Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात की घातपात या विषयावर पत्रकार परिषद घेऊन धक्कादाक दावे केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत अजित पवार आदल्या दिवशी बाय रोड बारामतीला जाणार होते मात्र एका नेत्याने केलेल्या कॉलमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना निर्णय बदलावा लागला असा दावा केला आहे. तर आता सोशल मीडियावर पोस्ट करत जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? असा प्रश्न विचारला आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?
देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
28 जानेवारी रोजी बारातमी येथे झालेल्या एका विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते.






