DNA मराठी

BJP

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन मार्गदर्शक सूचना लागू; Nitesh Rane यांची मोठी घोषणा

Nitesh Rane : मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची महत्वाची अधिसूचना राज्यात लागू करण्याच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, सध्याच्या स्थितीत मत्स्यखाद्य मुख्यतः राज्याबाहेरून आयात करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी व गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने विविध प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्र, पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प, बायोफ्लॉक, रास पद्धती व संगोपन तलाव आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण मत्स्यखाद्याची आवश्यकता आहे. राज्यातील सर्व अनुदानित मत्स्य प्रकल्पांनी केवळ राज्यातील केंद्र पुरस्कृत, राज्य शासनाच्या पथदर्शी, अनुदानित व नोंदणीकृत मत्स्यखाद्य उत्पादकांकडूनच मत्स्यखाद्य खरेदी करणे बंधनकारक राहील, असे मंत्री राणे म्हणाले. या सूचनानुसार मत्स्यखाद्य भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (ISI / BIS / FSSAI ) प्रमाणित असणे गरजेचे आहेत. त्यावर प्रथिन, स्निग्ध, आर्द्रता, कर्बोदके इत्यादी पोषणमूल्यांचे विश्लेषण व उत्पादन तारीख व कालबाह्यता तारीख पॅकिंगवर स्पष्टपणे नमूद असावी. पुरवठ्याच्या वेळी अधिकृत पावती किंवा करबिल (Tax Invoice) देणे अनिवार्य आहे. मत्स्यखाद्य हवाबंद आणि सुरक्षित पॅकिंग असणे गरजेचे असून कोरड्या व स्वच्छ वाहतूक साधनातून पुरवले जावे. पुरवठाधारकाची GST नोंदणी आवश्यक आहे. मत्स्यखाद्य खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. शाश्वत व पर्यावरण पूरक मच्छी खाद्य उत्पादनास प्रोत्साहन देताना या अनुषंगाने गुणवत्तेबाबत शेतकरी व मच्छीमारांच्या तक्रारी आल्यास तात्काळ दखल घेतली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील नविन मार्गदर्शक सूचना लागू; Nitesh Rane यांची मोठी घोषणा Read More »

eknath khadse

तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा.. गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपांची झोड उठवत आपली खदखद व्यक्त केली. प्रफुल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी सांगितले की, “हो, लोढा माझ्याशी बोलत होता. पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे, तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता.” खडसे म्हणाले की, “गुलाबी गप्पा करण्याचं वय आता माझं राहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या विधानावर खोचक प्रत्युत्तर दिलं. त्यांनी महाजनांवर आरोप करत सांगितले की, “तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही.” तसेच, खडसे यांनी महाजन यांच्यावर वैयक्तिक टीकाही करत, “तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्याइतकी देखील राहिली नसती,” अशी जहरी टीका केली. “माझ्या पाच चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी, एवढा दम आहे का?”, असा सवालही खडसेंनी थेट विचारला. भाजपामधील आपला प्रवास आणि त्यांना झालेल्या अन्यायावरही खडसे भावनिक झाले. “मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज आरोप सिद्ध होऊनही काहीजण पक्षात आहेत, आणि आम्ही बाहेर फेकले गेलो,” असं म्हणत त्यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या. “महाजन यांनी मला मंत्रीमंडळातून दूर ठेवण्यासाठी षड्यंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला.” “जोपर्यंत मी मंत्रिमंडळात होतो, तोपर्यंत महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं, म्हणूनच हे सर्व घडलं, असेही खडसे म्हणाले.

तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा.. गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंचा हल्लाबोल Read More »

modi

PM मोदींनी मोडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम; केली ‘ही’ मोठी कामगिरी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजकीय प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले, ज्यामुळे ते भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान (Prime Minister) राहिले. या कामगिरीसह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा विक्रम मागे टाकला आहे, ज्या ४०७७ दिवस पंतप्रधान होत्या. मोदींनी आतापर्यंत सलग २४ वर्षे प्रशासनात सक्रिय भूमिका बजावली आहे. प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून. ही कामगिरी इतर कोणत्याही भारतीय नेत्यासाठी दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे ते स्वतंत्र भारतात जन्मलेले (१९४७ नंतर) इतके दीर्घ कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधींनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत पंतप्रधानपद भूषवले आणि ४०७७ दिवसांचा कार्यकाळ सांभाळला. आता मोदींनी त्यांना मागे टाकले आहे. सलग सहा प्रमुख निवडणुका जिंकल्या पंतप्रधान मोदी हे आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ बिगर-काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत. सलग सहा प्रमुख निवडणुका जिंकणारे ते भारतातील एकमेव नेते आहेत. २००२, २००७ आणि २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुका आणि २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका. तथापि, या यादीत अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru)आहेत, ज्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत एकूण ६१२६ दिवस पंतप्रधान राहून एक विक्रम केला. हा विक्रम मोडण्यासाठी मोदींना अजूनही सुमारे २०४८ दिवस या पदावर राहावे लागेल.

PM मोदींनी मोडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम; केली ‘ही’ मोठी कामगिरी Read More »

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, खरेदी प्रक्रिया योग्यच उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Dhananjay Munde : तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नेमकं प्रकरण काय? राज्य शासनाने 12 मार्च 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDCL) व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन (MSPCL) यांच्यामार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या निर्णयावरून धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा हा शब्द वापरून अनेकांनी मुंडेंची व कृषी विभागाची बदनामी केली होती. या निर्णयाला विरोध करताना Agri Sprayers TIM Association व उमेश भोळे यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका व जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता. राज्य शासनाने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, 2016 मधील DBT योजना व 2023-24 मधील विशेष कृती आराखडा ही दोन्ही योजना स्वतःच्या स्वरूपात वेगळी असून त्यांची उद्दिष्टे ही केवळ शेतकऱ्यांचे हीत एवढेच आहेत. विशेष कृती आराखड्याचा उद्देश शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर पीक उत्पादन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यांचा समावेश असलेले सर्वांगीण पाठबळ देणे हा आहे व तो पूर्णपणे योग्य आहे. शासनातर्फे ॲड. अंतुरकर, ॲड. व्यंकटेश दौंड, ॲड. कुंभकोनी यांनी बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने नमूद केले की DBT योजना व विशेष कृती आराखडा यांचा एकमेकांशी संबंध नाही. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले की याचिकाकर्ते केवळ आपल्या व्यवसायाच्या हितासाठी न्यायालयात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा वापर करून अनेकांनी शासनाच्या तत्कालीन धोरणावर चुकीचे भाष्य करून बदनामी साध्य केली. तर याचिकाकर्ते तुषार पाडगिलवार यांनी न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर करत “फोरम शॉपिंग” केल्याबद्दल 1 लाख दंड ठोठावण्यात आला. हा दंड 4 आठवड्यांत हायकोर्ट विधी सेवा प्राधिकरणाकडे भरावा लागेल; अन्यथा संबंधित जिल्हाधिकाऱ्याद्वारे भूमिकराप्रमाणे वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, खरेदी प्रक्रिया योग्यच उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब Read More »

Bihar Election : मतदार यादीत तब्बल 18 लाख मृत तर 26 लाख स्थलांतरित मतदार; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

Bihar Election : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे १८.६६ लाख मतदार मृत, २६.०१ लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, ७.५ लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १ लाख बीएलओ (BLO), ४ लाख स्वयंसेवक आणि १२ प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले १.५ लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत. आतापर्यंत प्राप्त माहिती : एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४ प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ७,१६,०४,१०२ (९०.६७%) डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%) पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%) मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%) कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%) दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%) न सापडणारे: ११,४८४ (०.०१%) एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%) अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%) याबाबत १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, समावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहे, असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Bihar Election : मतदार यादीत तब्बल 18 लाख मृत तर 26 लाख स्थलांतरित मतदार; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा Read More »

img 20250723 wa0002

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या आजच्या Pandharpur दौऱ्यासाठी स्वागताचे अनोखे पोस्टर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचाविरोध होत असल्याने प्रोजेक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे या प्रोजेक्टला विरोध दर्शवण्यासाठी संतांच्या अभंगातील ओव्यांचा वापर करून पंढरपुरात पोस्टरबाजी करण्यात आली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आहेत. या पार्श्वभूमीवर ” वतन आमची मिराशी पंढरी…” हा संत नामदेव महाराजांचा अभंग पोस्टरवर छापून देवेंद्रजी आपण पंढरपूरची मूळ रचना व संस्कृती कायम ठेवाल असा विश्वास वाटतो, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने हे पोस्टर लावले आहेत. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसरातील 600 घरांचे भूसंपादन प्रस्तावित आहे. याच भूसंपादनाला आता थेट विरोध करण्यासाठी संत वचनांचा वापर करून फडणवीस यांचे स्वागत अनोख्या पोस्टर मधून केले जाते.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या आजच्या Pandharpur दौऱ्यासाठी स्वागताचे अनोखे पोस्टर Read More »

jitendra awhad

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय?

Jitendra Awhad : विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली. मात्र, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली, पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मकोकाचा आरोपी पसार होतो, जो मार खातो त्यांना पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं. रात्री 1 वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे दाखल झाले. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाचे 4 माणसं तुम्ही घेऊन येतात. इथे बॉस अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलेला शब्द जर ते पळत नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा होत आहे. यांचा हा माज उतरवावं लागेल नाहीतर हे एवढे पुढे जातील , तुमच्या जमिनी घेतील आणि तुमच्या आया बहिणीला हात लावतील अशा विचारसरणीचे काही नेते आहेत. असं रोहित पवार म्हणाले. यानंतर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला गेले, मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते. पोलिसांनी आव्हाडांना सांगितले नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलय. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहचले. मात्र, तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आव्हाड यांना कळले की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यानंतर आव्हाड, पवार कार्यकर्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय? Read More »

img 20250716 wa0000

उद्धव ठाकरेंना धक्का, जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: कोल्हापूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह उबाठा तसेच शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की या सर्वांच्या साथीमुळे कोल्हापुरातील विकासाची कामे अधिक गतीने पूर्ण होतील. प्रवेश केलेल्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासास सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पात्र ठरू अशी ग्वाही त्यांनी दिली. पोवार आणि कोराणे यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. पोवार हे पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. करवीर तालुक्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये व्हिजन ग्रूपचे अध्यक्ष जनसुराज्य चे संताजी घोरपडे, काँग्रेसचे प्रसाद जाधव, वैभवराज राजेभासले, राजेंद्र थोरवडे तसेच मुंबईतील उबाठा गटाचे मंदार राऊत, संकेत रुद्र यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील उबाठाचे जिल्हाप्रमुख व चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे आणि उबाठाचे सभापती वासुदेव ठाकरे तसेच निफाड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, करण देवतळे आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंना धक्का, जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

dada bhuse

खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळा रडारवर,- दादा भुसे

Maharashtra Government: पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार प्रशांत बंब राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’ दर्जा प्राप्त केल्या असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल आणि त्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा देखील दादा भुसे यांनी केली. शिक्षण विभागाच्या नियमानुसार, एखाद्या शाळेला ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवण्यासाठी त्या शाळेतील किमान 50 टक्के विद्यार्थी अल्पसंख्यांक समुदायातील (जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा पारशी) असणे आवश्यक आहे. या दर्जामुळे शाळांना शासकीय अनुदान, सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक आणि कर्मचारी भरती, तसेच इतर प्रशासकीय सवलती मिळतात. तथापि, आमदार प्रशांत बंब यांनी सभागृहात मांडले की, राज्यातील काही शाळांनी, विशेषतः अमरावती आणि मुंबई येथील शाळांनी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या 10 ते 20 टक्क्यांपेक्षा कमी असतानाही खोटी कागदपत्रे सादर करून हा दर्जा मिळवला आहे. अल्पसंख्यांक दर्जामुळे या शाळांना आरक्षण धोरणातून सूट मिळते, ज्यामुळे इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक आणि कर्मचारी पदांवर नियुक्तीच्या संधी मर्यादित होतात. याशिवाय, खोट्या माहितीच्या आधारे मिळवलेला हा दर्जा सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा निर्माण करत आहे, कारण या शालांना अनुदान आणि इतर सवलती मिळतात. “काही शाळांनी बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या विद्यार्थी संख्येच्या आकडेवारीद्वारे हा दर्जा मिळवला आहे, ज्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे,” असे बंब यांनी नमूद केले. विशेष समिती स्थापन करणार – शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि लवकरात लवकर चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल, जी राज्यातील सर्व अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळांची कागदपत्रे आणि विद्यार्थी संख्येची पडताळणी करेल. “ज्या शाळांनी नियमांचे उल्लंघन करून खोट्या पद्धतीने अल्पसंख्यांक दर्जा मिळवला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे भुसे यांनी स्पष्ट केले. ही समिती अल्पसंख्यांक दर्जाच्या अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीही उपाययोजना सुचवेल, असे त्यांनी नमूद केले.

खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळा रडारवर,- दादा भुसे Read More »

“भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीखाली हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू; सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील आष्टी  येथील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कारने झालेल्या अपघातात हॉटेल व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नगर-पुणे महामार्गावर घडली आहे. ही घटना ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे घडली. या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४, रा. पळते खुर्द) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा अपघातावेळी एम.जी. ग्लॉस्टर (एमएच २३ बीजी २९२९) ही कार चालवत होता. सुपा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे मोटारसायकलने निघाले होते. जातेगाव फाटा येथे महामार्गावर यु-टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. जी. ग्लॉस्टर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने सुपा येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचालक सागर धस व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ८ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत नितीन शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. या प्रकरणी स्वप्नील शेळके यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सागर सुरेश धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत.

“भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीखाली हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू; सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Read More »