DNA मराठी

ट्रेंडिंग

sunetra pawar

Sunetra Pawar Oath : शपथविधी आणि सत्तेचा वेग; संवेदनांवर मात करणारी राजकीय गणितं

Sunetra Pawar Oath : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका महिलेनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा केवळ एक प्रशासकीय वा घटनात्मक घटना नव्हे, तर पवार कुटुंबाच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याचा हा क्षण अभिमानास्पद मानावा असा असतानाच, या शपथविधीभोवती निर्माण झालेली अस्वस्थता आणि प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. कारण हा शपथविधी अशा काळात पार पडला, की ज्यावेळी महाराष्ट्र अजूनही सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, पण कधीही मुख्यमंत्रीपद न भूषवलेले आणि सर्वसामान्य माणसांच्या मनात मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठे घर केलेले अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरलेला नाही. सत्ता आणि पद यांपेक्षा लोकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेलं एक व्यक्तिमत्त्व हरपल्याची जाणीव अजूनही ताजी आहे. अजित पवार हे नाव केवळ राजकीय नव्हतं; ते थेटपणा, स्पष्टता आणि निर्णयक्षमतेचं प्रतीक होतं. अनेक सर्वसामान्य नागरिक असे होते, ज्यांनी कधी अजित पवार यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, कधी त्यांच्याशी थेट संबंधही आला नव्हता. तरीही त्यांच्या जाण्याने ते हळवे झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो प्रसंग खिशात पैसे नसलेल्या एका रस्त्यावरील माणसाने वृत्तपत्रातील अजित पवार यांच्या छायाचित्राला फुलं वाहणं हा केवळ भावनिक क्षण नव्हता, तर राजकारण आणि सामान्य माणूस यांच्यातील नात्याचं वास्तव दर्शन घडवणारा क्षण होता. अशा पार्श्वभूमीवर, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच पवार कुटुंबातील सदस्यांनी मुंबई गाठून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं, हे घटनात्मकदृष्ट्या योग्य असलं तरी सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रश्न निर्माण करणारं ठरलं. भारताची, विशेषतः महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही केवळ सत्ता-समीकरणांवर उभी नाही; ती भावनिक आहे, संवेदनशील आहे आणि काही अंशी अध्यात्मिकही आहे. दुःख, शोक आणि अवकाश या गोष्टी इथे सार्वजनिक जीवनाचाही भाग ठरतात. या शपथविधीमागे कारणं अनेक असू शकतात. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षातील नेतृत्वाची पोकळी निर्माण होऊ नये, काही नेत्यांना पक्ष हातातून निसटतो की काय अशी भीती वाटत असावी, किंवा यामागे मोठ्या राजकीय सत्तासमीकरणांचाही दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारण पोकळी सहन करत नाही, हे वास्तव आहे; मात्र सत्ता भरताना संवेदनांचा विचार कितपत केला गेला, हा प्रश्न उरतोच. हा शपथविधी कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे, तरी नैतिक आणि सामाजिक पातळीवर तो अनेक वर्षं लोकांच्या मनात प्रश्न विचारत राहील. “घाई कशाची होती?”, थोडा काळ थांबता आलं नसतं का? आणि सत्ता महत्त्वाची की स्मृती? हे प्रश्न सहज पुढे येतात. लोकशाहीत सत्ता ही अंतिम नसते. ती लोकांच्या विश्वासावर उभी असते. आणि हा विश्वास केवळ निर्णयांनी नव्हे, तर निर्णय घेण्याच्या वेळेनेही जोपासला जातो. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतिहासात नोंदला जाईलच, पण तो महाराष्ट्राच्या राजकारणात संवेदनशीलतेच्या कसोटीवर मोजला जाणारा एक संदर्भबिंदू म्हणूनही दीर्घकाळ लक्षात राहील, यात शंका नाही.

Sunetra Pawar Oath : शपथविधी आणि सत्तेचा वेग; संवेदनांवर मात करणारी राजकीय गणितं Read More »

sunetra pawar dcm

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

राज्याचे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली आहे. अजित पवार यांचा बारामती येथे एका विमान अपघातात झालेल्या निधनानंतर आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जाणार आहे. पुढील 10 दिवस सुनेत्रा पवार बारामतीतच मुक्काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ Read More »

mahesh landge

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे

Mahesh Landge : महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे. या निवेदनात महेश लांडगे म्हणाले की, ”दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहरात ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि शहराच्या प्रगतीसाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही राज्याची मोठी हानी आहे, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून शहरवासी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे, असल्याचे लांडगे यांनी सांगितले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देत राहील. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे म्हणाले.

