DNA मराठी

Ahilyanagar district

rain

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज

Ahilyanagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रातील पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज दुपारी १२.०० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पुलाजवळ २७ हजार ६५१ क्युसेक, घोड धरणातून घोड नदीत ४ हजार क्युसेक आणि गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा, घोड व गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रवरा व मुळा नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच मोकळी मैदाने, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि रोहित्रांपासून दूर राहावे. वादळी वाऱ्यादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान व डोके झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे. पर्यटकांनी धरणे, नद्या व ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी छायाचित्रे (सेल्फी) काढणे टाळावे. नदी, ओढे व नाल्यांवरील पूल अथवा बंधारे पाण्याखाली गेले असल्यास ते ओलांडू नयेत. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाटरस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुनाट अथवा धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० हे दूरध्वनी क्रमांक अथवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज Read More »

Accident Photo

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार

Ahilyanagar Bus Accident: शेंडी-पोखर्डी परिसरातील घटना लग्न समारंभाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याची घटना अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. खरवंडी येथील लग्न समारंभ आटोपून पुण्यातील स्वारगेटकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा शेंडी-पोखर्डी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास सुरू असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. लग्न समारंभाचा आनंद एका क्षणात भीती आणि गोंधळात बदलला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता का, की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ जखमी प्रवाशांना तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महामार्गावर अपघातानंतर तत्काळ मदत आणि आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार Read More »

vivek kolhe

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा

Vivek Kolhe :  माझा स्वभाव सकारात्मक राजकारण करण्याचा आहे. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ कशी मोठी करता येईल, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर किती संयम ठेवायचा यालाही एक मर्यादा असते. लक्षात ठेवा, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’,” अशा अत्यंत कडक शब्दांत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी विरोधकांना आणि पर्यायाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. राहाता शहरात आयोजित एका सत्कार समारंभादरम्यान सभेत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे हे बोलत होते. सर्वपक्षीय उपस्थिती आणि वाढती ताकद या सभेला मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती यावेळी होती या सर्वपक्षीय प्रेमाचा उल्लेख करत विवेक कोल्हे म्हणाले की, “अनेक टीका-टिप्पण्या आणि क्रॉस फायरिंग झाली, पण आज मला केवळ टीका करायची नाही. हा जो वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हीच माझी खरी ताकद आहे ‘गणेश’ कारखान्यावरून विरोधकांना टोला शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ‘गणेश’ कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “दोन-तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांसमोर जा आणि मते मागा. पण, आता अशा पद्धतीने कायदेशीर अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका,” अशी नम्र विनंती त्यांनी केली. तसेच जर विरोधक ऐकणार नसतील, तर संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी लावला छातीवर बिल्ला: आपल्या आमदारकीचा उल्लेख करताना कोल्हे म्हणाले, “मला आमदारकी रूपी जो सातबारा मिळाला आहे, तो बिल्ला खुद्द मुख्यमंत्री यांनीच माझ्या छातीवर लावला आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. या सातबाऱ्याच्या पोटहिश्श्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेच आहात असे कोल्हे म्हणाले. आधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यापुरते मर्यादित असलो, तरी आता आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ हे आहे. यामध्ये राहता आणि लोणी परिसर आवर्जून येतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. कामासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जाण्याची आपली तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक जर कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर मी भाऊ आणि सहकारी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा Read More »

Accident Photo

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार

Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली. ‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार Read More »

img 20251113 wa0010

Leopard Attack: बिबट्याला ठार मारा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; रीयंका प्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला

Leopard Attack: अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात काल (१२ नोव्हेंबर) सायंकाळी बिबट्याने पाच वर्षांच्या रीयंका पवार हिला उचलून नेले होते. तब्बल १६ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी काटवण परिसरात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला आणि गावात शोककळा पसरली मात्र या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा राग अनावर झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेत ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला पकडत नाही किंवा ठार मारत नाही, तोपर्यंत रीयंका पवार हिचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वेळीच पिंजरे लावले असते तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गावात वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस व वनविभागाचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून गाव सुरक्षित नाही, बिबट्याला ठार मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Leopard Attack: बिबट्याला ठार मारा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; रीयंका प्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला Read More »

leopard

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना

Ahilyanagar News : जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा वावर असून सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या वेळी शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे. ऊसतोड सुरू असताना शेतकरी आणि मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा मुलांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला सोडले जाते. अशा वेळी मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन एखाद्या मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येईल. फार वाकून ऊसतोड करू नये; कारण अशा वेळी दुसरा एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डर किंवा वायरलेस ब्लूटूथ स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात गाणी लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोड किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समूहाने काम करावे. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळवण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना Read More »

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »