DNA मराठी

BJP

भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर; अरुण मुंडेंच्या कुस्ती मेळ्याला मंत्र्यांची उपस्थिती, आमदारांच्या गटाचा विरोध?

Arun Munde : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आले असून, पक्षातील दोन गटांत वाढता संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या पक्षाचे सरचिटणीस असलेले अरुण मुंडे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी तसेच गोकुळ दौंड यांनी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, भाजपने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच संधी दिली. या पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या शेवगाव शहरातील ‘देवाभाऊ कुस्ती स्पर्धा’ला अरुण मुंडे यांनी संयोजन दिलं. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, यामध्ये भाजपातील अंतर्गत मतभेद अधोरेखित झाले. या कार्यक्रमाच्या बक्षीसवाटप समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महसूल मंत्री व जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. मात्र, जिल्ह्यातील इतर भाजप आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, हे विशेष. या कार्यक्रमाला भाजपमधील काही नेत्यांनी उपस्थित राहू नये यासाठी खुद्द आमदार मोनिका राजळे यांच्या गटाकडून प्रयत्न झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोशल मीडियावरही अशाच आशयाची पोस्ट फिरत होती, ज्यामध्ये “पक्षविरोधात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते हजर का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, व्यासपीठावरून बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “या कार्यक्रमाला येण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केले, त्यामुळे उपस्थित राहणं शक्य झालं,” असं स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानेही अनेकांचे भुवया उंचावल्या. यानंतर, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात भाजपच्या गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे का, हे स्पष्ट होत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फूट आणखी गडद होणार की पक्ष नेमकी भूमिका घेऊन तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर; अरुण मुंडेंच्या कुस्ती मेळ्याला मंत्र्यांची उपस्थिती, आमदारांच्या गटाचा विरोध? Read More »

“मतदान हीच खरी क्रांती : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा” त्यांची टक्केवारी तुमची मृत्यूची वारी

DNA मराठी विशेष लेख Election 2025: – “ज्या दिवशी तुम्ही मुलांचा, नातवांचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून मतदान कराल, तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्यातील तुमच्या पिढीला काहीतरी द्याल,” ही साधी पण खोल अर्थ सांगणारी भावना आजच्या समाजव्यवस्थेसमोर आरसा धरते. देशात किंवा राज्यात निवडणुका जरी वारंवार येत असल्या, तरी ‘मतदान’ या घटकाचा खरी सामाजिक जबाबदारी म्हणून विचार फार कमी वेळा केला जातो. आज जनतेने विचार करायची गरज आहे की, आपण केवळ जात, पंथ, पक्ष, किंवा तात्कालिक फायद्याच्या आधारावर मतदान करत आहोत का? की आपल्या पिढ्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा, आणि नैतिक अधिष्ठानाचा विचार करत आहोत? आज समाजात वाढत चाललेला भ्रष्टाचार, टक्केवारीची रीत, आणि कंत्राटी साखळीतील माफियांची झोपमोड करणारी उपस्थिती, या सर्व गोष्टींचा थेट परिणाम आपण खात असलेल्या अन्नधान्यावर, पिण्याच्या पाण्यावर, आणि शेतीमालावर होत आहे. शेतीमध्ये मारल्या जाणाऱ्या अतिरिक्त कीटकनाशकांपासून ते रासायनिक खतांपर्यंत, दूध आणि शीतपेयांतील रसायनांची मात्रा, आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांतील अपायकारक घटक या सर्व गोष्टी आरोग्यास घातक ठरत आहेत आणि यामागील मूळ कारण म्हणजे नफेखोरीचा हव्यास आणि प्रशासकीय दुर्लक्ष. आज हे निर्णय घेणारे अधिकारी, हे कायद्याचे रक्षक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडून दिले गेलेले लोकप्रतिनिधी हेच सर्व स्वतःच्या अपत्यांच्या भविष्यातील आरोग्याचा विसर पावले आहेत. आज ते भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात, सत्ता गाजवतात, ठेके वाटतात, नियम मोडतात… पण त्यांचेही मूल हीच विषारी फळे आणि विषारी अन्न आणि दुधाचे पदार्थ खाणार आहे, हे वास्तव ते विसरत आहेत. म्हणूनच, एक नागरिक म्हणून, प्रत्येकाने विचार करावा “माझ्या मुलांच्या आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्यासाठी मी कोणाला निवडतोय?” हा प्रश्न फक्त आजच्या राजकारणाला नाही, तर समाजाला प्रश्न विचारण्याची आणि सजग करण्याची एक नवी दिशा ठरतोय. मतदान म्हणजे केवळ बोटावर शाई लावणे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात कुठल्या प्रकारचं अन्न शिजणार आहे, हे ठरवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. “काय खावे राजकारण्यांनी ठरवायचं? का नागरिकांनी?” देशात सध्या एक विचित्र आणि धोकादायक प्रवृत्ती वाढत चालली आहे “कोणत्या धर्माने काय खावे, कुणाच्या घरात काय शिजावे हे राजकारणी ठरवत आहेत!” एखाद्या देशाची ओळख ही त्याच्या विविधतेमुळे असते, त्याच्या खाद्यसंस्कृती, परंपरा, आणि व्यक्तिगत निवडींमुळे असते पण आज काही राजकारणी व्यक्तिशः पातळीवर जाऊन, धर्माच्या आधारावर ताटात काय असावे याचेही राजकारण करत आहेत. धर्म, जात, परंपरा या प्रत्येकाचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र एखाद्या धर्माला धक्का लागतो म्हणून दुसऱ्या धर्मातील अन्नपदार्थावर बंदी घालणे, किंवा त्यास राजकीय मुद्दा बनवणे, हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही. दुर्दैव हे की, हेच लोक जेंव्हा प्रश्न येतो विषारी, भेसळयुक्त अन्न, रसायनांनी भरलेल्या पिकांचे, तेव्हा गप्प बसतात. ना ते कृषी कायदे काटेकोरपणे अंमलात आणतात, ना अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करतात, ना फूड सॅम्पलिंग किंवा गुणवत्तेच्या तपासण्या नियमित करतात. साधा प्रश्न आहे “कोण काय खातो, याच्यावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी हे का सांगितलं नाही की, तुम्ही जे खात आहात ते शुद्ध आहे की नाही?” काहींना कोणती भाजी खावी हे सांगणाऱ्या नेत्यांनी कधीही हे सांगितले नाही की, त्या भाजीत किती किटकनाशक आहे. दूध पिण्याचा सल्ला देणाऱ्यांनी कधी तपासलं नाही की, ते दूध कोणत्या केमिकल्सने पातळ केलं गेलं आहे. हे दुटप्पीपणं आता सर्वसामान्य जनतेनं ओळखलं पाहिजे. आज गरज आहे ती सजग मतदाराची, जो प्रतिनिधी निवडताना त्याच्या भूतकाळाचा, कार्यशैलीचा, आणि विचारसरणीचा अभ्यास करतो. धर्माच्या आणि ताटातल्या नावावर भांडण लावणारे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात शुद्ध अन्न, स्वच्छ पाणी, आणि सुरक्षित जीवन मिळेल यासाठी आवाज उठवणारे प्रतिनिधी आपल्याला निवडायला हवेत. कारण मतपेढ्या जिंकण्यासाठी पेटवले जाणारे हे विषय उद्याच्या आपल्या पिढीच्या आरोग्यावर पडणाऱ्या परिणामांपासून लक्ष विचलित करणारे आहेत. तर मग ठरवूया आपला प्रतिनिधी असा असावा जो “कोण खाल यावर नाही”, तर “कोण चांगलं खाईल यासाठी” लढा देईल. जागरूक नागरिकत्वाची जाणीव करणारा विचार! आपण ठरवूया – मतदान करताना ‘धर्म’, ‘जाती’, ‘भावना’ यांच्याऐवजी ‘स्वच्छता’, ‘सत्शासन’, ‘नैतिकता’ यांना महत्त्व द्यायचं. कारण भविष्यातील पिढीसाठी आपली हीच निवड आधारभूत ठरणार आहे.

“मतदान हीच खरी क्रांती : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा” त्यांची टक्केवारी तुमची मृत्यूची वारी Read More »

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अहिल्यानगर – “राम शिंदे हे कर्तबगार आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक षडयंत्र रचून पाडण्यात आलं,” असा घणाघात करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा राजकीय भडका उडवला आहे. मात्र, त्यांनी कोणावरही थेट नाव घेऊन आरोप न करता, ‘पण कुणी पाडलं?’ या सवालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. शेवगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “राम शिंदेंनी मैदानात आणि राजकारणात नेहमी झुंज दिली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा पराभव नैसर्गिक नव्हता, तर हे एक संगनमताचे षडयंत्र होतं.“ राजकीय सूत्रांच्या मते, बावनकुळे यांचा हा इशारा पक्षांतर्गत गटबाजीकडे असल्याची शक्यता आहे. मात्र, बावनकुळे यांनी नामोल्लेख टाळल्याने चर्चा आणि तर्कांना अधिक उधाण आलं आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि राम शिंदे समर्थकांनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत, “खरं कुणी पाडलं, हे आता लोकांनी समजून घ्यायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात पुन्हा एकदा खदखद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या आरोपाचा प्रतिध्वनी दिल्लीपासून जिल्हापर्यंत ऐकू येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय भूकंप होतोय का? की केवळ इशारा? या आरोपाच्या पडद्यामागे नेमकं काय? – येणाऱ्या काळात स्पष्ट होईल!

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने तयारी करावी; मंत्री राणे यांचे आदेश

Nitesh Rane: गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदर विभागाने त्यांचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आज वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन जलटॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भागांशी मुंबईचे कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे 40 मिनिटे असणार आहे. या जलटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. या सेवांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. मुंबईतील जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने तयारी करावी; मंत्री राणे यांचे आदेश Read More »

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पण आजही आदिवासी महिलेला रस्त्यावर मूल जन्माला घालावे लागतात, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत

Rohini Khadse : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावातील आदिवासी पाड्यातील एका महिलेने आरोग्य यंत्रणा नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे. यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जपानला मागे टाकत आपला देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे अशा बातम्या कालपरवा पासून आपण मीडियामध्ये ऐकत आहोत. मला वाटत नाही की जपानमध्ये कधी आरोग्य यंत्रणेअभावी एखाद्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे. पण आपल्या भारतात ते घडले आहे तेही आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावात एक महिलेने आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, आमच्या जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, प्रत्येकांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने एका लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे ही शोकांतिका आहे असं त्या म्हणाल्या.

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पण आजही आदिवासी महिलेला रस्त्यावर मूल जन्माला घालावे लागतात, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत Read More »

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला

Maharashtra Rain Alert: राज्याच्या हवामान इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे: १९५६: २९ मे १९६१: २९ मे १९७1: २९ मे २०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान २०२५: २६ मे (सर्वात लवकर!) ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला. पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय २६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद: कुलाबा: १०५.२ मिमी सांताक्रूज: ५५ मिमी मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी सांगितले की, “सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती.” नागरिकांना प्रशासनाचे आवाहन अनावश्यक प्रवास टाळावा पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी २०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला Read More »

Arunkaka Death : नगरचे ‘काका’ हरपले… जाणून घ्या अरुण जगतापांचा राजकीय प्रवास

Arunkaka Death – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील तसेच माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विविध स्तरातून प्रार्थना सुरू होत्या. मात्र आज पहाटे त्यांचे प्राणज्योत मालवली. अरुण काकांचा राजकारणातील प्रवास नगराध्यक्ष ते आमदार अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केली. ते अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, तसेच सलग दोन वेळा विधान परिषदेचे आमदार, तसेच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. काकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं होत मात्र नगर शहर मतदारसंघातून त्यांना दोनदा पराभवला समोरे जावे लागले. पराभवाने खचून न जाता त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच संग्राम जगताप यांना महापौरपदावर विराजमान करून आपली राजकीय वारसा पुढे नेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांनी अहमदनगरच्या राजकारणाला दिशा दिली. काही काळासाठी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी सहा महिन्यांतच त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परत येऊन आपली निष्ठा सिद्ध केली. राजकारणाबरोबरच क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील ठसा अरुण काका हे केवळ राजकारणी नव्हते, तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे, गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडली. काकांच्या इतर आवडी निवडी एक अभ्यासू व संयमी राजकारणी अशी ओळख असलेल्या अरुण काका यांची राजकारणाबाहेर देखील एक वेगळीच छाप आहे. काकांना घोडेस्वारीची विशेष आवड होती. शेती, उद्योग, आणि हॉटेल व्यवसायात त्यांची खास रुची होती, ज्यामुळे ते केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांशीही घट्ट नातं निर्माण करू शकले. मुलांना दिला राजकीय वारसा माजी आमदार राहिलेले अरुण जगताप यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीन वेळा नगर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या सूनबाई शितल संग्राम जगताप या नगरसेविका, तर काकांचे दुसरे सुपुत्र सचिन जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तर सचिन यांच्या अर्धांगिनी सुवर्णा सचिन जगताप जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. अरुण काका यांच्या कुटुंबाने त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा यशस्वीपणे पुढे चालवला आहे.

