DNA मराठी

Maharashtra government

railway

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्‍यासाठी राज्‍यसरकार सकारात्‍मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली. पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्‍हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या मार्गाबाबत सविस्‍तर चर्चा केली. माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील, आ.डॉ.किरण लहामटे, आ.सरोज अहिरे, आ.अमोल खताळ, आ.शरद सोनवणे, आ.बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते. शिष्‍टमंडळाने पुणे-नाशिक रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्‍यानगर या जिल्‍ह्यांच्‍या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्‍यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता करण्‍यात आल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली. या रेल्‍वे मार्गाबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असून, यासाठी निधीचीही तरतुद केलेली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्‍याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्‍पाची तांत्रिक अचुकता व कालबध्‍द अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍यासाठी तज्‍ज्ञांची उच्‍च्‍स्‍तरीय समिती स्‍थापन करुन, याबाबतचा अहवाल मागविण्‍यात येईल. समितीकडून येणा-या अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत आपण स्‍वत: पाठपुरावा करु अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्‍टमंडळाला दिली. राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपुर्ण बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्‍दारे करण्यात आली. यावेळी आ.प्राजक्त तनपुरे, आ.विठ्ठलराव लंघे पाटील व आ. अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही Read More »

anna hazare

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही

Anna Hazare: माहिच्या अधिकार कायद्याच्या नियमांतील दुरूस्तीच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आता विविध संघटनांकडून नैतिक जबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मात्र, अधिकृतपणे संपर्क करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आज सरकारला आंदोलनासंबंधी स्मरणपत्र पाठविले आहे. या कायद्याच्या नियमांत सरकारने अलीकडेच बदल केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना माहिती मिळविणे अवघड जाणार आहे, असे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिला आहे. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. मात्र, आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर हजारे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे उपोषण करण्यावर ठाम राहिले. त्यानंतर सरकारकडून कोणीही अधिकृतपणे चर्चेसाठी आले नाही. तर दुसऱ्या बाजूला विविध सामाजिक संघटनांनी हजारे यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रश्न सुटल्याशिवाय आता माघार नाही, अशा निर्धार व्यक्त करीत या संघटनांनी आंदोलनासाठी नैतिक दबाव निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर आता हजारे यांनी सरकारला पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, मी 22 जून 2026 रोजी आपणास सविस्तर पत्र देऊन महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायद्यातील अनेक तरतुदी नागरिकांच्या माहितीच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या असल्याचे सविस्तर निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये शासनाने या नियमांचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येवून भेट घेतली. त्यावेळेस आमच्यामध्ये अडीच तास माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश, नागरिकांच्या अडचणी आणि नवीन नियमांमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली. त्यांनी कोणताही कायदा अथवा नियमावली करण्याचे अधिकार शासनाकडे असल्याने आपल्या भावना आम्ही शासनास कळवितो, पुढील निर्णय शासन घेईल असे सांगितले होते. त्यामुळे सरकारने 12 जून 2026 रोजी लागू केलेली नियमावली रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुन्हा एकदा हा कायदा वाचविण्यासाठी प्राणपणास लावून उपोषण सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की. महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील नागरिकविरोधी व कायद्याच्या मूळ तत्त्वांना बाधा आणणाऱ्या सर्व तरतुदी तात्काळ स्थगित करून रद्द करण्यात याव्यात. माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, माहिती आयुक्त, वकील, पत्रकार आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करून नव्याने नियम तयार करण्यात यावेत. माहितीचा अधिकार अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा राहील याची शासनाने हमी द्यावी, अन्य़था ठरल्याप्रमाणे आंदोलन केले जाईल.

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही Read More »

anna hajare

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

Anna Hajare : माहितीचा अधिकार कायद्यातील दुरूस्तीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हजारे उपोषणावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर आयोगाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आणि हजारे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या कायद्याच्या नियमावलीत सरकारने काही बदल केले आहेत. ते बदल अन्यायकारक असल्याचे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य आयुक्त पांडे, पुणे विभागाचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, छत्रपती संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर आज बुधवारी राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी हजारे यांचे कायदेशीर सल्लागार अॅड. श्याम आसावा, दादा पटारे, दत्ता आवारी उपस्थित होते. आयुक्त पांडे यांच्याकडे हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांना न विचारता परस्पर दुरूस्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यासंबंधी समिती नियुक्त करावी, समितीच्या सूचना घेऊन त्यानुसार बदल करावेत, तोपर्यंत या तरतुदी स्थगित ठेवाव्यात अशी मागणी केली. यावर या भावना सरकारला कऴविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. आता सरकार पुढे काय भूमिका घेणार, पुढील चर्चा करण्यासाठी कोण येणार, याकडे लक्ष लागले आहे.

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम Read More »

maharashtra government

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गत मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांच्या विभाजन- समावेशनानंतर आता स्वतंत्र असे ४६ विभाग अस्तित्वात येणार आहेत. सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सामान्य प्रशासन विभागातंर्गत कार्यरत आहे. राज्य शासनाच्या प्रचार, प्रसिद्ध आणि जनसंपर्कासाठी कार्यरत या महासंचालनालयाची सात विभागीय कार्यालये आहेत. शिवाय उपराजधानी नागपूर येथे संचालक कार्यालय देखील आहे. देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे, तसेच गोवा राज्यात पणजी येथे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून देखील शासनाच्या जनसंपर्काचे काम केले जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या योजना व विकास कामांसह, लोकोपयोगी उपक्रमांसाठी जाणीव जागृतीसह, प्रसिद्धीचे कामकाज चालते. महासंचालनालय मुख्यालय तसेच या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आपत्त्कालिन परिस्थिती, ते सण – उत्सव आणि तातडीच्या परिस्थितीत शासकीय – प्रशासकीय यंत्रणेसह, माध्यम आणि नागरिकांसाठी संपर्क – संवादासाठी कार्यरत असते. स्वतंत्र विभाग निर्मितीमुळे निर्णय प्रक्रीयेत आणि कामकाजात गतीमानता येणार आहे. मुंबईतील मंत्रालयांतील विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता यावी दृष्टीने गत मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ३३ विभागांची पुनर्रचना करून, ४५ विभाग करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता त्यांची संख्या ४६ झाली आहे. या विभागांच्या पुनर्रचना आणि विभाजन- समावेशनामुळे एकंदर कामकाजात सुसूत्रता येणार आहे. तसेच निर्णय प्रक्रीया गतीने राबविता येणे शक्य होणार आहे. सुधारित निर्णयानुसार अस्तित्वात असलेल्या विभागांचे विभाजन करून, निर्माण होणारे नवीन विभाग पुढीलप्रमाणे – कृषि व पदुम विभागाचे विभाजन करुन कृषि विभाग आणि पदुम विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन स्वतंत्र सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. सामान्य प्रशासन विभागातून राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क हे दोन उप विभाग वेगळे करुन राजशिष्टाचार विभाग व माहिती व जनसंपर्क विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. गृह विभागातून स्वतंत्र परिवहन विभाग. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करुन उद्योग व खनिकर्म विभाग, ऊर्जा विभाग आणि कामगार विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. महसूल व वन विभागाचे विभाजन करुन महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. पूर्वी “भूसंपादन” हा विषय वन विभागाकडे होता. आता तो महसूल विभागाकडे राहील. तद्वतच “नोंदणी व मुद्रांक शुल्क” हा विषय पूर्वीप्रमाणे महसूल विभागाकडेच राहील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन करुन शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करुन सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभागा असे दोन स्वतंत्र विभाग. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे विभाजन करुन स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग. तसेच नियोजन विभागातून रोजगार हमी योजना विभाग वगळून त्याचा समावेश मृद व जलसंधारण विभागामध्ये करण्यात येणार.

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग Read More »

rbi

Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, मुंबईतील ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध

Reserve Bank of India : बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि सतत खालावणारी आर्थिक स्थिती यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. मध्यवर्ती बँकेने मुंबईस्थित ‘मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक’वर सहा महिन्यांसाठी अनेक कडक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने जारी केलेले हे आदेश शुक्रवारी कामकाजाच्या वेळेनंतर लागू झाले. या कारवाईनंतर, खातेदारांना पैसे काढण्यावर विशिष्ट मर्यादा घालण्यात आली आहे. खातेदारांवर थेट परिणाम रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा थेट परिणाम बँकेच्या ठेवीदारांवर होणार आहे. आरबीआयच्या नवीन आदेशानुसार, खातेदार आता त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यातून जास्तीत जास्त १ लाख रुपये काढू शकतात. १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे ज्या ग्राहकांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांना त्यांचे हप्ते (EMI) भरण्याची मुभा देण्यात आली आहे. नवीन कर्ज आणि गुंतवणुकीवर पूर्ण बंदी आरबीआयने स्पष्ट केले आहे की, सहा महिन्यांच्या या निर्बंधांच्या कालावधीत मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर विविध अटी लागू असतील. बँकेचे व्यवस्थापन आता नवीन ग्राहकांना कर्ज किंवा आगाऊ रक्कम (advances) देऊ शकत नाही, तसेच विद्यमान कर्जांचे नूतनीकरणही करू शकत नाही. याव्यतिरिक्त, बँकेला नवीन क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास, नवीन दायित्वे (liabilities) निर्माण करण्यास किंवा बाजारातून निधी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत बँक नवीन मुदत ठेवी (FDs) किंवा इतर ठेवी स्वीकारू शकत नाही. **परवाना रद्द नाही; परिस्थितीवर लक्ष** मध्यवर्ती बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, या निर्बंधांकडे बँकिंग परवाना रद्द करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहू नये. आरबीआयने सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती आणि तरलता (liquidity) सुधारण्यासाठी ते बँकेचे मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहेत. ठेवीदारांचे हित जपण्यासाठी आणि बँकेच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांच्या अधीन राहून आपले बँकिंग कामकाज सुरू ठेवेल.

Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, मुंबईतील ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध Read More »

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar: गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला. येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत. रोहित पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? Read More »

jcb

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त

Jalgaon News : जळगावमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एमडी ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित ड्रग माफिया रईस हसन देशमुख याच्या अवैध घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. जळगावच्या इतिहासात अमली पदार्थ तस्कराविरोधात झालेली ही पहिलीच बुलडोझर कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात आरोपींकडून कार, दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले होते. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला रईस हसन देशमुख सध्या पोलीस कोठडीत असून, तपासादरम्यान त्याने एमआयडीसी परिसरात नियमांचे उल्लंघन करून अवैध दुकान आणि घर उभारल्याचे निष्पन्न झाले.यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि जिल्हा पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत आरोपीचे अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने आरोपीचे दुकान आणि घर जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर प्रशासकीय आणि आर्थिक कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत असल्याची माहिती पंकज गोसावी, उपायुक्त महानगरपालिका, जळगाव यांनी दिली.

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त Read More »

img 20260606 wa0004

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता?

