DNA मराठी

ट्रेंडिंग

devendra fadnavis

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा

Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमुळे शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील काही महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू असतानाच ही बैठक पार पडल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र या भेटीचा पक्षांतर्गत वादाशी संबंध नसल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले असून, कोणताही राजकीय निर्णय किंवा पक्षांतराचा विषय चर्चेत नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा Read More »

Donald Trump

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी मोहिमेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सप्टेंबरअखेरपर्यंत अमेरिकेचे उर्वरित सर्व सैनिक इराकमधून माघारी बोलावले जाणार आहेत. 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या राजवटीविरोधात सुरू झालेल्या लष्करी कारवाईनंतर तब्बल 23 वर्षांनी अमेरिकेची इराकमधील सैन्य उपस्थिती संपुष्टात येणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. “इराकमध्ये आता अमेरिकन सैन्याची गरज उरलेली नाही. दोन्ही देशांतील संबंध आता आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर आधारित असतील,” असे ट्रम्प यांनी सांगितले. इराकचे पंतप्रधानांनीही 30 सप्टेंबरपर्यंत सर्व अमेरिकन सैनिक देशाबाहेर जातील, मात्र अमेरिकन कंपन्या इराकमध्ये कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले. अमेरिकेने 2003 मध्ये इराकवर आक्रमण करून सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवाया, इस्लामिक स्टेट (ISIS) विरोधातील मोहिमा आणि इराकी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकन सैन्य दीर्घकाळ तैनात होते. 2024 मध्ये झालेल्या अमेरिका-इराक करारानुसार सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार सुरू झाली होती आणि आता ती पूर्ण होणार आहे. सध्या उर्वरित अमेरिकन सैनिक मुख्यत्वे सल्लागार आणि प्रशिक्षणाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी धोरणात मोठा बदल होणार असून, अमेरिका आणि इराक यांच्यातील संबंध आता प्रामुख्याने आर्थिक, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रांवर केंद्रित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा Read More »

spain vs france

Spain vs France : स्पेनचा दमदार विजय; फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश

Spain vs France : फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनने सर्वांना धक्का देत फ्रान्सवर 2-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अमेरिकेतील आर्लिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात स्पेनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत फ्रान्सच्या बलाढ्य संघाला पराभव केले. या विजयासह स्पेनने विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सामन्याच्या 22 व्या मिनिटाला मिकेल ओयारझाबाल याने पेनल्टीवर गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. युवा स्टार लामिन यामाल याच्यावर झालेल्या फाऊलमुळे स्पेनला ही पेनल्टी मिळाली. त्यानंतर 58 व्या मिनिटाला पेद्रो पोरो याने अप्रतिम गोल करत स्पेनची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. फ्रान्सकडे किलियन एम्बाप्पे, उस्मान डेंबेले आणि मायकेल ओलिसे यांसारखे आक्रमक खेळाडू असूनही स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांना गोल करण्यात अपयश आले. या स्पर्धेत स्पेनची बचावफळी सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत अभेद्य राहिली असून, संपूर्ण स्पर्धेत त्यांनी केवळ एकच गोल स्वीकारला आहे. प्रशिक्षकांच्या अचूक रणनीती आणि युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे स्पेनने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम फेरीत स्पेनचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे. दुसरीकडे, फ्रान्सला आता तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळावा लागणार आहे.

Spain vs France : स्पेनचा दमदार विजय; फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री? Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

smart meter

Smart Meter : स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा आरोप; ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

Smart Meter : महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आरोप करून आणि सोशल मीडियाद्वारे त्याचा हेतुपुरस्सर प्रसार करीत नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर व ‘कोकणसाद’ यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १२) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या खोट्या आरोप प्रकरणी महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली. स्मार्ट मीटरबाबत कपोलकल्पित तसेच नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण होईल असे जाहीर व रेकॉर्डेड वक्तव्य केल्याप्रकरणी नंदन वेंगुर्लेकर आणि केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही खोटी माहिती सर्व सोशल मीडियाच्या खात्यांवरून प्रसारित केल्याप्रकरणी यूट्यूबचे संपादक सागर चव्हाण याच्याविरुद्ध जनतेत भीती निर्माण करून गुन्ह्यास चिथावणी देणे, गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, शांततेचा भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान करणे, बदनामी करणेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार कलम ३५३ (१) (बी), ३५१ (३), ३५२ व ३५६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे. स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यात कोणताही ‘कॅमेरा’ किंवा गोपनीयतेचा भंग करणारी यंत्रणा नाही. वीजग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पूर्णतः निश्चिंत राहावे. कोणत्याही कपोलकल्पित माहिती व खोटारड्या आरोपांना बळी पडू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरबाबत अत्यंत खोटी व काल्पनिक माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे देखील महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) येथे कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलमध्ये स्मार्ट मीटर संदर्भात चर्चासत्र ठेवण्यात आले. त्यांचे रेकॉर्डिंग शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये महावितरणकडून उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ, ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर तसेच दीपक पटेकर सहभागी झाले होते. यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत विविध फायद्यांची माहिती देण्यात आली तसेच विविध आरोपांचे सर्मपक खुलासे करण्यात आले. तथापि, या चर्चासत्रामध्ये नंदन वेंगुर्लेकर यांनी स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा धादांत खोटा आरोप केला. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात असल्याचा अत्यंत हास्यास्पद दावा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. याबाबत महावितरणचे श्री. वाघ यांनी त्याचवेळी स्पष्टीकरण दिले. तरीसुद्धा कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलने त्यांच्या इतर सोशल मीडियाच्या खात्यांवरून स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याची खोटी जाहिरात केली आणि या चर्चासत्रातील संदर्भ वगळून दिशाभूल करणारा २ ते ३ मिनिटांचा भाग ‘स्मार्ट मीटरची चिरफाड’ या मथळ्याखाली रिलच्या माध्यमातून हेतुपुरस्सरपणे प्रसारित केला. त्यात महावितरणकडून करण्यात आलेला खुलासा देखील वगळण्यात आला.

