DNA मराठी

Maharashtra Politics

img 20260213 wa0008

Nilesh Lanke: खासदार नीलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नागरिकांशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार लंके यांनी तीन स्वतंत्र निवेदने सादर करून तातडीच्या कारवाईची मागणी केली. पहिल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले. जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतल्यानंतर पैसे परत न देणे, धमकावणे व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप संबंधित संस्थेवर आहेत. या प्रकरणाची ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांमार्फत सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, तसेच भविष्यात अशा फसव्या योजनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दुसऱ्या निवेदनात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान कार्यालय ‘सेवा तीर्थ’ या नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना अधिकृत कामासाठी प्रवेश नाकारला जात असल्याने गंभीर आजारी नागरिकांच्या मदत प्रकरणांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. लोकप्रतिनिधींना त्यांच्या संवैधानिक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी पीएमएनआरएफ विभागात प्रवेश देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली. तिसऱ्या निवेदनात पुणे येथील गुन्हे शाखा युनिट-13 (गुप्तचर विभाग) च्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतरही युनिटचे कामकाज सुरू न झाल्याने आणि 170 कर्मचाऱ्यांचे 18 महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिट-13 चे कामकाज तातडीने सुरू करून सर्व थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार लंके यांनी केली. सामान्य नागरिकांच्या हिताशी निगडित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने, समन्वयाने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार नीलेश लंके यांनी सकारात्मक प्रतिसादाची आशा व्यक्त केली.

Nilesh Lanke: खासदार नीलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; अनेक चर्चांना उधाण Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीचीच; काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा)ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)चे 8 नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे, आणि त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जाते, काँग्रेसची लाज काढली जाते, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती, काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) शी सातत्याने संपर्कात होते असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे, त्यांचे 2 नगरसेवकर गैरहजर राहिले, त्यांना पक्षाने बडतर्फ केले तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली पण (शिवसेना)उबाठाने मात्र कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले, हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही. परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला व शिवसेना (उबाठा)च्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत शिवसेना(उबाठा) काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असेही सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: चंद्रपुरात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीचीच; काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही Read More »

musical road

Musical Road : भारतातील पहिल्या म्युझिकल रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

Musical Road : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाहन या संगीतमय पट्ट्यांवरून धावत स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील लोकप्रिय ‘ जय हो’ गाण्याच्या संगीताचा आवाज ऐकू आल्यावर त्यांच्या समवेत वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे , मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे. ही अभिनव संकल्पना आहे. वाहनचालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर ५०० मीटर लांब  विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत. या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी ६० ते ७०  किलोमीटर प्रति वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारे घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते. हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाफ म्हणून संगीतमय रस्ता देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. थोडक्यात संगीतमय रस्ता • भारतातला पहिलावहिला संगीतमय रस्ता • दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना मरीन ड्राइव्हवरील बोगदा संपल्यावर संगीतमय रस्त्याचा प्रारंभ • पहिल्या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात ५०० मीटर पर्यंत विशेष पट्ट्या. • रस्त्यावरील विशेष पट्ट्या आणि ६० ते ७० च्या गतीने जाणाऱ्या वाहनाच्या चाकांच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती. • वाहनातील प्रवाशांना कोणत्याही वेगळ्या उपकरणाशिवाय वाहनात ऐकू येतोय ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ गाण्याचे संगीत.

Musical Road : भारतातील पहिल्या म्युझिकल रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन Read More »

rahul narvekar

Rahul Narvekar : संविधानाच्या 10 व्या सूचीतील पेच सुटणार? राहुल नार्वेकरांच्या नेतृत्वाखालील समितीची महत्त्वाची पाऊले

Rahul Narvekar :  भारतीय संविधानातील 10 व्या सूचीमधील (पक्षांतरबंदी कायदा) तरतुदी आणि त्या अंमलात आणताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात एक महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या विशेष समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले की, “10 व्या सूचीमधील तरतुदींचा वापर करताना अनेकदा स्पष्टतेचा अभाव जाणवतो. संसदीय लोकशाही ही उत्क्रांत होत जाणारी पद्धत आहे. पूर्वी पक्षांतरासाठी 1/3 सदस्यांच्या पाठिंब्याची अट होती, जी नंतर सुधारणा करून 2/3 करण्यात आली. मात्र, अजूनही काही बाबींमध्ये संदिग्धता असल्याने लोकसभा आणि न्यायालयाला योग्य सल्ला देण्यासाठी ही समिती काम करत आहे. पुढील बैठक भुवनेश्वरमध्ये समितीच्या या पहिल्या बैठकीत चार सदस्यांनी सहभाग घेतला आणि विविध कायदेशीर पैलूंवर चर्चा केली. 10 व्या सूचीसंदर्भात देशभरातील पीठासीन अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना केल्या जाव्यात, यावर सविस्तर खल झाला. या प्रक्रियेतील पुढची महत्त्वाची बैठक आता भुवनेश्वर येथे होणार असून, तिथे अधिक ठोस शिफारसींवर चर्चा केली जाईल. पात्रता-अपात्रतेचा अधिकार आणि कालमर्यादा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, संविधानानुसार सदस्यांच्या अपात्रतेचा (Disqualification) अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ पीठासीन अधिकाऱ्यालाच असतो. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा या अधिकारावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हे निर्णय घेताना नेमकी किती ‘कालमर्यादा’ असावी, यावरही समिती गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कायद्याचा सखोल अभ्यास आणि पीठासीन अधिकारी म्हणून असलेला अनुभव यांच्या जोरावर ही समिती अशा काही शिफारसी (Recommendations) सादर करणार आहे, ज्या भविष्यात संसदीय लोकशाही अधिक पारदर्शक आणि सुस्पष्ट बनवण्यास मदत करतील.

Rahul Narvekar : संविधानाच्या 10 व्या सूचीतील पेच सुटणार? राहुल नार्वेकरांच्या नेतृत्वाखालील समितीची महत्त्वाची पाऊले Read More »

income tax

New Income Tax Rules : करदात्यांना मोठा दिलासा, नियम आणि फॉर्ममध्ये अनेक बदल

New Income Tax Rules : नवीन आयकर कायद्यांतर्गत करदात्यांना मोठी सवलत मिळणार आहे. आयकर विभागाने नवीन आयकर कायदा, 2025 साठी मसुदा नियम आणि फॉर्म जारी केले आहेत, ज्यामुळे नियम आणि फॉर्म दोन्हीची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या हालचालीचा उद्देश कर प्रणाली सुलभ करणे, अनुपालनाचा भार कमी करणे आणि करदात्यांसाठी संपूर्ण प्रक्रिया अधिक सोयीस्कर करणे आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. नियम आणि फॉर्मच्या संख्येत घट सूत्रांनुसार, प्रस्तावित आयकर नियम, 2026 अंतर्गत एकूण नियमांची संख्या 33£ पर्यंत कमी करण्यात आली आहे. यापूर्वी, आयकर नियम, 1962 अंतर्गत नियमांची संख्या 511 होती, जी अंदाजे 35 टक्के घट दर्शवते. त्याचप्रमाणे, फॉर्मची संख्या 50 टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आली आहे. फॉर्मची संख्या 399 वरून 190 पर्यंत कमी करण्यात आली आहे. हा बदल करदात्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा मानला जातो. तर दुसरीकडे वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले की नवीन नियम आणि फॉर्मची भाषा सोप्या हिंदी आणि सोप्या शब्दांमध्ये तयार करण्यात आली आहे. अनेक आवश्यकता नसलेल्या अनुपालन तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, करदात्यांना अनेक फॉर्म भरण्याचा त्रास कमी करण्यासाठी फॉर्म प्रमाणित करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुसंगत आणि समजण्यास सोपी झाली आहे. आयकर कायदा, 2025 शी जुळणारे नियम नवीन मसुदा नियम आयकर कायदा, 2025 शी पूर्णपणे जुळवून घेण्यात आले आहेत. कायदा आणि नियमांमधील गोंधळ दूर करण्यासाठी कालबाह्य आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या मते, नियम आणि फॉर्म पूर्णपणे “पुन्हा तयार केले गेले आहेत”, म्हणजेच ते पुन्हा डिझाइन केले गेले आहेत. नवीन नियमांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे करदात्यांना आधीच भरलेले फॉर्म उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की उत्पन्न आणि व्यवहार तपशील यासारखी आयकर विभागाकडे आधीच उपलब्ध असलेली माहिती आपोआप फॉर्ममध्ये भरली जाईल. यामुळे फॉर्म भरणे सोपे होणार नाही तर चुका होण्याची शक्यता देखील लक्षणीयरीत्या कमी होईल. सूचनांनंतर मार्चमध्ये अधिसूचना गेल्या आठवड्यात शनिवारी, प्राप्तिकर विभागाने नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 अंतर्गत मसुदा नियम आणि फॉर्म जारी केले. विभागाने सर्व भागधारकांकडून आणि जनतेकडून 22 फेब्रुवारीपर्यंत सूचना मागवल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या सूचनांचा विचार केल्यानंतर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवीन नियम आणि फॉर्म अधिसूचित केले जातील. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारा नवीन कायदा नवीन प्राप्तिकर कायदा, 2025, 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. त्याच्या अंमलबजावणीसह, नवीन कायदा सहा दशकांहून अधिक जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेईल. एका प्रश्नाच्या उत्तरात सूत्रांनी सांगितले की, या बदलांमुळे कर अनुपालन सोपे आणि सुधारेल आणि कर चुकवेगिरीला आळा घालण्यास मदत होईल.

New Income Tax Rules : करदात्यांना मोठा दिलासा, नियम आणि फॉर्ममध्ये अनेक बदल Read More »

aaditya thackeray

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले

Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच ‘ब्रेक’ लावण्याचे नियोजन सुरू आहे का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे ‘कंजेश्चन टॅक्स’ (गर्दी शुल्क) आकारण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या ‘टॅक्स बॉम्ब’वर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. ​आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या प्रस्तावाचा समाचार घेताना विचारले की, मुंबईकडून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा जातो, मग बदल्यात मुंबईकरांना नवीन करांचा बोजा का? “एकीकडे मुंबईतील उद्योग आणि रोजगार राज्याबाहेर घालवायचे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य जनतेला नवीन करांच्या जाळ्यात ओढायचे, हा भाजपचा दुहेरी डाव आहे,” असे ठाकरे म्हणाले. याआधीही रस्ते आणि सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करून मुंबईची तिजोरी रिकामी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ​मकरंद नार्वेकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव म्हणजे भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा खडा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. “रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणारी भाजप जनतेला ‘टॅक्स रिफंड’ देणार का? खराब हवामानामुळे आरोग्याचे नुकसान होणाऱ्या मुंबईकरांना भरपाई मिळणार का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपला कोंडीत पकडले. ‘बेस्ट’ बसची संख्या कमी करून खाजगी कंपन्यांचे खिसे भरले जात असताना आता सामान्य वाहनधारकांना लक्ष्य केले जात असल्याने मुंबईत आगामी काळात मोठा राजकीय रणसंग्राम होण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान

Raj Thackeray on Mohan Bhagwat : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा असे आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला ‘आजार’ असं संबोधले होते. यावर आता राज ठाकरे यांनी भागवतांना आव्हान देत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान Read More »

baramati by election

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. डुडी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे. तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकतीवर शुक्रवार ६ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून मंगळवार १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले. 7 हजाराहून अधिक मतदारांची वाढ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार  ६०८ इतके मतदार असून आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी आहे. या कालावधीत ७ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९२ हजार ८१९ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९६ हजार १०२ इतके मतदार असून यामध्ये ३ हजार २८३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत महिला मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार ७६५ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९२ हजार २४५ इतके मतदार असून यामध्ये ४ हजार ४८० इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. मतदारसंघात तृतीयपंथी मतदार संख्या २४ असून यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहिती डुडी यांनी दिली.

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध Read More »

eknath shinde

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, साजरा करणार नाही वाढदिवस; कारण काय?

Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. अजितदादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, साजरा करणार नाही वाढदिवस; कारण काय? Read More »

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला

Sujay Vikhe: राहुरीत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली. “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो,” असे सांगत त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. काम करताना गोड बोलण्यापेक्षा थेट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. नगर मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. “थोडा त्रास सहन करा, प्रश्न कायमचा सुटेल” काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र त्यानंतर नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विकासकामांना अडथळे निर्माण होऊ नयेत, यावर भर दिला. समस्या ऐकून थेट आदेश बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करत कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समस्या सोडवणे हाच उद्देश अनेक तांत्रिक अडचणी असूनही हे काम सुरू आहे. सध्या आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे” “मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल, आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. अजित पवार यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाची आठवण नगर मनमाड महामार्गावरील दीर्घकाळापासून प्रलंबित व नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या समस्यांवर आयोजित बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. कोणतीही तडजोड न करता त्यांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे अनेकांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निर्णयक्षम बैठकीची आठवण झाली.

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला Read More »