DNA मराठी

dna marathi

landslide

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी

Mumbai Rain: शुक्रवार रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी 16 व 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी Read More »

manoj jarange

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

sawedi land scam officer land mafia satellites, political blessings and the whole land game

सावेडी जमीन घोटाळा : अधिकारी–भूमाफिया साटेलोटे, राजकीय आशीर्वाद आणि संपूर्ण जमिनीचा खेळ

Sawedi land scam – अअहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात नगर मनमाड महामार्गावर ओढ्या जवळ लागून असलेल्या, आणि जुना हाडांचा कारखाना तिथे पूर्वी नागरिकही जायला घाबरत, मात्र म्हणतातना पैस्या पुढे भूतही नाचतात तसे काहीसे हे प्रकरण, १३५ गुंठे असलेली हि जमीन, स. नं. २४५/ब२ मधील फेरफार क्र. ७३१०७ हे प्रकरण केवळ एका कागदावरची नोंद नसून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी, संशयास्पद व्यवहार, आणि कायद्याच्या थेट उल्लंघनाचं जिवंत उदाहरण आहे. ३४ वर्षांपूर्वी झालेल्या खरेदी दस्तावर कुळकायद्याचा भंग करून फेरफार मंजूर केला गेला, तोही कोणत्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाविना. प्रशासनाच्या नोंदी सांगतात — १९९१ सालच्या खरेदीखतातील जमीन ही त्यावेळी अस्तित्वात नसलेल्या सर्वे नंबरांवर दाखल करण्यात आली. वाटपाचे आदेश १९९२ मध्ये झाले, पण खरेदीखतामध्ये त्यांचा उल्लेख नाही. आणखी गंमत म्हणजे, या दस्तामध्ये लागवडीयोग्य क्षेत्र शून्य दाखवून पोटखराब क्षेत्रावर व्यवहार करण्यात आला. महसूल अधिकाऱ्यांनी खरेदी देणाऱ्याचे नाव देखील तपासले नाही; प्रत्यक्षात ७/१२ वर त्या नावाचा संबंधच नव्हता. महसूल प्रक्रिया इतकी उथळ रीत्या पार पडली की, ३४ वर्ष जुन्या दस्तावरील फेरफार मंजुरीवेळी ना मुळ ७/१२ पाहिले, ना खरेदीदाराचा शेतकरी पुरावा घेतला. कुळकायदा कलम ६३ चे पालन झालेले नाही. खरेदी दस्त नोंदणीवेळी सुद्धा ७/१२ संलग्न नव्हते, आणि महसूल दप्तरी त्याची तपासणी केली गेली नाही. या प्रकरणाचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे — महसूल विभागाने स्वतःच्या अधिकार मर्यादा ओलांडत दस्तातील छेडछाड स्वीकारली. नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचा अधिकार केवळ दिवाणी न्यायालयाला असूनही महसूल कार्यालयाने प्रत्यक्षात त्या दस्ताची दखल घेतली आणि नोंद केली. ही प्रक्रिया केवळ गैरव्यवहाराला आमंत्रण देणारीच नाही तर कायदेशीरदृष्ट्या ही धोकादायक पायंडा घालणारी आहे. इतकेच नाही, तर या जमिनीच्या पीकपाहणी नोंदींवरून दिसते की १९३० ते २०१७ या ८७ वर्षांच्या काळात ही जमीन कारखाना व पडीक स्वरूपात होती. यामुळे महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ चे कलम ४५ आणि कुळकायदा कलम ६५(२) अंतर्गत कारवाई आवश्यक आहे. यावरून मुळ खातेदार आणि व्यवहारातील सहभागी दोघांनाही कायदेशीर जबाबदारीस सामोरे जावे लागेल. प्रशासनाची कारवाई येथून पुढे केवळ फेरफार रद्द करण्यापुरती मर्यादित राहू नये. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, मंडळाधिकारी आणि खरेदीदार-पक्ष या सर्वांवर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. तसेच, महसूल विभागातील फाईल वळवणारे, तपासणीत हलगर्जी दाखवणारे व अधिकार मर्यादेचा भंग करणारे अधिकारी यांची जबाबदारी ठरवून त्यांच्यावरही शिस्तभंगात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. हे प्रकरण केवळ सावेडीपुरते मर्यादित नाही. महसूल विभागाच्या यंत्रणेतील अशा प्रकारचे फेरफार-घोटाळे जिल्हाभरात किती झाले आहेत, याची तपासणी न झाल्यास “फाईल फिरली की जमीन विकली” हा प्रकार सुरूच राहील. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पारदर्शकतेसाठी नवे निकष ठरवले नाहीत, तर ‘फेरफारातला फेरफार’ हा नव्या घोटाळ्यांचा पाया ठरेल. सावेडी सर्वे नं. २४५ : ९० वर्षांची जमीनकहाणी! अहिल्यानगर तालुक्यातील मौजे सावेडी येथील सर्वे नं. २४५ (जुना नं. २७९ब) या जमिनीचा प्रवास गेल्या ९० वर्षांत अनेक मालकांच्या, वारसांच्या, खरेदी-विक्रीच्या आणि फेरफारांच्या फेरधडाक्यातून गेला आहे. एकूण १.३५ हे.आर क्षेत्राची ही जमीन १९३० पासून आजपर्यंतच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये झालेल्या सर्व बदलांचा मागोवा घेतला असता खालील चित्र उभे राहते, १९३७ : पहिली वारस नोंद १५ फेब्रुवारी १९३७ रोजी फेरफार क्र. ४७६ अंतर्गत “वारस” म्हणून मयत दायाभाई वेलजी खोजा यांच्या वारसांची नोंद झाली. १९६५ : पुढील पिढीचा हक्क १२ जुलै १९६५ रोजी फेरफार क्र. २२३० अंतर्गत दायाभाईंची मुले मुसा दायाभाई आणि अब्दुल अजीज दायाभाई यांची नावे आली. त्यानंतर मयत मुसा दायाभाईंच्या हिस्स्याचे वारस पुतणे – डायाभाई अब्दुल अजीज आणि कासम अब्दुल अजीज – प्रत्येकी ३३.२ गुंठे हक्काने मिळाले. १९६५ : ‘पोकळीस्त’ नोंद १७ ऑक्टोबर १९६५ रोजी फेरफार क्र. २२७६ मध्ये “पोकळीस्त” म्हणून पारुबाई रामजी वामन यांची नोंद घेतली गेली. १९७१ : दशमान पद्धती लागू २३ जुलै १९७१ रोजी दशमान पद्धतीनुसार क्षेत्र मोजणी झाली. जमीन १.३५ हेक्टर अशी नोंदवली गेली. १९८७ : सर्वे नंबर बदल ३१ डिसेंबर १९८७ रोजी फेरफार क्र. ९७७६ नुसार जुना सर्वे नं. २७९ब बदलून नवीन सर्वे नं. २४५ झाला. १९९२ : भावंडांमध्ये वाटप १४ जुलै १९९२ रोजी फेरफार क्र. १४६७६ अंतर्गत अब्दुल अजीज डायाभाई यांना ०.७२ हे.आर (२४५/ब१) आणि डायाभाई अब्दुल अजीज यांना ०.६३ हे.आर (२४५/ब२) असे वाटप झाले. २००२ : खरेदी व्यवहार २० ऑगस्ट २००२ रोजी २४५/व१ मधील ०.७२ हे.आर अब्दुल अजीज डायाभाई यांनी अजीज डायाभाई आणि साजिद डायाभाई यांना विकले. २०१८ : आकारणी दुरुस्ती ०३ एप्रिल २०१८ रोजी फेरफार क्र. ५४६१३ नुसार २४५/ब२ मध्ये आकारणी दुरुस्तीची नोंद झाली. २०२५ : ताज्या विक्रीची नोंद १७ मे २०२५ रोजी फेरफार क्र. ७३१०७ अंतर्गत डायाभाई अब्दुल अजीज यांनी ०.६३ हे.आर (२४५/व२) पारसमल मश्रीमल शाह यांना विकले. सावेडी जमीन प्रकरण — वादग्रस्त मुद्दे

सावेडी जमीन घोटाळा : अधिकारी–भूमाफिया साटेलोटे, राजकीय आशीर्वाद आणि संपूर्ण जमिनीचा खेळ Read More »

'coolie' vs. 'war 2' — a colorful box office battle

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत

दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दोन वेगवेगळ्या सिनेमाई प्रवाहांचा थरार अनुभवायला मिळत आहे. एका बाजूला हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या “War 2” मधील अ‍ॅक्शन-थ्रिलरचा झंझावात, तर दुसरीकडे रजनीकांतच्या “Coolie” मधील साऊथ इंडियन मास एंटरटेनमेंटचा जादुई प्रभाव पडला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या टक्करने बॉक्स ऑफिसवर एक नवा अध्याय लिहायला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक विरुद्ध व्यावसायिक ब्रँडिंग War 2 हा यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. जागतिक दर्जाच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस, स्टार कास्टची जबरदस्त केमिस्ट्री आणि हॉलीवूडसदृश सादरीकरण या सगळ्यामुळे त्याची प्रतिमा ‘इंटरनॅशनल थ्रिलर’सारखी झाली आहे. मात्र, Coolieचा प्रभाव वेगळा आहे — रजनीकांतच्या करिष्म्याने तयार झालेला एक सांस्कृतिक सोहळा, ज्यामध्ये कथा, गाणी, संवाद आणि फॅन्सचा भावनिक ओघ या सर्वांचा संगम आहे. आकड्यांचा खेळ पहिल्या दिवशी War 2 ने ₹20–21 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली, विशेषतः हिंदी पट्टा आणि तेलुगू प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे. पण Coolieने एडवांस बुकिंगमध्येच ₹51 कोटींचा टप्पा गाठून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. परदेशातील प्रीमियर शोजमध्ये Coolieने War 2पेक्षा अनेक पटींनी अधिक कमाई करून एक स्पष्ट संदेश दिला — फॅनबेसची ताकद कोणापेक्षा कमी नाही. मराठी प्रेक्षकांचे स्थान महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमी या दोन्ही सिनेमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे War 2मधील आधुनिक अ‍ॅक्शनचा थरार त्यांना भुरळ घालत आहे, तर दुसरीकडे Coolieमधील रजनीकांतच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सची मोहिनीही कमी झालेली नाही. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतरच्या आठवड्याच्या शेवटी कोण आघाडीवर राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निष्कर्ष ही स्पर्धा केवळ आकड्यांची नाही, तर भारतीय प्रेक्षकांच्या विविध अभिरुचींची, भाषांच्या पलीकडच्या प्रेमाची आणि स्टारडमच्या अद्वितीय शक्तीची आहे. Coolie आणि War 2 हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या सिनेमाई शाळांचे प्रतिनिधित्व करतात — एक साऊथ इंडियन मास अ‍ॅक्शन, तर दुसरा बॉलिवूडचा जागतिक स्तरावरील थ्रिलर. शेवटी जिंकणारा ठरणार तोच, जो प्रेक्षकांच्या मनात अधिक काळ घर करून राहील.

