DNA मराठी

Maharashtra Politics

congress

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार?

Maharashtra Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत ‘संघटन सृजन अभियान’ या विषयावर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वॅार रूमचे प्रमुख खा. शशिकांत सेंथिल मार्गदर्शन करणार आहेत तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर हे ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशिवाय इतरांना प्रवेश नाही, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार? Read More »

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून Read More »

fb img 1770982840504

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी एम. विनोद, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते. पथकासोबत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली. भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली. शेवगाव तहसील कार्यालयात आढावा पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने तहसील कार्यालय, शेवगाव येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. तसेच नुकसानभरपाई व पुनर्बांधणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

rohit pawar

Rohit Pawar: जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवार सरकारवर बरसले

Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात की घातपात या विषयावर पत्रकार परिषद घेऊन धक्कादाक दावे केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत अजित पवार आदल्या दिवशी बाय रोड बारामतीला जाणार होते मात्र एका नेत्याने केलेल्या कॉलमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना निर्णय बदलावा लागला असा दावा केला आहे. तर आता सोशल मीडियावर पोस्ट करत जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं? देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 28 जानेवारी रोजी बारातमी येथे झालेल्या एका विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते.

Rohit Pawar: जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवार सरकारवर बरसले Read More »

bmc election

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब

Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांत हजारो कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचे जे रस्ते चकाचक केले, ते रस्ते आता पुन्हा खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी खोदले जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “8 हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बनवायचे आणि पुन्हा टाटा पॉवरसारख्या कंपन्यांना ते खोदण्याची परवानगी द्यायची, हा कोणता कारभार? मुंबईत ‘बेस्ट’ची वीज असताना टाटा पॉवरला केबल टाकण्याची गरजच काय?” असा खोचक सवाल करत देशपांडे यांनी महापालिकेच्या ‘हितसंबंधांवर’ बोट ठेवले आहे. सदर घोटाळ्याबाबत बोलतांना संदीप देशपांडे म्हणाले की, परवानगी इलेक्ट्रिकल केबलची घेतली जाते, मात्र जमिनीखाली टाटा ऑप्टिकल फायबरचे जाळे विणले जात आहे. एका कामाच्या नावाखाली चार वेगवेगळ्या सेवांचे काम केले जात असूनही महापालिका त्यातून उत्पन्न का मिळवत नाही? जागा पालिकेची, त्रास मुंबईकरांना आणि नफा मात्र खाजगी कंपन्यांना, असे संतापजनक चित्र सध्या मुंबईत दिसत आहे. या गैरप्रकाराकडे लक्ष वेधणारे शाखा सचिव लक्ष्मण पाटील यांचे त्यांनी कौतुक केले असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केवळ रस्ते खोदाईच नव्हे, तर महापालिकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरही देशपांडे यांनी चिंता व्यक्त केली. “पुढच्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पालिकेकडे पैसे उरणार नाहीत, अशी परिस्थिती असताना पाणीपट्टी कमी करण्याच्या लोकप्रिय घोषणा कशाच्या आधारावर केल्या जात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, ॲमेझॉन आणि ब्लिंकिट सारख्या कमर्शियल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून कर वसुली करावी, अशी मागणीही मनसेने लावून धरली आहे. आयुक्तांच्या नवीन नियमावलीवर टीका करताना, “लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आयुक्तांनी करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भगतसिंग कोशारी यांच्यावर कडाडून टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. “भगतसिंग असते तर त्यांना चौपाल असता, ड वर्गाचा माणूस… भगतसिंग यांचं नाव या माणसाला देणं म्हणजे अपमान आहे,” असा घणाघाती आरोप देशपांडे यांनी केला. इतकंच नाही तर, “त्यामुळे भगतसिंग कोशारी यांनी आपलं नाव बदलावं, ही आमची मागणी आहे,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी वादाला नवं वळण दिलं आहे. देशपांडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी काळात यावरून नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटू शकते.