Smart Meter : स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा आरोप; ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल Read More »

Gold

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : देशातील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू असल्याने बाजारात ग्राहकांची देखील आता वाढत चालली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि विविध सराफा बाजारातील ताज्या दरांनुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,३२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,२९० रुपये आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,४७० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,४५० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदविण्यात आला आहे. कोलकाता व हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,३२० रुपये असून, चेन्नईमध्ये तो १,४५,०८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ४,३७० रुपयांनी कमी झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही जवळपास ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली असून, तिचा दर प्रति किलो २,३४,९०० रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात चांदी सुमारे १५ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या मूल्यातील बदलांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. सध्याच्या घसरलेल्या दरामुळे दागिने खरेदी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी ही अनुकूल संधी मानली जात आहे.

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या नवीन दर Read More »

shrirampur band

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद…

Shrirampur Band : श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती उच्छाद मांडला असून खून मारामाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे यातच श्रीरामपूर मधील एका हॉटेल मालकाच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली वाढती गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूर शहरांमध्ये आज बंद पाळण्यात आला असून यामध्ये नागरिक व्यापारी व राजकीय नेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. श्रीरामपूर मधील हॉटेल मालक आकाश दुबय्या यांच्या भर दिवसा घडलेल्या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे शहरात वाढती गुन्हेगारी व या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून आमदार हेमंत उगले नगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी फेरी काढून गुन्हेगारांचा विमोड करण्यासाठी साथ द्यावी असं आव्हान देखील केला आहे. तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुक्का अंतर्गत कारवाईचे करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे दरम्यान आकाश यांच्या कुटुंबीयांनी संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद राहणार असे आवाहन सर्वपक्षीय विविध संघटनांनी केले आहे. श्रीरामपूर मध्ये अवैध धंदे गुंडांच्या टोळ्या ह्या कार्यरत असून यामुळे गोरगरिबांवती अन्याय महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत मात्र पोलिसांनी देखील योग्य वेळी कारवाई केली पाहिजे श्रीरामपूर शहराची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून निर्माण होत आहे वाळूमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होत असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मांडू व मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात असल्याचे माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद… Read More »

jayden adams

Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी, अवघ्या 25 वर्षाच्या ‘या’ फुटबॉलरचे निधन

Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा फुटबॉलर जेडन अॅडम्स (Jayden Adams) याचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. ॲडम्सने नुकतेच ‘बाफाना बाफाना’ (दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय संघ) कडून फिफा (FIFA) विश्वचषकात खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले होते. त्याच्या निधनामुळे चाहते, सहकारी खेळाडू यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्लब फुटबॉलमध्ये (Club Football) जेडेन ॲडम्सने क्लब फुटबॉलमध्ये ‘ममेलोडी सनडाउन्स’साठी (Mamelodi Sundowns) उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघाला ‘सीएएफ (CAF) चॅम्पियन्स लीग’चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले. विश्वचषकादरम्यानही त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने बाद फेरीत (नॉकआउट स्टेज) धडक मारून इतिहास रचला होता, परंतू ‘राउंड ऑफ ३२’ मध्ये कॅनडाविरुद्धच्या (Canada) सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. जेडेन याचे मार्गदर्शक ब्रेंडिन जॉन्सन यांच्या मते, विश्वचषकातून (World Cup 2026) परतल्यानंतर ॲडम्स खूप आनंदी होता आणि आगामी हंगामासाठी खुप उत्सुक होता. ‘सीएएफ’ चॅम्पियन बनल्यानंतर तो आपल्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत होता. जॉन्सन म्हणाले, “गुरुवारी माझी त्याच्याशी दीर्घ चर्चा झाली होती. विश्वचषकातून परतल्यानंतर तो खूप सकारात्मक होता. त्याला माहित होते की त्याच्यासमोर अनेक मोठ्या संधी आहेत. तो फुटबॉलसाठी पूर्णपणे समर्पित होता. झेकियाविरुद्धच्या गट सामन्यात दोन आठवडे आधी त्याच्या आजीचे निधन झाले होते. या दुःखाच्या प्रसंगातही तो देशासाठी मैदानात उतरला”. जेडेन याच्या म़त्यूचे कारण अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र त्याच्या अचाकन जाण्याने केवळ दक्षिण आफ्रिकेलाच नव्हे तर फुटबॉल विश्वालादेखील मोठा धक्का बसला आहे.त्याने कमी वयात फुटबॉल खेळामध्ये केलेली कामगिरी फुटबॉलप्रेमी कायम लक्षात ठेवतील.

Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी, अवघ्या 25 वर्षाच्या ‘या’ फुटबॉलरचे निधन Read More »

img 20260712 wa0035

Ahilyanagar Crime: तलाठ्याचा सत्कारात नाव पुकारलं नाही ; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ

Ahilyanagar Crime: जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना शनिवारी (११ जुलै) दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझं नाव माईकवर का पुकारलं नाही?; लोखंडी रॉड असलेला माईक घातला डोक्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७) हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असताना तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब विचारला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

Ahilyanagar Crime: तलाठ्याचा सत्कारात नाव पुकारलं नाही ; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ Read More »