DNA मराठी

ट्रेंडिंग

pratap sarnaik

Pratap Sarnaik: अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक

Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे.शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

Pratap Sarnaik: अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक Read More »

donald trump

Donald Trump: अमेरिका भारताला देणार 1 लाख कोटींचा परतावा देणार; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Donald Trump: अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या शुल्क धोरणाबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर, भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर बेकायदेशीरपणे लादलेले शुल्क (टॅरिफ) आता परत करण्याची शक्यता आहे. या परताव्याची एकूण रक्कम ₹८३,००० कोटी ते ₹१ लाख कोटींच्या दरम्यान असू शकते. ट्रम्प यांच्या शुल्कावर न्यायालयाची स्थगिती आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ (America First) धोरणांतर्गत, ट्रम्प प्रशासनाने विविध देशांतून येणाऱ्या वस्तूंवर जड शुल्क लादले होते. हे शुल्क ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायद्या’ (IEEPA) अंतर्गत आकारले गेले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यानंतरच्या अपील न्यायालयांनी हे शुल्क बेकायदेशीर असल्याचे निकाल दिले. न्यायालयाच्या या निकालांनंतर, अमेरिकेने जागतिक स्तरावर एकूण $१६६ अब्ज इतके शुल्क परत करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. अमेरिकेच्या ‘सीमा आणि शुल्क संरक्षण विभागाने’ (CBP) २० एप्रिल २०२६ रोजी ‘CAPE’ नावाचे एक नवीन ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले आहे, ज्याचा उद्देश परतावा प्रक्रिया वेगवान करणे हा आहे. भारताला परताव्यापोटी किती रक्कम मिळू शकते? ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (GTRI) च्या मते, या परताव्याच्या एकूण रकमेपैकी सुमारे $१० ते $१२ अब्ज (स्थूलमानाने ₹८३,००० कोटी ते ₹१ लाख कोटी) इतकी रक्कम भारतीय वस्तूंशी संबंधित आहे. विशेषतः तीन क्षेत्रांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे: वस्त्रोद्योग आणि कपडे: सुमारे $४ अब्ज अभियांत्रिकी वस्तू: सुमारे $४ अब्ज रसायने: सुमारे $२ अब्ज भारतीय निर्यातदारांना कसा फायदा होईल? हा परतावा थेट भारतीय निर्यातदारांना दिला जाणार नाही; परताव्यासाठीचे दावे केवळ अमेरिकेतील आयातदार (खरेदीदार)च दाखल करू शकतात. त्यामुळे, भारतीय निर्यातदारांना त्यांच्या अमेरिकन खरेदीदारांशी चर्चा करावी लागेल. या लाभांचा प्रत्यक्ष फायदा मिळवण्यासाठी तीन मुख्य मार्ग उपलब्ध आहेत: परतावा-वाटप करार एका लेखी कराराद्वारे अशी तरतूद करणे की, परताव्याच्या रकमेचा काही भाग भारतीय पुरवठादाराला दिला जाईल. किंमत समायोजन भविष्यातील ऑर्डर्सवर किंचित कमी दर आकारून, परताव्याच्या लाभाचा अप्रत्यक्षपणे फायदा मिळवणे. प्राधान्य जे अमेरिकन खरेदीदार त्यांना मिळालेल्या परताव्याची रक्कम निर्यातदारांशी वाटून घेतील, त्यांना भविष्यातील ऑर्डर्ससाठी प्राधान्य दिले जाईल. तज्ञांचे मत: ‘ग्रँट थॉर्नटन इंडिया’चे भागीदार सोहराब बारारिया यांनी ‘CAPE’ या व्यासपीठाचे वर्णन एक महत्त्वपूर्ण पाऊल असे केले आहे. त्यांनी नमूद केले की, या उपक्रमामुळे कागदपत्रांचे काम कमी होईल आणि परतावा (Refund) मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. शिवाय, त्यांनी असा सल्ला दिला की, सर्व जुना ऐतिहासिक डेटा वेळेवर तयार आणि प्रमाणित करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे की, ही केवळ एक प्रकारची व्यावसायिक सवलत नसून, भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी देखील आहे.

Donald Trump: अमेरिका भारताला देणार 1 लाख कोटींचा परतावा देणार; जाणून घ्या नेमकं कारण काय? Read More »

Devendra Fadnavis: महिला आरक्षण मिळेल तेव्हाच ही लढाई संपेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis: विरोधकांच्या मेंदूमध्ये नारी शक्ती संपवण्याची संकल्पना असल्याने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा संविधानविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. मात्र हे विधेयक पडले म्हणजे महिला आरक्षण थांबले असे होणार नाही. महिलांनी मैदानात उतरण्याची हीच वेळ आहे. जोवर संसदेत 33 टक्के खासदार आणि राज्याच्या विधानसभेत 33 टक्के आमदार बसवू त्याचदिवशी ही लढाई संपवू, अशा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपातर्फे वरळी येथे काढण्यात आलेल्या जन आक्रोश महिला संमेलनात दिला. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या या जन आक्रोश महिला संमेलनात जमलेल्या हजारो महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी राहुल गांधी तसेच काँग्रेस नेतृत्वासह महाविकास आघाडी नेत्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत हजारो महिलांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.आजच्या विराट मोर्चामुळे ज्या ज्या लोकांनी नारी शक्तीला विरोध केला त्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे अधिकार पायदळी तुडवून ज्यांनी ढोलताशे वाजवले त्यांना इशारा देण्याचे काम या आक्रोश मोर्चाने केले आहे. आज सुरुवात झाली आहे. जोपर्यंत संसदेत मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोवर हा लढा सुरू राहील, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 1996 सालापासून महिलांना आरक्षण देण्याचा विचार होता. अटलजीं त्यादृष्टीने प्रयत्नही केले होते. मात्र कॉँग्रेसची निती ही महिला आरक्षणाला विरोध करण्याची होती. त्यामुळे कॉँग्रेसने यादृष्टीने कधीच प्रयत्न केले नाहीत. नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 33 टक्के आरक्षण आणण्याचा निर्णय घेतला.मात्र या देशातील नारी शक्ती जागृत झाली तर कुठेतरी आपली दुकानदारी बंद होईल. सामान्य जनता मुख्य प्रवाहात आली तर आपली लेकीसूनांचे काय होईल याची कल्पना असल्याने विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. पण आता आग लावली नाही तर विरोधक प्रत्येकवेळी महिलांचा आवाज दाबत राहतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल. एक कोटी महिलांच्या सह्या करून त्या राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या थोबाडावर माराव्या लागतील, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मी वेदनेने बोलत आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करून विरोधकांनी विधेयकाचा नव्हे तर महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. प्रत्येक भाषणात गोंडस नावे घ्यायची आणि वेळ येताच हात मागे घ्यायचे काम केल्याने विरोधकांचा महिलाविरोधी मानसिकतेचा चेहरा उघडा पडला असल्याची जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली. आपण कित्येक वर्षे केवळ मतदान करत राहिलो. आपल्याला 50 टक्के आरक्षणाची गरज आहे हे माननीय मोदीजींनी ओळखले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर मोदीजींनी तसा विचार केला. मग विरोधकांच्या पोटात का दुखले? हीच तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे का? महिला केवळ वोट बँक म्हणून वापर करण्यासाठी आहेत का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

Devendra Fadnavis: महिला आरक्षण मिळेल तेव्हाच ही लढाई संपेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा Read More »

madhuri misal

Nashik TCS Case: नाशिकनंतर आता पुण्याच्या आयटी कंपनीतही खळबळ; मंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

