DNA मराठी

BJP

kalyan dombivli municipal corporation

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार

Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा यावर सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकामध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा देखील दोघांमध्ये झाली आहे. तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असल्याची देखील माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी

Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे. मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी Read More »

img 20260122 wa0002

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड

Ahilyanagar Municipal Corporation: महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या महानगरपालिका गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजेत्या सर्व 27 नगरसेवकांची बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी झाली. यावेळी गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रकाश भागानगरे यांचा सत्कर करून अभिनंदन केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले,  प्रकाश भागानगरे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि समस्त कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी नूतन गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले, स्व.अरुणकाका जगताप यांच्या आशीर्वादाने व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वसात व बरोबर घेऊन काम करू. महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांचे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करू. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोरुडे, दिपाली बारस्कर, संपत बारस्कर, महेश तवले, संध्या पवार, ज्योती गाडे, गौरी बोरकर, काजल भोसले, हरप्रीतकौर गंभीर, मोहित पंजाबी, सुनिता भिंगारदिवे, कुमार वाकळे, अशा डागवाले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, गणेश भोसले., अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, पोर्णिमा गव्हाळे, गीतांजली काळे, सुनीता कांबळे, वर्षा काकडे, मयूर बांगरे व अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड Read More »

img 20260121 wa0007

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद

Ahilyanagar Municipal Corporation :  अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे अहिल्यानगर नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर ढवण यांना ही निवड श्रद्धांजली ठरत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रथमच एका महिलेला गटनेतेपदाची संधी देत महिला नेतृत्वालाही ठोस व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भाजप पक्षाने पहिल्यांदाच धनगर समाजातील प्रतिनिधीस हे महत्त्वाचे पद देत शहरातील विविध समाजघटकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचण्याचा दिला आहे. ही निवड केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. शारदा दिगंबर ढवण या दिवंगत दिगंबर ढवण यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्या माजी खासदार डॉ  सुजय विखे पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दिगंबर ढवण यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या काळात स्वतः मैदानात उतरून केलेल्या प्रचारामुळे शारदा ढवण यांना मिळालेला जनसमर्थनाचा पाया आज गटनेतेपदाच्या रूपाने अधिक दृढ झाल्याचे दिसते. अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे 25 नगरसेवक निवडून आले असून नामांतरानंतर हे पहिलेच गटनेतेपद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णयक्षम आणि स्पष्ट नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या धोरणात्मक भूमिकांना महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद Read More »

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणूकींचे 19 सामंजस्य करार

Devendra Fadnavis : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रीया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहचणाऱ असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले. तत्पुर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.’ भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी मनोदय भावनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, आगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़, क्वांटम कंम्प्युटींग, डीजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणूकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, बोलणी -चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे. सामंजस्य करार पुढीलप्रमाणे… महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी गुंतवणूक: ५०० कोटी रोजगार : ७५० महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि. क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा गुंतवणूक: ४ हजार कोटी रोजगार : ६ हजार ठिकाण: पालघर/एमएमआर महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स क्षेत्र: स्टील गुंतवणूक: ५६५ कोटी रोजगार : ८४७ ठिकाण: पालघर/एमएमआर एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स रोजगार : ८० हजार. एमएमआरडीए-के. रहेजा गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स रोजगार : एक लाख. एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स रोजगार : २ लाख ५० हजार. एमएमआरडीए-एसबीजी समूह क्षेत्र: लॉजिस्टिक्स गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स रोजगार : ४ लाख ५० हजार. एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स रोजगार : ८० हजार. एमएमआरडीए-जायका धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात क्षेत्र: स्टील गुंतवणूक: २० हजार कोटी रोजगार: ८ हजार. ठिकाण: गडचिरोली महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स गुंतवणूक: १ लाख कोटी रोजगार: १ लाख ५० हजार. ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो. याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्या समेवत देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणूकींचे 19 सामंजस्य करार Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut on BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्व गटांनी ठरवले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती आहे. त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्यांनी आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हस्यजत्रा आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे बघू काय होईल. जे नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे, ते शिवसैनिक आहेत, त्यांना वाटत भाजपचा महापौर होऊ नये त्यांना कितीही कोंडला तरी खूप साधन आहे. दळणवळणाची साधन आहे, संदेश काही जाऊ शकते. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महत्व महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, आम्ही तथास्थ होउन पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन झाला आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्य त्यांचे तरी नगरसेवकांना कोंडून ठेवले, स्वतःला भाई म्हणून घेणारे एकनाथ शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले. महापौर शिवसेनेचा असतो, डूब्लिकेट शिवसेनेचा नाही, ती अमित शाह यांची सेना आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला महापौर शिवसेनेला पाहिजे, असायला हवा ते आम्ही पाहू, मात्र शिंदेंनी मुंबई भाजपला दिली. 29 नगरसेवक कोंडले तो मराठी अस्मितेचा कोंडमारा, एकनाथ शिंदे सोडले तर हे कोणालाच फरक पडणार नाही.

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले? Read More »

nana patole

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी

Nana Patole: राज्यात नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe Patil : नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर! 

Sujay Vikhe Patil : नगर–मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कामाच्या संथ गतीमुळे सकाळ-संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग, तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या. यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थितीत होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे, तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली. वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन” असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले. सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. विखे पाटील यांनी तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले.

Sujay Vikhe Patil : नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर!  Read More »

maharashtra government

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या भुखंडासाठीचे शुल्क माफ

Maharashtra Government: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृति आराखडा कक्ष यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध. (नियोजन विभाग) अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. वाहनधारकांना दिलासा (नगर विकास विभाग) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा – २ (एमयुटीपी -२) साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी. (नगर विकास विभाग) तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ (नगर विकास विभाग) पीएम – ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एक हजार ई- बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता. पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट डेबीट मॅन्डेंट (डीडीएम) द्वारे संबंधित कंपन्यांना खर्चाची रक्कम मिळणार ( नगर विकास विभाग) भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिंवडी ) येथे सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला ७ हेक्टर ९६.८० आर जमीन उपलब्ध करून देणार. व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लॅंट विकीरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे- भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी (महसूल विभाग) यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी ४ हजार ७७५ कोटींची मान्यता. प्रकल्पामुळे पाच तालुकयातील ५२ हजार ४२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी (जलसंपदा विभाग) मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणार. मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी. मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार. ( गृह विभाग) राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलीटी अँण्ड अँडव्हान्समेंटस् – महिमा) स्थापन करण्यास मंजुरी. प्रशिक्षित, कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय व अमंलबजावणीसाठी संस्था काम करणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथील भूखंड देण्यास मान्यता. महामंडळाला मुख्यालयाची व बहुउद्देशीय इमारत उभी करता येणार. ( नगर विकास विभाग)

Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या भुखंडासाठीचे शुल्क माफ Read More »