MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या आराखड्यात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुधारित परीक्षा पॅटर्न २०२७ पासून लागू केला जाणार असून, आयोगाने यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
काय आहेत मुख्य परीक्षेतील महत्त्वाचे बदल?
भाषा विषय केवळ अर्हताकारी (Qualifying):
मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही भाषा विषयांचे पेपर केवळ पात्रतेसाठी (Qualifying) असतील. उमेदवारांना यामध्ये किमान २५% गुण मिळवणे अनिवार्य असेल. या पेपरांचे गुण अंतिम गुणवत्तेसाठी धरले जाणार नाहीत.
एकूण 7 अनिवार्य पेपर
मुख्य परीक्षेत आता भाषा विषयांचे २ अर्हताकारी पेपर, १ निबंधाचा पेपर आणि ४ सामान्य अध्ययनाचे (General Studies) पेपर असे एकूण सात अनिवार्य पेपर असतील.
गुणवाटप 1250 + 175 (मुलाखत):
अंतिम निवड यादी ही १ निबंधाचा पेपर आणि ४ सामान्य अध्ययनाचे पेपर यांच्या एकूण १२५० गुणांवर आधारित असेल. याशिवाय, मुलाखतीसाठी (Interview) १७५ गुण निश्चित करण्यात आले आहेत. या आधी मुख्य परीक्षेचे गुण वाटप 900 गुणांचे होते.
बदलांमागील मुख्य कारण
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने आयोगाने २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सेवा मुख्य परीक्षा अधिक पारदर्शक आणि संतुलित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
२०२७ ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी सुधारित गुणवाटप आणि रचनेनुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. या सुधारित योजनेचा सविस्तर अभ्यासक्रम लवकरच MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.






