DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर

Ahilyanagar News : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अहिल्यानगर ल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ गावे आणि तब्बल ५०० वाड्या-वस्त्यांवर सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. या गावे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश असून, याद्वारे यातील सुमारे १ लाख ४१२२ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. तसेच नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत असलं तरी तो गावाला पूर्णपणे पाणी देऊ शकत नाही त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो तर काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.दरम्यान, जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात ९०० कोटींवर खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर Read More »

BCCI on Rohit Sharma: … तर रोहित शर्माचे विश्वचषकाचे स्वप्न धोक्यात: बीसीसीआयसाठी डोकेदुखी वाढली

BCCI on Rohit Sharma: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या 2027 च्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी भारतीय संघात रोहित शर्माची निवड होणार नाही. एकदिवसीय (ODI) विश्वचषक जिंकणे हे रोहित शर्माचे नेहमीच एक आयुष्यभराचे स्वप्न राहिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन टी-20 विश्वचषक जिंकूनही, रोहित शर्माला अद्याप एकदिवसीय विश्वचषकाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. रोहित शर्माचे अपूर्ण स्वप्न 2019 आणि 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही, टीम इंडियाला दोन्ही प्रसंगी विजेतेपद पटकावता आले नाही. 2019 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला त्यानंतर, 2023 मध्ये अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. त्यावेळी, रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता. यानंतर, रोहित शर्माने 2027 च्या विश्वचषकात खेळण्याची आणि भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची आपली इच्छा उघडपणे व्यक्त केली होती. आता त्याचा हा मार्ग अधिकाधिक आव्हानात्मक वाटत आहे आणि BCCI ला देखील याविषयी चिंता वाटू लागली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ (TOI) च्या एका अहवालानुसार, BCCI मधील एका सूत्राने सांगितले की, रोहित शर्मा गेल्या तीन आठवड्यांपासून BCCI च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (Centre of Excellence) उपस्थित राहिलेला नाही. जरी त्याने आपल्या तंदुरुस्तीवर (फिटनेसवर) काम केले असले आणि काही प्रमाणात वजनही कमी केले असले, तरी उच्च-स्तरीय खेळासाठी आवश्यक असलेला शारीरिक ताण सहन करण्यास त्याचे शरीर सक्षम असेल की नाही, याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याला 50 षटके क्षेत्ररक्षण करणे आवश्यक असते. IPL च्या विपरीत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा (Impact Player) पर्याय उपलब्ध नसतो. जसजसे एखादी व्यक्ती 40 वर्षांच्या वयाकडे वाटचाल करते, तसतसे शरीराला रिकव्हर होण्यासाठी नैसर्गिकरित्या अधिक वेळ लागतो. तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या संघात रोहित शर्माला स्थान मिळाले असले, तरी तो प्रत्यक्षात खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. 2026 च्या IPL हंगामादरम्यानही, दुखापतींच्या चिंतेमुळे स्पर्धेच्या मध्यातच त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. त्यातील बहुतांश सामन्यांमध्ये, तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या भूमिकेत खेळताना दिसून आला होता.

BCCI on Rohit Sharma: … तर रोहित शर्माचे विश्वचषकाचे स्वप्न धोक्यात: बीसीसीआयसाठी डोकेदुखी वाढली Read More »

ms dhoni

MS Dhoni IPL 2026 मध्ये ‘या’ दिवशी खेळणार; CSK ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

MS Dhoni : आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप पूर्णपणे मावळलेल्या नाहीत. पण कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर, संघाचा पुढील मार्ग कठीण झाला आहे. अव्वल चार स्थानांच्या शर्यतीत सध्या कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ चेन्नई सुपर किंग्जच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि CSK या दोन्ही संघांकडे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजूनही आहे मात्र, असे करण्यासाठी त्यांना इतर संघांच्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. धोनी कधी खेळणार सध्या CSK आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचा ‘नेट रन रेट’ (Net Run Rate) निगेटिव्ह आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात निराशाजनक बाब म्हणजे, संपूर्ण हंगामात धोनीला एकही सामना खेळता आलेला नाही. शिवाय, अनेक खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे संघ डिस्टर्ब झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा लीग फेरीतील शेवटचा सामना आज, 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात धोनी खेळणार नाही पण संघाचे फलंदाजी प्रशिक्षक (Batting Coach) माईक हसी यांनी स्पष्ट केले आहे की, जर संघाने प्ले-ऑफसाठी पात्रता मिळवली, तर धोनी पुन्हा संघात सामील होईल आणि कदाचित प्ले-ऑफचे सामने खेळू शकेल. CSK च्या पात्रतेची शक्यता कठीण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना माईक हसी म्हणाले, “मी या गोष्टीची पुष्टी करू शकतो की, तो सध्या संघासोबत नाही. त्याच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली आहे, परंतु तो वेगाने सावरत आहे. या सामन्यासाठी तो अद्याप पूर्णपणे सज्ज नाही तरीही, जर आम्ही प्ले-ऑफसाठी पात्रता मिळवण्यात यशस्वी झालो, तर तो पुन्हा संघात सामील होईल अशी आम्हाला आशा आहे.” सध्याची परिस्थिती पाहता, चेन्नई सुपर किंग्जपुढील पुढील वाटचाल सोपी दिसत नाही. संघाला केवळ आपला शेवटचा सामना जिंकणेच आवश्यक नाही, तर दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी त्यांचे शेवटचे सामने मोठ्या फरकाने गमावावेत, अशीही त्यांना आशा करावी लागेल. जेणेकरून ‘नेट रन रेट’च्या गणितात CSK ला फायदा मिळू शकेल.

MS Dhoni IPL 2026 मध्ये ‘या’ दिवशी खेळणार; CSK ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी Read More »

cockroach janata party

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स

Cockroach Janata Party : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर Cockroach Janata Party (CJP) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षाने आता सोशल मीडियावर भाजपला मागे टाकत नवीन इतिहास रचला आहे. पक्षाने सोशल मीडिया मोहिमेने 90 लाखांहून अधिक (9 दशलक्ष) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत या मोहिमेने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय जनता पक्ष’ (BJP) लाही मागे टाकले आहे. अवघ्या चार दिवसांत भाजपला टाकले मागे 21 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर (@bjp4india) सुमारे 87 लाख (8.7 दशलक्ष) फॉलोअर्स होते तर केवळ चार दिवस जुन्या असलेल्या ‘Cockroach Janata Party’ ने 90 लाखांचा (9 दशलक्ष) टप्पा केव्हाच ओलांडला आहे. सध्या या यादीत काँग्रेस पक्षाचे हँडल (@incindia) अव्वल स्थानी असून त्याचे सुमारे 1.32 कोटी (13.2 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत, तर ‘आम आदमी पक्षा’चे (AAP) सुमारे 19 लाख (1.9 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. भाजपने आतापर्यंत 18000 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत तर CJP ने केवळ 54 पोस्ट्सच्या माध्यमातूनच हा टप्पा गाठला आहे. डिजिटल विश्वात, अलीकडच्या काळातील सर्वात मोठी राजकीय मोहीम म्हणून या CJP चे कौतुक केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. या सोशल मीडिया खात्याच्या ‘बायो’मध्ये (Bio) स्वतःचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, हे “तरुणांचे, तरुणांनी चालवलेले आणि तरुणांसाठी असलेले एक राजकीय व्यासपीठ” आहे. हे व्यासपीठ केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून काम करत नाही तर देशातील तरुण वर्ग बेरोजगारी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना (Paper leaks) आणि राजकीय उत्तरदायित्व यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करत आहे.

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स Read More »

img 20260519 wa0071

PM Modi: प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती की लोकशाहीची कसोटी?

PM Modi : नॉर्वेमधील एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाने भारतातील राजकारण, प्रसारमाध्यमांची स्वायत्तता आणि सत्तेची उत्तरदायित्वाची भावना या तिन्ही मुद्द्यांना नव्याने केंद्रस्थानी आणले आहे. “तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं कधी देतील?” हा नॉर्वेच्या पत्रकाराने विचारलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीला उद्देशून नव्हता तो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेला प्रश्न होता. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांची ताकद केवळ बहुमतावर मोजली जात नाही, तर टीका ऐकून घेण्याच्या आणि कठीण प्रश्नांना सामोरे जाण्याच्या क्षमतेवरही ठरते. त्यामुळेच पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला प्रतिप्रश्न, भावनिक राष्ट्रवाद किंवा ऐतिहासिक अभिमानाच्या चौकटीत अडकवण्यापेक्षा थेट उत्तर देणे अधिक अपेक्षित होते. भारताने योग दिला, शून्याचा शोध लावला, कोरोना काळात लस पुरवल्या या सर्व गोष्टी निःसंशय अभिमानास्पद आहेत मात्र मानवाधिकार आणि प्रसारमाध्यम स्वातंत्र्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे ते प्रत्यक्ष उत्तर ठरत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकाराला संयम ठेवा असे सुनावत भारताची जागतिक प्रतिमा आणि योगदान मांडले. परंतु आधुनिक लोकशाहीत विश्वास हा केवळ ऐतिहासिक वारसा किंवा आंतरराष्ट्रीय मदतीवर उभा राहत नाही तो पारदर्शकतेवर उभा राहतो. पत्रकाराने उपस्थित केलेला प्रश्न अस्वस्थ करणारा असू शकतो, पण अस्वस्थ करणारे प्रश्न टाळणे ही कोणत्याही मजबूत लोकशाहीची खूण नसते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या थेट प्रश्नांना क्वचितच सामोरे जातात, ही टीका पुन्हा ऐरणीवर आली आहे. गेल्या काही वर्षांत संवादाचे स्वरूप नियंत्रित मुलाखती, निवडक माध्यमांशी संभाषण किंवा थेट जनसंवाद अशा चौकटीत अधिक दिसले. कठोर, अनपेक्षित आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांसमोर उभे राहणे ही परिपक्व लोकशाहीतील नेतृत्वाची आवश्यक कसोटी मानली जाते. जगातील अनेक प्रबळ राष्ट्रांचे नेते नियमित पत्रकार परिषदांना सामोरे जातात.त्यामुळे भारतातही ही अपेक्षा अस्वाभाविक नाही. या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे भारतीय माध्यमांची भूमिका. नॉर्वेच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नानंतर अनेकांनी भारतीय माध्यमांवरच प्रश्न उपस्थित केले. सत्तेला प्रश्न विचारण्याची धार कमी होत चालल्याची टीका नवीन नाही. माध्यमांचे काम सरकारविरोध करणे नसते परंतु सत्तेला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे हीच लोकशाहीतील त्यांची मूलभूत जबाबदारी असते. भारताची प्रतिमा आज जगभर वेगाने उंचावत आहे. अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, तंत्रज्ञान आणि भू-राजकीय प्रभाव या सर्व क्षेत्रांत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु जागतिक नेतृत्वाचा दावा करणाऱ्या देशाने टीका आणि प्रश्नांनाही तितक्याच आत्मविश्वासाने सामोरे जाणे अपेक्षित असते. कारण प्रश्न टाळल्याने प्रतिमा मजबूत होत नाही उलट संशय अधिक गडद होतो. लोकशाहीची खरी ताकद जयघोषात नसते, तर प्रश्न विचारण्याच्या आणि उत्तर देण्याच्या स्वातंत्र्यात असते. आणि सत्तेला प्रश्न विचारणारा पत्रकार हा राष्ट्रविरोधी नसतो तो लोकशाहीच्या आरशात वास्तव दाखवणारा नागरिक असतो.

PM Modi: प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती की लोकशाहीची कसोटी? Read More »

img 20260519 wa0072

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि चार वर्षांपासून गोठलेले राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ही केवळ एक निवडणूक नाही तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय शक्तिसंतुलनाची पहिली मोठी चाचणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा आता भाजपच्या वाढलेल्या संख्याबळामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हा खरा कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने आणि अनेक संस्था अस्तित्वात नसल्याने ही जागा तब्बल चार वर्षे रिक्त राहिली. तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, यामागे राजकीय अंकगणित स्पष्ट दिसते. ५५९ पैकी ९६ जागा रिक्त असल्या, तरी उर्वरित मतदाररचना भाजपसाठी अनुकूल असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने मागील काही वर्षांत निर्माण केलेले वर्चस्व आता विधान परिषद निवडणुकीत कसोटीवर लागणार आहे. नगर जिल्ह्याच्या या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रंगतदार राहिला आहे. एका मताने दिग्गजांचा पराभव, मिठाईच्या बॉक्समधून उमेदवारीची चाहूल, मतदारांच्या ‘भावा’भोवती फिरणारे राजकारण या साऱ्यांनी या निवडणुकीला नेहमीच वेगळे स्थान मिळवून दिले. मर्यादित मतदारसंख्या असल्यामुळे येथे राजकीय गणिताइतकेच वैयक्तिक संबंध आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच ही निवडणूक पक्षनिष्ठेपेक्षा सत्तासमीकरणांची अधिक असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडे जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ आहे. त्यामुळे “ही जागा भाजपलाच मिळावी” असा सूर पक्षातील निष्ठावंतांकडून उमटू लागला आहे. महायुतीतील जागावाटपात भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. तर राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचे नावही चर्चेत आहे. तनपुरे यांनी घेतलेली ‘मवाळ’ भूमिका आणि त्याबदल्यात मिळालेल्या आश्वासनांच्या चर्चा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतील. ते भाजपकडे झुकतात की अजित पवार गटाकडे, यावर अनेक समीकरणे बदलू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक आव्हानात्मक आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने विजयासाठी त्यांना केवळ राजकीय चातुर्य आणि मतविभाजनावर अवलंबून राहावे लागेल. अशा वेळी ‘क्रॉस वोटिंग’ आणि अंतर्गत नाराजी हे घटक निर्णायक ठरू शकतात. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक केवळ एक जागा भरणारी प्रक्रिया नाही; तर आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. भाजपला आपले वर्चस्व अधिक मजबूत करायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत नगरचे राजकारण अधिक चुरशीचे, अधिक वैयक्तिक आणि अधिक अनपेक्षित वळणे घेणार, हे निश्चित.

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Read More »

petrol

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका

Petrol Price Today: अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मुबलक इंधन उपलब्ध जिल्हा प्रशासनाने IOCL, BPCL व HPCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली असून, मागील सात दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक इंधन पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींवर तत्काळ कार्यवाही काही पेट्रोल पंपांवर बिलिंग किंवा क्रेडिटच्या तांत्रिक कारणांमुळे किरकोळ विलंब झाल्यास, प्रशासनाकडून अवघ्या ४ ते ५ तासांत इंधन उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यात येत आहे. प्रशासनाचा प्रभावी समन्वय शासनाचे संबंधित विभाग, गॅस एजन्सीज व पेट्रोल पंप चालक यांच्यात योग्य समन्वय राखण्यात आला असून, सर्व प्रकारचे इंधन सुरळीत उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून करण्यात आले आहे.

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका Read More »

iea report

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली

IEA Report: वाढता जागतिक तणाव आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाचा परिणाम देशात आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर जाणवू लागला आहे. तेलाच्या साठ्यांबाबत एक गंभीर इशारा देताना, ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने’ (IEA) असे नमूद केले आहे की, जगातील व्यावसायिक तेलाचे साठे वेगाने कमी होत आहेत. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, अनेक देशांकडे आता केवळ काही आठवडे पुरेल इतकाच तेलाचा साठा शिल्लक आहे. दरम्यान, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून, या प्रवृत्तीमुळे जनतेची चिंता अधिकच वाढली आहे. पॅरिसमध्ये आयोजित G-7 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान बोलताना, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी सांगितले की, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) भागात वाढलेला तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीचा जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. बिरोल यांच्या मते, परिस्थिती स्थिर करण्याच्या उद्देशाने दररोज आपत्कालीन साठ्यांमधून (emergency reserves) सुमारे 25 लाख बॅरल्स तेल बाजारात सोडले जात आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की हे साठे अमर्याद नाहीत जर हे संकट दीर्घकाळापर्यंत कायम राहिले, तर जगाला गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. दोन महिन्यांत तेलाचे साठे विक्रमी नीचांकी पातळीवर संस्थेच्या अहवालानुसार, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये जागतिक तेलाच्या साठ्यांमध्ये मोठी घट नोंदवली गेली. अवघ्या दोन महिन्यांतच तेलाचे साठे सुमारे 24 कोटी 60 लाख बॅरल्सने कमी झाले आहेत. तज्ञांचे असे मानणे आहे की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे, नजीकच्या भविष्यात तेलाची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत आणखी वाढू शकते. परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा न झाल्यास, तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा IEA ने यापूर्वीच दिला होता. भारताकडे तेलाचा किती साठा उपलब्ध? तेलाच्या संकटाबाबत वाढत्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी नुकतेच असे आश्वासन दिले की, भारताकडे सध्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशाकडे कच्च्या तेलाचा (crude oil) सुरक्षित साठा उपलब्ध असून तो सुमारे 60 दिवस पुरेल इतका आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 60 दिवस पुरेल इतका LNG (द्रवरूप नैसर्गिक वायू) आणि 45 दिवस पुरेल इतका LPG (द्रवरूप पेट्रोलियम वायू) यांचा साठाही उपलब्ध आहे. सरकारने हे देखील मान्य केले आहे की, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर राहिल्या, तर त्याचा सरकारी तेल कंपन्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ मंगळवारी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली. एकाच आठवड्यात तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, पेट्रोलचा दर वाढून तो अंदाजे ₹98.64 प्रति लिटर झाला आहे तर डिझेलही महाग होऊन ₹91.58 प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. कोलकातामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, जिथे पेट्रोलचे दर ₹110 प्रति लिटरच्या जवळ पोहोचले आहेत आणि डिझेलचा दर ₹96.07 प्रति लिटर झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर आता ₹107.59 प्रति लिटर आणि डिझेलचा दर ₹94.08 प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹104.49 प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ₹96.11 प्रति लिटर इतका आहे.

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली Read More »

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना मोठा धक्का! तीन दिवसांत दुसऱ्यांदा वाढले पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price Hike : सामान्य नागरिकांना आज मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. अवघ्या तीन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. आज सकाळी, सरकारी तेल कंपन्यांनी प्रति लिटर ९० पैशांची दरवाढ लागू केली. या वाढीनंतर, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल आता ₹९७.७७ वरून वाढून ₹९८.६४ प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेलचा दर ₹९०.६७ वरून वाढून ₹९१.५८ प्रति लिटर झाला आहे. अवघ्या 3 दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल महाग यापूर्वी, शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹३ ची वाढ करण्यात आली होती. ही वाढ चार वर्षांहून अधिक कालावधीनंतर लागू करण्यात आली होती. मध्यपूर्वेतील (Middle East) सध्याचा तणाव आणि इराणसोबत वाढलेला संघर्ष यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठी उलथापालथ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली प्रचंड वाढ भरून काढण्यासाठी सध्याची दरवाढ अद्याप पुरेशी नाही. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मधील सध्याच्या संकटामुळे इंधनाच्या वाहतुकीत (शिपमेंट्समध्ये) व्यत्यय आला आहे, ज्याचा थेट परिणाम भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांवर होत आहे. प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर राजधानी दिल्लीमध्ये, पेट्रोल ८७ पैशांनी महाग होऊन ₹९८.६४ प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलचा दर ९१ पैशांनी वाढून ₹९१.५८ प्रति लिटर झाला आहे. मुंबईमध्ये, ९१ पैशांच्या वाढीनंतर पेट्रोल ₹१०७.५९ प्रति लिटर दराने विकले जात आहे. दरम्यान, डिझेल ९४ पैशांनी महाग होऊन ₹९४.०८ प्रति लिटरवर पोहोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक वाढ दिसून आली; येथे पेट्रोल ९६ पैशांनी वाढून ₹१०९.७० प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल ९४ पैशांनी महाग होऊन ₹९६.०७ प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. येथे, पेट्रोलच्या दरात ८२ पैशांची वाढ होऊन तो प्रति लिटर ₹१०४.४९ वर पोहोचला आहे; तर डिझेलच्या दरात ८६ पैशांची वाढ झाली असून, ते आता प्रति लिटर ₹९६.११ दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना मोठा धक्का! तीन दिवसांत दुसऱ्यांदा वाढले पेट्रोल डिझेलचे दर Read More »