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब Read More »

img 20260213 wa0008

Nilesh Lanke: खासदार नीलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नागरिकांशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार लंके यांनी तीन स्वतंत्र निवेदने सादर करून तातडीच्या कारवाईची मागणी केली. पहिल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले. जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतल्यानंतर पैसे परत न देणे, धमकावणे व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप संबंधित संस्थेवर आहेत. या प्रकरणाची ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांमार्फत सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, तसेच भविष्यात अशा फसव्या योजनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दुसऱ्या निवेदनात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान कार्यालय ‘सेवा तीर्थ’ या नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना अधिकृत कामासाठी प्रवेश नाकारला जात असल्याने गंभीर आजारी नागरिकांच्या मदत प्रकरणांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. लोकप्रतिनिधींना त्यांच्या संवैधानिक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी पीएमएनआरएफ विभागात प्रवेश देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली. तिसऱ्या निवेदनात पुणे येथील गुन्हे शाखा युनिट-13 (गुप्तचर विभाग) च्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतरही युनिटचे कामकाज सुरू न झाल्याने आणि 170 कर्मचाऱ्यांचे 18 महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिट-13 चे कामकाज तातडीने सुरू करून सर्व थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार लंके यांनी केली. सामान्य नागरिकांच्या हिताशी निगडित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने, समन्वयाने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार नीलेश लंके यांनी सकारात्मक प्रतिसादाची आशा व्यक्त केली.

Nilesh Lanke: खासदार नीलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; अनेक चर्चांना उधाण Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीचीच; काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा)ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)चे 8 नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे, आणि त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जाते, काँग्रेसची लाज काढली जाते, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती, काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) शी सातत्याने संपर्कात होते असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे, त्यांचे 2 नगरसेवकर गैरहजर राहिले, त्यांना पक्षाने बडतर्फ केले तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली पण (शिवसेना)उबाठाने मात्र कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले, हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही. परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला व शिवसेना (उबाठा)च्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत शिवसेना(उबाठा) काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असेही सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीचीच; काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही Read More »

musical road

Musical Road : भारतातील पहिल्या म्युझिकल रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

Musical Road : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाहन या संगीतमय पट्ट्यांवरून धावत स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील लोकप्रिय ‘ जय हो’ गाण्याच्या संगीताचा आवाज ऐकू आल्यावर त्यांच्या समवेत वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे , मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे. ही अभिनव संकल्पना आहे. वाहनचालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर ५०० मीटर लांब  विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत. या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी ६० ते ७०  किलोमीटर प्रति वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारे घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते. हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाफ म्हणून संगीतमय रस्ता देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. थोडक्यात संगीतमय रस्ता • भारतातला पहिलावहिला संगीतमय रस्ता • दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना मरीन ड्राइव्हवरील बोगदा संपल्यावर संगीतमय रस्त्याचा प्रारंभ • पहिल्या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात ५०० मीटर पर्यंत विशेष पट्ट्या. • रस्त्यावरील विशेष पट्ट्या आणि ६० ते ७० च्या गतीने जाणाऱ्या वाहनाच्या चाकांच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती. • वाहनातील प्रवाशांना कोणत्याही वेगळ्या उपकरणाशिवाय वाहनात ऐकू येतोय ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ गाण्याचे संगीत.

Musical Road : भारतातील पहिल्या म्युझिकल रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन Read More »

rahul narvekar

Rahul Narvekar : संविधानाच्या 10 व्या सूचीतील पेच सुटणार? राहुल नार्वेकरांच्या नेतृत्वाखालील समितीची महत्त्वाची पाऊले

Rahul Narvekar :  भारतीय संविधानातील 10 व्या सूचीमधील (पक्षांतरबंदी कायदा) तरतुदी आणि त्या अंमलात आणताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात एक महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या विशेष समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले की, “10 व्या सूचीमधील तरतुदींचा वापर करताना अनेकदा स्पष्टतेचा अभाव जाणवतो. संसदीय लोकशाही ही उत्क्रांत होत जाणारी पद्धत आहे. पूर्वी पक्षांतरासाठी 1/3 सदस्यांच्या पाठिंब्याची अट होती, जी नंतर सुधारणा करून 2/3 करण्यात आली. मात्र, अजूनही काही बाबींमध्ये संदिग्धता असल्याने लोकसभा आणि न्यायालयाला योग्य सल्ला देण्यासाठी ही समिती काम करत आहे. पुढील बैठक भुवनेश्वरमध्ये समितीच्या या पहिल्या बैठकीत चार सदस्यांनी सहभाग घेतला आणि विविध कायदेशीर पैलूंवर चर्चा केली. 10 व्या सूचीसंदर्भात देशभरातील पीठासीन अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना केल्या जाव्यात, यावर सविस्तर खल झाला. या प्रक्रियेतील पुढची महत्त्वाची बैठक आता भुवनेश्वर येथे होणार असून, तिथे अधिक ठोस शिफारसींवर चर्चा केली जाईल. पात्रता-अपात्रतेचा अधिकार आणि कालमर्यादा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, संविधानानुसार सदस्यांच्या अपात्रतेचा (Disqualification) अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ पीठासीन अधिकाऱ्यालाच असतो. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा या अधिकारावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हे निर्णय घेताना नेमकी किती ‘कालमर्यादा’ असावी, यावरही समिती गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कायद्याचा सखोल अभ्यास आणि पीठासीन अधिकारी म्हणून असलेला अनुभव यांच्या जोरावर ही समिती अशा काही शिफारसी (Recommendations) सादर करणार आहे, ज्या भविष्यात संसदीय लोकशाही अधिक पारदर्शक आणि सुस्पष्ट बनवण्यास मदत करतील.

Rahul Narvekar : संविधानाच्या 10 व्या सूचीतील पेच सुटणार? राहुल नार्वेकरांच्या नेतृत्वाखालील समितीची महत्त्वाची पाऊले Read More »

income tax

New Income Tax Rules : करदात्यांना मोठा दिलासा, नियम आणि फॉर्ममध्ये अनेक बदल

New Income Tax Rules : नवीन आयकर कायद्यांतर्गत करदात्यांना मोठी सवलत मिळणार आहे. आयकर विभागाने नवीन आयकर कायदा, 2025 साठी मसुदा नियम आणि फॉर्म जारी केले आहेत, ज्यामुळे नियम आणि फॉर्म दोन्हीची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या हालचालीचा उद्देश कर प्रणाली सुलभ करणे, अनुपालनाचा भार कमी करणे आणि करदात्यांसाठी संपूर्ण प्रक्रिया अधिक सोयीस्कर करणे आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. नियम आणि फॉर्मच्या संख्येत घट सूत्रांनुसार, प्रस्तावित आयकर नियम, 2026 अंतर्गत एकूण नियमांची संख्या 33£ पर्यंत कमी करण्यात आली आहे. यापूर्वी, आयकर नियम, 1962 अंतर्गत नियमांची संख्या 511 होती, जी अंदाजे 35 टक्के घट दर्शवते. त्याचप्रमाणे, फॉर्मची संख्या 50 टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आली आहे. फॉर्मची संख्या 399 वरून 190 पर्यंत कमी करण्यात आली आहे. हा बदल करदात्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा मानला जातो. तर दुसरीकडे वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले की नवीन नियम आणि फॉर्मची भाषा सोप्या हिंदी आणि सोप्या शब्दांमध्ये तयार करण्यात आली आहे. अनेक आवश्यकता नसलेल्या अनुपालन तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, करदात्यांना अनेक फॉर्म भरण्याचा त्रास कमी करण्यासाठी फॉर्म प्रमाणित करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुसंगत आणि समजण्यास सोपी झाली आहे. आयकर कायदा, 2025 शी जुळणारे नियम नवीन मसुदा नियम आयकर कायदा, 2025 शी पूर्णपणे जुळवून घेण्यात आले आहेत. कायदा आणि नियमांमधील गोंधळ दूर करण्यासाठी कालबाह्य आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या मते, नियम आणि फॉर्म पूर्णपणे “पुन्हा तयार केले गेले आहेत”, म्हणजेच ते पुन्हा डिझाइन केले गेले आहेत. नवीन नियमांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे करदात्यांना आधीच भरलेले फॉर्म उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की उत्पन्न आणि व्यवहार तपशील यासारखी आयकर विभागाकडे आधीच उपलब्ध असलेली माहिती आपोआप फॉर्ममध्ये भरली जाईल. यामुळे फॉर्म भरणे सोपे होणार नाही तर चुका होण्याची शक्यता देखील लक्षणीयरीत्या कमी होईल. सूचनांनंतर मार्चमध्ये अधिसूचना गेल्या आठवड्यात शनिवारी, प्राप्तिकर विभागाने नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 अंतर्गत मसुदा नियम आणि फॉर्म जारी केले. विभागाने सर्व भागधारकांकडून आणि जनतेकडून 22 फेब्रुवारीपर्यंत सूचना मागवल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या सूचनांचा विचार केल्यानंतर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवीन नियम आणि फॉर्म अधिसूचित केले जातील. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारा नवीन कायदा नवीन प्राप्तिकर कायदा, 2025, 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. त्याच्या अंमलबजावणीसह, नवीन कायदा सहा दशकांहून अधिक जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेईल. एका प्रश्नाच्या उत्तरात सूत्रांनी सांगितले की, या बदलांमुळे कर अनुपालन सोपे आणि सुधारेल आणि कर चुकवेगिरीला आळा घालण्यास मदत होईल.

New Income Tax Rules : करदात्यांना मोठा दिलासा, नियम आणि फॉर्ममध्ये अनेक बदल Read More »