DNA मराठी

ताज्या बातम्या

raj thackeray

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान

Raj Thackeray on Mohan Bhagwat : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा असे आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला ‘आजार’ असं संबोधले होते. यावर आता राज ठाकरे यांनी भागवतांना आव्हान देत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान Read More »

baramati by election

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. डुडी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे. तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकतीवर शुक्रवार ६ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून मंगळवार १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले. 7 हजाराहून अधिक मतदारांची वाढ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार  ६०८ इतके मतदार असून आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी आहे. या कालावधीत ७ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९२ हजार ८१९ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९६ हजार १०२ इतके मतदार असून यामध्ये ३ हजार २८३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत महिला मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार ७६५ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९२ हजार २४५ इतके मतदार असून यामध्ये ४ हजार ४८० इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. मतदारसंघात तृतीयपंथी मतदार संख्या २४ असून यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहिती डुडी यांनी दिली.

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आनंदाची बातमी! 70 हजार पदांची लवकरच नोकरभरती होणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार  निर्णय घेण्याचे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी  इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis: आनंदाची बातमी! 70 हजार पदांची लवकरच नोकरभरती होणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

Sharad Pawar: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये प्राथिमक उपचार घेतल्यानंतर त्यांना दुपारी पुण्याला हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपासून त्यांना अवस्वस्थ वाटत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी आणखी त्रास जाणवल्याने बारामतीतील डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र, त्यानंतर दुपारी त्यांना तातडीने पुण्याला हलविण्याच सल्ला देण्यात आला. माहितीनुसार, शरद पवार यांना श्वासनाचा आणि खोकल्याचा त्रास असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे.

Sharad Pawar: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली Read More »

rahuri

Rahuri News : राहुरी नगरपरिषदेचा ठराव; सायंकाळी दीड तास विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही पासून दूर रहावे लागणार

Rahuri News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई वडील, पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा. या संकल्पनेतून नगराध्यक्ष मोरे यांनी नगरपरिषदेत एक उल्लेखनीय ठराव मंजूर केला. राहुरी पालिकेत सायंकाळी सात वाजता भोंगा वाजतो व साडेआठला भोंगा वाजतो.या दीड तासात मोबाईल, दूरदर्शन अशा माध्यमापासून शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी यांनी पूर्णपणे दूर रहावे अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी व्यक्त केली. आजच्या युगात मोबाईलचा अति वापर, टीव्ही, सोशल मीडिया व इतर व्यसनाच्या सवयी यामुळे आपली तरुण पिढी बऱ्याच प्रमाणात भरकटलेली आपण पाहतो. पालक व मुलांमध्ये संवाद राहिला नाही. लहान मुलानां चांगले वाईट यातील फरक सांगायला व त्यांच्यापाशी बसायला कोणाला वेळ नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार आपण स्वतः पालक आहोत. पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि, आपल्या कडून या सवयीनां वेळीच आवर घातला पाहीजे. याकारीता राहुरी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून राहुरी नगरपरिषदेच्या सभेत एकमताने हा विषय मंजूर करण्यात आला. त्यामध्ये सायंकाळी ७ वा. नगरपरिषदेचा सायरान वाजल्या नंतर सर्व पालकांनी आपल्या घरातील टिव्ही व इतर मनोरंजनांचे माध्यम बंद करायचे आहे. यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसावयाचे आहे. आपण स्वतः घरात थांबुन पुस्तकाचे वाचन करणे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे कुटुंबाला वेळ देणे. अशा प्रकारे दीड तासानंतर ठिक रात्री ८.३० वा. दुसरा सायरान वाजल्या नंतर पुर्ववत आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल. आज हा निर्णय कठोर वाटत असला तरी पुढच्या पिढीला घडविण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची आपल्यावर वेळ आली आहे. तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचा काटेकोर अवलंब करतील व पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले.

Rahuri News : राहुरी नगरपरिषदेचा ठराव; सायंकाळी दीड तास विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही पासून दूर रहावे लागणार Read More »

mpsc exam

SSC Exam : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, यासाठी शिर्डी उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. राहाता व कोपरगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये (पूर्वीचे कलम १४४) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहेत. या संपूर्ण कालावधीत परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी/आयएसडी बूथ, तसेच ध्वनीक्षेपक व तत्सम उपकरणे परीक्षा सुरु असलेल्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवावी लागतील. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर, संगणक, लॅपटॉप इत्यादी साहित्याचा वापर परीक्षा सुरू असलेल्या वेळेत करता येणार नाही. (मात्र, हा नियम परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाहनांना लागू नसेल.) या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

SSC Exam : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू Read More »

eknath shinde

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, साजरा करणार नाही वाढदिवस; कारण काय?

Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. अजितदादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, साजरा करणार नाही वाढदिवस; कारण काय? Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक

Chandrashekhar Bawankule: राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२ उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता ‘भू-आधार’ क्रमांक (ULPIN) मिळणार आहे. 2 कोटींहून अधिक पोटहिश्शांचा होणार ‘डिजिटल’ कायापालट राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि ७/१२ उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता ‘पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे. काय आहे ‘भू-आधार’ ? केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजेच ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल. यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे वादातून सुटका: जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद कमी होतील. अचूक नकाशे: ७/१२ उताऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल. डिजिटल डेटाबेस: पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल. खरेदी-विक्री सुलभ: जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना या प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नकाशे आणि ७/१२ यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे अर्थकारण अधिक मजबूत होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक Read More »

Baramati Assembly by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हालचाल सुरू ; विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

Baramati Assembly by-election : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २०१–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Baramati Assembly by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हालचाल सुरू ; विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला

Sujay Vikhe: राहुरीत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली. “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो,” असे सांगत त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. काम करताना गोड बोलण्यापेक्षा थेट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. नगर मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. “थोडा त्रास सहन करा, प्रश्न कायमचा सुटेल” काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र त्यानंतर नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विकासकामांना अडथळे निर्माण होऊ नयेत, यावर भर दिला. समस्या ऐकून थेट आदेश बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करत कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समस्या सोडवणे हाच उद्देश अनेक तांत्रिक अडचणी असूनही हे काम सुरू आहे. सध्या आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे” “मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल, आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. अजित पवार यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाची आठवण नगर मनमाड महामार्गावरील दीर्घकाळापासून प्रलंबित व नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या समस्यांवर आयोजित बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. कोणतीही तडजोड न करता त्यांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे अनेकांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निर्णयक्षम बैठकीची आठवण झाली.

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला Read More »