Maharashtra Politics : “६०० वर्षे मुघलांचे राज्य होते, १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते, ७० वर्षे काँग्रेसचे सरकार होते मग हिंदू समाजाला धोका नेमका गेल्या काही वर्षांतच कसा निर्माण झाला?” हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार फिरताना दिसतो. या प्रश्नाचे उत्तर राजकीय भूमिकेनुसार बदलू शकते परंतु त्यामागील मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर आहे. तो म्हणजे, धर्म खरोखर धोक्यात आहे की धोक्याची भावना राजकीयदृष्ट्या निर्माण केली जात आहे? भारतातील हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समुदाय आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, असंख्य श्रद्धास्थाने, विविध तत्त्वज्ञान, भाषा आणि सामाजिक रचना यांचा हा समाज आहे. अशा समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, असे मानण्यासाठी अत्यंत गंभीर आणि व्यापक स्वरूपाचे पुरावे आवश्यक असतात. परंतु सार्वजनिक चर्चेत अनेकदा भावनांचा आवाज तथ्यांपेक्षा मोठा असतो. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गेल्या काही दशकांत धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय न राहता निवडणुकीतील प्रभावी राजकीय साधन बनला आहे. पूर्वी विकास, रोजगार, शेती, शिक्षण किंवा आरोग्य यांवर केंद्रित असलेले राजकारण आता ओळख, अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरताना दिसते. कारण भीती ही आश्वासनांपेक्षा अधिक प्रभावी राजकीय प्रेरणा ठरते. यामुळेच आज गावोगावी “धर्मरक्षक”, “हिंदुत्ववादी नेता”, “समाजरक्षक” अशा उपाध्या घेऊन अनेक जण पुढे येताना दिसतात. प्रश्न असा आहे की, जर हिंदू समाज खरोखरच इतका शक्तिशाली, व्यापक आणि ऐतिहासिकदृष्ट्या टिकाऊ असेल, तर त्याच्या रक्षणासाठी इतक्या नव्या रक्षकांची अचानक गरज का भासावी? धर्माच्या रक्षणाची चिंता अधिक आहे की धर्माच्या नावावर राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची? लोकशाहीत मतभेद हे स्वाभाविक असतात. एखाद्या नागरिकाने एखाद्या पक्षाला मतदान केले नाही, एखाद्या नेत्याच्या विचारांशी सहमत झाला नाही किंवा एखाद्या धोरणावर टीका केली, म्हणून तो धर्मविरोधी ठरत नाही. राजकीय असहमती आणि धार्मिक वैर यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली गेली, तर लोकशाहीची सर्वात मोठी हानी होते. कारण मग प्रत्येक प्रश्न धर्माच्या चष्म्यातून पाहिला जाऊ लागतो. धर्म हा श्रद्धेचा विषय आहे मतदान हा राजकीय अधिकार आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कायमस्वरूपी जोडण्याचा प्रयत्न झाला, तर नागरिकत्वाची संकल्पनाच कमकुवत होते. एखाद्या व्यक्तीचे राजकीय मत वेगळे असू शकते, पण त्यामुळे तो आपल्या धर्माचा शत्रू ठरत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या समुदायाच्या काही व्यक्तींच्या कृतींवरून संपूर्ण समुदायाला दोषी ठरवणे हेही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. भारतीय समाजाने मुघल राजवट, ब्रिटिश सत्ताकाळ, फाळणी, आणीबाणी, दंगली आणि अनेक राजकीय उलथापालथी अनुभवल्या आहेत. तरीही समाज टिकून राहिला, कारण त्याची ताकद केवळ धर्मात नव्हे तर सहअस्तित्वात होती. त्यामुळे आज जर कोणता धोका असेल, तर तो धर्मापेक्षा संवाद हरवण्याचा, प्रश्न विचारण्याची सवय कमी होण्याचा आणि नागरिकांना सतत भीतीच्या मानसिकतेत ठेवण्याचा आहे. धर्म वाचवण्यापेक्षा लोकशाही जपणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लोकशाही मजबूत असेल, तर प्रत्येक धर्म सुरक्षित राहू शकतो. पण लोकशाहीच कमकुवत झाली, तर कोणताही धर्म, कोणतीही विचारधारा किंवा कोणताही समुदाय स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. म्हणून आजचा खरा प्रश्न “हिंदू धोक्यात आहे का?” हा नाही. खरा प्रश्न असा आहे की, आपण धर्माच्या नावावर भीती विकणाऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणार आहोत की लोकशाहीच्या मूल्यांवर?

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता? Read More »

utkarsha rupavate

Utkarsha Rupavate : विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल

Utkarsha Rupavate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधानपरिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली. असे करून भाजपला मदत करण्याचे पूणपणे महाविकास आघाडीने काम केले असा आरोप करत वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना रूपवते म्हणाल्या, इतरांना भाजपची बी टीम म्हणतात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांनी आणि नेत्यांनी भाजपची ए टीम म्हणून काम करण्याला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीने लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणे बंद करून सरळ ते भाजपला मदत करत आहे हे मान्य करावे अशा शब्दात उत्कर्षा रूपवते यांनी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

Utkarsha Rupavate : विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल Read More »

img 20260604 wa0018

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

Pune Crime: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२, धंदा-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे:गोरख संभाजी सोनवणे(वय ३२ वर्षे – पती)संभाजी लक्ष्मण सोनवणे(वय ६२ वर्षे – सासरा), अलका संभाजी सोनवणे(वय ५५ वर्षे – सासू) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांना ‘विरा’ (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण व मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि “पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका” अशी तंबी दिली. नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली. त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता, पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि “हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा”असा अमानुष पवित्रा घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला. फ्लॅटसाठी 3 लाख आणि ‘अधिक मासात’ सोन्याच्या अंगठीची मागणी एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्याने तेजस्विनीकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. मे २०२६ मध्ये ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र,”आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,”असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली. २ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही.” त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन Read More »