Nashik TCS Case : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातही अशाच प्रकारच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयातील पुरुष विश्रांती कक्षाबाबत (Resting Rooms) गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून या कक्षाचा वापर नियमितपणे धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, या विधींच्या वेळी इतर कर्मचाऱ्यांना त्या कक्षात प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असून कार्यालयीन शिस्तीचा भंग होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले आहे. “विश्रांती कक्षाच्या वापराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सत्यता तपासणे आवश्यक आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असून, यामुळे कार्यस्थळावरील वातावरणावर परिणाम होऊ शकतो,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर भर या पत्रात विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांशी गोपनीयतेने संवाद साधून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा लादली जात आहे का, याची शहानिशा करण्याचे निर्देश मिसाळ यांनी दिले आहेत. या प्रकरणावर बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुण्यातील आयटी कंपनीत विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट कार्यासाठी करून इतरांना प्रवेश नाकारला जाणे ही बाब चिंताजनक आहे. कार्यस्थळी कोणत्याही प्रकारचा भेदभाव, बळजबरी किंवा नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.”

Nashik TCS Case: नाशिकनंतर आता पुण्याच्या आयटी कंपनीतही खळबळ; मंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलीस आयुक्तांना पत्र Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Woman Reservation : एक कोटी महिलांच्या सह्या घेणार; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Woman Reservation : लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाण साधला. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जन्मताच रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही. महिलांना उत्तर देऊ शकत नाही. त्या दिवशी ही सर्व पक्ष वाटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने यासंदर्भात जन्मत एकत्रित करण्याचे काम करू महिलांना संघटित करण्याचे काम करू महाराष्ट्रातलं एक कोटी महिलांच्या सह्या या मी गोळा करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखादा किती खोटं बोलू शकतो याच जर ऑलिंपिक स्पर्धा घेतलं तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधीं यांना मेडल मिळते असते. संविधानाने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न कर म्हणजे आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्या संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आग्रही होते पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचा आरक्षण करावं असा विषय आला नाही पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहे. त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकला म्हणायचं खरं म्हणजे संविधानात संविधान करांच्या विचारांवरील एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचे काम त्यांनी केलंय त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही कारण ते मागणारच मला माहिती आहे. त्यांना महिलांचा अपमान करणं समाजातल्या इतर घटकांचा अपमान करण्याचा छंद आहे त्याच्यामुळे ते काही माफी मागतील खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत धरून माफी मागितली पाहिजे.

Devendra Fadnavis on Woman Reservation : एक कोटी महिलांच्या सह्या घेणार; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती !

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ६ ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठी सिझन ६ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर हा शंभर दिवसांचा रोमांचक प्रवास आज संपन्न झाला. बिग बॉस मराठी सिझन ६ चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच उत्सुकता होती या पर्वाचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची. ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता तो क्षण शेवटी आला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकत घराघरांत पोहोचलेल्या या पर्वाचा भव्य समारोप होत, तन्वी कोलते हिने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’चा मान पटकावला. अंतिम क्षणापर्यंत कायम असलेल्या उत्कंठेनंतर विजेतेपदाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघालं. विजेत्याला कलर्स मराठीकडून तब्बल १५ लाख धनराशी आणि ट्रॉफी देण्यात आली. विजेत्याला मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे तब्बल १० लाख रुपयांचं वाउचर…रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. तुनवाल ई मोटर्स ची लिथीनो प्रो ही ई बाईक देण्यात येणार आहे. रितेश देशमुख यांच्याकडून आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटो देण्यात आला. या घराने गेल्या १०० दिवसांत प्रत्येक भावनेचा साक्षीदार होत अनेक रंग दाखवले कधी मैत्रीची घट्ट नाती जुळताना पाहिली, तर कधी त्याच नात्यांमध्ये कटुता येताना अनुभवली. सदस्यांचे रडणं–हसणं, तक्रारी, मतभेद आणि स्पर्धेची धग यामुळे प्रत्येक दिवस नवा वाटत गेला. कॅमेरांच्या नजरकैदेत प्रत्येकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. या सगळ्या प्रवासात तन्वीने आपल्या रोखटोक बोलण्याने, जिद्दीने आणि ठाम मताने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला. Executive Vice President, Marathi Cluster‘ Jiostar, सतीश राजवाडे म्हणाले, “बिग बॉस मराठी सिझन ६’ अनोख्या थीमसह सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सिझनमध्ये सदस्यांसाठी दार उघडलं आणि नशिबाचा खेळही पालटला एका मागून एक सरप्राइजेस, अनपेक्षित ट्विस्ट्स, नात्यांचे बदलते रंग आणि प्रत्येक क्षणाला नव्या आव्हानांचा सामना करत हा १०० दिवसांचा प्रवास भावनांनी, संघर्षांनी आणि जिद्दीने परिपूर्ण ठरला. या पर्वाला महाराष्ट्राचं भरभरून प्रेम लाभलं आणि प्रत्येक स्पर्धकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप उमटवली. तन्वी कोलतेने सातत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांशी जोडलेलं नातं यांच्या जोरावर ‘महाविजेती’ हा मान पटकावला. हा शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे.” विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”. असं म्हणता म्हणता, भावना, जिद्द आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रवास एका अविस्मरणीय टप्प्यावर येऊन पूर्ण झाला. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनात आपली वेगळी छाप उमटवत या पर्वाची दिमाखदार सांगता केली.

