DNA मराठी

आरोग्य

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन

IMD Rain Alert – अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज १९ ऑगस्ट रोजी देखील नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. भिमा नदी (दौंड पूल) -३०४४ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) २६९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन Read More »

rain alert

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी

Mumbai Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. 16 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज ( 16 ऑगस्ट) रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत. पर्जन्‍य जलवाहिनी यंत्रणा, मलनि:सारण व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. तथापि,महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी Read More »

eat more vegetables fruits and whole grains

जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम

मुंबई – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या तणावामुळे महाराष्ट्रात असंतुलित आहार ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. फास्ट फूड, प्रोसेस्ड पॅकेट खाण्याचे पदार्थ आणि जास्त तेलकट-गोड पदार्थ यांच्या खाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य विभागाने नागरिकांना “जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा” असा सल्ला देत एक व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे जागृती करून जमत नाही तर आपण स्वत होऊन काही कर्तनही तोपर्यंत काही होत नसते. का आवश्यक आहे भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य? तज्ज्ञांच्या मते, हंगामी भाज्या व फळे यामध्ये विटामिन, मिनरल्स, फायबर मोठ्या प्रमाणात असते, जे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते. संपूर्ण धान्य – जसे की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राउन राईस – यात ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ आणि भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवते व जास्त वेळ पोट भरल्याची भावना देते. महाराष्ट्रातील आहाराची चिंता नाशिक, पुणे, कोल्हापूर,मुंबई, अहिल्यानगर, नागपूरसारख्या शहरांत फास्ट फूड संस्कृती झपाट्याने वाढते आहे. ग्रामीण भागातसुद्धा पॅकेट नाश्ता, गोड पेये आणि पॉलिश केलेले तांदूळ यांचा वापर वाढतोय. परिणामी, पारंपरिक पौष्टिक अन्न – उदा. ज्वारीची भाकरी, भाजी, डाळ, ताक – हळूहळू आहारातून गायब होत आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन सरकारची भूमिका आरोग्य मंत्रालयाने शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत स्तरावर ‘आरोग्यदायी आहार’ जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये पाककला स्पर्धा, आरोग्य शिबिरे, तसेच ‘संतुलित आहार’ विषयक कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी आहे. विश्लेषण आहारातील बदल हा फक्त वैयक्तिक सवय नसून सार्वजनिक आरोग्य धोरणाचा भाग असावा लागेल. महाराष्ट्राला कुपोषणापासून स्थूलतेकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य आपल्या ताटात नसेल, तर उद्या रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतील.

जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम Read More »

What is a DNA test? How is the test done?

DNA Test म्हणजे काय? कशी केली जाते तपासणी?

DNA Test – मुंबई – गुन्हेगारी तपास, पितृत्व निश्चिती, वारसा विवाद तसेच वैद्यकीय निदान यांसाठी ‘डीएनए टेस्ट’ म्हणजेच DNA चाचणी आज सर्वात विश्वसनीय वैज्ञानिक साधन मानली जाते. डीएनए म्हणजे ‘डिऑक्सीरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड’, जे प्रत्येक माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये आढळतं आणि त्याची आनुवंशिक ओळख सांगतं. कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये ९९.९९ टक्के डीएनए सारखं असतं, मात्र उरलेला सूक्ष्म फरकच त्यांना वेगळं ठरवतो. डीएनए टेस्ट म्हणजे काय? डीएनए टेस्ट म्हणजे व्यक्तीच्या शरीरातील उदा. लाळ, रक्त, केस, त्वचा किंवा हाडांमधून मिळवलेल्या जैविक नमुन्यांमधून त्याचा जनुकीय संकेत (genetic code) तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवण्याची प्रक्रिया. हे विश्लेषण ‘डीएनए प्रोफाइलिंग’ किंवा ‘फिंगरप्रिंटिंग’ म्हणूनही ओळखलं जातं. या चाचणीद्वारे दोन व्यक्तींमध्ये रक्तसंबंध आहे का, गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेले नमुने कोणाचे आहेत, हे निश्चित करता येतं. कशी केली जाते डीएनए तपासणी 1. नमुना संकलन (Sample Collection)    – रक्त, केस, लाळ, त्वचा किंवा हाडं यांपासून नमुना घेतला जातो.    – बहुधा गालामध्ये (buccal swab) कापसाने घासून लाळीचा नमुना घेतला जातो. 2. डीएनए वेगळं करणं (Extraction)    – नमुन्यातून डीएनए वेगळं केलं जातं. ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असते. 3. डीएनएचे गुणवैशिष्ट्य पाहणे (Amplification & Profiling)    – विशेष प्रयोगशाळांमध्ये ‘PCR’ तंत्रज्ञानाने डीएनए वाढवून त्याचा सखोल अभ्यास केला जातो.    – STR (Short Tandem Repeat) पद्धतीने विशिष्ट जनुकांची तुलना केली जाते. 4. तुलना (Comparison):     नमुन्याची तुलना इतर व्यक्तींच्या डीएनए प्रोफाइलशी केली जाते (उदाहरणार्थ, संशयित गुन्हेगार किंवा आई-वडील इ.) कुठे वापर होते डीएनए तपासणीचं? भारतामध्ये डीएनए चाचणीला न्यायालयीन मान्यता आहे. मात्र न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही वैयक्तिक डीएनए तपासणी करता येत नाही. डीएनए तज्ञ, वैज्ञानिक, फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि न्यायाधीश यांचं संयोजन यात आवश्यक असतं. विश्वसनीयता व मर्यादा डीएनए टेस्ट ९९.९९% अचूक असते, त्यामुळे न्यायालयांमध्ये ती खात्रीलायक पुरावा मानली जाते. मात्र नमुन्याचं दूषित होणं, प्रक्रिया अर्धवट असणं किंवा चुकीच्या सॉफ्टवेअर विश्लेषणामुळे परिणाम बिघडू शकतो. नोंद घ्या * भारत सरकारने “डीएनए टेक्नॉलॉजी (वापर व रेग्युलेशन) विधेयक” २०१९ मध्ये सादर केलं होतं. * यामध्ये डीएनए डेटा बँक, नमुना घेण्याच्या अटी व व्यक्तीच्या गोपनीयतेचं संरक्षण यावर नियमावली आखण्यात आली आहे निष्कर्ष डीएनए टेस्ट ही आधुनिक विज्ञानातील अत्यंत सशक्त व अचूक ओळख पटवणारी प्रक्रिया आहे. ती केवळ गुन्हे उघडकीस आणण्यासाठीच नव्हे, तर कुटुंबीयांचे संबंध, वारसाहक्काचे प्रश्न, आणि वैद्यकीय समस्यांमध्येही अमूल्य ठरते. मात्र ती नैतिक व कायदेशीर चौकटीतच केली गेल्यास तिचा खरा उपयोग साध्य होतो.

DNA Test म्हणजे काय? कशी केली जाते तपासणी? Read More »

alcohol price hike is it good or bad for public health

दारू महागली: आरोग्याला फायदा की तोटा काळ्या बाजार जोरात?

Alcohol price hike: बनावट आणि बेकायदेशीर विक्रीचा वाढता होण्याचा धोका कायम आहे. किमती वाढल्याने गरीब व व्यसनाधीन लोक कायदेशीर उत्पादनांना पर्याय शोधतात आणि त्यामुळे नकली, घातक दारू व तंबाखू उत्पादनांची मागणी वाढते. याचे थेट परिणाम आरोग्य हानी आणि गुन्हेगारीट  वाढ होण्यची शक्यता नाकारता येत नाही. दारू बंदी कायदा सक्षम करणार का? Alcohol price hike:मुंबई : – राज्य सरकारने अलीकडेच मद्य व तंबाखूवरील उत्पादन शुल्कात लक्षणीय वाढ केली आहे, त्यामुळे दारूच्या किमती वाढ झाली आहे. सरकारच्या मते, या वाढीचा उद्देश म्हणजे व्यसनाधीनतेला आळा घालणे, तसेच ‘सिन टॅक्स’च्या माध्यमातून महसूल वाढवणे. मात्र, या धोरणावरून सध्या राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. एकीकडे सरकार आणि आरोग्य क्षेत्र या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. सरकारचा दावा:- आरोग्य फायदा आणि महसूल वाढ मद्य व तंबाखूच्या किमती वाढल्यामुळे सामान्य जनतेमध्ये या नशेपासून मुक्ती होऊन या वस्तूंपासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढेल. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर चांगला परिणाम होईल आणि आरोग्य सेवांवरचा ताण कमी होण्यास मद्दत होईल असा राज्य सरकारचा दावा आहे. याशिवाय, वाढलेल्या उत्पादन शुल्कामुळे सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार हा निधी आरोग्य, शिक्षण आणि जनहिताच्या योजनांमध्ये वापरला जाईल. आरोग्य संस्थांचा पाठिंबा राज्य सरकारच्या या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि देशातील अनेक आरोग्य तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. WHO च्या अहवालानुसार, तंबाखूवर ५० टक्क्यांहून अधिक दरवाढ केल्यास भारतात लाखो मृत्यू टाळले जाऊ शकतात. यामुळे सरकारच्या निर्णयाला आरोग्य क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गरीब व मध्यमवर्गीयांचा दृष्टिकोन आरोग्य आणि व्यसन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढलेले दर व्यसन करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांमध्ये मानसिक आवर घालण्याचे काम करतात. महागाईमुळे ते या वस्तूंमधून दूर राहतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि कुटुंबाचा आर्थिक सतोल सुधारणा होईल. मात्र, हा बदल तात्पुरता की दीर्घकालीन, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्योग क्षेत्राची नाराजी मद्य उत्पादक आणि वितरक संघटनांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत म्हटले आहे की, “अचानक केलेल्या दरवाढीमुळे मद्य उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. विक्री कमी होईल, उत्पादन घटेल आणि परिणामी अनेकांचे रोजगार धोक्यात येतील.” सरकारने दरवाढ टप्प्याटप्प्याने करावी आणि उद्योग क्षेत्राशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.अशी मागणी काही संघटनानीकेली आहे. काळा बाजार आणि बनावट उत्पादनांचा धोका दारू आणि गुन्हेगारी – या निर्णयामुळे एक मोठा धोका उभा राहत शकतो – बनावट आणि बेकायदेशीर विक्रीचा वाढता धोका कायम आहे. किमती वाढल्याने गरीब व व्यसनाधीन लोक कायदेशीर उत्पादनांना पर्याय शोधतात आणि त्यामुळे नकली, घातक दारू व तंबाखू उत्पादनांची मागणी वाढते. याचे थेट परिणाम आरोग्य हानी आणि गुन्हेगारीट  वाढ होण्यची शक्यता नाकारता येत नाही. गुटखा बंदीचा अपयश आणि नवा प्रश्न गुटखावर बंदी का फसली राज्यात गुटखा विक्रीवर पूर्ण बंदी असतानाही, अनेक ठिकाणी तो सर्रास विक्री होत आहे. पोलीस आणि अन्न प्रशासन, आणि इतर प्रशासन यांना माहिती असूनही मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ मते – “जर पूर्ण बंदी असलेला गुटखा रोखता येत नसेल, तर फक्त महाग केलेली दारू आणि तंबाखू कशी थांबेल?” अशी मद्यप्रेमींची प्रतिक्रिया आहे. हा मुद्दा सरकारच्या