DNA मराठी

Vikhe Patil

ahilyanagar district bank election

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत?

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय वातावरणाने आधीच निवडणुकीचा रंग धारण केला आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुका पूर्वी विकास, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लढल्या जात असत. आता मात्र त्यांचे स्वरूप सत्तेच्या अंकगणितात अडकत चालल्याची भावना निर्माण होत आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती “घोडेबाजार” आणि अंतर्गत राजकीय हालचालींची. पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांत विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क, गाठीभेटी आणि मोर्चेबांधणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या चर्चांची सत्यता संबंधितांनाच माहीत; मात्र अशा चर्चांनाही वाव मिळणे, हेच सहकार चळवळीसाठी चिंतेचे लक्षण आहे. भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याने समीकरणे बदलत आहेत. कर्जत-जामखेडच्या राजकारणापुरती मर्यादित असलेली त्यांची ताकद आता संपूर्ण जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात कसोटीला लागणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके हेही आपापल्या पातळीवर राजकीय मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र दिसते. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती भाजपमधील अंतर्गत राजकीय हालचालींविषयी. एकाच पक्षातील वेगवेगळे प्रभावकेंद्रे आपापले संख्याबळ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. ही स्पर्धा जर उघड संघर्षात बदलली, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत मतभेदच अनेकदा निर्णायक ठरतात, हा सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. सहकार संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्या शेतकरी, सभासद आणि ग्रामीण उद्योगांच्या विश्वासावर उभ्या आहेत. अशा संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर विचारांपेक्षा व्यवहार, तत्त्वांपेक्षा तडजोडी आणि सेवाभावापेक्षा घोडेबाजार चर्चेचा विषय ठरू लागला, तर सहकाराच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक कोण जिंकणार, यापेक्षा ती कशा पद्धतीने लढवली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. पारदर्शकता, लोकशाही आणि सभासदांचा विश्वास या तीन मूल्यांवरच सहकाराचे भविष्य टिकून राहणार आहे. अन्यथा प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता बदलेल पण सहकार मात्र हरत जाईल.

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत? Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अन्…, सुजय विखे काय म्हणाले?

Sujay Vikhe : गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट घोषणा केली की, आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत. कारखाना तुमचाच आहे.मात्र, गणेश कारखान्याशी संबंधित न्यायालयीन वादाबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नाही. कर आमची लढाई प्रवरा कारखाना सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे ना. राधाकृष्ण विखे पाटील किवा डॉ सुजय विखे पाटील यांचे नाहीत, तर प्रवरा कारखान्याचे सभासदांचे आहेत. सभासदांनी उभे केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. राहाता येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राहाता व गणेश परिसरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाचे मुद्द्यांवर चर्चा करावी,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राहाता शहराच्या विकासाबाबत विश्वास व्यक्त करताना डॉ. विखे म्हणाले, आजचे राहाता आणि दोन वर्षांनंतरचे राहाता शहर यात मोठा फरक दिसेल.शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलून जाईल. विकासकामांवरच आमचा भर राहणार आहे. भाजपच्या संघटन शक्तीवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकत नाही.” शेवटी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. आपले राजकारण विकास, प्रगती आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. शांत राहा आणि विकासाची कामे करत राहा.असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अन्…, सुजय विखे काय म्हणाले? Read More »

railway

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्‍यासाठी राज्‍यसरकार सकारात्‍मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली. पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्‍हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या मार्गाबाबत सविस्‍तर चर्चा केली. माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील, आ.डॉ.किरण लहामटे, आ.सरोज अहिरे, आ.अमोल खताळ, आ.शरद सोनवणे, आ.बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते. शिष्‍टमंडळाने पुणे-नाशिक रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्‍यानगर या जिल्‍ह्यांच्‍या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्‍यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता करण्‍यात आल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली. या रेल्‍वे मार्गाबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असून, यासाठी निधीचीही तरतुद केलेली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्‍याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्‍पाची तांत्रिक अचुकता व कालबध्‍द अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍यासाठी तज्‍ज्ञांची उच्‍च्‍स्‍तरीय समिती स्‍थापन करुन, याबाबतचा अहवाल मागविण्‍यात येईल. समितीकडून येणा-या अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत आपण स्‍वत: पाठपुरावा करु अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्‍टमंडळाला दिली. राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपुर्ण बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्‍दारे करण्यात आली. यावेळी आ.प्राजक्त तनपुरे, आ.विठ्ठलराव लंघे पाटील व आ. अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही Read More »

img 20260624 wa0000

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा  मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मंत्री मंडळातील जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माहीती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार,मदत व पुनर्वसन मकरंद जाधव,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी,तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने व मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखी खाली वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी. स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, तसेच ज्या मागण्या/निवेदने राज्य शासनाशी संबंधित आहेत, ती आवश्यकते नुसार तात्काळ शासनाकडे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत  घेण्यात आला. जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रक्रियेचा प्रत्येक आठवड्याला सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल दर आठवड्याला राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारने ५ जून २०२६ रोजीच्या काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे, याची सविस्तर आकडेवारी संबंधित विभागाने पुढील बैठकीत अनिवार्यपणे सादर करावी, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले असून, मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक आता नियमितपणे घेतली जाणार आहे. चालू अधिवेशन कालावधी संपल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीनंतर या उपसमितीची बैठक घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध योजना आणि आरक्षणाशी संबंधित बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र ‘मराठा कक्ष’ तात्काळ कार्यरत करण्यात यावा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. न्यायमुर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय Read More »

img 20260622 wa0041

Vikhe Patil: सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार

Vikhe Patil: महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातर्गत विविध प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. कार्यक्रमाच्या टप्पा दोन अंतर्गत होणाऱ्या या कामातून कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पातील कामांसाठी गती मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी आमदार सत्यजित पाटील , आमदार अमोल जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक जयंत गवळी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्यातील पूर्ण झालेल्या १५५ जलसिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी ५ हजार ३६ कोटी रुपये तरतुदीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नाबार्ड च्या माध्यमातून निधी उपलब्धतेच्याया दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कामास गती दिली जाईल. अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणेसाठी या टप्प्यातील ७५०० कोटीपैकी गोदावरी व कृष्णा खो-यात निधी उपलब्ध होणार असून सदयस्थिती झालेला खर्चबाबतचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षमता यामधील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत २१ प्रकल्पांना व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर एकूण ३१ प्रकल्पांच्या बाबत चर्चा करण्यात आली. गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा २ मधून टप्पा १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती व भोजापूर मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचा प्रथम टप्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Vikhe Patil: सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार Read More »

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली

Ahilyanagar News : यावर्षी पावसाला होणार उशीर आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी पिण्याचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानी सांगितले की, धरण क्षेत्र व अन्य उदभव क्षेत्रातून पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर वेळापत्रकानुसार गावात जाणार आहेत. त्यांच्यासाठीच्या पाण्याच्या उद्भव परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकले जाणार नाही. तेथील पाणी पुरवठा योजनेत किंवा गावच्या लोकसंख्येनुसार दोन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. या टाक्यांना कॉक बसवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल व ते वायाही जाणार नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी चारा सध्या मुबलक असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच सहा दिवसात येईल व त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही विखे यांनी सांगितले.

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली Read More »

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर

Ashadhi Wari Palkhi : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्ती महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज व श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्याबरोबरच अन्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे पुरवणे तसेच जलरोधक मंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनास सादरही करण्यात आला होता. राज्यातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. “आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर Read More »

img 20260427 wa0000

Punyashlok Ahilyadevi Holkar Water Journey : गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा दोन्ही यात्रा शिर्डीत दाखल

Punyashlok Ahilyadevi Holkar Water Journey : संपूर्ण जगाला श्रध्दा आणि सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या भूमीत पुण्यश्लोक अहील्यादेवीचा जयजयकार करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रा शिर्डीत दाखल झाल्या.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प जलयात्रेच्या निमिताने पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नमर्दा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गोदा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथून यात्रेची सुरूवात करण्यात आली. दोन्ही यात्रा शिर्डी मध्ये एकत्रित होवून मध्यप्रदेशकडे सोमवारी रवाना होणार आहेत.राज्यातील सर्व नद्यामधून आलेल्या जलकलशाचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खा.वडतुके आ.गोपीचंद पडळकर आ.सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदीरात पूजन करून यात्रेचे स्वागत केले.शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला. पूण्यश्लोक अहील्यादेवींचा पुतळा आणि कलशाचा रथ जलयात्रेचे मुख्य आकर्षण आहे.धनगर नृत्य तसेच मंत्री विखे पाटील यांच्यासह सर्व सहभागी आमदारांचा बस मधून चाललेला प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. यात्रेच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलसंवर्धनाची चळवळ महत्वपूर्ण होतीच पण सांस्कृतिक परंपरेचा वारसा सुध्दा त्यांच्याकडून आपल्याला मिळाला.श्री दासगणू महराजांनी श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी ग्रंथ महेश्वर येथे लिहीला त्यामुळे शिर्डी आणि महेश्वर नगरीच नात हे अध्यात्माने जोडले गेले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

Punyashlok Ahilyadevi Holkar Water Journey : गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा दोन्ही यात्रा शिर्डीत दाखल Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार?

