DNA मराठी

Maharashtra

Election Commission

Baramati Assembly by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हालचाल सुरू ; विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

Baramati Assembly by-election : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २०१–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Baramati Assembly by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हालचाल सुरू ; विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला

Sujay Vikhe: राहुरीत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली. “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो,” असे सांगत त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. काम करताना गोड बोलण्यापेक्षा थेट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. नगर मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. “थोडा त्रास सहन करा, प्रश्न कायमचा सुटेल” काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र त्यानंतर नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विकासकामांना अडथळे निर्माण होऊ नयेत, यावर भर दिला. समस्या ऐकून थेट आदेश बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करत कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समस्या सोडवणे हाच उद्देश अनेक तांत्रिक अडचणी असूनही हे काम सुरू आहे. सध्या आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे” “मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल, आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. अजित पवार यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाची आठवण नगर मनमाड महामार्गावरील दीर्घकाळापासून प्रलंबित व नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या समस्यांवर आयोजित बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. कोणतीही तडजोड न करता त्यांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे अनेकांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निर्णयक्षम बैठकीची आठवण झाली.

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला Read More »

Police

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Ahilyanagar News : प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली. या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील १४ तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण २०२१ वाहनांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्या ४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या ६ लाख ४६ हजार रुपये दंडापैकी ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. “जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई Read More »

shivendra raje bhosale

Shivendra Raje Bhosale: “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे!”; शिवेंद्रराजे साताऱ्यात बरसले

Shivendra Raje Bhosale : साताऱ्यातील करहरमध्ये शिवेंद्रराजेंनी जोरदार हल्लाबोलकरत ‘पुनर्रचना देवाभाऊच करणार, गैरसमज ठेवू नका’ असा ठणकावून इशारा विरोधकांना इशारा दिला. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही!”असे ज्वालाग्राही शब्द उच्चारत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या करहर येथील प्रचारसभेत शिवेंद्रराजे भोसले अक्षरशः बरसले. त्यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट इशाऱ्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांना थेट उत्तर देत शिवेंद्रराजेंनी रणसिंघ फुंकला. सन 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जावळी तालुक्याची विधानसभा निहाय पुनर्रचना होणार, आणि त्यातून आपल्याला पुन्हा संधी मिळणारअशी दिवास्वप्नं काही नेत्यांना पडू लागली आहेत, असा टोला लगावत शिवेंद्रराजे म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो ही सगळी पुनर्रचना महाराष्ट्राचा बॉस देवेंद्र फडणवीसच करणार. देवाभाऊ माझा नेता आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज पाळू नका.” या शब्दांतून त्यांनी नेतृत्वावरील निष्ठा आणि राजकीय दिशा ठामपणे मांडली. तर ठेकेदारीच्या आरोपांवर विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेला थेट न्यायालयीन वास्तवासह प्रत्युत्तर देत करहर येथील प्रचारसभेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार हल्लाबोल केला. नवी मुंबईतील मार्केट कमिटीच्या शौचालय बांधकाम प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी थेट आरोपपत्र दाखल असल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “ज्यांच्यावर कोर्टात कारवाई सुरू आहे तेच आज आम्हाला नैतिकतेचे धडे देत आहेत.”नाव न घेता शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधताना शिवेंद्रराजे म्हणाले की, ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कागद न्यायालयात आहेत, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. आमच्यावर आरोप करण्याची पात्रता त्यांनी केव्हाच गमावली आहे. शिवेंद्रराजे यांनी या प्रकरणातील सविस्तर माहिती केरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याकडे असल्याचेही ठामपणे सांगितले, ज्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली. 7 फेब्रुवारी रोजी 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापालिका निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भाजप बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Shivendra Raje Bhosale: “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे!”; शिवेंद्रराजे साताऱ्यात बरसले Read More »

maharashtra election comission

Zilla Parishad Election : उरलेल्या झेडपी निवडणुकांचे भवितव्य लांबणीवर? जाणून घ्या सर्वकाही

Zilla Parishad Election : प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणासंबंधीची सुप्रिम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेल्याने आता २३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार सुनावणी होणार आहे. बराच काळ रखडलेली ही सुनावणी २१ जानेवारीला होणार होती. त्यावेळी ती लांबणीवर पडून २७ जानेवारीला ठेवण्यात आली. नंतर ४ फेब्रुवारी तारीख पडली. मात्र आता पुन्हा ती लांबणीवर पडली असून २३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे उरलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे काय होणार, याचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करु नयेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद १६ (घ) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, परिच्छेद १६ (ग) अन्वये ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही,अशी माहिती डुडी यांनी दिली आहे. ‘मताधिकार’ मोबाईल ॲप उपलब्ध राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल ॲपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Zilla Parishad Election : उरलेल्या झेडपी निवडणुकांचे भवितव्य लांबणीवर? जाणून घ्या सर्वकाही Read More »

img 20260205 wa0000

Congress on China: चीन प्रश्नी मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेसची मोठी मागणी

