DNA मराठी

BJP

coldrif syrup death case

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा

Coldrif Syrup Death Case: मध्यप्रदेशात रासायनिक अयोग्यता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून बनवलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 16 मुलांचा मृत्यू झाला असल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर, तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाने 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी श्रीसन फार्मास्युटिकल्स कारखान्यावर छापा टाकला. तपासणीत निकृष्ट दर्जाची परिस्थिती आणि बेकायदेशीर पद्धती आढळून आल्या. निरीक्षकांना प्लास्टिक पाईप्समधून गळणारे रासायनिक अवशेष, गंजलेली यंत्रसामग्री आणि संरक्षक उपकरणे नसलेले कामगार औद्योगिक रसायने हाताने मिसळत असल्याचे आढळले. कारखान्यात प्रशिक्षित केमिस्ट नव्हते आणि उत्पादनादरम्यान कोणतीही गुणवत्ता चाचणी घेण्यात आली नाही. औद्योगिक रसायनांपासून बनवलेले कोल्ड्रिफ कफ सिरप सूत्रांनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रोपीलीन ग्लायकॉलसारखी औद्योगिक रसायने स्थानिक वितरकांकडून रोख रकमेत किंवा गुगल पे द्वारे खरेदी केली गेली. कागदपत्रे टाळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. तपासणी अहवालात असेही उघड झाले की कारखान्याने औद्योगिक दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल वापरले होते, ज्याची डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल सारख्या संभाव्य हानिकारक दूषित घटकांसाठी चाचणी केली गेली नव्हती. प्रिंटिंग इंक, अॅडेसिव्ह, ब्रेक फ्लुइड आणि ल्युब्रिकंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या डायथिलीन ग्लायकॉलमुळे मुलांच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान झाले. तपासणीत असे आढळून आले की SR-13 बॅचमध्ये 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकॉल होते, जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट जास्त आहे. तपासणीत असे आढळून आले की: कोणतीही औषधोपचार यंत्रणा नव्हती, म्हणजेच कोणीही दुष्परिणामांचे निरीक्षण केले नाही किंवा रिकॉल केले नाही. उत्पादनादरम्यान कोणतेही प्रशिक्षित केमिस्ट उपस्थित नव्हते. गुणवत्ता चाचणीशिवाय कच्चा माल वापरण्यात आला. अज्ञात स्त्रोतांकडून पाणी मिळवण्यात आले आणि शुद्धतेसाठी चाचणी केली गेली नाही. कारखान्यात एअर हँडलिंग युनिट्स, HEPA फिल्टर्स, वेंटिलेशन, कीटक नियंत्रण किंवा सुरक्षा नोंदींचा अभाव होता. तपासणीत 39 गंभीर आणि 325 प्रमुख उल्लंघने उघड झाली, ज्यात कीटकांचा प्रादुर्भाव, उघडे गटार, तुटलेली उपकरणे आणि एअर फिल्टरचा अभाव यांचा समावेश आहे. SR-13 बॅचचा विनाशकारी परिणाम मे 2025 मध्ये उत्पादित आणि एप्रिल 2027 पर्यंत वैध असलेली SR-13 बॅच अनेक महिने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बाजारात मुक्तपणे फिरत होती. या बॅचचे सेवन केल्यानंतर चिंदवाडा येथील अनेक मुलांना तीव्र मूत्रपिंड निकामी झाले. सोळा मुलांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक पाच वर्षांखालील होते. रेस्पोलाइट डी, जीएल, एसटी आणि हेप्सँडिन सारख्या इतर सिरपची चाचणी घेण्यात आली आणि ते सामान्य दर्जाचे असल्याचे आढळले. देखरेख आणि जबाबदारीचा अभाव तपासात असे दिसून आले की हा अपघात केवळ निष्काळजीपणाचा परिणाम नव्हता तर एक पद्धतशीर बिघाड होता. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीने स्रेसन फार्मास्युटिकल्सची उत्पादन प्रक्रिया थांबवली आणि सर्व साठा गोठवला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि तिचा परवाना निलंबित करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने दोन औषध निरीक्षक आणि एका उपसंचालकांना निलंबित केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली केली, तर चिंदवाडा येथील एका डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

da hike

DA Hike : दिवाळी गिफ्ट, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीएमध्ये 3% वाढ जाहीर केली. ही घोषणा दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त करण्यात आली आहे. 1 जुलैपासून याचा फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. केंद्र सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. एकदा होळीपूर्वी, जानेवारी-जून दरम्यान आणि दुसऱ्यांदा दिवाळीपूर्वी, जुलै-डिसेंबर दरम्यान. या वाढीचा फायदा देशभरातील 1.5 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल. डीए वाढ किती असेल? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए अंदाजे 3% ने वाढवण्यात आला आहे. यामुळे एकूण डीए त्यांच्या मूळ पगाराच्या 58% वर जाईल. या वर्षी जानेवारी-जूनमध्ये डीए 2% ने वाढवण्यात आला होता, जो गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी वाढ होता. पगार वाढ किती असेल? मूळ पगार 36,000 आहे असे गृहीत धरा. याचा अर्थ महागाई भत्ता दरमहा 1,080 ने वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3% वाढ मोजली तर पेन्शनधारकांनाही प्रमाणानुसार लाभ मिळेल आणि महागाई सवलतीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या, महागाई भत्त्यात वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू केली जाते. या सातव्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल. आठवा वेतन आयोग पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे.

DA Hike : दिवाळी गिफ्ट, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5187 अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार Read More »

nitesh rane attack on uddhav thackeray

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर आता या मागणीवर प्रतिक्रिया देत स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. पंतप्रधान मोदी आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव असं माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, सकारात्मक गोष्ट आहे. दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिनच सरकार आहे, याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील.

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल Read More »

modi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत

Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत सुमारे 1 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत. 3 संरक्षण कॉरिडॉर संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात 10 ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. भारताला लागणार्‍या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात 60,000 कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत Read More »

yogendra yadav

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

Yogendra Yadav : आणीबाणी काळात लोकशाही धोक्यात आली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात लोकशाहीसह देशाची संस्कृती, सभ्यता, आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि मोदींविरोधातील लढाई तीव्र करून एकूण अन्यायाच्या विरोधात परावर्तित केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते योगेंद्र यादव यांनी केले. समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी एकजुटता संमेलन पार पडले. पुणे घोषणा पत्र या सत्रात यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती चळवळीचे नेते अविनाश पाटील होते. या सत्रामध्ये अमूल्य निधि (इंदौर), विनोद शिरसाठ, अशोक पांडा (छत्तीसगड), हरीश खन्ना, शाहिद कमाल, सिद्धराम पैटी आदी सहभागी होते. सुनीति सु. र., गीता आर यांनी घोषणा पत्राचा प्रस्ताव मांडला. देशाला लोकशाहीवादी बनविण्याचे काम समाजवादी चळवळीने केले आहे. देशातील सध्याच्या प्रश्नांचा मुकाबला करण्याची ताकद देखील समाजवादी विचारांमध्ये आहे. प्रत्येक समाजवादी व्यक्तीने संघ, भाजप यांना प्रतिकार करणे हा पहिला धर्म आहे. अन्यथा त्यांना समाजवादी म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही यादव म्हणाले. राजकीय सामाजिक संस्था संघटनांमध्ये पन्नास पंचावन्न वय झाले तरी ते कार्यकर्ते स्वतःला तरुण समजतात. वयोवृद्ध झाल्यावरही पदांचा मोह त्यांना सुटत नाही. त्यामुळे व्यवकांनी संघर्ष करून संस्था संघटनांमधील सत्ता हस्तगत केली पाहिजे. अनेक ठिकाणी असे संघर्ष उभे राहिले आहेत, असे अविनाश पाटील म्हणाले. हिंदीभाषा दिन बंद करावा मी स्वतः हिंदीप्रेमी आहे. मात्र हिंदी भाषा दिन साजरा करण्याची गरज नाही. सरकारने तो बंद करून भारतीय भाषा दिन सुरू करण्याची गरज आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. उलट सर्व भाषांनी एकमेकांशी एकोपा निर्माण करून सरकारच्या विरोधात सांस्कृतिक लढाई लढली पाहिजे, असेही योगेंद्र यादव म्हणाले.

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi on Election Comission : ब्लॉक, ब्लॉक, ब्लॉक … ‘मतदार चोरी’ वरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक

Rahul Gandhi on Election Comission : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतदारांचे नाव ऑनलाईन पद्धतीने डिलीट करण्याच्या आरोप केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या अलांड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याच्या चौकशीला जाणीवपूर्वक थांबवले जात असल्याचा देखील आरोप केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पारदर्शकता टाळत आहे आणि विरोधी मतदारांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की अ‍ॅक्समधील काँग्रेस उमेदवाराने फसवणूक उघड केल्यानंतर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सीआयडी तपास थांबवला. ते म्हणाले की कर्नाटक सीआयडीने गेल्या 18 महिन्यांत आवश्यक पुरावे मागण्यासाठी 18 पत्रे पाठवली, परंतु प्रत्येक वेळी सीईसीने तपास रोखला. 6,018 मते वगळण्याचा आरोप राहुल गांधी म्हणाले की जर ही कथित “मतचोरी” वेळेत उघड झाली नसती तर या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार हरला असता. त्यांनी सांगितले की एकूण 6,018 मते हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारला आणि आरोप केला की डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्स यासारखी महत्त्वाची तांत्रिक माहिती जाणूनबुजून रोखण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व पुरावे कर्नाटक सीआयडीकडे तात्काळ सोपवावेत. निवडणूक आयोगाचा प्रतिहल्ला निवडणूक आयोगानेही राहुल गांधींच्या आरोपांना तात्काळ उत्तर दिले. #ECIFactCheck या टॅगसह त्यांच्या अधिकृत खात्यावरून एका पोस्टमध्ये, आयोगाने गांधींचे दावे “खोटे आणि निराधार” असल्याचे फेटाळून लावले. आयोगाने म्हटले आहे की मतदारांची नावे कोणत्याही खाजगी नागरिकाद्वारे ऑनलाइन हटवता येत नाहीत आणि अशी कोणतीही तरतूद नाही. आयोगाच्या मते, 2023 मध्ये अलांड विधानसभा मतदारसंघात नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, त्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्याने एफआयआर दाखल केला होता. अलांड मतदारसंघाचे निवडणूक निकाल आयोगाने स्पष्ट केले की अलांड मतदारसंघ 2018 मध्ये भाजपचे सुभध गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर बी.आर. 2023 मध्ये काँग्रेसचे पाटील विजयी झाले. आयोगाने सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे 6 सप्टेंबर 2023 रोजी कलबुर्गी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आली. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निवेदन कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाने म्हटले आहे की या प्रकरणात मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे संबंधित तपास संस्थांना आधीच पाठवण्यात आली आहेत. त्यांनी म्हटले आहे की मतदार यादीतून नावे वगळण्याच्या कथित कटाबद्दलचा एफआयआर निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (ईआरओ) दाखल केला आहे. सीईओ कार्यालयाने म्हटले आहे की ते तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कोणतीही माहिती रोखण्यात आलेली नाही. राहुल गांधी आक्रमक भूमिकेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकशाही संस्था कमकुवत करण्याचा आणि विरोधी मतदारांना लक्ष्य करण्याचा आरोप केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा असा दावा आहे की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती आणि कोणतीही अनियमितता झाली नाही. या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi on Election Comission : ब्लॉक, ब्लॉक, ब्लॉक … ‘मतदार चोरी’ वरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक Read More »

ram shinde

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी

Ram Shinde: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामस्थांना संवाद साधताना शिंदे म्हणाले, “ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.” “ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी Read More »

satara crime

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार

Satara Crime: शिरवळ (ता. खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली असून गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार शिरवळच्या विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रासोबत बोलत असताना दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला. या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ झाली. त्याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद गोळीबाराचा हा थरार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना पूर्ववैमन्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. गोळीबारामुळे मुख्य रस्त्यावर पळापळ शिरवळच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांची पळापळ झाली. गोळीबाराच्या घटनेवेळी शालेय विद्यार्थी घरी जात होते. त्याचचवेळी हा थरार घडला. सुदैवाने विद्यार्थी अथवा नागरिकांना गोळी लागली नाही. मात्र कायदा, सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ शिरवळकरांवर आली आहे. संशयित आरोपींची नावे कळली, तपास पथके रवाना झाली आहेत. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शिरवळ पोलीस तपास करत आहेत. जखमी तरुणाचा जबाब घेतला आहे. हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार Read More »