Sujay Vikhe Patil: अहिल्यानगरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. पराभव हा राजकीय कारकिर्दीचा शेवट नसतो, तर अनेकदा तो नव्या उभारणीचा प्रारंभ ठरतो. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात हीच प्रक्रिया सध्या दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी घेतलेली राजकीय पुनर्बांधणीची दिशा आणि आता राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चा, या केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा भाग नाहीत; त्या महाराष्ट्राच्या बदलत्या सत्तासमीकरणांचेही प्रतीक आहेत. पराभवानंतरची पुनर्बांधणी : पराभव की संधी? लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक नेते राजकीय अंधारात जातात. परंतु सुजय विखे पाटील यांनी हा पराभव आत्मपरीक्षणाची संधी मानून संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील नेतृत्व स्वीकारून त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सहकार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जातो. या क्षेत्रात नेतृत्व मिळवणे म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय प्रभावही निर्माण करणे होय. याच काळात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि स्थानिक राजकारणात त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका, विशेषतः संगमनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल, यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. स्थानिक आमदारांच्या निवडणुकीत आणि महानगरपालिका सत्तास्थापनेत त्यांनी निभावलेली भूमिका, ही त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक मानली जाते. राज्यसभा : पराभूत नेत्यांसाठी पुनरागमनाचा मार्ग? भारतीय संसदीय व्यवस्थेत राज्यसभा ही केवळ “वरिष्ठ सभागृह” नसून अनेकदा ती राजकीय पुनरागमनाचे व्यासपीठ ठरते. लोकसभेत पराभव झालेल्या किंवा थेट निवडणूक लढवणे कठीण झालेल्या नेत्यांना राज्यसभेद्वारे संसदेत स्थान दिले जाते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीकडे केवळ वैयक्तिक प्रगती म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ही एक व्यापक राजकीय रणनीती असू शकते. भाजपसाठी अहिल्यानगर आणि आसपासचा भाग हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या भागात पक्षाची ताकद वाढवण्यात विखे पाटील कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला अशा प्रभावशाली कुटुंबातील नेत्याला राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा विचार आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. वारसा आणि नेतृत्व : कौटुंबिक प्रभावाचा प्रश्न सुजय विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या वडिलांचा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव नाकारता येणार नाही. सहकार, प्रशासन आणि राज्यकारभारातील त्यांचा अनुभव हा सुजय विखे पाटील यांच्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक वारसा ही नवी गोष्ट नाही; शरद पवार, ठाकरे, चव्हाण, मुंडे यांसारख्या अनेक घराण्यांनी ही परंपरा निर्माण केली आहे. मात्र, वारसा हा केवळ प्रवेशद्वार असतो; टिकून राहण्यासाठी वैयक्तिक नेतृत्वगुण आवश्यक असतात. सुजय विखे पाटील यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा दाखला मानला जाऊ शकतो. राज्यसभा उमेदवारी : पक्षनिष्ठेचे पारितोषिक की रणनीतिक गरज? राज्यसभेची उमेदवारी ही अनेकदा पक्षनिष्ठा, संघटनात्मक योगदान आणि भविष्यातील राजकीय संभाव्यता या तिन्ही गोष्टींचा संगम असते. भाजपसारख्या पक्षासाठी महाराष्ट्रात मजबूत स्थानिक नेतृत्व निर्माण करणे ही दीर्घकालीन गरज आहे. सुजय विखे पाटील यांची संभाव्य निवड ही या व्यापक रणनीतीचा भाग असू शकते. तथापि, राज्यसभेत जाणे म्हणजे केवळ प्रतिष्ठा नव्हे, तर जबाबदारीही आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणनिर्मितीत सहभाग, राज्याच्या प्रश्नांना संसदेत मांडणे आणि मतदारसंघाच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणे, ही राज्यसभा सदस्याची मूलभूत कर्तव्ये आहेत. पुनरागमन की नव्या पर्वाची सुरुवात? सुजय विखे पाटील यांच्या राज्यसभा संभाव्य उमेदवारीच्या चर्चा या केवळ राजकीय अफवा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत आहेत. पराभवानंतरही राजकीय सक्रियता कायम ठेवून संघटनात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न, हा त्यांच्या नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. राजकारणात वारसा महत्त्वाचा असतो, पण अंतिम कसोटी ही जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची परिणामकारकता यांचीच असते. राज्यसभेचा मार्ग खुला झाला, तर तो सुजय विखे पाटील यांच्यासाठी केवळ पुनरागमन नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकतो.

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार? Read More »

img 20251120 wa0007

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी

Vikhe Patil – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची वाटचाल सांगताना काही नावे अनिवार्यपणे उच्चारावी लागतात. त्यांमध्ये सर्वात प्रखर ठसा उमटवलेले नाव म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. सहकार म्हणजे केवळ आर्थिक संघटना नव्हे, तो ग्रामीण समाजाचा विकासमार्ग आहे, ही भूमिका ज्या व्यक्तींनी आपल्या कामाने सिद्ध केली त्यापैकी अग्रगण्य व्यक्तिमत्त्व हेच. आज, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव मिळाला आहे, तेव्हा हा प्रवास केवळ एका घराण्याचा नाही. तर महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व, सहकार आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या सातत्याचा दस्तऐवज ठरतो. पहिली पायाभरणी- विठ्ठलराव विखे पाटील यांचे राष्ट्रपतींकडून झालेले पहिले गौरव 1950 च्या दशकात भारत स्वराज्याच्या पहिल्या श्वासांसोबत पुढे जात असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अस्थिर होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मध्यस्थांची पकड होती, कर्जपुरवठ्याची व्यवस्था बळकट नव्हती. त्याच काळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपच बदलले. हे केवळ एका उद्योगाची कथा नव्हती ही होती शेतकऱ्याला उद्योगाचा ‘हिस्सेदार’ बनवण्याची नवचेतना. त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पद्मश्री देऊन गौरवताना सहकार चळवळीच्या मूलभूत मूल्यांना मान्यता दिली. आजही हा पुरस्कार केवळ सन्मान नसून भारतीय सहकाराच्या क्रांतिकारी युगाची सुरुवात मानला जातो. नवी वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रीय योगदान सहकाराच्या घराण्यात जन्मलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारण, शिक्षण आणि सहकार या त्रिसूत्रीला वेगळा आयाम दिला. सहकार क्षेत्राचा विस्तार, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांची प्रमुख कामगिरी. 2010 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दिलेला पद्मभूषण हा पुरस्कार राज्य आणि केंद्राच्या धोरणनिर्मितीत त्यांच्या प्रभावी योगदानाची दखल होता. हेही लक्षात घ्यावे लागेल की बाळासाहेब विखे यांचे कार्य केवळ सहकारपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रामीण समाजातील सामाजिक भान आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा एक नमुना म्हणून ते राष्ट्रीय नेतृत्वात स्वीकारले गेले. समकालीन परंपरा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलव्यवस्थापन आजच्या महाराष्ट्रात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. हवामानबदल, वाढती मागणी, सिंचनातील असमानता आणि जलसंपत्तीचे अव्यवस्थापन यांमधून मार्ग शोधताना परिणामकारक प्रशासन, वैज्ञानिक धोरणे आणि जलसाक्षरता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. 2024 मध्ये केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेला “बेस्ट स्टेट कॅटेगरी” राष्ट्रीय पुरस्कार हा या व्यापक बदलांचा सरकारी शिक्का आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा पुरस्कार व्यक्तीगत कामगिरीचा नसून संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरावा आहे, आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वातील धोरणात्मक स्थिरतेचे प्रतीकही. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या — महाराष्ट्राची सहकार परंपरा जगाच्या नकाशावर एका घराण्याच्या तीन पिढ्यांना राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणे, हे अपवादात्मक आहे. पण या सन्मानांमागे घराणेशाही नसून सातत्यपूर्ण समाजकार्य, सहकार विचारांची परंपरा आणि ग्रामीण विकासाचे अधिष्ठान आहे. डॉ. विठ्ठलराव – सहकाराची क्रांती बाळासाहेब – सहकार + शिक्षण + राजकीय नेतृत्व राधाकृष्ण – आधुनिक प्रशासन, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित धोरण ही परंपरा एका घराण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजशास्त्राचा आराखडा ठरते. विखे पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या हे सिद्ध करतात की विकास हा योगायोग नसतो तो दृष्टिकोन, कष्ट आणि मूल्ये यांची सलग परंपरा असते. आज जेव्हा महाराष्ट्र जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान मिळवतो, तेव्हा या परंपरेची बाजू अजूनही मजबूत असल्याचे दिसते. राजकीय मतभेद असोत वा सहकारातील नवनवे आव्हान महाराष्ट्राची ग्रामीण परिवर्तनाची गाथा लिहिताना विखे पाटील कुटुंबाचा उल्लेख अपरिहार्य राहणार आहे. सन्मान ही केवळ मानाची पाऊलवाट नाही तर ग्रामीण भागाचा आत्मविश्वास वाढवणारी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी, हीच आजच्या संपादकीयाची मुळ भूमिका.

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी Read More »