DNA मराठी

latest update

milind deora

Milind Deora : दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप; मराठी एकीकरण समितीची तीव्र प्रतिक्रिया

Milind Deora : राज्यसभेतील खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी आंदोलनांचे ठिकाण दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवण्याची सूचना केली आहे. देवरांनी म्हटले आहे की, दक्षिण मुंबई हे राज्याच्या शासन, सुरक्षा आणि अर्थकारणाचे केंद्र असून, येथे मुख्यमंत्री सचिवालय (मंत्रालय), विधीमंडळ, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, पोलिस दलाची कार्यालये तसेच वेस्टर्न नेव्हल कमांड यांसारख्या महत्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो आणि शासन, सुरक्षा तसेच खासगी क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम होतो. म्हणूनच अशा आंदोलनांना इतर ठिकाणी हलवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. तथापि, या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे, “बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे.” देवरांच्या पत्रामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली असून, आंदोलने हा लोकशाही हक्क असून त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही, असे मराठी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Milind Deora : दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप; मराठी एकीकरण समितीची तीव्र प्रतिक्रिया Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणानुसार कारखाने अधिनियम १९४८ मध्ये विविध सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत. या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहू शकते. कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे याऐवजी ६ तासापर्यंत ३० मिनिटे असा करण्यात आला आहे. आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासावरुन १२ तास करण्यात आला आहे. अतिकालिक कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही यावरुन १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात येणार आहे. अर्थात अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल, अशी कठोर तरतूद सुद्धा त्यात आहे. याचबरोबर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील. या सुधारणांनुसार दैनंदिन कामाचे तास ९ वरुन १० करणे, त्यास अनुसरुन विश्रांतीच्या सुट्टीच्या कालावधीत बदल करणे, तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यकालयोजन साडेदहा तासांवरून १२ तास करणे, अतिकालिक कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करणे इत्यादी सुधारणांस मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

gadchiroli police

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार

Gadchiroli Police : गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 नक्षलवादी ठार केले आहे. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांनी 4 नक्षलवादी ठार (01 पुरुष आणि 03 महिला) केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. सदर भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 04 जहाल माओवाद्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) मिळाळे आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे.

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार Read More »

nagpur gondiya access expressway

Maharashtra News: नागपूरकरांना दिलासा, नागपूर – गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग उभारणीस मान्यता

Maharashtra News: नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास आणि यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नागपूर ते गोंदिया सध्याच्या महामार्गाने पोहचण्यासाठी साधारणपणे ३ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गाच्या अंमलबजावणीद्वारे प्रवासाचे अंतर १५ कि.मी. ने कमी होऊन प्रवासाचा कालावधी सव्वा तासावर येणार आहे. हा महामार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण १० तालुके, ११५ गावांतून जात आहे. यामध्ये २६ उड्डाणपूल, प्राण्यांसाठी ८ अंडरपास, १५ मोठे व ६३ लहान पूल, ७१ कालवा क्रॉसिंग आदिंचा समावेश आहे. गवसी, पाचगाव, ठाना, रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहरी व सावरी अशा आठ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७०१ किमी लांबीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग गोंदियापर्यंत विस्तारण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाचा भाग असलेल्या नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रीत द्रुतगती महामार्गाच्या १६२.५७७ कि. मी.लांबीस यापुर्वीच २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर बाह्य वळण मार्गावरील गावसी मनापूर इंटरचेंज पासून लोधी तोळा (जि. गोंदिया) पर्यंत, नागपूर ते भंडारा ७२.५०० कि.मी., भंडारा ते गोंदिया ७२.६००, तिरोडा जोडरस्ता ३.७६५ कि.मी. आणि गोंदिया बाह्य वळण रस्ता १३.७१२ कि.मी. अशा एकूण १६२.५७७ कि.मी. लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही महामंडळामार्फत करण्यास मान्यता देण्यात असून त्यासाठी रु.३ हजार १६२.१८ कोटीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दुर्गम, मागास व आदिवासीबहुल भाग नागपूर-मुंबईशी जोडला जाणार आहे. यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊन त्या परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होऊन नवीन उद्योगास चालना मिळेल, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

Maharashtra News: नागपूरकरांना दिलासा, नागपूर – गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग उभारणीस मान्यता Read More »

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Maharashtra Government: तरुण-तरुणींसाठी इस्त्राईल देशात “गृह-आधारित आरोग्य सेवा कर्मचारी” म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार उमेदवारांना ही संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे. या नोकरीसाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कौशल्य आणि अनुभव असणे महत्त्वाचे आहे. यासाठी भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि किमान 990 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, नर्सिंग, फिजिओथेरपी, किंवा नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए (GDA), एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing), किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग (Post B.Sc. Nursing) याशिवाय, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. या नोकरीसाठी दरमहा 1 लाख 61 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. निवड प्रक्रिया आणि सुविधा इस्त्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठीची निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच पार पडेल. यासाठी नियुक्ती, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल. तसेच, इस्त्राईलमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय विमा, राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. या संधीबद्दल अधिक माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असेही पंतम यांनी सांगितले.

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

manoj jarange

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

img 20250814 wa0010

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल

Jalna Crime : जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतल. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद

Ahilyanagar News : मानवी हक्कांचा भंग करणारी धक्कादायक घटना अहिल्यानगरात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुरुडगाव परिसरात छापा टाकून तब्बल दोन वर्षांपासून कैदेत ठेवून गोठ्यात जबरदस्तीने काम करण्यास लावण्यात आलेल्या तीन वेठबिगारांची सुटका केली. या प्रकरणी जाकिश उर्फ बबड्या काळे (वय 35, रा. जयपूर) याला अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद आणि बळजबरीचे वास्तव तपासानुसार, अटक आरोपीने एक कामगार नागपूरहून तर दोन कामगार उत्तर प्रदेशहून आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना आपल्या घराशेजारील गायीच्या गोठ्यात कैद करून ठेवले होते. बाहेर जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती. कामगारांवर सतत लक्ष ठेवून, मारहाण करत व धमकावत त्यांच्याकडून गोठ्यातील कामे करवून घेतली जात होती. या काळात पीडितांना मोबदला न देता केवळ जेवणापुरतेच सोय करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खात्रीशीर माहितीवर छापा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना आरोपीकडे तीन जणांना बेकायदेशीररीत्या कैद करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. पथकाने बुरुडगाव परिसरातील आरोपीच्या घरावर छापा टाकून तिघांना सुरक्षितपणे मुक्त केले. पीडितांची ओळख सुटविण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी एक जण नागपूरचा आहे, तर उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, आरोपीने त्यांना वेठबिगार म्हणून आणले होते आणि दोन वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याशिवाय, जबरदस्तीने काम करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास सुरू या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम 370 (मानव व्यापार), 342 (बेकायदेशीर कैद), 323 (मारहाण), 506 (धमकी) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा सहकारी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पीडितांना पोलिस संरक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगार प्रथेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारचे प्रकरणे उघड करण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद Read More »