DNA मराठी

Raj Thackeray

bala nandgaonkar

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते सामान्य माणसांना आवडणारे नाही. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले, महाराष्ट्रातही तसेच झाले. आम आदमी पक्षामध्येही असे प्रकार झाले. लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, ज्या पक्षाकडे पाहून मतदान केले, त्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे हा लोकांचाही अपमान आहे.दुर्दैवाने राजकारणाबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जाणारे आहेत म्हणून घेणारे तयार आहेत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींनीही स्वतः विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत. शेवटी जनता सर्व काही पाहत असते.-लोकांचा ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडत चालला आहे.-त्यामुळे जाणाऱ्यांनाही असे वाटते की ईव्हीएम असल्यामुळे काही अडचण नाही. लोकांच्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारलाही आणि विरोधी पक्षांनाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.-विरोधी पक्षांनाही आम्ही सांगितले होते की, जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा. सरकारला जर एवढा आत्मविश्वास असेल की जनता आमच्या विचारधारेला आणि कामांना मतदान करते, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील असं बाळा नांदगावकर म्हणाले. NDA ची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न तर एनडीएवर बोलताना जर एखादा नेता पक्षात येणार असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या विचारांचे लोकही येणारच. त्याला कोणतेही नाव दिले तरी त्याचा फारसा अर्थ नाही.1967 मध्ये हरियाणामध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा जन्म झाला होता.तेथील एका आमदाराने अवघ्या नऊ तासांत तीन पक्ष बदलले होते.त्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा आला. मात्र त्यावरील वाद आणि निर्णय आजही सुरू आहेत.कायदा असला तरी त्याचे पालन होत नाही. न्यायालय तातडीने निर्णय देत नाही आणि अध्यक्षांकडे गेल्यानंतरही निर्णय होण्यास वेळ लागतो.त्यामुळे या सर्व बाबींचा काही जणांकडून फायदा घेतला जात आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य Read More »

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »

raj thackeray

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले

Raj Thackeray on PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील एका वर्षासाठी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सोने खरेदी टाळा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांना पत्र लिहित चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? असा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ? पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Ashok Kharat : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो.  ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा ‘गीतारहस्य’ सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब ‘तीर्थ’ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.  महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.  हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.  या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं.  गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.  पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.  राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Rohit Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान  अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही पुरावे सादर करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई आणि बारामती येथे त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांची एफआयआर दाखल करून घेतली नाही. यानंतर आता रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात मदतीची मागणी केली आहे. तर आता रोहित पवार यांच्या  समर्थनात मनसे प्रमुख राज ठाकरे उतरले असून त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. अनेक संशयाची भूत फिरत आहे. अपघात हा धोक्याचे झाला का? हे समजत नाही. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की 3 ठिकाणी एफआयआर द्यायला गेले पण ती घेतली नाही इथे संशयाची सुई निर्माण झाली. मरीन ड्राइव्ह येथे एफआयआर टाईप करताना DCP येऊन  नाही म्हणतात. जर घरच्या संशय आहे तर मग का एफआयआर नाही? असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  सुनेत्रा वहिनी यांचे पती होते. मग त्यांनी पण याबाबत पुढाकार घ्यायला हवे. काय काळ बेर आहे ? याबाबत संशय निर्माण होत आहे. जर काही संशय आहे तर चौकशी व्हायला हवी ब्लॅक बॉक्स बाबत पण कळले नाही. सरकार संशयाची भूत नाचवत आहे असे दिसून येत. एफआयआर का नोंदवून घेतले नाही. हा मुळात प्रश्न आहे. रोहित पवार यांचा एफआयआर नोंदवून गेला जात नसेल तर सामान्य माणसाचे काय? त्रुटी काही असतील ते मांडले जात नसेल तर काय उपयोग. सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर यात संशयाची भूत या ठिकाणी नाचवली जात आहेत असे वाटत आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

bmc election

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब

Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांत हजारो कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचे जे रस्ते चकाचक केले, ते रस्ते आता पुन्हा खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी खोदले जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “8 हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बनवायचे आणि पुन्हा टाटा पॉवरसारख्या कंपन्यांना ते खोदण्याची परवानगी द्यायची, हा कोणता कारभार? मुंबईत ‘बेस्ट’ची वीज असताना टाटा पॉवरला केबल टाकण्याची गरजच काय?” असा खोचक सवाल करत देशपांडे यांनी महापालिकेच्या ‘हितसंबंधांवर’ बोट ठेवले आहे. सदर घोटाळ्याबाबत बोलतांना संदीप देशपांडे म्हणाले की, परवानगी इलेक्ट्रिकल केबलची घेतली जाते, मात्र जमिनीखाली टाटा ऑप्टिकल फायबरचे जाळे विणले जात आहे. एका कामाच्या नावाखाली चार वेगवेगळ्या सेवांचे काम केले जात असूनही महापालिका त्यातून उत्पन्न का मिळवत नाही? जागा पालिकेची, त्रास मुंबईकरांना आणि नफा मात्र खाजगी कंपन्यांना, असे संतापजनक चित्र सध्या मुंबईत दिसत आहे. या गैरप्रकाराकडे लक्ष वेधणारे शाखा सचिव लक्ष्मण पाटील यांचे त्यांनी कौतुक केले असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केवळ रस्ते खोदाईच नव्हे, तर महापालिकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरही देशपांडे यांनी चिंता व्यक्त केली. “पुढच्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पालिकेकडे पैसे उरणार नाहीत, अशी परिस्थिती असताना पाणीपट्टी कमी करण्याच्या लोकप्रिय घोषणा कशाच्या आधारावर केल्या जात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, ॲमेझॉन आणि ब्लिंकिट सारख्या कमर्शियल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून कर वसुली करावी, अशी मागणीही मनसेने लावून धरली आहे. आयुक्तांच्या नवीन नियमावलीवर टीका करताना, “लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आयुक्तांनी करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भगतसिंग कोशारी यांच्यावर कडाडून टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. “भगतसिंग असते तर त्यांना चौपाल असता, ड वर्गाचा माणूस… भगतसिंग यांचं नाव या माणसाला देणं म्हणजे अपमान आहे,” असा घणाघाती आरोप देशपांडे यांनी केला. इतकंच नाही तर, “त्यामुळे भगतसिंग कोशारी यांनी आपलं नाव बदलावं, ही आमची मागणी आहे,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी वादाला नवं वळण दिलं आहे. देशपांडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी काळात यावरून नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटू शकते.

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीचीच; काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा)ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)चे 8 नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे, आणि त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जाते, काँग्रेसची लाज काढली जाते, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती, काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) शी सातत्याने संपर्कात होते असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे, त्यांचे 2 नगरसेवकर गैरहजर राहिले, त्यांना पक्षाने बडतर्फ केले तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली पण (शिवसेना)उबाठाने मात्र कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले, हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही. परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला व शिवसेना (उबाठा)च्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत शिवसेना(उबाठा) काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असेही सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीचीच; काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान

Raj Thackeray on Mohan Bhagwat : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा असे आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला ‘आजार’ असं संबोधले होते. यावर आता राज ठाकरे यांनी भागवतांना आव्हान देत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंकडून CM फडणवीसांची मिमिक्री अन् मुख्यमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता अंतिम टप्प्यात प्रचार आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत शिवसेना ठाकरे गट वर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीवर देखील प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 15 जानेवारी रोजी होणारी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे, मराठी लोकांसाठी नाही. तसेच फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केल्याबद्दल टीका केली आणि म्हटले की त्यांचे काका राज ठाकरे हे एक चांगले मिमिक्री करणारे आहेत आणि म्हणूनच त्यांचा पक्ष सध्याच्या स्थितीत आहे. ठाकरे बंधूंच्या एकतेवर टीका शिवाजी पार्क येथे महायुती आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना फडणवीस यांनी जुने व्हिडिओ दाखवले. या व्हिडिओंमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत, तर आता 20 वर्षांनंतर ते हात मिळवताना दिसत आहेत. फडणवीस म्हणाले, “ही निवडणूक मुंबई किंवा मराठी लोकांसाठी नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की महायुती बीएमसी जिंकेल. या रॅलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकांचे वर्णन “मराठी माणसाची शेवटची निवडणूक” असे केले होते. फडणवीस यांनी असे उत्तर दिले की ठाकरे कुटुंबाची राजकीय विश्वासार्हता येथे पणाला लागली आहे. ते म्हणाले की मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि कोणीही त्याला वेगळे करू शकत नाही. फडणवीस यांनी मुंबईत महायुतीचा महापौर नियुक्त करण्याचे आणि पारदर्शक कारभार आणण्याचे आश्वासन दिले. शहराचा कायापालट करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. हिंदी आणि धारावीवरील हल्ला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय याच सरकारने घेतला होता. धारावी पुनर्विकासाची निविदाही याच सरकारने रद्द केली होती. आता, अदानी समूह आणि राज्य सरकार संयुक्तपणे धारावीला आधुनिक टाउनशिपमध्ये रूपांतरित करत आहेत. भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महाराष्ट्रात फक्त मराठी ही सक्तीची भाषा आहे.

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंकडून CM फडणवीसांची मिमिक्री अन् मुख्यमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर Read More »

mns

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक

BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. “हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे. नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक Read More »