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत Read More »

पत्रकारास शिवीगाळ,

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकीतोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करणार अहिल्यानगर – शहरातील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक फौजदार टाईम्स चे कार्यकारी संपादक अन्सार राजू सय्यद (वय 51, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना कार्यालयीन आवारात शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबासाहेब बलभिम सानप या व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला असून, फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून कलम 351(2), 352 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. घटनेची पार्श्वभूमीफिर्यादी अन्सार सय्यद हे राज चेंबर्स, कोठला येथे असलेल्या आपल्या कार्यालयात नियमित हजेरी लावतात. त्यांच्या कार्यालयासमोरच आरोपी बाबासाहेब सानप यांचेही कार्यालय आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास फिर्यादींचा ओळखीचा गणेश उरमुले हा कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आला होता. भेटीच्या दरम्यान उरमुले यांनी इमारतीतील शौचालय वापरले. यानंतर सानप यांनी उरमुले यांना बोलावून “तू लघवी केली आहेस, टॉयलेट धुवून घे” असे सांगितले. उरमुले हे पाणी घेऊन टॉयलेट धुण्यास जात असताना सानप यांनी पुन्हा हाक मारून “तू लघवीला तिकडे का गेला?” असे विचारत चापटी मारून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पत्रकार व मुलाला देखील धमकीही घटना फिर्यादींनी कार्यालयातून पाहिली व त्यांनी सानप यांना ओरडले की, उरमुले टॉयलेट धुवून देतील, मारू नका. यावेळी फिर्यादींचा मुलगा अमन सय्यद हा देखील तिथे गेला व दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविला. यानंतर, पार्किंगमध्ये असताना सानप यांनी अन्सार सय्यद यांना विनाकारण शिवीगाळ करत धक्का बुक्की केली, “तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झाला का? तुमची लायकी काय आहे मला माहित आहे,  मी चांगल्या-चांगल्यांना कामाला लावले आहे, आता पुढचा नंबर तुझा” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. या प्रकरणी तोपखाना पोलीस्थाण्य्त गुन्हा दाखल,फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा क्र. 832/2025 दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांच्याकडे दिला आहे. गुन्हा बीएनएस 351(2) व 352 या कलमांखाली नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तक्रार लेखी स्वरूपात नोंदवून रोजनाम्यात नोंद केली आहे. या घटनेने पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पत्रकार संघटनांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; Read More »

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे. सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय? आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते. यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो.. कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात! Read More »

