Pune Crime: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२, धंदा-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे:गोरख संभाजी सोनवणे(वय ३२ वर्षे – पती)संभाजी लक्ष्मण सोनवणे(वय ६२ वर्षे – सासरा), अलका संभाजी सोनवणे(वय ५५ वर्षे – सासू)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांना ‘विरा’ (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण व मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि “पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका” अशी तंबी दिली. नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली.
२८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली. त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता, पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि “हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा”असा अमानुष पवित्रा घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला.
फ्लॅटसाठी 3 लाख आणि ‘अधिक मासात’ सोन्याच्या अंगठीची मागणी
एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्याने तेजस्विनीकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले.
मे २०२६ मध्ये ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र,”आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,”असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली.
२ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही.” त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.