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती ! Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe : राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं नमूद करत तात्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार नाशिक पदवीधर मतदार संघातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण यंत्रणा दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. एसीआयटी चौकशीच्या नावाखाली लहानसहान कामेही प्रलंबित ठेवली जात असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याशिवाय शिक्षण विभागातील अनेक प्रश्न हे आर्थिक नसून दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असतानाही वारंवार अर्थसंकल्पाचे कारण पुढे केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षकांवर जनगणना, मतदार नोंदणी, बीएलओसारख्या विविध शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या मुख्य कार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा अहवाल, लेखापरीक्षण आणि पूरक कामांवर अधिक भर दिला जात असल्याची बाबही चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. आमदार तांबे यांच्या मागण्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल आढावा -या दरम्यान आमदार तांबे यांनी मुख्य शिक्षण आयुक्तांकडे तात्काळ अंतर्गत बैठक घेऊन सर्व प्रश्नांचा सखोल आढावा घेण्याची मागणी केली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, उपसंचालक, शिक्षक संघटना, संस्थाचालक, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुणे येथे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर ठोस व दीर्घकालीन निर्णय घ्यावेत अशी मागणी देखील केली आहे. २५ मे पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन -या सर्व शैक्षणिक विषयांवर ठोस निर्णय न झाल्यास २५ मे २०२६ पासून मुख्य शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आणि प्रश्न निकाली निघेपर्यंत ते सुरूच राहील असा इशारा देखील आमदार तांबे यांनी दिला आहे. आंदोलन हे माझ्यासाठी नवीन नाही – आ.तांबेसत्यजीत तांबेंसाठी आंदोलन हे नवीन नाही वयाच्या 18 वर्षापासून विविध चळवळींत सक्रिय सहभाग ठेवत त्यांनी वारंवार शिक्षणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आवाज उठवला आहे, जुनी पेन्शन योजना असो, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळून देणे असो यांसह विविध प्रश्नांचा शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अधिवेशनात देखील शैक्षणिक प्रश्नांवर आमदार तांबे यांनी आक्रमक भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्न सोडवले आहेत.