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

Devendra Fadanvis: भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले. या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (297.8 कोटी), नागपूर जं. (589 कोटी), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (17.4 कोटी), जालना (189 कोटी), छत्रपती संभाजीनगर (241 कोटी), रोटेगाव (12 कोटी), अहिल्यानगर (31 कोटी), भायखळा (35.5 कोटी), चिंचपोकळी (52 कोटी), चर्नी रोड (23 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टमिनल (1813 कोटी), ग्रॅट रोड (27 कोटी), लोअर परेल (30 कोटी), मरिन लाईन्स (27.7 कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (16.4 कोटी), मुर्तिजापूर स्टेशन (13 कोटी), बडनेरा (36.3 कोटी), बारामती (11.4 कोटी), दौंड (44 कोटी), केडगाव (12.5 कोटी), परळी वैजनाथ (25.7 कोटी), भंडारा रोड (7.7 कोटी), गोंदिया 40 कोटी), तुमसर रोड (11 कोटी), टिटवाळा (25 कोटी), शेगाव (29 कोटी), बल्लारशाह (31.4 कोटी), चंद्रपूर (25.5 कोटी), चांदा फोर्ट (19.3 कोटी), धुळे (9.5 कोटी), लासलगाव (10.5 कोटी), मनमाड (45 कोटी), नगरसोल (20.3 कोटी), नांदगाव (20 कोटी), आमगाव (7.8 कोटी), वडसा (20.5 कोटी), हातकंणगले (6 कोटी), हिमायतनगर (43 कोटी), हिंगोली डेक्कन (21.5 कोटी), किनवट (23 कोटी), चाळीसगाव (35 कोटी), अंमळनेर (29 कोटी), धरणगाव (26 कोटी), पाचोरा जं. (28 कोटी), दिवा (45 कोटी), मुंब्रा (15 कोटी), शहाड (8.4 कोटी), कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (43 कोटी), लातूर (19 कोटी), जेऊर (20 कोटी), कुर्डूवाडी जं (20 कोटी), फलटण (1 कोटी), वाठर (8 कोटी), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20.4 कोटी), देहू रोड स्टेशन (8.05 कोटी), तळेगाव स्टेशन (40.34 कोटी), मालाड स्टेशन (12.32 कोटी), कुर्ला जं. स्टेशन (28.81 कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (27 कोटी), विद्याविहार स्टेशन (32.8 कोटी), विक्रोळी स्टेशन (19 कोटी), जोगेश्वरी स्टेशन (119 कोटी), माटुंगा स्टेशन (17.3 कोटी), परळ स्टेशन (19.4 कोटी), प्रभादेवी (21 कोटी), वडाळा स्टेशन (23 कोटी), भोकर स्टेशन (11.3 कोटी), धर्माबाद स्टेशन (30 कोटी), मुखेड जं.स्टेशन (23 कोटी), उमरी स्टेशन (8 कोटी), देवळाली स्टेशन (10.5 कोटी), इगतपुरी स्टेशन (12.5 कोटी), धाराशिव स्टेशन (22 कोटी), गंगाखेड स्टेशन (16 कोटी), मनवथ रोड स्टेशन (12 कोटी), परभणी जं. स्टेशन (26 कोटी), परतूर स्टेशन (23 कोटी), पूर्णा जं. स्टेशन (24 कोटी), सेलू स्‍टेशन (23.2 कोटी), हडपसर स्टेशन (25 कोटी), गोधनी स्टेशन (29 कोटी), काटोल स्टेशन (23.3 कोटी), कामठी स्टेशन (7.7 कोटी), नरखेड जं. स्टेशन (37.6 कोटी), कराड स्टेशन (12.5 कोटी), सांगली स्टेशन (24.2 कोटी), लोणंद जं.स्टेशन (10.5 कोटी), सातारा स्टेशन (34.3 कोटी), बेलापूर स्टेशन (32 कोटी), कोपरगाव स्टेशन (30 कोटी), सेवाग्राम स्टेशन (18 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी), हिंगणघाट स्टेशन (22 कोटी), पुलगाव स्टेशन (16.5 कोटी), उरूली स्टेशन (13 कोटी), वाशिम स्टेशन (20.3 कोटी), मलकापूर स्टेशन (19 कोटी), नांदुरा स्टेशन (10.6 कोटी), रावेर स्टेशन (9.2 कोटी), सावदा स्टेशन (8.5 कोटी), दुधनी स्टेशन (22 कोटी), पंढरपूर स्टेशन (40 कोटी), सोलापूर स्टेशन (56 कोटी), नंदूरबार स्टेशन (15 कोटी) आणि पालघर स्टेशन (17.5 कोटी).

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट Read More »

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी

Vijay Wadettiwar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली. परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशीही टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी Read More »

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण

Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी त्यांचे मूळगावी गेल्याने महायुतीमध्ये होणाऱ्या पुढील बैठका दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे जेव्हाही त्यांच्या गावी जातात तेव्हा मोठा निर्णय घेऊन परततात. संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे येत्या 24 तासांत काही मोठा राजकीय निर्णय घेऊन परतणार आहेत. यावेळी त्यांनी दावा केला की शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही पद घेणार नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. संजय शिरसाट म्हणाले, कोणतीही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि एकनाथ शिंदे यांना विचार करण्याची वेळ आली की ते दर्यागावला प्राधान्य देतात. तिथे गेल्यावर ना त्याचा मोबाईल चालतो ना कोणी त्याच्याशी संपर्क साधू शकतो. शांतपणे विचार करून मोठा निर्णय घेऊन ते परतात. शनिवारी सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय जाहीर करू शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतलीयाआधी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर महायुतीचे तिन्ही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. ही बैठक सकारात्मक असल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल, असे सांगितले होते.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »