DNA मराठी

ट्रेंडिंग

Nirbhaya Squad : निर्भया पथकाच्या वाहनातून आलेल्या व्यक्तीचा धिंगाणा अन् मारहाण

Nirbhaya Squad : नवी मुंबईतील खारघर परिसरातील बेलपाडा येथे सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती पोलिस दलातील निर्भया पथकाच्या वाहनातून आला आणि वाहनातून उतरून काही नागरिकांना विनाकारण मारहाण करू लागला, अशी माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने त्यांनाही दम दिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. महिला अत्याचारासारख्या गुन्ह्यांवर कारवाई करणाऱ्या निर्भया पथकाच्या वाहनातूनच संबंधित व्यक्ती आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्ती खरोखर पोलीस कर्मचारी होता की इतर कोणी, तसेच त्याच्या ताब्यात हे वाहन कसे आले, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती काय दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nirbhaya Squad : निर्भया पथकाच्या वाहनातून आलेल्या व्यक्तीचा धिंगाणा अन् मारहाण Read More »

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून  

Ahilyanagar Crime :  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संवत्सरजवळील रामवाडी येथे दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.   खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून   Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया

Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा. खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत. दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे. जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही. आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा. तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया Read More »

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, आणखी एक न्यायालयीन लढाईत विजय; अंजली दमानियांचे आरोप बोगस

Dhananjay Munde : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले, त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. लोकायुक्त यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे संपूर्णतः ऐकून घेऊन, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल तसेच संविधानिक तरतुदींचा अभ्यास करून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा स्वयंस्पष्ट असून या प्रकरणातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून सदर आरोप फेटाळून लावत असल्याचे आपल्या निकालामध्ये स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पडगिलवार यांच्यासह विविध जनहित याचिका यांच्यावरती एकत्रित निकाल देताना हे आरोप केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून व खोट्या पुराव्यांच्या आधारे केलेले असून राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर व्यवसायिक दृष्टीने खोटी माहिती समोर आणून शंका उपस्थित करणे हे कायद्याला धरून नसल्याचे स्पष्ट करत, सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. तसेच याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर संबंधित याचिकाकर्त्यांना जर निकाल मान्य नसता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विरोधात अपील करायला हवे होते मात्र त्यांनी अद्याप अपील न करता दंड भरला; याचाच अर्थ याचिका करते यांना सुद्धा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य होता. उच्च न्यायालयाने या निकालामध्ये नोंदविलेली निरीक्षणे ही स्वयंस्पष्ट, निर्णायक व शासनाच्या धोरणाला अनुसरून असल्याने तसेच याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे संबंधित याचिकेमध्ये जोडलेल्या बाबींव्यतिरिक्त, बनावट पुरावे असून कुठलाही ठोस पुरावा किंवा दखल घेण्यायोग्य काहीही नसल्याने यामध्ये आणखी वेगळी सुनावणी घेण्याचा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही, असेही लोकायुक्तांनी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. कृषी साहित्य खरेदी सोबतच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ऑफिस प्रॉफिट सह विविध आरोप केले होते. यासंदर्भात धनंजय मुंडे यांचे वकील श्री शार्दुल सिंह यांनी धनंजय मुंडे यांची बाजू मांडताना खासदार जया बच्चन यांच्या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा संदर्भ देत ऑफिसर प्रॉफिट बाबत लोकायुक्तांकडे देण्यात आलेली माहिती ही चुकीची व अर्धवट असल्याचे नमूद केले. या प्रकरणात देखील संविधानातील ठराविक काही कलमे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला असून, लोक आयुक्तांच्या अखत्यारीतील कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा किंवा त्या अनुषंगाने कुठलाही आरोप सिद्ध होत नाही; तसेच याचिकाकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत देखील कुठलाही महत्त्वाचा नवीन पुरावा त्यांच्या पुरवणी जबाबात देखील सादर केलेला नाही. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा हा देखील निकाली काढला असून, त्यातही धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. दरम्यान मागील एका वर्षापासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे काही आरोप केले ते उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता लोकायुक्तांनी देखील सदर आरोप फेटाळून लावले असल्याने, अंजली दमानिया यांच्या केवळ तोंडाच्या वाफा व धनंजय मुंडे यांच्या बदनामीचा असफल प्रयत्न होता, हे सिद्ध झाले आहे, अंजली दमानिया यांना या निकालाने एक प्रकारे न्यायव्यवस्थेने चपराक लावली आहे, असे म्हणावे लागेल. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वरती मागील काही महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले, त्यावरून त्यांची बदनामी करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही, मात्र मुंडे यांच्या विरोधातील एक एक आरोप खोटा सिद्ध होण्याची मालिका देखील सुरू असून आज त्यात या निकालाने महत्वाची भर पडली आहे. महत्त्वाचे निकाल कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीबाबत करण्यात आलेल्या आरोपात उच्च न्यायालय त्यापाठोपाठ आता लोकायुक्त यांनी देखील मुंडेंच्या बाजूने निकाल दिला. पीकविमा संदर्भात कोणताही घोटाळा झाला नसून राज्यात मागील दहा वर्षातील सर्वाधिक पीकविमा धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री कार्यकाळात महाराष्ट्राला मिळाला, असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषित केले. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथ पत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपातून क्लीन चीट, मुंडेंच्या बाजूने निकाल. ऑफिस ऑफ प्रॉफिट संदर्भाने केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, आणखी एक न्यायालयीन लढाईत विजय; अंजली दमानियांचे आरोप बोगस Read More »

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण

Maharashtra Crime : अभियांत्रिकी महाविद्यालयातील सी सी टीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड का बदलला असे विचारले म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्याने मुलासह मोठ्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार लोणीकंदमध्ये घडला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रामचंद्र भूमकर ( वय ५८) व त्यांचा मुलगा सिद्धांत ( वय २५ ) ( दोघेही रा. लोणीकंद ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मोठे भाऊ उद्धव रामचंद्र भूमकर ( वय ६५, रा. लोणीकंद ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर कुटुंबीयांचे रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे महाविद्यालय आहे. उद्धव भूमकर हे त्या संस्थेचे खजिनदार आहेत. तर शंकर भूमकर हे संचालक असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. बकोरी रोडवर हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सी सी टीव्ही चा पासवर्ड सिद्धांत याने बदलला. तसेच सर्व आर्थिक व्यवहार शंकर व त्यांचा मुलगा बघतात. त्याबाबत उद्धव यांना काही कळू देत नाहीत. त्याबाबत विचारणा केली की दोघे शिवीगाळ करायचे. कॉलेजच्या काही महत्वाच्या फाईल जागी दिसल्या नाही. लोणीकंद येथील घरी उध्दव यांनी पासवर्ड व फाईल बद्दल शंकर यांना विचारले असता. दोघा बाप लेकांनी उद्धव यांना तू आम्हाला विचारणारा कोण म्हणून शिवीगाळ करीत आधी लाथा बुक्याने व नंतर कोणत्या तरी कठीण वस्तुने खाली पाडून मारहाण केली. उद्धव यांच्या पुतण्याने व पत्नीने त्यांची सोडवणूक केली. यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसात त्यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण Read More »

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

israel iran war

Israel-Iran War : परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी

Israel-Iran War : मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक :आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत :​टोल फ्री क्रमांक : १०७०​ फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३​ई- मेल : controlroom@gov.in​ तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत, त्यांच्याबाबतची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक : ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०​टोल फ्री क्रमांक: १०७७​परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना :१. सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.२. भारतीय दूतावास / कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.३. आपले लोकेशन (ठिकाण) आणि सद्यस्थितीची माहिती कुटुंबाला सतत कळवावी.४. मोबाईलची बॅटरी चार्ज राहील याची काळजी घ्यावी आणि पासपोर्ट-व्हिसासह सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.५. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.६. भारतीय दूतावासाकडे आपली नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ​विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४x ७ आपत्कालीन क्रमांक उपलब्ध : तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सुचवण्यात आले आहे.