अंमलबजावणी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांच्यात योग्य समन्वय नसेल, तर मद्य व तंबाखूच्या दरवाढीचे सारे फायदे केवळ कागदावरच राहतील. मद्य व तंबाखूवरील दरवाढीतून सरकारचा महसूल वाढतो, आरोग्य सेवेला दिलासा मिळतो, आणि व्यसनाधीनता कमी होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अंमलबजावणीत कुचराई झाली, तर याचा फायदा काळ्या बाजाराला होणार असून, बनावट उत्पादनांमुळे आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याची विचार व्हायला हवा. गुटखा बंदीची फसलेली अंमलबजावणी लक्षात घेता, सरकारने यावेळी केवळ महसूलवाढीपुरता विचार न करता, कडक नियंत्रण आणि पारदर्शक यंत्रणा उभी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, ‘दारू महाग – पण अधिक घातक आणि बेकायदेशीर मार्गाने उपलब्ध’ अशी नवी समस्या समोर येण्यास वेळ लागणार नाही.

दारू महागली: आरोग्याला फायदा की तोटा काळ्या बाजार जोरात? Read More »

adulterated milk

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”  

लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. adulterated milk – Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील दूध संकलन केंद्रांमध्ये सुरू असलेला भेसळीचा उद्योग आणि त्यामागे असलेला राजकीय वरदहस्त हा केवळ एक स्थानिक गैरप्रकार नाही, तर ही आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या अनास्थेची आणि नैतिक दिवाळखोरीची स्पष्ट साक्ष आहे. दूधासारखा नितळ आणि पवित्र मानला जाणारा अन्नघटक जर विषारी बनवून बाजारात विकला जात असेल, तर हे केवळ एक आर्थिक घोटाळा नाही, तर मानवी आरोग्यावर, विशेषतः बालकांवर केलेले अक्षम्य अपराध आहे. धायतडकवाडी येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्राच्या नावाने चालवला जाणारा हा बनावट व्यवहार केवळ भेसळीतच मर्यादित नाही. येथे शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान उचलून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली दुधाळ जनावरे दाखवून शासनाची फसवणूक झाली आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीने उघडकीस आले, त्यावरून स्पष्ट होते की, यामागे एक संगनमत आहे आणि याला स्थानिक मोठ्या राजकारण्यांचे संरक्षण लाभले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारवाई करू नका’ असा आदेश स्थानिक मोठ्या नेत्याने दिला. ही घटना लोकशाहीसाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी गंभीर इशारा आहे. प्रशासन जर एखाद्या मंत्र्याच्या किंवा स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करत असेल, तर मग सामान्य जनतेचा काय? दूध हा आपल्या घराघरात दररोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. या प्रकरणात अमोल सखाराम धायतडक यांच्यावर झालेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरे नसताना, त्यांनी बनावट संकलन केंद्राच्या नावाखाली व्यवसाय उभा करून जनतेला विषारी दूध विकले आहे. हे दूध म्हणजे एका अर्थाने विषाचे घोट होते जे आपण आपल्या मुलांच्या हातात दिले. प्रश्न इतकाच आहे ही माहिती सरकारदरबारी पोहोचल्यावर खरोखर दोषींवर कारवाई होईल का? की या प्रकरणाची फाईलसुद्धा राजकीय दबावात गारद होईल? कारण ही केवळ एक घटनेची नव्हे, तर व्यवस्थेच्या भ्रष्ट पायाभरणीची कथा आहे. हा प्रकार आरोग्याच्या आणि नैतिकतेच्या दोन्ही आघाड्यांवर गंभीर धोका आहे. आज पाथर्डी, उद्या कोण? जर या विषारी धंद्यांना वेळेत आवर घातला नाही, तर शासन आणि प्रशासनाची विश्वासार्हता पार खिळखिळी होईल. दूधभेसळीप्रकरणी केवळ पोलिस चौकशी नव्हे, तर अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, आणि लोकायुक्त यांची संयुक्त समिती नेमून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.शेवटी, दूध विकण्याचा व्यवसाय म्हणजे सेवा आणि ती सेवा विषारी बनवणाऱ्यांसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. आणि या सर्व प्रक्रियेला राजकीय वरदहस्त असेल, तर मग समाजानेच निर्धार करून, अशा नेत्यांना जनादेशातून दूर ठेवायला हवे.

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”   Read More »

cm medical assistance fund

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी, सहा महिन्यात 587 रुग्णांना 4 कोटी 90 लाखांची मदत

Devendra Fadnavis: जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे. गेल्या पाच महिन्यांत या निधीच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य रुग्णांना देण्यात आले असून उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कक्षात दाखल अर्जांची तातडीने पडताळणी करून ते मुंबईकडे पाठवले जातात. कक्षाचे काम डॉ. निळकंठ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य स्वप्निल कच्छवे व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांच्या देखरेखीखाली सुरु आहे. या निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीही रुग्णांना देण्यात येते. कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी कार्यरत असून नागरिकांनी थेट येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे. सन २०२५ या वर्षात मागील सहा महिन्यात रुग्णांना देण्यात आलेली मदत जानेवारी – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये, फेब्रुवारी – २८ अर्जांना २२ लाख ७५ हजार रुपये, मार्च – ४३ अर्जांना ३२ लाख २५ हजार रुपये, एप्रिल – २९ अर्जांना २४ लाख ७० हजार रुपये, मे – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये, जून – ३२० अर्जांना २ कोटी ७३ लाख ६३ हजार रुपये, १३ जुलैपर्यंत – १०३ अर्जांना ८७ लाख ३० हजार रुपये, १ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात जवळपास चारपट वाढ झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल केल्यास व कागदपत्रे पूर्ण असल्यास पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. सध्या जिल्ह्यातील १०५ नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा निधी मिळवता येतो. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया अर्जदारांनी निधीसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा स्थाननिश्चित (जीओ टॅग) केलेले छायाचित्रे, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक), तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे), आधारकार्ड, आजाराशी संबंधित निदानात्मक कागदपत्रे तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी पोलिसांचा एफआयआर, प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय समितीचा अहवाल अशी कागदपत्रे बंधनकारक आहेत. अर्जदारांनी ही कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, २ रा मजला, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत किंवा ई-मेलद्वारे (aao.cmrf-mh@gov.in) पाठवावीत. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या साहाय्याने https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासता येते. जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जीव वाचविणाऱ्या या वैद्यकीय मदत उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातर्फे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी, सहा महिन्यात 587 रुग्णांना 4 कोटी 90 लाखांची मदत Read More »

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश

Ashish Shelar: गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश Read More »

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन

Ahilyanagar News : तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या त्रासाला कंटाळून परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या बैठकीस माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार हेही उपस्थित होते. सयाजीराव वाव्हळ, नानासाहेब माळवदे, बंडोपंत ढोले, राजेंद्र डहाळे, संजय कांडेकर, रमेश चौधरी, किरण विरकर, संजय धामने, पोपटराव राठोड, प्रशांत फुगनर, सुरेश बोडखे, भानुदास दातीर, अशोक कोरडे, सुर्यकांत झेंडे आणि पत्रकार साहेबराव कोकणे यांनी नागरिकांचे म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, लक्ष्मीनगरमधील जलवाहिनी ही जुनी व गंजलेली आहे, त्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. फेज टू पाण्याकरिता सर्वांनी नियमाप्रमाणे शुल्क भरले असून नवीन नळजोडण्या देखील दिल्या गेल्या आहेत, मात्र अपेक्षित पाणीपुरवठा अद्याप मिळत नाही. यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत काम लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन Read More »

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde: आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोग्य तपासणी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोडल अधिकारी नेमणार यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा Read More »