DNA मराठी

ट्रेंडिंग

nilesh lanke

Nilesh Lanke: गुंड खोटे पोलीस व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिराडण्याचा प्रयत्न… खासदार लंकेचा आरोप

Nilesh Lanke: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठी चार्ज होते हे अत्यंत लज्जस्पद आहे वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मात्र पेपर फुटीमुळे आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात देखील टीईटी चा पेपर फुटला जे उद्या देशाचे भविष्य आहे मात्र पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावा लागत असेल तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतर मंतर वर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अहिल्यानगर मध्ये खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दिला असून यावेळी लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या समवेत आंदोलन सुरू केले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले सनम वांगचूंग असतील किंवा अभिजीत इतके असतील हे आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला . दरोडेखोरांना देखील एवढ्या चुकीच्या पद्धतीने मारहाण केली जात नाही तेवढ्या चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण झाली असा यावेळी लंके म्हणाले विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही नीट पेपर कुठे प्रकरणानंतर थेट पुरावे घेऊन लंके जिल्हाधिकारी कार्यालयावर बसले यावेळी एका विद्यार्थिनीला उत्तर पत्रिकेवरती 500 हून अधिक मार्क दिसतात मात्र ऑनलाईन तिला केवळ 50 मार्क पडल्याचे दिसले आणि याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यास त्यांना धुडकावून लावले जात आहे यामुळे विद्यार्थ्यांसमोर आत्महत्या सारखाच पर्याय उरला असल्याचा देखील यावेळी लंके यांनी नमूद केलं तसेच लंके म्हणाले विद्यार्थ्यांच्या मागण्या देखील मापक आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 वर्षीचे स्वप्न दाखवले विद्यार्थ्यांकडे युवाशक्ती म्हणून पाहिले जायचे आणि त्याच युवाशक्ती वरती अन्याय होतो आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावे लागले त्यासंबंधीचा वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हे हिटलर शाही व हुकूमशाही सरकार हे मंगरूळ आणि हुकूमशाही सरकार आहे हे हिटलर सरकार आहे हिटलर चा अंत कसा झाला हे जगाला माहिती आहे की मी विद्यार्थ्यांना न्याय देण्यापेक्षा पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली महिला भगिनींना मारहाण केली गुंड प्रवृत्तीचे लोक आंदोलनामध्ये आणले कारण हे आंदोलन चिरडले जावे. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील आढळून आले असा सणसणीत आरोप खासदार निलेश लंके यांनी केला.

Nilesh Lanke: गुंड खोटे पोलीस व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिराडण्याचा प्रयत्न… खासदार लंकेचा आरोप Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi: राहुल गांधी आक्रमक; विद्यार्थ्यांसाठी मांडल्या तीन नव्या मागण्या

Rahul Gandhi : NEET-UG परीक्षा आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या परीक्षा व्यवस्थेची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी तीन महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. राहुल गांधी म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास कमी होत असून, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारणे आवश्यक आहे. त्यांनी पहिली मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हटले. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि सातत्याने घडणाऱ्या घटनांसाठी शिक्षण मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्या मागणीत त्यांनी जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला. आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तिसऱ्या मागणीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने देशभरातील तरुणांमध्ये असंतोष वाढला असून, सरकारने त्यांची भावना समजून घेत जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनीही परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, संसदेत आणि रस्त्यावरही हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जाईल, असे आश्वासन दिले. NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनानंतर केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आक्रमक; विद्यार्थ्यांसाठी मांडल्या तीन नव्या मागण्या Read More »

uddhav thackeray

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा

Uddhav Thackeray : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणावरून दिल्लीत आंदोलन देखील होत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्तपणे 26 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची असल्याचे स्पष्ट केले. लाखो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून परीक्षेला सामोरे जातात. मात्र पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे अशा घटनांबाबत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. मोर्चा मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू होणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात आंदोलनाची लाट उसळली असून विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रस्तावित मेगा मोर्च्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून होणारे हे आंदोलन आगामी काळातील शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेला नवी दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा Read More »

rain

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज

Ahilyanagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रातील पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज दुपारी १२.०० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पुलाजवळ २७ हजार ६५१ क्युसेक, घोड धरणातून घोड नदीत ४ हजार क्युसेक आणि गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा, घोड व गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रवरा व मुळा नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच मोकळी मैदाने, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि रोहित्रांपासून दूर राहावे. वादळी वाऱ्यादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान व डोके झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे. पर्यटकांनी धरणे, नद्या व ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी छायाचित्रे (सेल्फी) काढणे टाळावे. नदी, ओढे व नाल्यांवरील पूल अथवा बंधारे पाण्याखाली गेले असल्यास ते ओलांडू नयेत. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाटरस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुनाट अथवा धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० हे दूरध्वनी क्रमांक अथवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज Read More »

