DNA मराठी

Maharashtra

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिपादन

Chandrashekhar Bawankule : शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हीजन निश्चित करून त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना 32,000 कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन शेतक-यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत वर्षभरात 37,166 कामे पूर्ण करण्यात आली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. 100 गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो 11 ला मान्यता, मुंबईत 238 लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी 4826 कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही बावनकुळे यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध निर्णय आणि योजना महायुती सरकारने आखल्या आहेत. लाडकी बहिण योजना दमदारपणे सुरु आहे. तसेच राज्यातील 10 जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी उमेद मॉल सुविधा देण्यात आली. उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण या आणि अशा अनेक नवीन धोरणांची घोषणा करण्यात आली. दावोसमध्ये विक्रमी 16 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून, 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये गेल्यावर्षीपेक्षा 34 टक्के अधिक म्हणजे 1,64,875 कोटींची परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जपण्यासाठी देखील अनेक निर्णायक पावले उचलण्यात आली. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पानिपतला मराठा शौर्य स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीवर्षात तीर्थक्षेत्र विकासासाठी 5503 कोटींचा निधीही देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करून जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश ‘एमईआरसी’ने दिला आहे. महावितरणने इतिहासात प्रथमच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला होता. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 2399 आजारांचा समावेश करण्यात आला. प्रधानमंत्री आवासमध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरे मंजूर त्यातील 4,91,278 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय तसेच ग्रामीण कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या. डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कामही महायुती सरकारने केले. मागच्या एक वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड स्थापित केले जात आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule: महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिपादन Read More »

indigo airlines

IndiGo Airlines प्रकरणात केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; होणार उच्चस्तरीय चौकशी

IndiGo Airlines : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली इंडिगो एअरलाइन्स प्रकरणात आता केंद्र सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. देशभरातील इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या मोठ्या प्रमाणात विस्कळीततेनंतर सरकार आता कारवाई करणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी घोषणा केली की या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या संख्येने उड्डाणांवर कसा परिणाम झाला आणि त्यामागील खरी कारणे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही चौकशी केली जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की इंडिगोच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या सर्व पैलूंचा तपास पथक सखोल आढावा घेईल. तांत्रिक कारणे, मानवी चूक किंवा सिस्टम बिघाड या व्यत्ययाला कारणीभूत आहेत का हे देखील ते तपासेल. आवश्यक असल्यास, जबाबदारी निश्चित केली जाईल आणि संबंधित अधिकारी किंवा विभागांवर आवश्यक कारवाई केली जाईल. सरकारचे उद्दिष्ट केवळ कारणे ओळखणे नाही तर भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना विकसित करणे देखील आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले की या तपासणीचा उद्देश एअरलाइनची जबाबदारी वाढवणे आणि तिचे कामकाज मजबूत करणे आहे जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा अडचणींचा सामना करावा लागू नये. मंत्रालयाने असे सूचित केले आहे की जर तपासणीत कोणत्याही संरचनात्मक किंवा व्यवस्थापन त्रुटी आढळून आल्या तर त्या दूर करण्यासाठी शिफारसी जारी केल्या जातील. इंडिगोच्या विमान उड्डाणे अचानक थांबल्याने देशभरातील अनेक विमानतळांवर प्रवाशांना दीर्घकाळ वाट पाहावी लागली, विलंब झाला आणि तिकिटांच्या समस्या निर्माण झाल्या. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आणि एअरलाइनकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. वाढत्या घटना लक्षात घेता, सरकारने वेळेवर चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मंत्रालयाने असे म्हटले आहे की ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि नवीन माहिती समोर येताच जनतेला अपडेट करेल. संपूर्ण प्रकरण अजूनही विकसित होत आहे आणि संबंधित एजन्सी गोळा केलेल्या प्राथमिक माहितीचे विश्लेषण करत आहेत.

IndiGo Airlines प्रकरणात केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; होणार उच्चस्तरीय चौकशी Read More »

maharashtra election comission

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा

Maharashtra Election : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध  घेऊन योग्य ती दक्षात घ्यावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी सांगितले. काकाणी यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

rajesh agarwal

Rajesh Agarwal : राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; ‘या’ दिवशी स्वीकारणार पदभार

Rajesh Agarwal : सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर हे आहे. त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिम विषयामध्ये बी.टेक केले आहे. राजेश अग्रवाल यांनी सेवाकाळात सहायक जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला येथे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे उप विशेष आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, भारत निवडणूक आयुक्त कार्यालयात संचालक, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, इंटर्नल एक्स्चेंज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय मुंबई येथे कृषी आणि मत्स्यव्यवसाय विभागात सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात सचिव (अतिरिक्त कार्यभार), वित्त विभागात सचिव, सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), वित्त विभागात लेखा व कोषागारे विभागात सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार, वित्त विभागात सचिव (लेखा व कोषागारे)(व्यय – अतिरिक्त कार्यभार), केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण), पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागात सचिव, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागात सचिव, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

Rajesh Agarwal : राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; ‘या’ दिवशी स्वीकारणार पदभार Read More »

ram khade

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांच्यावर नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र आता देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक Read More »

pune crime

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल

Pune News : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात देखील महिलांवर अत्याचारासारखे घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेने पुरुषावर गुंगी आणणारे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केल्या असल्याची घटना घडली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील 47 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणाची ओळख तुळजापूर येथे देवदर्शनादरम्यान आरोपी महिलेशी झाली. सुरुवातीला ‘भाऊ’ म्हणून तिने पीडित तरुणाच्या कुटुंबाशीही जवळीक वाढवली. पुढे वारंवार संपर्क साधत ती त्यांच्या घरात येऊन राहू लागली. घरात राहत असताना त्या महिलेकडून पीडिताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास विरोध केल्यानंतर पीडिताने तिला घर सोडण्यास सांगितले. नंतर माफी मागत ती महिलेला चंदगडसाठी निघाली मात्र बसस्थानकात आल्यानंतर सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला म्हणाली की मला वॉशरुमला जायचे आहे. तसेच मी उघड्यावर जात नाही म्हणत ती एका लॉजवर गेली आणि तरुणालाही आत बोलावून स्वतःला उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगत तुम्हाला मदत करेन तुमच्या मुलाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरीला लावले असे सांगत त्याच्यावर मानसिक दबाव टाकला मात्र तो रागाने निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा तिने पीडिताच्या पत्नीला फोन करून त्याला ‘काशी दर्शनासाठी भाऊ म्हणून’ सोबत घेऊन जाते असे सांगून त्याला 25 फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलावले. तक्रारीनुसार, कोथरूडमधील तिच्या घरी तरुणाला काहीतरी प्यायला दिले त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. विरोध केल्यावर धमकी देण्यात आली मी म्हणेल तसेच करायचे नाहीतर इथेच काहीतरी करेन असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे मला काशीला नेले त्यांनतर काशीत तीन दिवस बळजबरीने ठेवत शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडिताने केला आहे. पत्नीशी संपर्क झाल्यानंतर तिने या महिलेला फोनवर सुनावले, त्यानंतर काही दिवस फोन आला नाही मात्र त्यानंतर आरोपी महिलेकडून दोन लाख रुपयांची मागणी व फोटो व्हायरल करण्याची धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोथरूड परिसरात आणि शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल Read More »

img 20251122 wa0004

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल…

Pune News : स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये प्रामाणिक पणाची सुद्धा कमी नाही. कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या तत्त्वांवर आयुष्य जगणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अशीच एक प्रामाणिकपणाची आणि पैशांचा लोभ नसणाऱ्या पुण्यातील कचरावेचक मंजू माने यांची कथेची पुण्यात जोरदार चर्चा आहे. सदाशिव पेठेत कचरा वेचत रोजची कष्टाची लढाई लढणाऱ्या अंजू माने यांचा प्रामाणिकपणा पाहून संपूर्ण परिसर थक्क झाला आहे. 20 नोव्हेंबरची सकाळ… साधारण सात वाजता अंजूताई नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा गोळा करत होत्या. त्याचवेळी रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली. ‘कशाची तरी औषधांची पिशवी असेल’ असा साधा अंदाज करून त्यांनी ती बॅग उचलून फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली. पण नंतर जे दिसलं ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकावी! बॅगेत औषधांसोबत तब्बल दहा लाख रुपये होते. त्या क्षणी पैशाचा लोभ न होता, ‘ही कोणाच्या तरी आयुष्यभराची कमाई असेल’ एवढाच विचार अंजूताईंच्या मनात आला. वीस वर्षांपासून या भागात कष्टाने काम करत असल्यामुळे त्यांना इथलं प्रत्येक घर ओळखीचं. त्यांनी लगेचच लोकांना विचारपूस सुरू केली. तेवढ्यात एक नागरिक अतिशय अस्वस्थ होऊन काहीतरी शोधताना दिसला. अंजूताईंनी त्याला बसवून आधी पाणी दिलं, शांत केलं… आणि त्यांची बॅग हरवली आहे का ते विचारलं. तोंडातून शब्दच फुटेना! खात्री पटल्यावर अंजूताईंनी ती बॅग त्याच्याकडे परत दिली पैशाचा एक नोटही कमी न करता. या प्रामाणिकपणामुळे त्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं आणि आसपासच्या नागरिकांच्या मनात अंजूताईंबद्दल प्रचंड आदर. लोकांनी स्वखुशीने साडी, थोडी रोख आणि भरभरून कौतुक देत त्यांचा सत्कार केला. अंजू माने यांची ही कृती म्हणजे खरा मानवीपणा कसा असतो याचं जिवंत उदाहरण. कष्टाची कामं करत असली तरी मन मात्र सोन्यासारखं हीच पुण्याची खरी शान. लाखो रुपयांची हाव मनात न ठेवता पैशांची बॅग परत करणाऱ्या अंजुमाने यांनी खरे लखमोलाची माणसं कशी असतात याच दर्शन घडवलं….

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल… Read More »

anagar nagar panchayat

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले

Anagar Nagar Panchayat : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी अनगर नगरपंचायत आता बिनविरोध झाली आहे. मात्र राजकारण काही थांबताना दिसत नाही. अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही अशी टीका उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांनी केली आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिला होता मात्र त्यानंतर जाहीर माफी देखील मागितली होती. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवारांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही, सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं त्यामुळे निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आता अशा पोकळ चॅलेंज करू नका. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे पाटील नाचतोय मात्र ही नगरपंचायत कोणी दिली..? त्यावेळेस अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा, अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी अजित पवारांकडे बाळराजे गेला होता. ज्या वेळेला यांच्या बँकेकडे पैसे नव्हते, त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे राजन पाटील आणि बाळराजे पाटील हे भीक मागत गेले होते अशी टीका उमेश पाटील यांनी केली. तर दुसरीकडे आज अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे होत्या. मात्र त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती त्यामुळे मी आक्षेप घेतला त्याचबरोबर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असला, तरी मी निवडणुकीतून माघार घेणार आहे आम्ही राजन पाटलांचीच माणसं आहोत, त्यांच्या विचारानेच काम करतो. अर्ज माघारी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले Read More »