DNA मराठी

Rahuri

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »

exit polls

Rahuri and Baramati Exit Polls : राहुरीमध्ये अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता

Rahuri and Baramati Exit Polls : राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक झाली. राहुरीमध्ये एकूण 56.20% तर बारामतीमध्ये 58.17% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले तर बारामती मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या. राहुरीमध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारामतीमध्ये कुठल्याच मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नव्हता. ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या आमच्या संस्थेने राहुरी आणि बारामती मतदारसंघात थेट ग्राउंडवर जाऊन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार राहुरीमध्ये भाजप तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे. राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर 22 असे एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा आपला गड राखणार असल्याचे दिसून येते. अंदाजानुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 142500 (76%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25500 (14%) तर इतरांना 19463 (10%) मतदान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 117000 (62%) इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते. अक्षय कर्डिले यांच्यासोबत स्व. शिवाजी कर्डिले यांची असणारी सहानुभूती, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची निवडणुकीतून मागार व कार्यकर्त्यांचा भाजपच्या बाजूने असलेला कल, विरोधात तुल्यबळ उमेदवार नसणे, विखे पाटील कुटुंबीयांचा असणारा पाठिंबा व अहिल्यानगर तालुक्यातील प्रभाव, आमदार मोनिका राजळे यांनी केलेला प्रचार आणि पाथर्डी तालुक्यातील प्रभाव, अक्षय कर्डिले यांनी गावोगावी केलेला प्रचार, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेंमुळे होणारे मतांचे विभाजन, महाविकास आघाडीला वातावरण निर्मिती करण्यात आलेल्या मर्यादा या कारणांमुळे अक्षय कर्डिले यांच्या विजयाची एकतर्फी शक्यता आहे. ‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार, बारामती मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 212000 (95%) तर इतरांना 11705 (5%) मते मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा 207000 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचा असलेला प्रभाव आणि प्रमुख सदस्यांनी मतदारांमध्ये जाऊन केलेला प्रचार, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे नागरिकांमध्ये असणारी सहानुभूतीची मोठी लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा, कोणत्याही प्रमुख पक्षाने विरोधात न दिलेला उमेदवार, सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरीक्त असणाऱ्या उमेदवारांचा मर्यादित प्रभाव यामुळे सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर प्रमुख उमेदवारांनी मागार घेतली. याचा फायदा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना होत असल्याचे दिसून येते.

Rahuri and Baramati Exit Polls : राहुरीमध्ये अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता Read More »

crime

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका…

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल पाच दिवस जंगलात तिला ठेवत तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरीत घडली आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्या आक्रमक झाले असून गाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. यामुळे राहुरीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. कॉलेजला जात असल्याचे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती मात्र ती परतलीच नाही. या मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्थानकात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित मुलीच्या मोबाईलचे लोकेशन व तांत्रिक साह्याने पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवली. पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती अशी की घटनेतील आरोपीने नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला जवळील परिसरात मुलीला अपहरण करून घेऊन गेला होता. यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली आणि तीन जणांना अटक केली आहे.

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका… Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूमिसंपादनाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. या रेल्वे मार्गासाठी तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, आदी गावांतील अत्यंत सुपीक शेतीजमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील बहुतांश शेतजमीन नदीकाठालगत असून कालव्यांद्वारे नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या जमिनींवर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते. रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमिसंपादनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचवून भूमिसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला, ज्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार Read More »

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल. यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Read More »