DNA मराठी

BJP

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे तीन महिन्यात भरणार , मंत्री अतुल सावेंची ग्वाही

Atul Salve : सरकारकडून विविध स्तरांवर दिव्यांग कल्याणासाठी कार्यवाही सुरू आहे. नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विभागीय स्तरावर निर्णय घेण्यात आले असून, आतापर्यंत 33 पदांवर नियुक्त्या झाल्या असून उर्वरित भरती प्रक्रिया सुरू असून पुढील तीन महिन्यात सर्व रिक्त पदे भरण्यात येतील अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, भाई जगताप, परिणय फुके, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, सदाशिव खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पुढील तीन महिन्यांत सर्व जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगून मंत्री सावे म्हणाले की, सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेत पुढील आठवड्यात सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागवण्यात आला आहे. दिव्यांग शाळांना मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या 15 वर्षांच्या कालावधीबाबत शासन सकारात्मक आहे. या निकषांची पूर्तता झालेल्या शाळांना पूर्ण मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी नोकरीमध्ये 5% आरक्षण, परवाना प्रक्रियेमधील अडथळे दूर करणे, तसेच स्थानिक करांमध्ये सूट देण्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सर्व स्तरांवर दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचेही मंत्री सावे म्हणाले.

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे तीन महिन्यात भरणार , मंत्री अतुल सावेंची ग्वाही Read More »

राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना 10 लाख रुपयांची मदत द्या, विजय वडेट्टीवारांची

Vijay Wadettiwar: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन मध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले.

राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना 10 लाख रुपयांची मदत द्या, विजय वडेट्टीवारांची Read More »

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल

Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरु केलेल्या चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ताकदीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचे अधिवेशन आज 1 जुलै रोजी वरळी येथे होणार असून या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या 3 वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आहे. बावनकुळे यांनी संघटनेच्या केलेल्या बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई भाजपा अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सुनील कांबळे, आ. उमा खापरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदींनी चव्हाण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खा. अरुण सिंह यांच्याकडे श्री. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती हेही यावेळी उपस्थित होते. संघटन पर्वा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाच्या 80 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापाठोपाठ मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम 28 जून रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार 30 जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल Read More »

निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

Election Commission : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक जोशी यांच्या उपस्थितीत 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची (Registered Unrecognized Political Parties – RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पक्ष 2019 पासून सहा वर्षांत एकाही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचे कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नाही, असे आढळले आहे. सध्या आयोगाकडे नोंदणीकृत 2800 हून अधिक नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी अनेक पक्षांनी RUPP म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली असून त्यात सध्या 345 पक्षांची निवड झाली आहे. या पक्षांना अन्यायकारकपणे नोंदणी रद्द होऊ नये यासाठी संबंधित राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) या पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर या पक्षांना त्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिली जाईल. अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. देशातील राजकीय पक्षांची नोंदणी ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 29अ अंतर्गत केली जाते. एकदा पक्ष नोंदणीकृत झाला की, त्याला करसवलतीसह अनेक सवलती आणि सुविधा मिळतात. हा संपूर्ण उपक्रम राजकीय व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे. 2019 नंतर एकाही लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकीत भाग न घेणारे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले पक्ष यामध्ये समाविष्ट आहेत. 345 पक्ष हे पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले असून हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू Read More »

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump on India: भारतासोबत मोठी डील होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिका आता काही मोठे व्यापार करार करणार आहे आणि त्यात भारतासोबतचा करार देखील समाविष्ट आहे. असं ट्रम्प म्हणाले. “बिग ब्युटीफुल बिल” या त्यांच्या कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनसोबत करार केला आहे आणि आता पुढचा मोठा करार भारतासोबत होऊ शकतो.” ट्रम्प पुढे म्हणाले, “प्रत्येकजण अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा भाग होऊ इच्छितो. परंतु आम्ही सर्वांशी व्यवहार करणार नाही. आम्ही काही मोठे करार करणार आहोत. आम्ही भारतासाठी दरवाजे उघडणार आहोत.” भारतासाठी दरवाजे उघडतील अमेरिका आणि चीनमधील दीर्घ व्यापार युद्धानंतर करार झाला असताना हे विधान आले आहे. अमेरिका आता भारतासोबतही आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. चीनसोबत कोणता करार झाला? ट्रम्प यांनी चीनसोबतच्या कराराची संपूर्ण माहिती दिली नसली तरी, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की हा करार चीनमधून अमेरिकेत दुर्मिळ पृथ्वी घटकांची वाहतूक जलद करण्याबद्दल आहे. अमेरिका या दुर्मिळ धातूंसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे आणि आता त्यांचा पुरवठा सुरक्षित करू इच्छित आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराची पार्श्वभूमी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी आधीच सांगितले आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी म्हटले होते की, “आम्ही खूप जवळ आलो आहोत आणि लवकरच एक मजबूत व्यापार भागीदारीची घोषणा केली जाऊ शकते.” भारत आणि अमेरिका दोघेही आता एकमेकांसाठी धोरणात्मक भागीदार बनले आहेत, विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावामुळे. या कराराद्वारे, भारताला अमेरिकन बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळू शकतो आणि अमेरिकेला भारतासारख्या मोठ्या ग्राहक देशात आपला व्यापार वाढवण्याची संधी देखील मिळेल.

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा Read More »

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश

Ashish Shelar: गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश Read More »

आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ?भाजप नेते रविशंकर प्रसाद

Ravi Shankar Prasad : आणीबाणीत सर्व देशाचा तुरुंग बनवून विरोधी कार्यकर्त्यांचा छळ केल्याबद्दल, जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करुन सामान्य जनतेवर अत्याचार केल्याबद्दल काँग्रेस नेते माफी मागणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. रविशंकर प्रसाद यांनी केला. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. प्रसाद बोलत होते. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. अमित साटम, मुंबई भाजपा कोषाध्यक्ष किरीट भन्साळी, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. यावेळी खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणीत दीड लाख लोकांना देशभर अटक करण्यात आली होती. जनसंघ, समाजवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांना अटक करून हरयाणात तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच तुरुंगात मोरारजीभाई देसाई यांनाही ठेवण्यात आले होते. मात्र या दोघांना भेटण्याची परवानगी नाकारली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा तुरुंगात शारीरिक छळ करण्यात आला होता . यावेळी खा. प्रसाद यांनी आणीबाणीत झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणी काळात 253 पत्रकारांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 110 पत्रकारांना मिसा खाली तर 110 जणांना संरक्षणविषयक कायद्यानुसार अटक करण्यात आली. 33 जणांना अन्य गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. अनेक ज्येष्ठ संपादकांनाही अटक करण्यात आली होती. 52 विदेशी पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली. ख्यातनाम पत्रकार मार्क टली सह 29 विदेशी पत्रकारांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली गेली. वृत्तपत्रांवर प्रसिद्धी पूर्व निर्बंध (प्री सेन्सॉर शिप) घालण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांना नसबंदीचे उद्दिष्ट ठरवून दिले जात असे. 60 लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेकांचा विवाह झाला नसताना त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली, असेही खा. प्रसाद यांनी नमूद केले. या अत्याचाराबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजवर माफी मागितली नाही, असेही खा. प्रसाद यांनी सांगितले.

आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ?भाजप नेते रविशंकर प्रसाद Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला असेही ते म्हणाले. चंदीगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण  आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला. मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप Read More »

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

Chandrakant Patil:  राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ Read More »