Israel-Iran War : परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी Read More »

israel iran war

Israel-Iran War : ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय टँकरवर हल्ला; चार जण जखमी

Israel-Iran War : इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धामध्ये काही भारतीयांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ओमानच्या मुसंदम किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवर झालेल्या भयानक हल्ल्याने जगाचे लक्ष वेधले आहे. या संघर्षाचे थेट बळी ठरलेल्या जहाजावर पंधरा भारतीय क्रू मेंबर्स होते. पश्चिम आशियातील तणाव जागतिक व्यापार मार्गांसाठी कसा मोठा धोका बनला आहे हे या घटनेवरून दिसून येते. ओमानच्या किनाऱ्याजवळ भयानक हल्ला मुसंदम द्वीपकल्पाबाहेर झालेल्या या हल्ल्याने त्याच्या भौगोलिक स्थान आणि तीव्रतेमुळे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले आहे. “स्कायलाईट” हा भव्य पलाऊ-ध्वजांकित तेल टँकर ओमानच्या खासाब बंदराच्या उत्तरेस फक्त पाच नॉटिकल मैल अंतरावर जात असताना अचानक हल्ला करण्यात आला. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने पुष्टी केली आहे की या तणावाच्या काळात ओमानच्या इतक्या जवळ व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जहाजावर एकूण 20 क्रू मेंबर्स हल्ल्यानंतर लगेचच, ओमानच्या सुरक्षा एजन्सींनी एक प्रचंड आणि अत्यंत सक्रिय बचाव मोहीम सुरू केली. वृत्तानुसार, जहाजावर 20 क्रू मेंबर्स होते, ज्यात 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिक होते. सर्व 20 क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवण्यात आले ही दिलासादायक बाब आहे. या हल्ल्याच्या अचानकपणामुळे आणि स्फोटाच्या आवाजामुळे सर्व क्रू मेंबर्सना गंभीर दुखापत झाली. जखमी सदस्यांवर उपचार सुरुवातीच्या अहवालांनुसार, या हल्ल्यात चार क्रू मेंबर्सना वेगवेगळ्या प्रमाणात दुखापत झाली. काहींना गंभीर दुखापत झाली, तर काहींना किरकोळ. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आहे. जहाजावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता की नाही हे सुरक्षा यंत्रणांनी अद्याप निश्चित केलेले नाही. शिपिंग उद्योगासाठी मोठा धोका ओमानच्या इतक्या जवळ झालेला हा हल्ला संपूर्ण आंतरराष्ट्रीय शिपिंग उद्योगासाठी मोठा धोका आहे. मुसंदम द्वीपकल्प हा एक धोरणात्मक आणि संवेदनशील क्षेत्र आहे ज्यातून जगातील तेल व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग जातो. येथे हल्ला झाल्यास आता कोणताही समुद्री मार्ग सुरक्षित नाही. भारत सरकार या गंभीर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण हजारो भारतीय खलाशी या धोकादायक सागरी मार्गांवर तैनात आहेत.

Israel-Iran War : ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय टँकरवर हल्ला; चार जण जखमी Read More »

iran usa war

Iran USA WAr : इराणची मोठी कारवाई; अमेरिकन विमानवाहू जहाज अब्राहम लिंकनवर हल्ला

Iran USA WAr : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्युनंतर, इराणने सूडबुद्धीने “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4” सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या युद्धनौके अब्राहम लिंकनला टार्गेट केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून हा दावा स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. अमेरिकेने दावे फेटाळल इराणी राज्य वृत्तसंस्था आयआरएनए आणि आयआरजीसीच्या मते, “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4” चा भाग म्हणून अमेरिकन विमानवाहू अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, तीच युद्धनौका ज्याने इराणविरुद्धच्या अलिकडच्या लष्करी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आणि म्हटले की क्षेपणास्त्रे जहाजाच्या जवळही आली नाहीत. मुस्लिम जगताविरुद्ध उघड युद्धाची घोषणा इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचे वर्णन संपूर्ण मुस्लिम जगताविरुद्ध उघड युद्धाची घोषणा म्हणून केले. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आपल्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा बदला घेणे हे आपले पवित्र कर्तव्य आणि कायदेशीर अधिकार मानतो. इराणी सैन्याने घोषणा केली आहे की, ते आता संघर्षाच्या “नवीन आणि धोकादायक टप्प्यात” प्रवेश करत आहे, जिथे जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी हल्ले तीव्र केले जातील, ज्यामध्ये अमेरिकन आणि इस्रायली तळांना टार्गेट केले जाईल. प्रमुख आखाती शहरांमध्ये घबराट इराणने केलेल्या मोठ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती प्रदेश हादरला. रियाध, दुबई, अबू धाबी, दोहा, मनामा, जेरुसलेम आणि तेल अवीव यासारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रचंड स्फोट ऐकू आले. इस्रायली मदत सेवांनुसार, ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान चार जण ठार झाले, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. इस्रायलचे ‘पहिले पाऊल’ ऑपरेशन इस्रायलने खामेनींच्या मृत्यूचे वर्णन त्यांच्या मोठ्या लष्करी रणनीतीचे फक्त “पहिले पाऊल” म्हणून केले आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी खुलासा केला की संयुक्त गुप्तचर कारवाईत एका मिनिटात 40 वरिष्ठ इराणी कमांडर मारले गेले. इस्रायलच्या सीमेपासून एक हजार मैलांपेक्षा जास्त अंतरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. इस्रायलचा हा दावा इराणच्या लष्करी नेतृत्वासाठी आणि त्याच्या संपूर्ण सुरक्षा संरचनेसाठी एक महत्त्वाचा आव्हान आहे. जागतिक शांततेवर संकट वाढतोय इराणच्या क्रांतिकारी रक्षकांनी इशारा दिला आहे की, ते अमेरिका आणि इस्रायलला त्यांच्या नवीन आक्रमणाबद्दल पश्चात्ताप करण्यास भाग पाडतील. या लष्करी संघर्षामुळे केवळ मध्य पूर्वेतील शांतताच नाही तर जागतिक शांतता आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यालाही धोका निर्माण झाला आहे.

Iran USA WAr : इराणची मोठी कारवाई; अमेरिकन विमानवाहू जहाज अब्राहम लिंकनवर हल्ला Read More »

team india

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात

IND vs WI: आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली होती.मात्र भारताकडून संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकतेचे उत्तम मिश्रण दाखवले. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला, जिथे आता इंग्लंड आव्हान देईल. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोस्टन चेस आणि शाई होप यांच्या भागीदारीने वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. दोघांनी 68 धावा जोडल्या. होप 32 धावांवर बाद झाला. बुमराहने एकाच षटकात दोन विकेट घेतले. पॉवेल आणि होल्डरने आक्रमक फलंदाजी केली. अर्शदीपने एका षटकात 24 धावा दिल्या. वेस्ट इंडिजने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. तर दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्ये 53 धावा केल्या पण दोन विकेट गमावले. अभिषेक शर्मा 10 आणि इशान किशन 10 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. तिलक वर्माने 27 धावांची उपयुक्त खेळी केली. यानंतर संजू सॅमसनने जबाबदारी सांभाळली. त्याने नाबाद 97 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने 17 धावा केल्या. सॅमसनमुळे भारताने 19.2 षटकात 5 बाद 199 धावा करून विजय मिळवला. हा विश्वचषकातील भारताचा सर्वात मोठा पाठलाग होता. उपांत्य फेरीची तयारी या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आता त्यांचा सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल.

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात Read More »