DNA मराठी

ट्रेंडिंग

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics : अजित पवार – अमित शहांची चर्चा अन् सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद; नेमकं  ‘फॉर्म्युला’ काय ठरला होता?

Maharashtra Politics:  अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही हिरवा कंदील मिळाला होता. विलीनीकरणाच्या हालचालींची नागपूरला सुरुवात विलीनीकरणाच्या हालचालींची सुरुवात नागपूर अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील बैठकीतून झाली. अजित पवार यांनी या विषयाची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. फडणवीस यांनी हा विषय केंद्राशी संबंधित असल्याचे सांगितल्यानंतर, अहिल्यानगरमध्ये अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात यावर प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून या विलीनीकरणाला संमती मिळवून दिली, असा दावा सूत्रांनी केला आहे. मंत्रिपदाचा ‘फॉर्म्युला’ आणि सत्तेचे वाटप तर दुसरीकडे विलीनीकरणानंतरच्या सत्तेच्या वाटपाबाबतही काही महत्त्वाचे मुद्दे निश्चित करण्यात आले होते. या प्रस्तावानुसार, शरद पवार यांचा गट अजित पवार यांच्या पक्षात विलीन झाल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्याचे ठरले होते. तसेच जयंत पाटील किंवा रोहित पवार यापैकी एका नेत्याला राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्याचा प्रस्ताव होता. 16 जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत यावर सविस्तर चर्चा झाली होती. राजकीय अडचण अजित पवार यांच्या विलीनीकरणाच्या या प्रयत्नांना त्यांच्या स्वतःच्याच पक्षातील काही नेत्यांचा विरोध होता, असे बोलले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे, शरद पवार गटाकडे संसदेत असलेली अधिक ताकद. जर हे विलीनीकरण झाले असते, तर सुप्रिया सुळे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित झाला असता, ज्यामुळे अजित पवार गटातील इतर नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकली असती. या अंतर्गत वादामुळे ही प्रक्रिया काहीशी संथ झाली होती असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही गटांनी ‘घड्याळ’ चिन्हावर एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. अजितदादांच्या निधनानंतर आता हे विलीनीकरण पूर्ण होणार की राष्ट्रवादीमधील पेच अधिक वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : अजित पवार – अमित शहांची चर्चा अन् सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद; नेमकं  ‘फॉर्म्युला’ काय ठरला होता? Read More »

shani shingnapur

Shani Shingnapur: शनिशिंगणापूर देवस्थान अँप प्रकरण, 77 लाखांचा अपहार अन् 2500 पानांचे दोषारोपपत्र

Shani Shingnapur:  शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अँप संदर्भातील सुमारे ५०० कोटीचा अपहार झालयाचा आरोप करण्यात आला होता. हा मुद्दा थेट अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये ७७ लाखांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. अपहार प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरूध्द सुमारे अडीच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सुमारे ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.   संजय तुळशीराम पवार (रा. सोनई), सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन सुर्यभान शेटे (मयत), उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई), सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्ष केरूजी दरंदले (रा. शनिशिंगणापूर) यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. श्री शनैश्वर प्रसन्न शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अँपमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या अँप करारातील संशयास्पद व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात कोणताही तक्रारदार पुढे न आल्याने स्वतः पोलीस फिर्यादी होत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी तसेच अॅप मालक यांचे जबाब नोंदविले. विविध बँक खात्यांची तपासणी करून अपहारासंदर्भातील कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले. मात्र, सखोल तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्रात ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. सायबर पोलिसांनी तपासाला गती देत देवस्थानचे कर्मचारी संजय पवार व सचिन शेटे यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान अँप मालकांनी करारानुसार देवस्थानच्या खात्यात जमा करावयाची रक्कम थेट काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायबर पोलिसांनी अँप मालकांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

Shani Shingnapur: शनिशिंगणापूर देवस्थान अँप प्रकरण, 77 लाखांचा अपहार अन् 2500 पानांचे दोषारोपपत्र Read More »

ahilyanagar events

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

Ahilyanagar Events :   कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ व कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन व थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. महोत्सवात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कृषी यांत्रिकीकरण व निविष्ठांचे सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यात जामखेडची ज्वारी, अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ, हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू, कडधान्य, फळे व भाजीपाला यांसह विविध कृषी प्रक्रिया पदार्थांची विक्री व प्रदर्शन करण्यात येईल. कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेता महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपाययोजना व काटेकोर शेती याविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल असणार आहेत. यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसह विविध पारंपरिक गावरान खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येईल. या महोत्सवाच्या कालावधीत आयोजित कृषी परिषदेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित अधिकारी व विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित केली असून त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी या जिल्हा कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव Read More »

shirdi news

Shirdi News :  शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर मोठी कारवाई