Arunkaka Death : नगरचे ‘काका’ हरपले… जाणून घ्या अरुण जगतापांचा राजकीय प्रवास Read More »

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे. भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की , “ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.” शासनाच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १००% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी पुढीलप्रमाणे, कंसात गुण सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे (९२.००), नागपूर (७५.८३), नाशिक (७४.७३), पुणे (७४.६७), वाशिम (७२.००) सर्वोत्तम महापालिका आयुक्त उल्हासनगर (६५.२१), पिंपरी-चिंचवड (६५.१३), पनवेल (६४.७३), नवी मुंबई (६४.५७) सर्वोत्तम पोलिस आयुक्त मीरा भाईंदर (६८.४९), ठाणे (६५.४९), मुंबई रेल्वे (६३.४५) सर्वोत्तम विभागीय आयुक्त कोकण (७५.४३), नाशिक (६२.२१), नागपूर (६२.१९) सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक कोकण (७८.६८), नांदेड (६९.८७) सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग महिला व बाल विकास (८०.००), सामाजिक न्याय विभाग (७७.९४), कृषी (६६.५४), ग्रामविकास (६३.५८), परिवहन व बंदरे (६२.२६) सर्वोत्तम आयुक्त / संचालक संचालक, तंत्र शिक्षण (७७.१३), आयुक्त, जमाबंदी (७२.६६), आदिवासी विकास (७२.४९), राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८), वैद्यकीय शिक्षण (६८.५३) सर्वोत्तम जिल्हाधिकारी चंद्रपूर (६८.२९), कोल्हापूर (६२.४५), जळगाव (६०.६५), अकोला (६०.५८), नांदेड (५६.६६). सर्वोत्तम पोलिस अधीक्षक पालघर (७०.२१), जळगाव (६०.००), नागपूर ग्रामीण (६०.००), गोंदिया (५६.४९), सोलापूर ग्रामीण (५६.००) या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की “या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग Read More »

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले

Manoj Jarange Patil: केंद्र सरकारने आज संपूर्ण देशभरात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती, मात्र केंद्र सरकारने हा जर निर्णय घेतला असेल तर घेऊ द्या, कारण इंग्रजी जनगणना केली होती त्या नंतर जनगणना झाली नाहीच. या जनगणनेमुळे आमच्या समाजाला न्याय मिळेल, ओबीसीने जातीचे आरक्षण खाल्ले होते ते आता उघडे पडले आहे. कोणी किती खाल्ले ते समजेल. जनगणना करणे आवश्यक नाही, सरकारने बार्टी आयोगाचा शिफारसी जरी मंजूर केल्या, तरी भागते सरकारची इच्छा असेल तर नक्की करा. आमचा काही विरोध करण्याची गरज नाही, मात्र यात निष्पक्ष अधिकारी असले पाहिजे. बळजबरी नोंदी करणारे नसावे जाती वादी अधिकारी नसावे. जनगणना करतान कोणते ही जाती भेध करता कामा नाही, व आता आरक्षणाच कोठा सरकारने वाढवला पाहिजे. आयोग निवडतानी चांगले अधिकारी निवडा. असा सरकारला सल्ला देत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करत होतो.

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले Read More »

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai: पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. १ ते ४ मे, २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. ‘पर्यटन पोलीस’ या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील. पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, पर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरूवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल, ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतील, जेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील. पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा दल ठरेल वरदान प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, पर्यटकांसाठी सुरक्षाकवच निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाचे हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल. तसेच पर्यटकांचा पर्यटनाकडे ओघ वाढेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळेल. दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वित यंत्रणा असेल, जी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करेल. पर्यटकांसाठी हेल्पलाइन, माहिती केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ सेवा उपलब्ध होतील. याशिवाय, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल. पर्यटन विभाग पर्यटकांच्या गरजा समजून त्यांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी मजबूत होईल. प्रायोगिक तत्त्वावर ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ १ ते ४ मे २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल २५ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील. या दलासाठी आवश्यक वाहन व्यवस्था आणि अन्य सुविधा पुरविल्या जातील. जवानांकडून योग्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून केली जाईल. या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून अदा केला जाईल. महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन केले जातील. या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात रु. १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई Read More »