DNA मराठी

ताज्या बातम्या

img 20260606 wa0004

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता?

Maharashtra Politics : “६०० वर्षे मुघलांचे राज्य होते, १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते, ७० वर्षे काँग्रेसचे सरकार होते मग हिंदू समाजाला धोका नेमका गेल्या काही वर्षांतच कसा निर्माण झाला?” हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार फिरताना दिसतो. या प्रश्नाचे उत्तर राजकीय भूमिकेनुसार बदलू शकते परंतु त्यामागील मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर आहे. तो म्हणजे, धर्म खरोखर धोक्यात आहे की धोक्याची भावना राजकीयदृष्ट्या निर्माण केली जात आहे? भारतातील हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समुदाय आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, असंख्य श्रद्धास्थाने, विविध तत्त्वज्ञान, भाषा आणि सामाजिक रचना यांचा हा समाज आहे. अशा समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, असे मानण्यासाठी अत्यंत गंभीर आणि व्यापक स्वरूपाचे पुरावे आवश्यक असतात. परंतु सार्वजनिक चर्चेत अनेकदा भावनांचा आवाज तथ्यांपेक्षा मोठा असतो. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गेल्या काही दशकांत धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय न राहता निवडणुकीतील प्रभावी राजकीय साधन बनला आहे. पूर्वी विकास, रोजगार, शेती, शिक्षण किंवा आरोग्य यांवर केंद्रित असलेले राजकारण आता ओळख, अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरताना दिसते. कारण भीती ही आश्वासनांपेक्षा अधिक प्रभावी राजकीय प्रेरणा ठरते. यामुळेच आज गावोगावी “धर्मरक्षक”, “हिंदुत्ववादी नेता”, “समाजरक्षक” अशा उपाध्या घेऊन अनेक जण पुढे येताना दिसतात. प्रश्न असा आहे की, जर हिंदू समाज खरोखरच इतका शक्तिशाली, व्यापक आणि ऐतिहासिकदृष्ट्या टिकाऊ असेल, तर त्याच्या रक्षणासाठी इतक्या नव्या रक्षकांची अचानक गरज का भासावी? धर्माच्या रक्षणाची चिंता अधिक आहे की धर्माच्या नावावर राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची? लोकशाहीत मतभेद हे स्वाभाविक असतात. एखाद्या नागरिकाने एखाद्या पक्षाला मतदान केले नाही, एखाद्या नेत्याच्या विचारांशी सहमत झाला नाही किंवा एखाद्या धोरणावर टीका केली, म्हणून तो धर्मविरोधी ठरत नाही. राजकीय असहमती आणि धार्मिक वैर यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली गेली, तर लोकशाहीची सर्वात मोठी हानी होते. कारण मग प्रत्येक प्रश्न धर्माच्या चष्म्यातून पाहिला जाऊ लागतो. धर्म हा श्रद्धेचा विषय आहे मतदान हा राजकीय अधिकार आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कायमस्वरूपी जोडण्याचा प्रयत्न झाला, तर नागरिकत्वाची संकल्पनाच कमकुवत होते. एखाद्या व्यक्तीचे राजकीय मत वेगळे असू शकते, पण त्यामुळे तो आपल्या धर्माचा शत्रू ठरत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या समुदायाच्या काही व्यक्तींच्या कृतींवरून संपूर्ण समुदायाला दोषी ठरवणे हेही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. भारतीय समाजाने मुघल राजवट, ब्रिटिश सत्ताकाळ, फाळणी, आणीबाणी, दंगली आणि अनेक राजकीय उलथापालथी अनुभवल्या आहेत. तरीही समाज टिकून राहिला, कारण त्याची ताकद केवळ धर्मात नव्हे तर सहअस्तित्वात होती. त्यामुळे आज जर कोणता धोका असेल, तर तो धर्मापेक्षा संवाद हरवण्याचा, प्रश्न विचारण्याची सवय कमी होण्याचा आणि नागरिकांना सतत भीतीच्या मानसिकतेत ठेवण्याचा आहे. धर्म वाचवण्यापेक्षा लोकशाही जपणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लोकशाही मजबूत असेल, तर प्रत्येक धर्म सुरक्षित राहू शकतो. पण लोकशाहीच कमकुवत झाली, तर कोणताही धर्म, कोणतीही विचारधारा किंवा कोणताही समुदाय स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. म्हणून आजचा खरा प्रश्न “हिंदू धोक्यात आहे का?” हा नाही. खरा प्रश्न असा आहे की, आपण धर्माच्या नावावर भीती विकणाऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणार आहोत की लोकशाहीच्या मूल्यांवर?

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता? Read More »

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानले आहेत. जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या प्रश्नालाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विखे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे जरांगे यांनी म्हटले. “मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विखे, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचे मी मनापासून आभार मानतो,” असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य Read More »

utkarsha rupavate

Utkarsha Rupavate : विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल

Utkarsha Rupavate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधानपरिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली. असे करून भाजपला मदत करण्याचे पूणपणे महाविकास आघाडीने काम केले असा आरोप करत वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना रूपवते म्हणाल्या, इतरांना भाजपची बी टीम म्हणतात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांनी आणि नेत्यांनी भाजपची ए टीम म्हणून काम करण्याला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीने लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणे बंद करून सरळ ते भाजपला मदत करत आहे हे मान्य करावे अशा शब्दात उत्कर्षा रूपवते यांनी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

Utkarsha Rupavate : विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी

AIMIM : काही दिवसापूर्वी नगर महानगरपालिका हद्दीतील गंगा उद्यान येथे काही बुरखाधारी व्यक्तींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना आणि नगरचे लोकप्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून हनुमान चालीसा व हवन आणि वराह पूजा करून शुद्धीकरण केले. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित होत असल्याचे निदर्शनास आले. परंतु तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिलं तर त्यात काही टेक्निकल बाबी आढळून आले आहे. सदर बुरखाधारी नमाज पठण ज्या दिशेने करत आहे त्या दिशेने भारतीय मुस्लीम नमाज पठण करत नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाज हा काबा च्या दिशेने म्हणजेच सूर्य अस्त च्या दिशेने नमाज पठण करतो. परंतु सदर बुरखाधारी हे नमाज पठण काबा च्या दिशेने न करता उत्तरेचे दिशेने करत असल्याचे दिसते याच्याच अर्थ सदर बुरखाधारी हे मुस्लिम समाजाचे किंवा इस्लाम धर्माला मानणारे नसावेत. तसेच नमाज पठण करण्याच्या अगोदर वजू करणे म्हणजे योग्यरित हातपाय धुणे अनिवार्य आहे. परंतु गंगा उद्यान मध्ये अशी कोणती सोय नसल्याने त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे महिला नमाज पठण करणे टाळतील. गंगा उद्यानात वेगवेगळ्या ४ पायाचे जनावर त्या ठिकाणी आढळून येतात आणि घाण करून जातात अशा ठिकाणी मुस्लिम समाजाचे व्यक्तीने नमाज पठण करणे हे शक्य नसल्याने शंका निर्माण होणे साहजिक आहे. भारतामध्ये असे अनेक प्रकार रोज घडत आहे की काही पुरुष बुरखा घालून मंदिराच्या समोर अनावश्यक वातावरण खराब करणाऱ्या गोष्टी करतात आणि पळून जातात यातले काही पकडले गेल्याने लोकांचे लक्षात आले की बुर्खायाचे आत मध्ये महिला नसून पुरुष आहे आणि तेही मुस्लिम समाजाचा नसून इतर समाजाचे आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना इतके तातडीने उद्यानात आले जसेकाय ते या व्हिडिओची प्रतीक्षा करत होते. येतांना त्यांनी सर्व समग्री सोबत आणली आणि हवन, भजन कीर्तन हनुमान चालीसा आणि वराह पूजा हे सर्व केले. नगरचा लोकप्रतिनिधी आणि जातीवादी संघटना या उद्यानात हजर झाले यावरून असे दिसते की व्हिडिओ काढणे आणि ते त्यांच्या ग्रुप वर टाकणे आणि लगेच संबंधित टोळी हे उद्यानात येऊन धिंगाणा घालणे हे सर्व पूर्ण नियोजित आणि योग्य रीतीने षडयंत्र भाग असल्याचे दिसते. डॉ परवेज अशरफी यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले की जर नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसा, हवन वराह पूजा होत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही ? निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की संबंधित बुरखाधारी महिला व पुरुष प्रशासनाने शोधावे व तातडीने अटक करावी. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने व्हिडिओ काढून व्हायरल केला त्यालाही अटक करून त्याच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून हा सर्व षडयंत्र जनतेसमोर येईल. ईदच्या दिवशी माळीवाडा भागात जे घडले त्यात एक बुरखाधारी आढळले परंतु ती महिला की पुरुष हे अद्याप समजले नाही परंतु त्यातही काही त्रुटी असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे. प्रशासनाने त्याचा योग्य छडा लावल्यास त्या ठिकाणी तो प्रकार एक षड्यंत्र असल्याचे जनते समोर येईल. गंगा उद्यान या प्रकरणाचा योग्य रीतीने तपास करून दोषींवर कारवाई झाली नाही तर या षडयंत्र करणाऱ्या टोळीची हिम्मत वाढेल आणि भविष्यात असे प्रकार सर्रास घडताना आपल्याला दिसेल. याचा नुकसान भारतीय मुस्लिमांना भोगावे लागेल. पोलिस प्रशासनाने या दोन्ही घटनेची योग्य रीतीने तपास केल्यास नक्की अहमदनगर मध्ये चालले षडयंत्र जनतेसमोर येईल अशी खात्री एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेझ अशरफी यांनी नगरच्या पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी Read More »

img 20260605 wa0010

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला

Burudgaon Garbage Depot : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोवरील सौरऊर्जा प्रकल्पाला बसला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सुमारे ५०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महापौर ज्योती गाडे यांनी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेत तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.या पाहणीवेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर, इंजिनिअर गणेश गाडळकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांनी कचरा डेपो परिसरातील सोलर प्रकल्पाची पाहणी करताना नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापौर गाडे म्हणाल्या की, वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अशा प्रकल्पांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारण्यात याव्यात आणि त्या शेडवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा विचार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात प्रकल्पांचे नुकसान कमी होईल आणि वीज निर्मिती अखंडित सुरू राहील. त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सौरऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून अशा प्रकल्पांचे संरक्षण आणि देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. नुकसानग्रस्त सोलर प्लांटची तातडीने दुरुस्ती करून वीज निर्मिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सोलर प्रकल्पाच्या पाहणीनंतर महापौरांनी कचरा डेपो परिसरातील विविध प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. यामध्ये खत निर्मिती प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प, लिचेट प्रक्रिया प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांची माहिती घेण्यात आली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला Read More »

img 20260605 wa0011

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला

Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला Read More »

img 20260605 wa0009

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास

Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील खांबे गावात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ४) सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात “तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत अपेक्षित विकास झाला नाही. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत तालुक्यात विविध विकासकामांना गती देण्यात आली असून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. खांबे गावाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, विठ्ठल दातीर, बाबासाहेब दातीर, रामेश्वर शिंदे, दिगंबर दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, प्रेमराज बुधे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते… पुंजा जोशी, सुखदेव भतांबरे, रावसाहेब भांड, बाबूराव कापडी, बारकू पेकारी, बाबा एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, सुभाष केदार, राजू शेंडगे, बाळासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, ठकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्वर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विकासाच्या जोरावर शिवसेनेची ताकद वाढणार केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना वेग मिळत आहे. खांबे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा साकूर पठार भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणारा ठरेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत या भागात शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल,” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. चाळीस वर्षांत न झालेला विकास दीड वर्षांत… खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नव्हता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षांत साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच या विकासकामांचे लोकार्पण आणि गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास Read More »

nz vs ind

NZ vs IND 2026 : न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया; 6 वर्षांनंतर पुन्हा कसोटी मालिका

NZ vs IND 2026 : भारतीय क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून हा दौरा दोन्ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा द्विपक्षीय क्रिकेट दौरा ठरणार आहे. या दौऱ्यात भारत 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे भारत तब्बल सहा वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 2019-20 मध्ये खेळली होती. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, एकूण 12 सामन्यांचा हा दौरा त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. सामने न्यूझीलंडमधील प्रमुख पाच शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. दौऱ्याचे वेळापत्रक टी-20 मालिका 22 ऑक्टोबर – पहिला टी-20, क्राइस्टचर्च 24 ऑक्टोबर – दुसरा टी-20, क्राइस्टचर्च 27 ऑक्टोबर – तिसरा टी-20, वेलिंग्टन 30 ऑक्टोबर – चौथा टी-20, ऑकलंड 1 नोव्हेंबर – पाचवा टी-20, हॅमिल्टन वनडे मालिका 4 नोव्हेंबर – पहिला वनडे, ऑकलंड 7 नोव्हेंबर – दुसरा वनडे, वेलिंग्टन 10 नोव्हेंबर – तिसरा वनडे, हॅमिल्टन 13 नोव्हेंबर – चौथा वनडे, माउंट माऊंगानुई 15 नोव्हेंबर – पाचवा वनडे, माउंट माऊंगानुई कसोटी मालिका 19 ते 23 नोव्हेंबर – पहिली कसोटी, वेलिंग्टन 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – दुसरी कसोटी, क्राइस्टचर्च क्रिकेट चाहत्यांसाठी हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार असून न्यूझीलंडच्या वेगवान आणि स्विंगला अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे.

NZ vs IND 2026 : न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया; 6 वर्षांनंतर पुन्हा कसोटी मालिका Read More »

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »