DNA मराठी

ताज्या बातम्या

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या व त्यावेळी भूमीपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दिर्घ लढा दिला. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाली आहे. दि. बा. पाटील यांची आमदार व खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसीत होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून जनभावनेचा आदर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा कावा सर्वांना माहित आहे. ‘फडणविसांचा कावा ना कळे ब्रम्हदेवा’, असा आहे, असे सपकाळ म्हणाले. नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा केला जात आहे. विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे. अहमबादच्या क्रिकेट स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे दिले आहे, पण असा कोणताही कावेबाज पणा भाजपा वा देवेंद्र फडणवीस यांनी करु नये. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल, असे सपकाळ म्हणाले.     माणिकराव कोकाटे यांना अटक का नाही? माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा होऊन तीन दिवस झाले पण अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही व अटकही केलेली नाही. लिलावती रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे, आणि चोराच्या दिमतीला पोलीस ठेवले आहेत. शिक्षा ठोठावताच तात्काळ कारावई केली पाहिजे होती पण कारवाई ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच केली जाते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. एमडी ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या.. सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरु होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही. एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा एमडी ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी Read More »

election

Maharashtra Election: कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक‌ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त

Maharashtra Election : कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप आदी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी सकाळी ठीक ६:३० वाजता सर्व मतदान केंद्रांवर ‘मॉक पोल’ (चाचणी मतदान) प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांनी नेमलेल्या मतदान प्रतिनिधींनी विहित नमुन्यातील फॉर्म व दोन रंगीत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मतदान प्रतिनिधी संबंधित यादीतील मतदार असणे बंधनकारक आहे. केंद्रात एका वेळी एकाच प्रतिनिधीला उपस्थित राहता येईल. मतदानासाठी मतदारांजवळ निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID) सोबत असणे अनिवार्य आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात, तसेच केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदार यांनी आपले मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवूनच केंद्रात प्रवेश करावा. प्रचार कालावधी संपल्याने आज रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांनी सर्व होर्डिंग्ज, बॅनर्स, प्रचार साहित्य स्वतःहून काढून घ्यावे. त्यानंतर आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व ६९ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, ९ पीएसआय, १० मोबाईल व्हॅन्स, १२९ पोलीस कॉन्स्टेबल व ७४ होमगार्ड्स तैनात असतील. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मतदान संपल्यानंतर २१ डिसेंबर रोजी ‘सेवानिकेतन विद्यालय’ येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र (Pass) असलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. प्रशासनाने मतदानाच्या दिवशीही सर्व नागरिक, उमेदवार व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Maharashtra Election: कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक‌ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त Read More »

maharashtra government

Maharashtra Government: उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी निवडणूक अधिनियम, 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश देखील काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम 14 मध्ये, पोट-कलम (2) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, 2025 काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. तर दुसरीकडे गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापुर्वीच्या (दि. 20 जानेवारी 2025) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतूदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व गड-किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी व भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. समितीचे सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असतील. तर समितीमध्ये महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे. राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अशासकीय सदस्य गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या-त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे. तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे.

Maharashtra Government: उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

ram sutar

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड

Eknath Shinde on Ram Sutar Death : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे. नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या 101 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड Read More »

gotya gangster

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

Gotya Gangster : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात आहे. या कथानकाविषयीची उत्सुकता ट्रेलरमधून वाढली आहे. ‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला. आता गोट्या गँगस्टर आता 26 डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट Read More »

homebound

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक

Oscar 2026 : नीरज घायवान यांचा “होमबाउंड” हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. याबाबत माहिती देताना चित्रपटाचे निर्माते करण जोहर भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “‘होमबाउंड’च्या प्रवासाबद्दल मी किती अभिमानी, उत्साहित आणि आनंदी आहे हे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नीरज, आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्करसाठी निवड होण्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास होता. संपूर्ण कलाकारांना प्रेम. “होमबाउंड” चित्रपटाची स्टोरी काय? “होमबाउंड” ही बालपणीचे मित्र शोएब (ईशान) आणि चंदन (विशाल) यांची कथा आहे, ज्यांची पोलिस दलात सामील होण्याची इच्छा त्यांच्या जीवनाला आणि निर्णयांना आकार देते. हा चित्रपट मैत्री, कर्तव्य आणि तरुण भारतीयांना तोंड द्यावे लागणारे सामाजिक दबाव या विषयांवर प्रकाश टाकतो आणि जान्हवी कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. कोणते चित्रपट नामांकित झाले ? 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पुढील फेरीच्या मतदानासाठी पंधरा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या यादीत अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट्स केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटिमेंटल व्हॅल्यूज”, पॅलेस्टाईनचा “पॅलेस्टाईन 36”, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सिरात”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक Read More »

cameron green

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय?