mpsc

MPSC Exam 2027 पासून लागू होणार नवा पॅटर्न

​MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या आराखड्यात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुधारित परीक्षा पॅटर्न २०२७ पासून लागू केला जाणार असून, आयोगाने यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ​काय आहेत मुख्य परीक्षेतील महत्त्वाचे बदल? ​भाषा विषय केवळ अर्हताकारी (Qualifying): मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही भाषा विषयांचे पेपर केवळ पात्रतेसाठी (Qualifying) असतील. उमेदवारांना यामध्ये किमान २५% गुण मिळवणे अनिवार्य असेल. या पेपरांचे गुण अंतिम गुणवत्तेसाठी धरले जाणार नाहीत. ​एकूण 7 अनिवार्य पेपर मुख्य परीक्षेत आता भाषा विषयांचे २ अर्हताकारी पेपर, १ निबंधाचा पेपर आणि ४ सामान्य अध्ययनाचे (General Studies) पेपर असे एकूण सात अनिवार्य पेपर असतील. ​गुणवाटप 1250 + 175 (मुलाखत): अंतिम निवड यादी ही १ निबंधाचा पेपर आणि ४ सामान्य अध्ययनाचे पेपर यांच्या एकूण १२५० गुणांवर आधारित असेल. याशिवाय, मुलाखतीसाठी (Interview) १७५ गुण निश्चित करण्यात आले आहेत. या आधी मुख्य परीक्षेचे गुण वाटप 900 गुणांचे होते. ​बदलांमागील मुख्य कारण ​सर्वोच्च न्यायालयाच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने आयोगाने २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सेवा मुख्य परीक्षा अधिक पारदर्शक आणि संतुलित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ​ २०२७ ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी सुधारित गुणवाटप आणि रचनेनुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. या सुधारित योजनेचा सविस्तर अभ्यासक्रम लवकरच MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC Exam 2027 पासून लागू होणार नवा पॅटर्न Read More »

kangana ranaut

Kangana Ranaut on Rahul Gandhi: मोदींनी राजीनामा का द्यावा? ते लोकप्रिय नेते; राहुल गांधींवर कंगना राणौत यांची टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानासारख्या अतिसंवेदनशील परिसरात आंदोलन करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशभरात विविध विद्यार्थी संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे तसेच लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेसचे अनेक खासदार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत सरकारवर टीका करण्यात आली आणि पंतप्रधान तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौत म्हणाल्या की, देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. अशा ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी मागणे किंवा तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असला तरी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ठिकाणांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. कंगना यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत अशा कृतीमुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेसने आपल्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, कंगना रणौत यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी रंग चढला आहे.

Kangana Ranaut on Rahul Gandhi: मोदींनी राजीनामा का द्यावा? ते लोकप्रिय नेते; राहुल गांधींवर कंगना राणौत यांची टीका Read More »

sharad pawar

Sharad Pawar Meet PM Modi : PM मोदींची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी भेट; राजकीय चर्चांना उधाण

Sharad Pawar Meet PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, संसदीय कामकाज किंवा इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबतही नव्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, या भेटीपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध सार्वजनिक प्रश्नांवर भूमिका घेतली होती. त्यानंतर थेट पंतप्रधानांची भेट झाल्याने विरोधी राजकारण आणि सत्ताधारी पक्षातील संभाव्य संवादाबाबत चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या भेटीला कोणताही राजकीय अर्थ लावू नये, असे मत काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले असून संसदीय कामकाजाच्या निमित्ताने अशा भेटी होत असतात, असेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Sharad Pawar Meet PM Modi : PM मोदींची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी भेट; राजकीय चर्चांना उधाण Read More »

Ahilyanagar Crime : अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे उघडकीस आल्याने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे. अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील या हॉटेलमध्ये मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश असून, रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते व किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्धही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. यासाठी १५ जून व १९ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, संबंधित सुनावणीस गैरहजर राहिले. पोलीस विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही संबंधित आस्थापनेचा अशा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर झालेला असून, भविष्यात पुन्हा अशा प्रकारे वापर होऊ नये, यासाठी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मूळ जमीन व घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahilyanagar Crime : अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश Read More »

raj thackeray

Raj Thackeray: सरकार मानसिक रुग्ण, रुग्णालयात भरती करण्याची गरज; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी करण्यासाठी दिलीतील जंतरमंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत असून २० जुलै रोजी या मागणीसाठी त्यांच्याकडे संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्चात मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलिसांकडून लाटी चार्ज करण्यात आल्याने विरोधक आता मोदी सरकारवर जोरदार लागून करताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे . मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, ‘लेम डक’ प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला ! माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा. लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे ! या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !

Raj Thackeray: सरकार मानसिक रुग्ण, रुग्णालयात भरती करण्याची गरज; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय; आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणार

Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रशासन अधिक प्रभावी करणे, ग्रामीण भागाचा विकास आणि विविध योजनांना गती देण्यावर भर देण्यात आला. बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’ राबविण्याचा. या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्याला पाच कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेती, रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय विविध विभागांशी संबंधित विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक निर्णयही घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत विकासकामांचा वेग वाढविणे, निधीचा प्रभावी वापर करणे आणि मागास भागांतील विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील विकास प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विशेषतः आकांक्षित तालुका कार्यक्रमामुळे मागास तालुक्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय; आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणार Read More »