Chandrashekhar Bawankule : राज्य शासनाच्या महसूल विभागाने कौटुंबिक मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी अधिनियम, १९०८ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, जवळच्या नातेवाईकांमध्ये निवासी किंवा कृषी मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे (Gift Deed) हस्तांतरित करताना संबंधित दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी आता केवळ २०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे.
या सवलतीचा लाभ पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात तसेच मयत मुलाची पत्नी यांना मालमत्ता हस्तांतरणाच्या प्रकरणांमध्ये मिळणार आहे.
या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्तेचे हस्तांतरण अधिक सुलभ, जलद आणि किफायतशीर होणार असून, दस्तऐवज नोंदणीवरील आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, नागरिकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.