Shirdi News : साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे सशर्त आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी निर्गमित केले आहेत. शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसर व शिर्डी शहरात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींकडून सार्वजनिक रस्त्यावर भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे अडवली जातात. भाविकांना खासगी पार्किंगच्या ठिकाणी वाहने घेण्याचा आग्रह धरला जातो. तसेच विशिष्ट दुकानांतून अव्वाच्या सव्वा दरात पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यातून भाविकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा भाविकांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शिर्डी गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे व प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबवून त्यांची दिशाभूल करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही गावातून शिर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांनी विशिष्ट दुकान अथवा आस्थापनेतूनच खरेदी करावी किंवा निवास करावा, असा आग्रह आता धरता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली मध्यस्थीचे व्यवहार करणाऱ्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपली बाजू मांडता येईल, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Shirdi News :  शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर मोठी कारवाई Read More »

eknath shinde

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सामील करून आपली ताकद वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन आणि शरद पवार गटातील एक नगरसेवक शिंदे गटात अधिकृतपणे सामील होण्याची तयारी करत आहेत. हे चार नगरसेवक आता बीएमसीमध्ये संयुक्त विधिमंडळ गट म्हणून स्थापन केले जात आहेत. या नवीन राजकीय समीकरणांतर्गत, महायुती आघाडी बीएमसीमध्ये दोन स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करेल. भाजप स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करेल, तर शिंदे यांची शिवसेना संयुक्त गट म्हणून नोंदणी करेल, ज्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शरद पवार गटातील नगरसेवक एकत्र येतील. या फेरबदलानंतर, बीएमसीमध्ये शिंदे सेनेची संख्या 29 वरून 33 पर्यंत वाढेल. शिवसेनेच्या गटातील नगरसेवकांची संख्या वाढल्याने बीएमसीमधील नेतृत्व आणि महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव आणखी मजबूत होईल. दरम्यान, महायुती आघाडीची एकूण संख्या आता 122 नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. भाजपचा वाढता दबाव बीएमसीमध्ये वाढत्या शिवसेना (शिंदे गट) गटामुळे त्यांच्या मित्रपक्ष भाजपची चिंता वाढली आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने, बीएमसी धोरणात्मक निर्णयांवर आणि नेतृत्वावर शिंदे गटाचा प्रभाव आणखी मजबूत होईल. बीएमसी महापौरपद आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्वावरून दोन्ही पक्षांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे. वाढत्या ताकदीमुळे, शिंदे सेना आपला दावा अधिक आक्रमकपणे मांडू शकते, ज्यामुळे भाजपच्या एकतर्फी वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मुंबई बीएमसी निवडणुकीत या वर्षीचा जनादेश भाजप युतीसाठी ऐतिहासिक ठरला आहे. महायुतीने प्रचंड विजय मिळवला आणि ठाकरे कुटुंबाची जवळजवळ तीन दशकांची पकड मोडून काढली. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकूण 118 जागा जिंकल्या, त्यापैकी एकट्या भाजपने 90 जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष बनला. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी (यूबीटी) ही निवडणूक निराशाजनक ठरली. पक्षाला मागील निवडणुकीत 84 जागांवरून 65 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) उद्धव सेनेसोबत युती करून 53 जागा लढवूनही केवळ सहा जागा मिळाल्या.

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र Read More »

img 20260202 wa0016

Pimpari Chinchwad Municipal Corporation : उपमहापौर पदाच्या निवडीत पिंपरीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट: भाजपने दुसरा उमेदवार अन् राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल

Pimpari Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपने महापौर पदासाठी रवी लांडगे यांचे नाव जाहीर करताच अनेक घडामोडी घडल्या. महापौर पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शितल उर्फ गोरख शिंदे यांच्या नावाचे पत्र पाठवले. त्यानंतर मोठे नाराजी नाट्य घडले. शितल उर्फ गोरख शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास नकार दिला. ते महापौर किंवा स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र, उपमहापौर पदासाठी नाव आल्याने ते नाराज झाले आणि पालिकेतून निघून गेले. त्यानंतर भाजपने शर्मिला बाबर यांचे नाव निश्चित केले. त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. शितल उर्फ गोरख शिंदे यांनी नकार दिल्यानंतर कैलास कुटे, संजय काटे यांची नावे चर्चेला आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपकडून ही महिला उमेदवार देण्यात आला. त्यानंतर शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर सहा तारखेला उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. त्यामध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येईल कारण भाजपकडे 85 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 37 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत गेली तर त्यांना उपमहापौर पद मिळू शकते. अशी चर्चा आहे. मात्र, या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. पिंपरी भाजपमध्ये सगळे काही आलबेल नाही आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे हे महापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र, प्रदेश पातळीवरून त्यांचे नाव न आल्याने ते नाराज होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांचा महापौर पदासाठी चा अर्ज भरताना गैरहजर होते. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात झाली.

Pimpari Chinchwad Municipal Corporation : उपमहापौर पदाच्या निवडीत पिंपरीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट: भाजपने दुसरा उमेदवार अन् राष्ट्रवादीकडूनही अर्ज दाखल Read More »

sujay vikhe

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी ज्योती गाडे यांची सव्वा वर्षासाठी झालेली निवड केवळ महापालिकेपुरती मर्यादित राजकीय घटना मानणे भोळेपणाचे ठरेल. ही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तावाटपापेक्षा अधिक, जिल्ह्यातील येऊ घातलेल्या राजकीय हालचालींचा पूर्वसंकेत आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिक अर्थवाही ठरते. राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री असताना, भाजपचे जिल्ह्यातील राजकारण विखे कुटुंबाच्या अवतीभवती फिरत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचवेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या वाढत्या हालचाली, विशेषतः राहुरी मतदारसंघातील घाटाखालच्या गावांतील सततचे दौरे, गाठीभेटी आणि सामाजिक संपर्क, हे सगळे केवळ योगायोग म्हणून पाहता येणार नाही. राहुरी मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे पारंपरिक वर्चस्व आहे. ‘मारणारा-मानणारा’ असा मोठा वर्ग आजही या घराण्याशी जोडलेला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कोणतीही मोठी संस्थात्मक उभारणी न करता, केवळ जनसंपर्क, उपस्थिती आणि व्यक्तिगत नात्यांच्या जोरावर या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली होती. बाणेश्वर संस्थेपुरते मर्यादित कार्यक्षेत्र असतानाही, जनतेशी थेट संवाद ठेवत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय अवकाश तयार केला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. याच पोकळीतून भाजपकडून स्वर्गीय आमदारांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव पुढे येत आहे. सहानुभूतीचा घटक, कर्डिले घराण्याची ओळख आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राजकारणात सहानुभूती ही कायमस्वरूपी भांडवल ठरत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. याचवेळी माजी खासदार सुजय विखे किंवा धनश्री विखे यांची नावे चर्चेत असणे, हे भाजपच्या अंतर्गत सत्तासंतुलनाचे सूचक आहे. ‘विखे की कर्डिले’ ही चर्चा केवळ व्यक्तींची नाही, तर जिल्ह्यात भाजपचा चेहरा कोण असावा, याविषयीची आहे. महापालिकेतील घडामोडी याच संदर्भात पाहाव्या लागतील. महानगरपालिकेच्या सत्तेचे सूत्र आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्यावर देण्यात आले होते. महापौर निवडीपासून ते सत्ता-समीकरणांपर्यंत, अंतिम निर्णय त्यांच्याच भूमिकेवर अवलंबून राहिला. अशा परिस्थितीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या आणि गाडे कुटुंबाची सून असलेल्या ज्योती गाडे यांची महापौरपदी निवड, ही केवळ कौटुंबिक किंवा स्थानिक समतोल साधणारी बाब नाही, तर कर्डिले गटाला दिलेला एक राजकीय ‘संकेत’ म्हणूनही पाहिली जात आहे. त्याचवेळी विखे पाटील घराण्याचे नाव या निवडीभोवती फिरणे, हे सत्तेतील अदृश्य हात स्पष्ट करते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार आणि माजी मंत्री प्रसाद तनपुरे हेही या सगळ्या गणितात एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांनी जर “तीन वर्षांसाठी आमदार व्हायचे कशाला?” असा राजकीय निर्णय घेत माघार घेतली, तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अशा माघारीचा निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून, तो व्यापक राजकीय भाग असू शकतो. अहिल्यानगरच्या महापौरपदाची निवड त्यामुळे एका नगरसेविकेपुरती मर्यादित राहत नाही. ती राहुरीच्या आगामी पोटनिवडणुकीचा ट्रेलर ठरते. सत्तेची केंद्रे, घराणी, सहानुभूती आणि संधीसाधूपणा या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर आज जिल्ह्याचे राजकारण उभे आहे. प्रश्न एवढाच आहे की, या संघर्षात जनतेचा मुद्दा केंद्रस्थानी राहतो की पुन्हा एकदा सत्ताकारणाचाच खेळ वरचढ ठरतो? अहिल्यानगरच्या राजकारणाचे उत्तर लवकरच राहुरीच्या रणांगणात मिळणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ Read More »

t20 world cup

ICC T20 World Cup: भारताविरुद्ध खेळण्यास नकार देतातच पाकिस्तानला ICC ने दिला अल्टिमेटम; पुढे काय होणार?

ICC T20 World Cup: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठा ट्विस्ट आल्याने पुन्हा एकदा टी20 विश्वचषक 2026 चर्चेत आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान संघाला या स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली आहे. तर आता आयसीसीने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम दिले आहे. आयसीसीचा असा विश्वास आहे की असा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या मूलभूत भावनेचे आणि निष्पक्ष स्पर्धेच्या तत्त्वांचे उल्लंघन करतो. ICC ने निवेदनात काय म्हटले? आयसीसीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, त्यांना पाकिस्तान सरकारच्या भूमिकेची जाणीव आहे, परंतु या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कोणताही औपचारिक मेसेज मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने असेही म्हटले आहे की, कोणत्याही संघाने निवडक सामन्यांमध्ये भाग न घेण्याचे धोरण आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संदर्भात समर्थनीय ठरवणे कठीण आहे. असे वृत्त आहे की पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला T20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे, परंतु भारताविरुद्धच्या ग्रुप लीग सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मूलभूत आधार म्हणजे सर्व पात्र संघांनी नियोजित वेळापत्रकानुसार समान अटींवर स्पर्धा करणे. म्हणूनच, जागतिक क्रीडा स्पर्धेच्या भावनेनुसार कोणत्याही एका सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार केला जाऊ शकत नाही. आयसीसीने राष्ट्रीय धोरणात्मक बाबींमध्ये सरकारची भूमिका मान्य केली असली तरी, असा निर्णय जागतिक क्रिकेटच्या किंवा लाखो पाकिस्तानी चाहत्यांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या हिताचा नाही असेही म्हटले आहे. आयसीसीने पीसीबीला देशातील क्रिकेटवरील या निर्णयाच्या दीर्घकालीन परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले. दोन्ही संघ एकाच ग्रूपमध्ये भारत-पाकिस्तान सामना हा क्रिकेट जगतातील सर्वाधिक प्रेक्षक आणि महसूल मिळवणारा सामना मानला जातो. या कारणास्तव, 2012 पासून, आयसीसीने दोन्ही संघांना जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्पर्धेत एकाच गटात ठेवले आहे, जरी अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट झाले नाही. जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर 2026 चा टी20 विश्वचषक हा 2010 नंतरचा पहिला पुरुष आयसीसी स्पर्धा असेल ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भेटणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिस्थितीत आयसीसी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करू शकते. यामध्ये पाकिस्तान सुपर लीगसाठी परदेशी खेळाडूंना एनओसी देण्यावर बंदी घालणे आणि भविष्यातील आयसीसी स्पर्धांचे यजमानपद काढून घेणे यांचा समावेश असू शकतो, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

ICC T20 World Cup: भारताविरुद्ध खेळण्यास नकार देतातच पाकिस्तानला ICC ने दिला अल्टिमेटम; पुढे काय होणार? Read More »

Ajit Pawar Memorial : मोठी घोषणा, राज्यात ‘या’ ठिकाणी बांधले जाणार अजित अजित पवारांचे स्मारक

Ajit Pawar Memorial : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे एक स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात बांधले जाईल. अजित पवार यांचे जवळचे सहकारी आणि पवार कुटुंबाचे दीर्घकाळ विश्वासू किरण गुजर यांनी ही माहिती दिली. किरण गुजर यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. रविवारी मुंबईला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह अंत्यसंस्कार स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांशी आणि इतर संबंधित व्यक्तींशी चर्चा केली आणि अजित पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. गुजर यांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की स्मारकात अजित पवार यांचे सार्वजनिक जीवन, योगदान आणि बारामतीतील समर्पण प्रतिबिंबित झाले पाहिजे. स्मारकाच्या स्वरूपाबाबत लवकरच सविस्तर चर्चा केली जाईल. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसोबत डिझाईन, लेआउट आणि रचनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक घेतली जाईल, असे गुज्जर यांनी सांगितले. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली आणि प्रभावशाली नेते होते, त्यांनी बारामती आणि आसपासच्या परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. बारामती हा पवार कुटुंबाचा राजकीय गड मानला जात आहे आणि अजित पवार यांना या प्रदेशातील विकास नेते म्हणूनही ओळखले जात होते. चार दशकांहून अधिक काळ पवार कुटुंबाशी संबंधित असलेल्या किरण गुज्जर यांना अजित पवार यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात असे. सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शनिवारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना उत्पादन शुल्क, क्रीडा, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागांची जबाबदारी देण्यात आली. पण पूर्वी अजित पवारांकडे असलेले वित्त आणि नियोजन सारखे महत्त्वाचे खाते त्यांना देण्यात आले नाही. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी 62 वर्षीय सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार सध्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्य नाहीत, परंतु असे मानले जाते की त्या बारामती विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवू शकतात, ज्याचे प्रतिनिधित्व पूर्वी अजित पवार करत होते.

Ajit Pawar Memorial : मोठी घोषणा, राज्यात ‘या’ ठिकाणी बांधले जाणार अजित अजित पवारांचे स्मारक Read More »