Congress on China : चीन प्रश्नी मोदी सरकारचा गलथानपणा आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या निषेधार्ह मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालय, राजीव गांधी भवन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी “नरेंद्र सरेंडर हो गया” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. केंद्रातील मोदी सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून तात्काळ उत्तरांची मागणी केली. देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर मोदी सरकार मौन बाळगत असून सत्य दडपले जात आहे. गलवान प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय लपवत आहे. असा प्रश्न उपस्थित करून चीन प्रश्नावर मोदी सरकारने देशाला स्पष्ट उत्तर द्यावे तसेच माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावे अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केली आहे. २०२० मधील चीन संघर्षासंदर्भात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलेल्या गंभीर खुलासांवर संसदेत बोलण्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आल्याने देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लष्कराच्या स्पष्ट सूचनांनंतरही मोदी सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यामुळे आपल्या शूर जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. या जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा देत युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही झीनत शबरीन यांनी म्हटले आहे.

Congress on China: चीन प्रश्नी मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेसची मोठी मागणी Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

eknath shinde

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सामील करून आपली ताकद वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन आणि शरद पवार गटातील एक नगरसेवक शिंदे गटात अधिकृतपणे सामील होण्याची तयारी करत आहेत. हे चार नगरसेवक आता बीएमसीमध्ये संयुक्त विधिमंडळ गट म्हणून स्थापन केले जात आहेत. या नवीन राजकीय समीकरणांतर्गत, महायुती आघाडी बीएमसीमध्ये दोन स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करेल. भाजप स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करेल, तर शिंदे यांची शिवसेना संयुक्त गट म्हणून नोंदणी करेल, ज्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शरद पवार गटातील नगरसेवक एकत्र येतील. या फेरबदलानंतर, बीएमसीमध्ये शिंदे सेनेची संख्या 29 वरून 33 पर्यंत वाढेल. शिवसेनेच्या गटातील नगरसेवकांची संख्या वाढल्याने बीएमसीमधील नेतृत्व आणि महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव आणखी मजबूत होईल. दरम्यान, महायुती आघाडीची एकूण संख्या आता 122 नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. भाजपचा वाढता दबाव बीएमसीमध्ये वाढत्या शिवसेना (शिंदे गट) गटामुळे त्यांच्या मित्रपक्ष भाजपची चिंता वाढली आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने, बीएमसी धोरणात्मक निर्णयांवर आणि नेतृत्वावर शिंदे गटाचा प्रभाव आणखी मजबूत होईल. बीएमसी महापौरपद आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्वावरून दोन्ही पक्षांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे. वाढत्या ताकदीमुळे, शिंदे सेना आपला दावा अधिक आक्रमकपणे मांडू शकते, ज्यामुळे भाजपच्या एकतर्फी वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मुंबई बीएमसी निवडणुकीत या वर्षीचा जनादेश भाजप युतीसाठी ऐतिहासिक ठरला आहे. महायुतीने प्रचंड विजय मिळवला आणि ठाकरे कुटुंबाची जवळजवळ तीन दशकांची पकड मोडून काढली. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकूण 118 जागा जिंकल्या, त्यापैकी एकट्या भाजपने 90 जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष बनला. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी (यूबीटी) ही निवडणूक निराशाजनक ठरली. पक्षाला मागील निवडणुकीत 84 जागांवरून 65 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) उद्धव सेनेसोबत युती करून 53 जागा लढवूनही केवळ सहा जागा मिळाल्या.

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र Read More »

img 20260202 wa0016

Pimpari Chinchwad Municipal Corporation : उपमहापौर पदाच्या निवडीत पिंपरीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट: भाजपने दुसरा उमेदवार अन् राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल

Pimpari Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपने महापौर पदासाठी रवी लांडगे यांचे नाव जाहीर करताच अनेक घडामोडी घडल्या. महापौर पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शितल उर्फ गोरख शिंदे यांच्या नावाचे पत्र पाठवले. त्यानंतर मोठे नाराजी नाट्य घडले. शितल उर्फ गोरख शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास नकार दिला. ते महापौर किंवा स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र, उपमहापौर पदासाठी नाव आल्याने ते नाराज झाले आणि पालिकेतून निघून गेले. त्यानंतर भाजपने शर्मिला बाबर यांचे नाव निश्चित केले. त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. शितल उर्फ गोरख शिंदे यांनी नकार दिल्यानंतर कैलास कुटे, संजय काटे यांची नावे चर्चेला आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपकडून ही महिला उमेदवार देण्यात आला. त्यानंतर शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर सहा तारखेला उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. त्यामध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येईल कारण भाजपकडे 85 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 37 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत गेली तर त्यांना उपमहापौर पद मिळू शकते. अशी चर्चा आहे. मात्र, या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. पिंपरी भाजपमध्ये सगळे काही आलबेल नाही आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे हे महापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र, प्रदेश पातळीवरून त्यांचे नाव न आल्याने ते नाराज होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांचा महापौर पदासाठी चा अर्ज भरताना गैरहजर होते. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात झाली.

Pimpari Chinchwad Municipal Corporation : उपमहापौर पदाच्या निवडीत पिंपरीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट: भाजपने दुसरा उमेदवार अन् राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल Read More »

sujay vikhe

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी ज्योती गाडे यांची सव्वा वर्षासाठी झालेली निवड केवळ महापालिकेपुरती मर्यादित राजकीय घटना मानणे भोळेपणाचे ठरेल. ही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तावाटपापेक्षा अधिक, जिल्ह्यातील येऊ घातलेल्या राजकीय हालचालींचा पूर्वसंकेत आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिक अर्थवाही ठरते. राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री असताना, भाजपचे जिल्ह्यातील राजकारण विखे कुटुंबाच्या अवतीभवती फिरत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचवेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या वाढत्या हालचाली, विशेषतः राहुरी मतदारसंघातील घाटाखालच्या गावांतील सततचे दौरे, गाठीभेटी आणि सामाजिक संपर्क, हे सगळे केवळ योगायोग म्हणून पाहता येणार नाही. राहुरी मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे पारंपरिक वर्चस्व आहे. ‘मारणारा-मानणारा’ असा मोठा वर्ग आजही या घराण्याशी जोडलेला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कोणतीही मोठी संस्थात्मक उभारणी न करता, केवळ जनसंपर्क, उपस्थिती आणि व्यक्तिगत नात्यांच्या जोरावर या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली होती. बाणेश्वर संस्थेपुरते मर्यादित कार्यक्षेत्र असतानाही, जनतेशी थेट संवाद ठेवत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय अवकाश तयार केला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. याच पोकळीतून भाजपकडून स्वर्गीय आमदारांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव पुढे येत आहे. सहानुभूतीचा घटक, कर्डिले घराण्याची ओळख आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राजकारणात सहानुभूती ही कायमस्वरूपी भांडवल ठरत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. याचवेळी माजी खासदार सुजय विखे किंवा धनश्री विखे यांची नावे चर्चेत असणे, हे भाजपच्या अंतर्गत सत्तासंतुलनाचे सूचक आहे. ‘विखे की कर्डिले’ ही चर्चा केवळ व्यक्तींची नाही, तर जिल्ह्यात भाजपचा चेहरा कोण असावा, याविषयीची आहे. महापालिकेतील घडामोडी याच संदर्भात पाहाव्या लागतील. महानगरपालिकेच्या सत्तेचे सूत्र आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्यावर देण्यात आले होते. महापौर निवडीपासून ते सत्ता-समीकरणांपर्यंत, अंतिम निर्णय त्यांच्याच भूमिकेवर अवलंबून राहिला. अशा परिस्थितीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या आणि गाडे कुटुंबाची सून असलेल्या ज्योती गाडे यांची महापौरपदी निवड, ही केवळ कौटुंबिक किंवा स्थानिक समतोल साधणारी बाब नाही, तर कर्डिले गटाला दिलेला एक राजकीय ‘संकेत’ म्हणूनही पाहिली जात आहे. त्याचवेळी विखे पाटील घराण्याचे नाव या निवडीभोवती फिरणे, हे सत्तेतील अदृश्य हात स्पष्ट करते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार आणि माजी मंत्री प्रसाद तनपुरे हेही या सगळ्या गणितात एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांनी जर “तीन वर्षांसाठी आमदार व्हायचे कशाला?” असा राजकीय निर्णय घेत माघार घेतली, तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अशा माघारीचा निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून, तो व्यापक राजकीय भाग असू शकतो. अहिल्यानगरच्या महापौरपदाची निवड त्यामुळे एका नगरसेविकेपुरती मर्यादित राहत नाही. ती राहुरीच्या आगामी पोटनिवडणुकीचा ट्रेलर ठरते. सत्तेची केंद्रे, घराणी, सहानुभूती आणि संधीसाधूपणा या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर आज जिल्ह्याचे राजकारण उभे आहे. प्रश्न एवढाच आहे की, या संघर्षात जनतेचा मुद्दा केंद्रस्थानी राहतो की पुन्हा एकदा सत्ताकारणाचाच खेळ वरचढ ठरतो? अहिल्यानगरच्या राजकारणाचे उत्तर लवकरच राहुरीच्या रणांगणात मिळणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ Read More »