Satyajeet Tambe : शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे Read More »

heatwave

Heatwave Alert : जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Heatwave Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, पुढील काही दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून “यलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत : नागरिकांनी काय करावे ? कामगारांसाठी व कामाच्या ठिकाणच्या सूचना काय करू नये ? पशू-प्राण्यांची काळजी आणि आपत्कालीन संपर्क

Heatwave Alert : जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal: भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: विधानसभेतील पक्षीय बलाबल अनुसार विधान परिषद निवडणुकीत जागा मिळतील. त्यानुसार भाजपची ताकद जास्त असल्याने त्यांना जास्त जागा मिळतील. राष्ट्रवादीला एक जागा मिळेल. उमेदवार जेते पक्ष ठरवतील, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरणाबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्ष विलिनीकरण या विषयावर अशी काहीही चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही. दोन्ही बाजूने सांगण्यात आले आहे की, यावर पुढे चर्चा होणार नाही. रोहित पवार यांच्या सुनेत्रा पवार काकी असल्याने ते प्रचार करत आहेत. त्याच्या पक्षाने उमेदवार दिला नाही म्हणजे पाठिंबाच दिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. इंधन तुटवड्याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले, इंधन तुटवड्याचा प्रश्न हा केवळ नगरपूरता मर्यादित नाही. हा जागतिक प्रश्न आहे. यावर पंतप्रधान व केंद्रीय मंत्री उपाययोजना करत आहेत. त्यामुळे जगात निर्माण झाली तेवढी भीषण परिस्थिती भारतात निर्माण झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार रॉकेल विक्री बंद करण्यात आली होती. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता सरकारने पुन्हा रॉकेल विक्री सुरू केली आहे. मात्र, रॉकेल वितरणाची साखळी तुटलेली आहे. पुन्हा ही साखळी निर्माण करणे अवघड जात आहे. ज्यांच्याकडे रॉकेल विक्रीचे जुने परवाने आहेत, त्या परवान्यांचे नुतनीकरण झाले असे समजा आणि रॉकेल विक्री करायला सुरुवात करा, असे आदेश दिले आहेत. रॉकेलचा पुरवठा आपल्याकडे पुरेसा आहे. रॉकेल वापरण्यासाठीची साधने पुन्हा वापरात आणण्याची समस्या लवकरच सुटेल, असे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले. जगात परिस्थिती केव्हाही बदले अशी स्थिती आहे. आमच्याकडे तीन हजार लीटर पेक्षाही जास्त रॉकेलचा कोट आहे. त्यानुसार त्यांना रॉकेल पाहिजे त्या प्रमाणे देऊ. जे एलपीजी घेत नाहीत, ज्यांना एलपीजी परवडत नाही, त्यांना रॉकेल देण्यात येईल. केंद्रीय पेट्रोलीयम मंत्रालयाकडे साठा आहे त्यांच्याकडे वितरण व्यवस्था नाही म्हणून त्यांनी वितरणासाठी राज्य सरकारकडे रॉकेलचा साठा दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टीसीएस ही जगातील मोठी उत्तम कंपनी आहे. त्या कंपनीतील प्रकाराबाबत पोलीस तपास करून कारवाई करत आहेत. महाराष्ट्र सरकारला कोणताही प्रकल्प राबवायचा असल्यास टाटांची कंपनी असल्याने विश्वासाने काम दिले जाते. या कंपनीत खालच्या पातळीवर काय होते हे वरच्या पातळीवर आपल्याला कळत नाही. त्यामुळे टीसीएस कंपनीला बदनाम करणे योग्य होणार नाही. पोलीस कारवाई करत आहेत. कंपनीनेही दिलगिरी व्यक्त केली आहे. या कंपन्या देशाबाहेर जाणार नाहीत यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणा बाबत मी मागील २५ ते ३० वर्षांपासून ऐकतो आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिला सक्षमीकरणाचे काम केले. राजकारणातही महिला पुढे येत असतील आणि त्यांना आरक्षण मिळत असेल तर ही उत्तम गोष्ट आहे. महाराष्ट्रात जिजामाता, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा अनेक महिला महाराष्ट्रात होऊन गेल्या ज्यांनी देशात नाव गाजविले. नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांमध्ये जसे आपण महिलांना राजकारणा पुढे आणले तसे विधानसभा, लोकसभेत सुद्धा महिलांचे नेतृत्व यावे या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal: भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ Read More »