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे Read More »

new chapter in the power struggle within the nationalist party

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड यामुळे ‘दादा’ हे केवळ एक व्यक्तिनाम न राहता एक राजकीय प्रवाह बनले होते. मात्र त्यांच्या पार्थिवाचे विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जी घाई सुरू झाली, ती केवळ अस्वस्थ करणारीच नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरते. स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे चार नेते अचानक केंद्रस्थानी आले. प्रश्न असा की, इतक्या वेगाने निर्णय घेण्याची गरज नेमकी कुणाला आणि का भासली? शोक, आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक संवाद याऐवजी सत्तेची घाई दिसणे, हेच या साऱ्या प्रक्रियेचे भयावह वास्तव आहे. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र यावेत, ही इच्छा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती. त्या दिशेने प्रयत्नही झाले होते. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्यास या चौघांचा ठाम विरोध होता, हे आता उघडपणे समोर येत आहे. मग प्रश्न उरतो हा विरोध राजकीय मतभेदांचा होता की वैयक्तिक भीतीतून जन्मलेला? आज सुमित्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही जाऊ शकते. अजित पवार यांचा कणखरपणा, निर्णयातील ठामपणा आणि संघर्ष करण्याची वृत्ती सुमित्रा पवार यांच्यात कितपत उतरते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढे निश्चित की त्यांच्यासमोरचा रस्ता सोपा नाही. या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक गोंधळात टाकणारा मुद्दा म्हणजे या चार नेत्यांना नेमकी कसली भीती वाटते? अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत यासाठी पडद्यामागे प्रयत्न झाले, भाजपाचा हात धरला गेला, हेही आता लपून राहिलेले नाही. दादांचा निर्णय मात्र वेगळा होता. पक्ष स्वबळावर उभा राहावा, हीच त्यांची भूमिका होती. आज मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात नेतृत्वाचा ठोस चेहरा दिसत नाही. उलट पक्ष ‘कोणी चालवत आहे’ यापेक्षा ‘कोणाच्या दबावाखाली चालतो आहे’ असा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतो. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाच्या राजकीय चौकटीबाहेर जाण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, हा पक्ष स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याऐवजी भाजपाच्या छायेत चालेल, अशी भीती वाटणे साहजिक आहे. दरम्यान, सुमित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीची माहिती शरद पवार यांना नव्हती, असा त्यांचा दावा आहे. हे खरे असेल तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या तरी पडदा पडतो. संवादाऐवजी अविश्वास, समन्वयाऐवजी सत्तासंघर्ष आणि वारशाऐवजी स्वार्थ अशी ही सध्याची स्थिती आहे. अजित पवार यांचा राजकीय वारसा केवळ पदांनी जिवंत राहत नाही;तो मूल्यांमधून, निर्णयांमधून आणि स्वाभिमानातून पुढे जातो. तो वारसा टिकवायचा असेल तर घाई नव्हे, धैर्य लागेल. अन्यथा, राष्ट्रवादीतील ही घडामोड इतिहासात एका संधीच्या अपव्यय म्हणूनच नोंदली जाईल.

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय Read More »

silver rate

Silver Rate Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का; चांदीचा भाव 85 हजार रुपयांनी घसरला, जाणून घ्या आजचा भाव

Silver Rate Today : गुरुवारी, सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या ऐतिहासिक वाढीमुळे सामान्य लोकांमध्ये धाकधूक वाढली होती.  परंतु एकाच दिवसात संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. गुरुवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीने प्रति किलोग्रॅम ₹4,20,048 या नवीन उच्चांकावर पोहोचला. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर अवघ्या एका दिवसात, नफा-बुकिंगने सराफा बाजाराला हादरवून टाकले. मार्चमध्ये संपणारे चांदीचे वायदे जवळजवळ 17 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्रॅम 3,32,002 वर आले. ही घसरण केवळ 24 तासांत अंदाजे 21 टक्के (प्रति किलोग्रॅम ₹88,046) घसरण दर्शवते. सोन्याचा भाव MCX वर एप्रिलमध्ये संपणारे सोन्याचे वायदे जवळजवळ 9 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,67,406 या नीचांकी पातळीवर पोहोचले. फक्त एक दिवस आधी, सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम ₹1,93,096 या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. याचा अर्थ असा की सोन्याच्या वायदा किमती फक्त 24 तासांत 13 टक्क्यांनी (₹26,960 प्रति 10 ग्रॅम) घसरल्या. दिल्ली सराफा बाजाराची परिस्थिती शुक्रवारी, दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 14,000 रुपयांनी आणि चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम 20,000 रुपयांनी घसरल्या. अहवालांनुसार, 99.9 टक्के शुद्धता असलेले सोने प्रति 10 ग्रॅम 14,000 रुपयांनी किंवा 7.65 टक्क्यांनी घसरून 169,000 रुपयांनी (सर्व करांसह) झाले. गुरुवारी, सोन्याच्या किमती 12,000 रुपयांनी वाढून 183,000 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. चांदीच्या किमती 20,000 रुपयांनी किंवा जवळजवळ पाच टक्क्यांनी घसरून 384,500 रुपयांनी प्रति किलोग्रॅमवर पोहोचल्या (सर्व करांसह). मागील व्यापार सत्रात चांदीच्या किमती 19,500 रुपयांनी वाढून 4,04,500 रुपयांनी प्रति किलोग्रॅमवर पोहोचल्या. तज्ञ काय म्हणतात एचडीएफसी सिक्युरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक – कमोडिटीज सौमिल गांधी म्हणाले की, शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली कारण अलिकडच्या विक्रमी तेजीनंतर गुंतवणूकदारांनी वेगाने नफा बुक करण्यास सुरुवात केली. ही घसरण प्रामुख्याने मोठ्या संस्थात्मक व्यापाऱ्यांनी दीर्घ मुदतीच्या पोझिशन्सची जोरदार विक्री केल्यामुळे झाली, ज्यांनी अनेक सत्रांमध्ये जोरदार वाढ झाल्यानंतर नफा बुक करण्याचा प्रयत्न केला.

Silver Rate Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का; चांदीचा भाव 85 हजार रुपयांनी घसरला, जाणून घ्या आजचा भाव Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; संध्याकाळी शपथविधी ?

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहे. सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी बारामतीला जाताना अजित पवार यांचे विमान कोसळले, त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवारांशी बोलून त्यांना जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शविली आहे.   महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे, जिथे सुनेत्रा पवार यांना नेतेपद देण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय मिळेल, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते राहील. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि भविष्यात त्या अजित पवारांच्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने यावर निर्णय घेतला तर शनिवारीच त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाला त्यांना कोणतीही अडचण नाही. भुजबळ म्हणाले, “राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी बोलावली जाईल, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना नेते बनवले जाईल. अनेक नेत्यांना वाटते की त्यांना उपमुख्यमंत्री बनवावे.” ते म्हणाले की, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळ पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्रीपदाचे रिक्त पद भरणे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिस सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या अपघातासंदर्भात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 194 अंतर्गत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सरकारने पुणे ग्रामीण पोलिसांना आतापर्यंत गोळा केलेले प्रकरणाचे तपशील आणि पुरावे राज्य सीआयडीकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; संध्याकाळी शपथविधी ? Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीकडून मोठी मागणी

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. या मागणीमुळे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, दादांनी हा पक्ष रक्ताचं पाणी करून उभा केला. आज तो टिकवायचा असेल तर पवार कुटुंबातील व्यक्तीच पुढे हवी. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री करणे ही कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांना राज्य राजकारणात आणून उपमुख्यमंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकजूट आणि भावनिक लाट निर्माण होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यामुळे महायुतीला मिळालेला नवीन वोट बँक टिकवण्यासाठी देखील लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार राजकारणात एन्ट्री करणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीकडून मोठी मागणी Read More »

maharashtra election comission

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आता 7 फेब्रुवारीला मतदान; कारण काय?

Zilla Parishad Election: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आता 7 फेब्रुवारीला मतदान; कारण काय? Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik : एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध होणार कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चार दिवसापूर्वी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ आणलायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम अधिक काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता (चालन) विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केले नसल्याची खात्री करणे आता अधिक सक्तीचे करण्यात आले आहे. तपासणी अधिक कडक १)कर्तव्यावर जाणाऱ्या चालकांनी मद्यपान केले नसल्याची खात्री करूनच त्यांना ड्युटीवर पाठविण्यात यावे. २)ज्या चालकाला विशिष्ट वाहनावर कर्तव्य देण्यात येणार आहे, त्या वाहनासोबतच त्याची अल्कोहोल तपासणी (ब्रिथ अ‍ॅनालायझर चाचणी) करण्यात यावी. ३)वाहन परीक्षकांनी चालकाची तपासणी न करता वाहन बाहेर जाऊ देऊ नये. ४)मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित चालकाला तत्काळ कर्तव्यातून दूर ठेवून त्याची माहिती आगार व्यवस्थापकांना द्यावी. आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच, मुख्यालयाकडून अचानक तपासण्या (सरप्राइज चेक) घेण्यात येणार असल्याने सर्व आगारांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य एसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे चालकांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे ही गंभीर बाब मानून महामंडळाने शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण अवलंबले असल्याचे या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार असून एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली जात आहे.

Pratap Sarnaik : एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध होणार कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा Read More »

ranpati shivray swari agra

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार

Ranpati Shivray Swari Agra : शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.  कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत  मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे.  रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे  आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची  जबाबदारी  समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे  यांनी सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार Read More »