IPL Auction 2026: संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी मिनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर सर्वात जास्त बोली लागली आहे. त्याला केकेआरने तब्बल 25.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. तर तो परदेशी खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावरही पोहोचला. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? 25 कोटी बोली लागल्यानंतर ही ग्रीनला फक्त 18 कोटी रुपये मिळणार आहे. बीसीसीआयच्या एका नियमामुळे ग्रीनला 18 कोटी मिळणार आहे. कॅमेरॉन ग्रीनला फक्त 18 कोटी का मिळणार? कॅमेरॉन ग्रीनला 2026 च्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 18 कोटी मिळणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे “कमाल शुल्क नियम” नावाचा एक विशिष्ट आयपीएल नियम. या नियमानुसार, कोणत्याही परदेशी खेळाडूला मिनी-लिलावात जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते ती दोन गोष्टींपैकी कमी रक्कम आहे. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? या नियमानुसार, पहिली, या हंगामासाठी सर्वाधिक रिटेन्शन स्लॅब 18 कोटी आहे. दुसरी, गेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली. ऋषभ पंत आयपीएल 2025 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला, त्याला 27 कोटी मिळाले. या दोन्ही रकमेपैकी कमी रक्कम 18 कोटी आहे. त्यामुळे ग्रीनला 25.20 कोटी ऐवजी फक्त 18 कोटी दिले जातील. उर्वरित रक्कम बीसीसीआयच्या खेळाडू कल्याण निधीत जाईल. तर दुसरीकडे मिनी लिलावात ग्रीनसाठी संघांमध्ये तीव्र स्पर्धा झाली. कॅमेरॉन ग्रीनची सर्वोत्तम किंमत 2 कोटी ठेवण्यात आली होती. सुरुवातीला, बोली राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाली. पण राजस्थानने माघार घेतल्यावर, चेन्नईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. शेवटी, कोलकाता जिंकला आणि त्याने या खेळाडूला मोठ्या रकमेत त्यांच्या संघात समाविष्ट केले. दुखापतीनंतर कॅमेरॉन ग्रीनचे पुनरागमन पाठीच्या दुखापतीतून कॅमेरॉन ग्रीन पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसला नाही. तो मेगा लिलावातही विकला गेला नाही. तरीही कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे केकेआरमधून आंद्रे रसेलची निवृत्ती, कारण त्याची जागा घेणारा एकमेव खेळाडू ग्रीन होता. ग्रीन बॅट आणि बॉल दोन्हीने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय? Read More »

pradnya satav

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला

Pradnya Satav : राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी 29 महानगर पालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्ष कामाला लागलं असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काँग्रेसला रामराम करत पक्षाची साथ सोडणार आहे. आमदार प्रज्ञा सातव 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. आमदार प्रज्ञा सातव 2021 पासून काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या आमदार आहे. पक्षात सुरू असणाऱ्या गटबाजीच्या राजकारणामुळे प्रज्ञा सातव पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारीपैकी एक मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला Read More »

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, दर महिने मिळणार 5550 रुपये; जाणून गुंतवणूकीबद्दल सर्वकाही

Post Office MIS Scheme: जर तुम्ही देखील भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या एका भन्नाट आणि फायदेशीर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा नाव आहे एमआयएस. या योजनेत तुम्हाला वारंवार गुंतवणूक करावी लागत नाही. एकदा तुम्ही गुंतवणूक केली की तुमचे मासिक उत्पन्न सुरू होते. पोस्ट ऑफिस या योजनेअंतर्गत 7.4 टक्के वार्षिक व्याज देते, जे थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यात ठेवू शकता किंवा गरज पडल्यास ते काढू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत फक्त 1000 मध्ये खाते उघडू शकता. एका खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाखांपर्यंत आहे, तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाखांपर्यंत आहे. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 लोक सामील होऊ शकतात. जर तुम्ही एकाच खात्यात 9 लाखांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा 5550 चे निश्चित व्याज मिळेल. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते आणि मासिक उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्रोत बनते. MIS योजना 5 वर्षांत परिपक्व होते. मुदतपूर्तीनंतर, तुमच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला दरमहा व्याज मिळतेच, परंतु तुमची मुख्य गुंतवणूक देखील सुरक्षित असते. एमआयएस योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. निश्चित मासिक उत्पन्न उघडल्यानंतर लगेचच सुरू होते आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार निधी वापरू शकता. ही योजना सुरक्षित आणि नियमित उत्पन्न हवे असलेल्यांसाठी आदर्श आहे.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, दर महिने मिळणार 5550 रुपये; जाणून गुंतवणूकीबद्दल सर्वकाही Read More »

national herald

National Herald प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा; आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने दिला नकार

National Herald : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चालवत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची दखल घेण्यास नकार दिला आहे.तसेच न्यायालयाने म्हटले आहे की केंद्रीय एजन्सी त्यांची चौकशी सुरू ठेवू शकते. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश (पीसी कायदा) विशाल गोगणे यांनी असा निर्णय दिला की पीएमएलए अंतर्गत दाखल केलेली अंमलबजावणी संचालनालयाची तक्रार कायम ठेवण्यायोग्य नाही कारण हा खटला एफआयआरवर नाही तर खाजगी तक्रारीवर आधारित होता. न्यायालयाने असा निर्णय दिला की, “कलम 3 अंतर्गत परिभाषित केलेल्या आणि कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दंडनीय मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याशी संबंधित तपास आणि परिणामी खटला चालवण्याची तक्रार एफआयआर किंवा कायद्याच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या गुन्ह्याशिवाय कायम ठेवण्यायोग्य नाही.” ईडीला तपास सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयाने असेही निर्णय दिला की विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर आरोपींना या टप्प्यावर एफआयआरची प्रत मिळविण्याचा अधिकार नाही. तथापि, न्यायालयाने ईडीला या प्रकरणात पुढील तपास सुरू ठेवण्याची परवानगी दिली. आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही काँग्रेसने म्हटले आहे की, “आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही.” काँग्रेस पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाला सत्याचा विजय म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्षाने लिहिले आहे की, “सत्याचा विजय झाला आहे… मोदी सरकारच्या द्वेषपूर्ण आणि बेकायदेशीर कृती पूर्णपणे उघड झाल्या आहेत. माननीय न्यायालयाने यंग इंडियन प्रकरणात काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध – सोनिया गांधी आणि राहुल गांधी – ईडीच्या कृती बेकायदेशीर आणि द्वेषपूर्ण असल्याचे आढळले आहे. न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की ईडीला या प्रकरणात कोणतेही अधिकार क्षेत्र नाही आणि त्यांच्याकडे एफआयआर नाही, ज्याशिवाय खटला चालवता येत नाही.”

National Herald प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा; आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने दिला नकार Read More »