DNA मराठी

Maharashtra Politics

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पडद्यामागे मोठे राजकीय नाट्य रंगले असून पक्षांतर्गत वादाचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरून पक्षात आता स्पष्टपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत संघर्षामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक खळबळजनक पत्र धाडले आहे. 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कोणताही अधिकृत पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी आग्रही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. घटनेतील बदलांमुळे अधिकारांच्या वाटपावरून हा वाद विकोपाला गेल्याचे समजते. या वादावर पडदा टाकण्यासाठी दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खुलाशानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समाधान झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पत्रावरून उद्भवलेला हा कायदेशीर आणि राजकीय तिढा सोडवण्यासाठी सध्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या आणि दिग्गज नेत्यांच्या तातडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दिल्लीत असून भाजप श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ऐन राजकीय धामधुमीत राष्ट्रवादीतील हा कलह नेमके कोणते वळण घेतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार

Radhakrishnan Vikhe Patil: श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली मिळाली असून, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या 32 गावांतील 10 हजार हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून पूर्ण होत असल्याचे समाधान जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. वेळोवेळी बैठका घेऊन विविध आवश्यक परवानग्या व मान्यता प्राप्त करुन घेतल्यामुळे साकळाई योजनेचे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहीलेले स्वप्न पुढील 4 वर्षात पुर्ण करण्याचा निर्धार महायुती सरकारचा आहे.साकळाई उपसा सिंचन योजने अंतर्गत म्हसेगांव येथून 4 टप्प्यांमध्ये पाणी उचलून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यांतील एकूण 32 गावांमध्ये विकेंद्रीतजलसाठ्यांद्वारे अस्तित्वातील ल.पा. तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे व गाव तलावां मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या योजनेत सिंचनासाठी 1.60 TMC व पिण्यासाठी 0.20 TMC असा एकूण 1.80 TMC इतका पाणी वापर नियोजित असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली. साकळाई योजनेमध्ये घोड धरणाच्या जलाशयातून मौजे म्हसे येथे पंपगृह क्रमांक 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. पंपगृह क्रमांक 1 ते 4 व वितरण कुंड 1,2 व 3 द्वारे एकूण 4 टप्प्यांमध्ये सुमारे 208.34 मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदामध्ये सोडण्यात येणार आहे. वितरण हौद क्रमांक 2 व 3 मधून गुरुत्वीय बंदीस्त नलिका प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील 32 गावांतील 196 तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर योजनेच्या सर्वेक्षणापासून ते योजनेच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्याच्या सर्व निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे स्पष्ट करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुकीत योजनेच्या संदर्भात जाणीपुर्वक राजकारण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. परंतू अंतिमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देण्याचा शब्द पूर्ण केला आणि आदरणीय खासदार साहेबांनी पाहीलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती सरकाने सहकार्य केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. साकळाई योजनेचे काम पूर्णत्वास जावे म्हणून डॉ सुजय विखे पाटील यांची मोठी धडपड होती.प्रशासकीय स्तरावर त्यांचाही पाठपुरावा सात्तत्याने सुरू होता.मंत्री मंडळाने साकळाई योजनेला दिलेल्या मान्यतेबद्दल डॉ सुजय विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून,महायुती सरकारच्या सहकार्याने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला न्याय मिळत असल्याचे समाधान डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Radhakrishnan Vikhe Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार Read More »

img 20260401 wa0002

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा?

Devendra Fadnavis: राज्यकारभारात नेतृत्वाची खरी कसोटी ही केवळ विकासकामांत किंवा राजकीय यशात नसते ती कायदा-सुव्यवस्थेच्या काटेकोर अंमलबजावणीत आणि समाजातील न्यायभावनेच्या जपणुकीत असते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दुहेरी भूमिकेत काम करताना प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे अनेकदा सिद्ध केले आहे. काही बाबतींत त्यांच्या कार्यशैलीची तुलना शरद पवार यांच्या प्रभावी प्रशासकीय वारशाशी केली जाते. मात्र, अलीकडच्या काळात राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा चिंतेचा विषय बनत आहे. कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची भूमिका निष्पक्ष आणि कठोर असणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना राजकीय पाठबळ मिळाल्याची भावना जनमानसात निर्माण होते, तेव्हा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो. गुन्हेगारीचा प्रश्न केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहत नाही; तो सामाजिक आणि नैतिक संरचनेलाही बाधा पोहोचवतो. विशेषतः जात आणि धर्म यांच्या नावाखाली जेव्हा गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन केले जाते, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनते. समाजातील काही घटकांकडून धार्मिकतेचा आडोसा घेत नेतृत्व करण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी गुन्हेगारीकडे दुर्लक्ष किंवा समर्थन दिसून येणे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांची प्रशासनातील कडक प्रतिमा आणि निर्णयक्षमता यामुळेच जनतेने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला ती कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक छत्राखाली असो, निर्भीडपणे आळा घालणे अत्यावश्यक ठरते. प्रतिमा ही केवळ प्रचारातून घडत नाही; ती कृतीतून दृढ होते. आज राज्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कठोर, पारदर्शक आणि पक्षनिरपेक्ष कारवाई हीच प्रशासनाची खरी ओळख ठरू शकते. अन्यथा, सक्षम नेतृत्वाची ओळख असलेली प्रतिमाही काळाच्या ओघात धूसर होण्याचा धोका नाकारता येणार नाही. म्हणूनच, सत्तेची ताकद आणि जबाबदारी यांचा समतोल राखत कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे, हीच आजच्या नेतृत्वापुढील खरी परीक्षा आहे.

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा? Read More »

Eknath Shinde: शिवसेनेकडून विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी

Eknath Shinde: शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार दगडू सकपाळांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे निवेदन पक्षाने जारी केले आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. दक्षिण कोकण विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केल्याचे निवेदनात म्हटले आहे. मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख पदी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता विभागीय संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दिपक सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हांकरिता विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख तर पराग पिंगळे यांची विभागीय सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे शिवसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Eknath Shinde: शिवसेनेकडून विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी Read More »

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

pankaja munde

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं

Pankaja Munde : बीडच्या अंबाजोगाई येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा थेट तुरुंगातच असते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचं सांगताना, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. “ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने पंधरा पैसे कमवा… पण चुकीच्या मार्गाने शंभर रुपये कमवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा तुरुंगातच आहे,” असं त्या म्हणाल्या. तसेच, “मला चुकीची कामं सांगू नका… घरात पैसे कुठून येतात, याचा हिशोब ठेवा,” असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणातील कारस्थानांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे… माझ्या मनात पाप नाही, देवाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.” निवडणुकीतील पराभवाचं उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना सांगितलं की, राजकारणात पराभव होत असतो, पण चुकीचं वागणारे लोक नकाशावरून गायब होतात.

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं Read More »

bhiwandi gas news

Bhivandi Gas News : भिवंडीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार रात्रभर एजन्सीबाहेर झोपून

Bhivandi Gas News : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसत आहे. भिवंडी हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ५ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीकडे दररोज केवळ ४० ते ५० सिलेंडर उपलब्ध होत असल्याने “जे लवकर येतील त्यांनाच सिलेंडर मिळेल” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगार मध्यरात्रीपासूनच रांगा लावत आहेत. सिलेंडरसाठी नंबर लावून अनेक कामगार एजन्सीबाहेरच झोपून रात्र काढत आहेत, जेणेकरून सकाळी त्यांना सिलेंडर मिळू शकेल. मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. गॅसअभावी जेवण बनवणे कठीण झाले असून रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी प्रशासनाकडे ५ किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.

Bhivandi Gas News : भिवंडीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार रात्रभर एजन्सीबाहेर झोपून Read More »

maharashtra government

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कारण काय?

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी रुबल प्रखेर अग्रवाल यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. रुबल प्रखेर अग्रवाल यापूर्वी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. तर नयना गुंडे महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या १. श्रीमती रुबल प्रखेर अग्रवाल (आयएएस:आरआर:२००८), व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून बदली झाली आहे. २. श्रीमती नयना गुंडे (आयएएस:एससीएस:२००८), महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून बदली झाली आहे. ३. श्रीमती श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:२००९), विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांची व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून बदली झाली आहे. ४. श्री अशोक काकडे (आयएएस:एससीएस:२०१०), जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून बदली झाली आहे. ५. श्री राहुल रेखवार (आयएएस:आरआर:२०११) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. ६. श्री एम. देवेंद्र सिंग (आयएएस:आरआर:२०११) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. ७. डॉ. मैनक घोष (आयएएस:आरआर:२०१९), जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ८. श्री प्रियंवदा म्हाड्डळकर (आयएएस:आरआर:२०२२) यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कारण काय? Read More »

police bharti

Police Bharti: मोठी दुर्घटना, पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू

Police Bharti: राज्यात सध्या कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणीसाठी आलेल्या पुरुषोत्तम बुरकुल या तरुणाचा धावताना मृत्यू झाला आहे. १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच हा तरुण कोसळला आणि त्याच्या मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हा कारागृह पोलीस भरतीसाठी पुण्यात आला होता. शनिवारी सकाळी साधारण साडेनऊ ते दहाच्या सुमारास त्याची १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. तीन फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, जेव्हा तो चौथ्या आणि शेवटच्या राऊंडला आला, तेव्हा अचानक त्याला प्रचंड दम लागला. धावताना अचानक छातीत कळ आल्याने किंवा थकवा जाणवल्याने तो मैदानातच कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला प्रथमोपचार देऊन रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, धावताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. मैदानावर उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांनी सांगितले की, सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुरुषोत्तम जेव्हा धावत होता, तेव्हा उन्हामुळे त्याला मोठ्या प्रमाणात थकवा आणि दम लागला असावा. उन्हात धावताना शरीर साथ न दिल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे . या प्रकरणात आता पुढील तपासात काय समोर येते आणि कोणावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Police Bharti: मोठी दुर्घटना, पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू Read More »