DNA मराठी

ट्रेंडिंग

img 20260401 wa0002

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा?

Devendra Fadnavis: राज्यकारभारात नेतृत्वाची खरी कसोटी ही केवळ विकासकामांत किंवा राजकीय यशात नसते ती कायदा-सुव्यवस्थेच्या काटेकोर अंमलबजावणीत आणि समाजातील न्यायभावनेच्या जपणुकीत असते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दुहेरी भूमिकेत काम करताना प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे अनेकदा सिद्ध केले आहे. काही बाबतींत त्यांच्या कार्यशैलीची तुलना शरद पवार यांच्या प्रभावी प्रशासकीय वारशाशी केली जाते. मात्र, अलीकडच्या काळात राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा चिंतेचा विषय बनत आहे. कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची भूमिका निष्पक्ष आणि कठोर असणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना राजकीय पाठबळ मिळाल्याची भावना जनमानसात निर्माण होते, तेव्हा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो. गुन्हेगारीचा प्रश्न केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहत नाही; तो सामाजिक आणि नैतिक संरचनेलाही बाधा पोहोचवतो. विशेषतः जात आणि धर्म यांच्या नावाखाली जेव्हा गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन केले जाते, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनते. समाजातील काही घटकांकडून धार्मिकतेचा आडोसा घेत नेतृत्व करण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी गुन्हेगारीकडे दुर्लक्ष किंवा समर्थन दिसून येणे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांची प्रशासनातील कडक प्रतिमा आणि निर्णयक्षमता यामुळेच जनतेने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला ती कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक छत्राखाली असो, निर्भीडपणे आळा घालणे अत्यावश्यक ठरते. प्रतिमा ही केवळ प्रचारातून घडत नाही; ती कृतीतून दृढ होते. आज राज्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कठोर, पारदर्शक आणि पक्षनिरपेक्ष कारवाई हीच प्रशासनाची खरी ओळख ठरू शकते. अन्यथा, सक्षम नेतृत्वाची ओळख असलेली प्रतिमाही काळाच्या ओघात धूसर होण्याचा धोका नाकारता येणार नाही. म्हणूनच, सत्तेची ताकद आणि जबाबदारी यांचा समतोल राखत कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे, हीच आजच्या नेतृत्वापुढील खरी परीक्षा आहे.

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा? Read More »

santosh pandit

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल…

Santosh Pandit : सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणाऱ्या संतोष पंडित याच्याविरोधात महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे आणि परवानगीशिवाय मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी (30 मार्च) टिळक रस्त्यावर ही घटना घडली. नाशिकमधील खरात प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी संतोष पंडित घटनास्थळी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त करत गैरवर्तन करू लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने संबंधित पत्रकाराबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली तसेच अश्लील हावभावही केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, पंडितने केवळ संबंधित पत्रकारालाच नव्हे तर आंदोलनात सहभागी इतर महिलांनाही धमकावण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, महिलेच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे. महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल… Read More »

nagar urban bank

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक घोटाळा; आरोपींची मालमत्ता जप्त होणार

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी तसेच काही मोठ्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व दिशादर्शक ठरला आहे. या निर्णयामुळे बँक बुडवणाऱ्या जबाबदार घटकांवर ठोस कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. नगर अर्बन बँकेतील चेअरमन, संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्ट कारभार करत बँकेचे अस्तित्व धोक्यात आणले. ठेवीदारांचा निधी धोक्यात घालून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले. शासन व रिझर्व बँकेकडून वेळोवेळी सूचना देऊनही सुधारणा न करता भ्रष्टाचार सुरूच ठेवण्यात आला. विशेषतः 2014 नंतर मल्टीस्टेटच्या नावाखाली कायद्याचा गैरफायदा घेत भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली. या सर्व प्रकाराचा परिणाम म्हणून 2023 मध्ये बँकेचा परवाना रद्द झाला आणि ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. सुमारे 114 वर्षांची परंपरा असलेल्या बँकेचा जवळपास 175 कोटी रुपयांचा निधी धोक्यात आला. 2017 पासून सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले, तर अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली. दरम्यान, बँक बचाव समितीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणावर वसुली केली. आतापर्यंत ठेवीदारांना सुमारे 70 टक्के रक्कम परत मिळाली आहे. उर्वरित 30 टक्क्यांपैकी 15 टक्के रक्कम एप्रिल 2024 मध्ये देण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित 15 टक्क्यांसाठीही लढा सुरू राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. देशभरात ठेवीदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम परत मिळवून देण्याचे हे एकमेव उदाहरण मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 18 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढून संबंधित आरोपी, संचालक, अधिकारी व काही कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त करण्यात येणाऱ्या मालमत्तांची एकूण किंमत कोट्यवधी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. या कारवाईतून ठेवीदारांचे पैसे, व्याज, बँकेचा निधी, सभासदांचा लाभांश तसेच कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच, संबंधित आरोपींकडून मालमत्ता विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेत संबंधित मालमत्तांची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बँक बचाव समितीच्या प्रयत्नांमुळे ठेवीदारांना न्याय मिळत असून, 114 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे व डी. एम. कुलकर्णी यांनी दिली. यामधील आरोपी सुरेश शिवराम सातपुते, केशव भाऊसाहेब काळे, विनोदकुमार अण्णासाहेब श्रीखंडे, अनिल चंदुलाल कोठारी, महादेव पंढरीनाथ साळवे, अजय अमृतलाल बोरा, रवींद्र विठ्ठल कडूस, सतीश विठ्ठल रोकडे, मनेष दशरथ साठे, गिरीश केदारनाथ लाहोटी, राजेंद्र केशवराव डोळे, नवनीत शांतीलाल सुपरिया, प्रगती देवेंद्र गांधी, सरोज दिलीप गांधी, शैलेश सुरेश मुनोत, दिनेश पोपटलाल कटारिया, अक्षय राजेंद्र लुनावत, केदार मुरलीधर लोहाटी, शिवदास दिलीप गायकवाड, शितल शिवदास गायकवाड, सचिन दिलीप गायकवाड, दीप्ती सुरेंद्र गांधी, देवेंद्र दिलीप गांधी, सुरेंद्र दिलीप गांधी, संदीप ईश्वरदार वाघमारे, रवींद्र विठ्ठल जेजुरकर, अशोकलाल माधवलाल कटारिया, राजेंद्र बहिरू म्हस्के, आशुतोष सतीश लांडगे या व्यक्तींची कुणीही कोणत्याही जमिनीचा व पैशाचा व्यवहार करू नये कारण जमिनी हे महाराष्ट्र शासनाकडून जप्त करण्यात येणार असल्याने व्यवहार करू नये असे बँक बचाओ समितीने सांगितले.

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक घोटाळा; आरोपींची मालमत्ता जप्त होणार Read More »

cockfighting

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (वय-२७, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), आशरफ बाहुला खान (वय-५०,रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर), मोहम्मद उस्मान अली शेख (वय-४०, रा. महिम उन्नती सोसायटी मुंबई), अमजद युसुफ मगदुम वय-४३, रा. नागपुरचा येरवडा पुणे), सय्यद अझर अक्तर वय-४०, रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर), रोहीत श्रीचंद गोहिर (वय-३३, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (वय-३२, रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (वय-४६ रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक), तौफिक सिकंदर शेख (वय-२८, रा. नेवसा खुर्द ता.नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (वय-३४, रा.. मुकुंदनगर अहिल्यानगर), योगेश मनोहर छजलांनी (वय-४०, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संतोष गणेश गोयल (वय- ३९, रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर वय-४६ रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (वय- ४०, रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (वय-४२, रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी वय-२९ रा. मगळवारपेठ पुणे), समीर फिरोज शेख (वय-२२ रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (वय-७० रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (वय-६३, रा. मंगळवारपेठ पुणे), सोहेल कबीर सय्यद वय-३८ रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), उत्तम एकनाथ साळवे ( वय-४०, रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उज्जनी रस्त्यावर एका मोकळ्या जागेत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे काही व्यक्ती कोंबड्यांची झुंज लावत असून उपस्थित नागरिक त्यावर पैशांची पैज लावत असल्याचे आढळले. पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल Read More »

tukaram mundhe

Tukaram Mundhe : ‘बदली’ हीच ओळख? तुकाराम मुंढे प्रकरणातून प्रशासनाला पडलेला आरसा

Tukaram Mundhe : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही नावे त्यांच्या कामामुळे ओळखली जातात, तर काही नावे त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत राहतात. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नाव या दोन्ही कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहे. मात्र गेल्या दोन दशकांत त्यांच्या बाबतीत निर्माण झालेली सर्वात ठळक ओळख म्हणजे सतत बदली होणारे अधिकारी. 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली होणे ही केवळ वैयक्तिक बाब नसून राज्याच्या प्रशासकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे. अलीकडेच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असताना मुंढे यांची पुन्हा बदली झाली. वर्षभराच्या आत झालेली ही बदल्या प्रशासनातील स्थैर्याच्या अभावाचे प्रतीक मानावी लागेल. विशेष म्हणजे त्यांनी सुरू केलेली बोगस दिव्यांग शोध मोहीम गती घेत असतानाच त्यांची बदली झाली. एखाद्या अधिकाऱ्याने कठोर निर्णय घेतले की त्याच्या बदलीची चर्चा सुरू होते, हा योगायोग मानायचा की व्यवस्थेचा अलिखित नियम – हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. कडक अधिकारी की व्यवस्थेला अस्वस्थ करणारी शैली? मुंढे यांची प्रतिमा कडक शिस्तीचे आणि ‘धडाकेबाज’ अधिकारी अशी आहे. नवी मुंबई, नाशिक, नागपूर किंवा पुणे – जिथे जिथे त्यांनी काम केले तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी आणि प्रशासनातील शिस्तीवर त्यांनी भर दिला. परंतु भारतीय प्रशासन व्यवस्थेत नियमांची अंमलबजावणी अनेकदा राजकीय आणि स्थानिक हितसंबंधांना धडकते. तेव्हा संघर्ष अपरिहार्य ठरतो. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या बदल्यांकडे पाहिले तर एक समान धागा दिसतो कोणत्याही पक्षाचे सरकार असो, त्यांच्या बदल्यांचा वेग कमी झालेला नाही. म्हणजेच हा प्रश्न केवळ राजकीय पक्षांचा नसून प्रशासन आणि राजकारण यांच्यातील सत्तासंतुलनाचा आहे. बदली — शिक्षा की प्रशासकीय साधन? भारतीय नोकरशाहीत बदली ही प्रशासनिक गरज म्हणून मान्य असली, तरी तिचा वापर अनेकदा ‘नियंत्रणाचे साधन’ म्हणून होत असल्याची टीका जुनी आहे. एखादा अधिकारी अपेक्षित पद्धतीने वागत नसल्यास त्याची बदली हा सर्वात सोपा पर्याय ठरतो. परिणामी दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी विस्कळीत होते. मुंढे यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर हे अधिक स्पष्ट होते. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले पण बहुतांश ठिकाणी त्यांना दीर्घकालीन काम करण्याची संधी मिळाली नाही. प्रशासनात सातत्य नसल्यास सुधारणा टिकून राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बदललेला समाजाचा प्रतिसाद एकेकाळी मुंढे यांच्या बदलीनंतर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असत. नाशिक आणि नागपूरमध्ये त्याची उदाहरणे पाहायला मिळाली. मात्र आता अशी आंदोलने होताना दिसत नाहीत. यामागे दोन शक्यता आहेत. एक म्हणजे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे; किंवा दुसरे म्हणजे ‘बदली’ हीच व्यवस्था आहे, असा स्वीकार समाजाने केला आहे. दोन्ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. व्यक्तीपेक्षा प्रणाली महत्त्वाची तुकाराम मुंढे यांची कथा ही एका अधिकाऱ्याची वैयक्तिक कहाणी नाही; ती महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. एखादा अधिकारी कितीही सक्षम असला तरी संस्थात्मक स्थैर्य नसल्यास परिणाम मर्यादित राहतात. प्रशासनात पारदर्शक बदली धोरण, निश्चित कार्यकाल आणि राजकीय हस्तक्षेपावर मर्यादा या मूलभूत सुधारणा केल्याशिवाय अशी उदाहरणे पुन्हा पुन्हा घडत राहतील. शेवटचा प्रश्न मुंढे यांची 25 वी बदली ही बातमी म्हणून महत्त्वाची असली, तरी खरी चिंता वेगळी आहे. महाराष्ट्रात कठोरपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे भविष्य नेहमीच अस्थिर राहणार का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर नुकसान केवळ एका अधिकाऱ्याचे नाही ते प्रशासनाच्या विश्वासार्हतेचे आहे. कारण अखेरीस प्रश्न एका व्यक्तीचा नसतो.प्रश्न असतो व्यवस्थेने प्रामाणिकपणाला किती काळ टिकू दिले? तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या बदल्या (पोस्टिंग) खालीलप्रमाणे: 1. ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर 2. सप्टेंबर 2007 – उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग 3. जानेवारी 2008 – CEO, जिल्हा परिषद, नागपूर 4. मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विकास विभाग 5. जुलै 2009 – CEO, जिल्हा परिषद, वाशिम 6. जून 2010 – CEO, जिल्हा परिषद, कल्याण 7. जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना 8. सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त, मुंबई 9. नोव्हेंबर 2014 – जिल्हाधिकारी, सोलापूर 10. मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका 11. मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, PMRDA, पुणे 12. फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका 13. नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन विभाग 14. डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई 15. जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका 16. ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई 17. जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत 18. सप्टेंबर 2022 – संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान 19. एप्रिल 2023 – सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास 20. जून 2023 – सचिव, मराठी भाषा विभाग 21. जुलै 2023 – सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभाग 22. जून 2024 – आयुक्त, असंघटित कामगार विभाग 23. ऑगस्ट 2025 – दिव्यांग कल्याण मंत्रालय

