DNA मराठी

ताज्या बातम्या

police

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर एम.आय.डी.सी मधील उद्योजकाकडुन दर महिन्याला खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी 9.30 च्या सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावून काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती. त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते. तसेच ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या वेळी सूचना दिली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा.एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे. आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.   जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक Read More »

salim khan

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय?

Salim Khan Hospitalized : अभिनेता सलमान खान याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी सलीम यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. 90 वर्षीय सलीम खान यांनी बॉलीवूडमध्ये शोले आणि जंजीर सारख्या अनेक प्रतिष्ठित चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत.  तर दुसरीकडे एका अहवालानुसार अभिनेता सलमान खानने सर्व कार्यक्रम रद्द केले असून तो वडिलांना भेटण्यासाठी तातडीने रुग्णालयात दाखल झाला आहे. खान कुटुंबाकडून अद्याप या प्रकरणाबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. सलीम खान यांची प्रकृती बिघडणे ही चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरील अनेक चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.  सलमान खान रुग्णालयात दाखल सलमान खानचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ काल रात्री उशिरा समोर आला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल कळताच सलमान रुग्णालयात पोहोचला. तेव्हापासून तो रुग्णालयातच आहे. कुटुंबातील इतर सदस्यही नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत आहेत. यामध्ये अरबाज खान, शौरा खान, हेलेन आणि सलमा खान तसेच त्यांच्या मुली अलविरा, अर्पिता आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांचा समावेश आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिल्या पटकथा लेखक म्हणून, सलीम खानच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीत असंख्य ब्लॉकबस्टर कथा निर्माण केल्या आहेत. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी जवळजवळ दोन डझन चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांची नावे अशी आहेत: सीता और गीता, शोले, डॉन, दीवार, जंजीर, हाथ मेरे साथी, मिस्टर इंडियाचा समावेश आहे.

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय? Read More »

shani shingnapur

Shani Shingnapur : श्री शनेश्वर देवस्थानचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निविदा प्रक्रियेवर भर

Shani Shingnapur : शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान येथील बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर प्रक्रिया करून पुरवठादार नेमल्याने विशिष्ट ब्रँडची मक्तेदारी संपुष्टात येऊन देवस्थान आणि भाविकांनादेखील याचा लाभ होणार आहे. प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्यानंतर बर्फी प्रसाद आणि तेलाची विक्री वाढल्याचे गेल्या ३ महिन्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त तथा प्रशासक डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिले आहे. बर्फी प्रसाद निर्मितीसाठी शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर रीतसर प्रक्रिया करून पुरवठादार निवडण्यात आलेला आहे. यामुळे कामगार कायद्याचे पालन व सुलभतेने दर्जात्मक प्रसाद निर्मिती सुलभ होईल. यापूर्वी बर्फीकरिता विशिष्ट ब्रॅंडची मक्तेदारी असल्याने देवस्थानचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले होते हे टाळण्यासाठी व देवस्थानला साहित्याचा पुरवठा विना अडथळा होण्यासाठी निविदाप्रक्रियेद्वारा विविध साहित्य खरेदी करण्यात येत आहे. यामुळे देवस्थानला स्पर्धात्मक दराचा फायदा होईल व प्रक्रिया पारदर्शकता राहील. भविष्यातील खरेदी प्रक्रिया ही ई टेंडरद्वारे राबविण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करून नोंदणी करण्यात आलेली आहे. बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी यापूर्वी नियुक्त कारागीर यांची लेखी स्वरूपात नेमणूक करण्यात आलेली नव्हती. यासह सदरील बर्फी प्रसाद बनविण्यासाठी विशिष्ट ब्रॅंडचीच मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनस आलेले होते व त्यामुळे देवस्थान प्रशासनाला स्पर्धात्मक दराचा फायदा होत नव्हता. दरम्यान देवस्थान प्रशासनातर्फे या सुधारणा होत असतांना प्रसाद किंवा तेल विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही हे मागील ३ महिन्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतांना दिसते. बर्फी प्रसाद विक्री नोव्हेंबर:- ३ लाख १४ हजार ४५९ पाकिटे (रक्कम रु. ६२ लाख ८९ हजार १८० रुपये ) डिसेंबर : – ४ लाख ५२ हजार ८३५ पाकीटे ( रक्कम रु. ९० लाख ५६ हजार ७००) जानेवारी : – ५ लाख १० हजार ६२६ पाकीटे (रक्कम रु. १ कोटी २ लाख १२ हजार ५२०) तेल विक्री नोव्हेंबर :- ३४ लाख ८४ हजार ९५४ रुपये डिसेंबर :- ३३ लाख ८ हजार २६७ रुपये जानेवारी;- ४६ लाख ५ हजार २४४ रुपये वेतन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांचे कडून नियुक्त लेखा अधिकाऱ्यांकडून कार्यालयीन तपासणी सुरू असून लवकरच कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल.असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. देवस्थानचे कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत ते पारदर्शकरित्या आणि नियमानुसार व्हावे यावर प्रशासनाचा भर असून भाविकांचा त्रास कमी होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यावरही भर दिला जात आहे. देवस्थानचे महात्म्य आणि पावित्र्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुधारणांवर भर दिला जात आहे. अर्थातच यात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रशासनातर्फे दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.

Shani Shingnapur : श्री शनेश्वर देवस्थानचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निविदा प्रक्रियेवर भर Read More »

img 20260217 wa0010

Emmanuel Macron : इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Emmanuel Macron : फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी आज मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅक्रॉन तसेच त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचे स्वागत केले. मंगळवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष मॅक्रॉन यांची महाराष्ट्र लोकभवन येथे महत्वपूर्ण बैठक होत आहे. संध्याकाळी पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या ‘इंडिया – फ्रांस यिअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मॅक्रॉन यांच्या मुंबई आगमन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

Emmanuel Macron : इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत Read More »

congress

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार?

Maharashtra Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत ‘संघटन सृजन अभियान’ या विषयावर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वॅार रूमचे प्रमुख खा. शशिकांत सेंथिल मार्गदर्शन करणार आहेत तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर हे ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशिवाय इतरांना प्रवेश नाही, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार? Read More »

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा

Ahilyanagar News: पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून, चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन-पे अ‍ॅपचा गैरवापर करुन नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा घातला आहे. या घटनेत आरोपीने तब्बल २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन-पे अ‍ॅप सक्रिय होते.५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने फोन-पे अ‍ॅपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीष गावंड, बाळासाहेब सोलास व बिकास बेहेरा आदींच्या खात्यांवर विविध टप्प्यांत मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. एकूण २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा Read More »

leopard

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

Leopard in Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचा मोठा वावर वाढला आहे. आता तर बिबट्या थेट मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे नगर शहराजवळ असलेले भिंगार शहर परिसरात बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनविभागाने अखेर त्याला पकडले आहे. अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार हा आढळून आला. तसेच मनुष्यवस्ती मध्ये येत बिबट्याने अनेकांवर हल्ले केले असून यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता पुन्हा एकदा शहरी वस्ती मध्ये बिबट्या आला असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. भिंगार शहरातील वारूळ वाडी परिसरात बिबट्या हा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी त्याला पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्या हा एका इमारतीकडे पळाला त्यानंतर नागरिकांनी तातडीने वनविभागाला फोन द्वारे संपर्क साधत घटनेची कल्पना दिली बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर गर्दी करू लागले. दरम्यान भेदरलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूम मध्ये जाऊन बसला व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याला अखेर जेरबंद केले.

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद Read More »

north korea

North Korea : किम कुटुंबात सत्ता संघर्ष; बहीण की मुलगी, उत्तराधिकारी कोण?

North Korea : उत्तर कोरियामध्ये सत्ता हस्तांतरणाबाबत नवीन अटकळ तीव्र झाली आहे. किम जोंग उन त्यांची मुलगी किम जू एई हिला पुढचा नेता म्हणून तयार करत असल्याच्या संकेतांमुळे प्रादेशिक विश्लेषकांमध्ये वादविवाद सुरू झाला आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्था आणि कायदेकर्त्यांनी, तिच्या सार्वजनिक उपस्थितीत लक्षणीय वाढ झाल्याचे कारण देत, असे सुचवले आहे की किम जोंग उन यांनी त्यांच्या मुलीला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जर हे संकेत खरे ठरले तर किम कुटुंबात सत्ता संघर्ष सुरू होऊ शकतो. किम जोंग उन यांची 38 वर्षीय बहीण, किम यो जोंग, जी सध्या देशातील दुसरी सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानली जाते, ती तिचे पद सहजासहजी सोडण्याची शक्यता नाही. हे वेळेवर अवलंबून आहे, परंतु मला वाटते की जर किम यो जोंगला वाटत असेल की तिला सर्वोच्च नेता बनण्याची संधी आहे, तर ती ती घेईल असं दक्षिण कोरियाचे माजी राजदूत आणि गुप्तचर अधिकारी राह जोंग-यिल यांनी द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. किशोरावस्थेत असलेली किम जू एई, अलिकडेच तिच्या वडिलांसोबत अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. उत्तर कोरियाचे सरकारी माध्यमे तिला नियमितपणे “प्रिय मुलगी” म्हणून संबोधतात. किम जोंग उनच्या तीन मुलांपैकी ती एकमेव आहे जिला सार्वजनिकरित्या मान्यता देण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेचा दावा दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेने बंद दाराआड झालेल्या ब्रीफिंगमध्ये कायदेकर्त्यांना सांगितले की, किम जोंग उन उत्तराधिकारी नामांकन टप्प्यात प्रवेश केला आहे. एनआयएसच्या मते, जू ए आता औपचारिक उपस्थितीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर काही धोरणात्मक बाबींवर त्यांनी मते व्यक्त केली आहेत, जी या गुप्त राजवटीत असामान्य मानली जाते. किम यो जोंगची मजबूत भूमिका किम यो जोंगचा उत्तर कोरियाच्या सैन्य आणि नोकरशाहीवर बराच प्रभाव असल्याचे मानले जाते. विश्लेषकांचे म्हणणे आहे की योग्य वेळ आल्यास ती सर्वोच्च पदावर येण्यास मागेपुढे पाहणार नाही. 2022 मध्ये आयसीबीएम प्रक्षेपण दरम्यान जू ए पहिल्यांदा तिच्या वडिलांसोबत दिसली होती. तेव्हापासून, तिने अनेक लष्करी परेड, क्षेपणास्त्र चाचण्या आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये, ती किम जोंग उनसोबत बीजिंगमधील चिनी लष्करी परेडमध्ये गेली होती, जरी ती लोकांच्या नजरेतून बाहेर राहिली. उत्तराधिकार प्रक्रिया आणि इतिहास किम कुटुंबातील उत्तराधिकार प्रक्रिया बारकाईने पाहिली जाते. 2011 मध्ये किम जोंग उन यांनी त्यांच्या वडिलांकडून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे काका जांग सोंग-थेक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आणि गोळीबार पथकाने मृत्युदंड दिला. त्याचप्रमाणे, 2017 मध्ये त्यांचा सावत्र भाऊ किम जोंग-नाम यांनाही अशाच प्रकारे मृत्युदंड देण्यात आला. जू एई यांना उत्तराधिकारी घोषित केल्यास कुटुंबात तणाव आणि संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे मत आहे. येणाऱ्या राजकीय मेळाव्यावर सर्वांचे लक्ष फेब्रुवारीच्या अखेरीस उत्तर कोरियाच्या प्रमुख राजकीय मेळाव्यात जू एई यांची उपस्थिती, त्यांच्याशी केलेली वागणूक आणि कोणत्याही औपचारिक पदाची घोषणा यावरून उत्तराधिकाराचा मार्ग निश्चित होऊ शकतो. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर संस्थेने (एनएसआय) सांगितले आहे की ते या मेळाव्यावर बारकाईने लक्ष ठेवेल.

North Korea : किम कुटुंबात सत्ता संघर्ष; बहीण की मुलगी, उत्तराधिकारी कोण? Read More »

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून Read More »

fb img 1770982840504

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी एम. विनोद, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते. पथकासोबत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली. भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली. शेवगाव तहसील कार्यालयात आढावा पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने तहसील कार्यालय, शेवगाव येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. तसेच नुकसानभरपाई व पुनर्बांधणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »