ट होत चालले आहे. येणाऱ्या काळात या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही कधीही अशोक खरात याला पाहिलं नाही.. त्याला आम्ही ओळखत नाही. एका मध्यस्तीने व्यवहार केला. खरात आणि त्याची मुलगी स्वतः खरेदीला आले होते. गुंजाळवाडी शिवारात जागा आहे. ७० लाखांचा तो व्यवहार झाला आहे. – सतिश मणियार, जागा मालक मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात संगमनेरमध्ये जागा असल्याचे म्हटले होते त्यावर मी शोध घेतला असता सर्व्हे नं १३५ हा खूप मोठा परिसर असून ९ ते १० किलोमीटरचा परिसर आहे. वडिलोपार्जित जागा असताना देखील तिथे अशोक खरात याने त्याची मुलगी सृष्टी हिच्या नावावर मणियार यांच्याकडून १७ गुंठे जागा विकत घेतल्याचे समजले. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की, अशी कोणतीही जागा याठिकाणी उपलब्ध नसताना देखील हे खरेदी झाली कशी तसेच ज्याने कोणी मध्यस्थी केली असेल किंवा ज्याने खरेदी करून दिली याची चौकशी करावी. – संगीता पुंड, छावा संघटना

Ashok Kharat: वादात असलेली ‘ती’ जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ Read More »

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश

Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वारजे आणि उत्तम नगर परिसरात डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील राठोड याला अटक करण्यात आली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी Porter या डिलिव्हरी ॲपचा वापर करून MD (मॅफेड्रोन) या ड्रग्सचा पुरवठा करत होते. पोलिस तपासात तब्बल 300 जणांना या ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून काही प्रमाणात MD ड्रग्स जप्त केले असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश Read More »

samarjit ghatge

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश

Samarjit Ghatge : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्यातील कागलचे प्रभावी नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या बुधवारी (8 एप्रिल) मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडेल. या संदर्भात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालया बाहेर घाटगे समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहे. समरजित घाटगे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला होता. मात्र, आता पुन्हा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार आहे. घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश Read More »

lalit modi

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा

Lalit Modi on BCCI : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘आयपीएलचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांचे असे म्हणणे आहे की, आयपीएलच्या कार्यपद्धतीतील एका विशिष्ट त्रुटीमुळे बीसीसीआयला (BCCI) दरवर्षी 1200 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. केवळ ही लीगच नव्हे, तर आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीलाही दरवर्षी तितक्याच रकमेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. ललित मोदी यांचा असा युक्तिवाद आहे की, बीसीसीआय या स्पर्धेसाठी सुरुवातीला निश्चित करण्यात आलेल्या स्वरूपाचे (format) पालन करण्यात अपयशी ठरत आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी, बीसीसीआयने पुन्हा एकदा पूर्णपणे ‘होम-अँड-अवे’ (home-and-away) स्वरूपाकडे वळावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रँचायझींचे मूल्यांकन (valuation) सुमारे 31,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, या गोष्टीबद्दल ललित मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ललित मोदी यांच्या मते, मूळ नियमानुसार प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाविरुद्ध दोनदा सामने खेळणे बंधनकारक होते. 2022 मध्ये या लीगचा विस्तार होऊन त्यात 10 संघांचा समावेश झाल्यानंतर, निश्चित केलेल्या रचनेनुसार लीग टप्प्यात 90 सामने खेळवले जाणे अपेक्षित होते; त्यानंतर चार बाद फेरीचे (knockout) सामने नियोजित होते. मात्र, ‘होम-अँड-अवे’ पद्धतीत बदल करून, आयपीएलने सामन्यांची संख्या कमी करत केवळ 74 सामन्यांचे वेळापत्रक कायम ठेवले आहे; ज्यामध्ये प्रत्येक संघ सात ‘होम’ (घरच्या मैदानावर) आणि सात ‘अवे’ (प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने खेळतो. ‘स्पोर्टस्टार’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “प्रत्येक सामन्यातून मिळणाऱ्या महसुलापैकी 50 टक्के वाटा बीसीसीआयला मिळतो, तर उर्वरित 50 टक्के वाटा संघांमध्ये विभागला जातो. परिणामी, संघांना आता 20 सामन्यांना मुकावे लागत आहे. त्यांनी भरलेल्या फ्रँचायझी शुल्काचा विचार करता, त्यांना ‘होम-अँड-अवे’ सामन्यांचा पूर्ण कोटा मिळणे सुनिश्चित करणे ही एक करारात्मक जबाबदारी (contractual obligation) आहे. या स्पर्धेचे खरे मूल्य हे ‘होम-अँड-अवे’ स्वरूपातच दडलेले आहे. जर क्रिकेटच्या वेळापत्रकात (calendar) पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर सरळसरळ संघांची संख्या वाढवू नका. ही गोष्ट अगदी साधी आणि सोपी आहे. आम्ही कधीच अशा पद्धतीचे समर्थन केले नव्हते. सर्वांनी खरोखरच या बदलाला संमती दिली होती का? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, त्यांनी तसे केले नव्हते.” त्यांनी पुढे नमूद केले: “ते ‘होम-अँड-अवे’ (घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने का खेळत नाहीत? यासाठी कदाचित काही सबबी असू शकतात; परंतु संबंधित संघांच्या दृष्टीने, हा एक करारान्वये प्राप्त झालेला अधिकार आणि त्याच वेळी एक व्यावसायिक व्यवहार देखील आहे.” सामन्यांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम फ्रँचायझी आणि लीग या दोघांच्याही मूल्यांकनावर (valuations) होतो, असे मोदी यांचे मानणे आहे. त्यांनी स्पष्ट केले, “जर आज ‘होम-अँड-अवे’ तत्त्वावर 94 सामने खेळले गेले असते आणि प्रत्येक सामन्यातून 118 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, तर केवळ प्रसारमाध्यम हक्कांचे (media rights) मूल्यच 2400 कोटी रुपयांनी अधिक झाले असते. याचा अर्थ असा की, बीसीसीआयला 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असता. या रकमेपैकी 1200 कोटी रुपये 10 संघांमध्ये वितरित केले गेले असते ज्यामुळे प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये मिळाले असते आणि परिणामी, या संघांचे मूल्यांकन आपोआपच वाढले असते.”

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा Read More »