Tukaram Mundhe : ‘बदली’ हीच ओळख? तुकाराम मुंढे प्रकरणातून प्रशासनाला पडलेला आरसा Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: CA ललित पोफळेला वाचवण्याचा प्रयत्न?

Ashok Kharat Case: नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत असल्याने हा प्रकरण आता राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर येत आहे.पुण्यातील हाय प्रोफाइल सीए ललित पोफळे खरात प्रकरणातील खरा मास्टर माईंड असल्याची चर्चा आता पुढं येऊ लागलीय. सीए सलित पोफळे खरातच्या शिवनिका ट्रस्टचा ट्रस्टी होता. त्यामुळे या प्रकरणात त्याची देखील चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे खरात प्रकरणात ललित पोफळे हा मास्टर माईंड असल्याची चर्चा आहे. खरातचे अर्थिक व्यवहार पोफळेच्याच माध्यमातुन झाल्याचा आरोप होतोय. पोफळेच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. यातुन खरातचे अर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणे आवश्यक आहे. खरातची प्रगती होत असताना इकडे पोफळेची ही प्रगती झाल्याचं दिसतंय. कोरेगाव पार्क मधील कोट्यावधी रुपये किमत असलेला हा ललित पोफळेचा बंगला त्याची साक्ष देतोय. एव्हढ संगळं दिसत असताना आणि पोफळेवर संशयाची मुख्य सुई असताना देखील एसआयटी ने मात्र पोफळेला चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाही. हे विशेष. उलट पोफळेची तक्रार घेऊन खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु असल्याची सूत्राची माहीती आहे. त्यासाठी काल म्हणजेच 30 मार्चला पोफळे नाशिकला गेला होता. त्याने खरातच्या विरोधात फसवणुकीची तक्रार देखील दिली असल्याची माहीती पुढे आली आहे. म्हणजेच पोफळेची चौकशी करण्याऐवजी त्याला फिर्यादी बनवुन वावचले जात आहे का असा सशंय निर्माण होतो आहे.

Ashok Kharat Case: CA ललित पोफळेला वाचवण्याचा प्रयत्न? Read More »

Eknath Shinde: शिवसेनेकडून विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी

Eknath Shinde: शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार दगडू सकपाळांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे निवेदन पक्षाने जारी केले आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. दक्षिण कोकण विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केल्याचे निवेदनात म्हटले आहे. मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख पदी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता विभागीय संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दिपक सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हांकरिता विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख तर पराग पिंगळे यांची विभागीय सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे शिवसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Eknath Shinde: शिवसेनेकडून विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी Read More »

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

pankaja munde

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं

Pankaja Munde : बीडच्या अंबाजोगाई येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा थेट तुरुंगातच असते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचं सांगताना, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. “ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने पंधरा पैसे कमवा… पण चुकीच्या मार्गाने शंभर रुपये कमवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा तुरुंगातच आहे,” असं त्या म्हणाल्या. तसेच, “मला चुकीची कामं सांगू नका… घरात पैसे कुठून येतात, याचा हिशोब ठेवा,” असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणातील कारस्थानांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे… माझ्या मनात पाप नाही, देवाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.” निवडणुकीतील पराभवाचं उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना सांगितलं की, राजकारणात पराभव होत असतो, पण चुकीचं वागणारे लोक नकाशावरून गायब होतात.

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं Read More »

img 20260330 wa0005

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता, एक व्यक्ती घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून १० गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटार मशीन तसेच पाच लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत आरोपी हा साद अन्वर खान (रा. मुकुंदनगर, सध्या फरार) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणताही परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांची धोकादायक पद्धतीने साठवणूक करून स्वतःचे व नागरिकांचे जीवित धोक्यात घालून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत Read More »