DNA मराठी

latest update

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन व वाहतूक कामी इलेक्ट्रिक घंटागाडीचे वाटप तसेच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समर्थ शेवाळे, राहुल शेळके, उमेदचे सोमनाथ जगताप, महिला आर्थिक विकास महामंडळाचे  संजय गर्जे तसेच महिला व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार विखे म्हणाले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे चांगले व्यवस्थापन देखील केले पाहिजे. यासाठी अहमदनगर महापालिकेच्या परिसरातील व नगर तालुक्यातील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती खासदार विखेंनी दिली. तसेच मागील ज्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या आपण वाटप केल्या होत्या, त्या नगर एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. नगरमधील युवकांना रोजगार मिळावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता आणि त्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या त्यांनी केवळ तीन लाख रुपयांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी ज्या गाड्या दिल्या जात आहेत त्या पाच लाख रुपये किमतीच्या असून उत्तम दर्जाच्या गाड्या या ग्रामपंचायतींना आज आपण प्रदान केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने या घंटागाडीचा कचरा गोळा करण्यासाठी वापर करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या अनुषंगाने या एका वर्षामध्ये महिला बचत गटांमध्ये सुमारे 185 कोटी रुपयांचे जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजनामध्ये महिला रोजगार निर्मिती करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून अशा विविध हितावह धोरणांचा अवलंब करून महिला सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत महायुती सरकार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असतील तोपर्यंत महिलांना व महिला बचत गटांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी आश्वासित केले. तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी 27 आणि 28 तारखेला नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महा रोजगार मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केले.

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News: नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. कारण शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता २० कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे शहरातील मुलभूत सोई सुविधा उभारण्यासाठी येणारी निधीची समस्या मार्गी लागली असून लवकरच शहरात विविध नागरी कामांना सुरवात केली जाईल असे खासदार विखे म्हणाले.  अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे.  सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा आत्मविश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सदर निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील Read More »

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी

Maratha Reservation : अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनमाड रोड बोल्हेगाव फाटा येथील अनिधीकृत बांधकाम, अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरूषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.  संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका हद्दीतील नगर – मनमाड हायवे लगत बोल्हेगाव फाटा येथे अजय बारस्कर याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून या अनधिकृत बांधकामाचा वापर त्याच्या व्यवसायसाठी गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे.   या बेकायदा व्यवसायातून त्याने मोठया प्रमाणावर पैसा गोळा केला आहे. तसेच नगर मनमाड हायवे व अंतर्गत बोल्हेगाव फाटा मुख्य रस्त्यामध्ये बेकायदा पत्र्याची शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने काढून वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण केलेला आहे. या ठिकाणी अनेक वेळा लहान, मोठे अपघात झालेले आहेत, सदर ठिकाणी या व्यक्तीने स्वतःचे अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदा पद्धतीने, कोणतीही पूर्व परवानगी न घेता महापुरुषांचे अर्धपुतळे उभारुण प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले आहे. यामुळे या व्यक्तीने केलेले अनिधकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे तसेच वाहतूकीस अडथळा करून उभारलेले पत्रा शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने इ. ची अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  याच बरोबर या निवेदनात अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदेशीर बसविलेल्या महापुरुषांचे पुतळे म.न.पा ने ताब्यात घेवून या बेकायदा कृती करण्याऱ्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीबरोबर येत्या आठ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी Read More »

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा

Health Tips : टायफाइडमध्ये लोकांना तापाबरोबरच डोकं दुखी, छातीत जळजळ सारख्या समस्यांना सामोरी जावं लागतं. यामुळे या लेखात जाणून घ्या कश्या प्रकारे सुटका मिळवता येईल. टायफाइडच्या तापाला मियादी ताप म्हणजे अधून -मधून येणारा ताप देखील म्हणतात. टायफाइडचा ताप पचन तंत्राच्या आणि रक्तप्रवाहातील असलेल्या साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरिया मुळे होतो हा घाणपाणी आणि संक्रमित खाण्यामुळे आपल्या शरीरात शिरकाव करतो.  या आजारात संक्रमित झालेल्या माणसाचं शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहोचतो. टायफाइड पासून मुक्त होण्याचे काही घरघुती उपचार. टायफाइडची लक्षणे  ताप येतो भूक लागत नाही डोकं दुखणं थंडी जाणवते जास्त अशक्तपणा जाणवणं अतिसाराची समस्यां छातीत जळजळ होणं बद्धकोष्ठता होणं टायफाइड पासून मुक्त होण्यासाठी काही घरघुती उपचार  तुळस  तुळस आणि सूर्यमुखीच्या रसला काढून प्यायलानं आपणास फायदा होणार. या व्यतिरिक्त एका भांड्यात पाणी आणि थोडी तुळशीचे पान टाकून उकळवून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा असेच पिऊन घ्या. सफरचंदाचा रस सफरचंदाचा रस टायफाइडच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. या साठी आपण सफरचंदाच्या रसात आल्याचं रस मिसळून प्या. असे केल्यानं आपल्याला टायफाइडच्या तापापासून आराम मिळेल. लसूण लसूण अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट असण्यासह उष्ण प्रकृतीचा आहे. यासाठी साजूक तुपात 6 -7 पाकळ्या लसणाच्या तळून घ्या. यामध्ये सेंधव मीठ घालून खावं. लवंग लवंग देखील या आजारापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहे. या साठी आठ कप पाण्यात 6 ते 7 लवंगा टाकून उकळवून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर याचे सेवन दिवसभर करावं. असे केल्यानं टायफाइड मुळे आलेला अशक्तपणा देखील कमी होणार. मध मधात अँटिव्हायरल, अँटीबॅक्टीया, अँटीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावं. या मुळे आपणास आराम मिळेल.

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा Read More »

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे

Sujay Vikhe News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवाल दिल झाले होते.  या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे.  या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास 50 हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने  कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे.  या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा  मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे,  हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार , धर्माजी आव्हाड आदी  उपस्थित होते. यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.  मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.  यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता अनेक जण केवळ फोटो काढण्या पुरते मागण्याचे निवेदन देतात. मात्र  विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केल्याचं खासदार विखे म्हणाले. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही  कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाची असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आम्ही प्रश्नांची मांडणी सरकारकडे केली आणि त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा आवर्जून खासदार सुजय विखे यांनी नमूद केले.  माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी  मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे Read More »

Ahmednagar News:  भिंगार येथे सकल मराठा  समाजाचे वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा

Ahmednagar News:  यावर्षी देखील भिंगार येथे सकल मराठा समाजाचे वतीने भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली.  या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा व तसेच उंट, घोडे,मावळे, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची रॅली विजय लाईन चौक ते वृंदावन मंगल कार्यालय पर्यंत काढण्यात आली होती येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होणार आहे यावेळी विविध मान्यवरांच्या सत्कार देखील करण्यात आले.  यावेळी राजेश काळे,संजय सपकाळ,संपत बेरड, शामराव वागस्कर,पंकज चव्हाण,गणेश सातकर, श्रीकांत शिरसागर, भूषण थोरात, अंकुश शिंदे, गणेश शिंदे, हर्षद काळे, अरुण चव्हाण, अमोल वागस्कर, कांता बोटे, अभिजीत सपकाळ, गणेश शिंदे,पंकज चव्हाण भूषण थोरात, मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्यावतीने लेझीम, जानपदक, ढोल पथक, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मात्र सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Ahmednagar News:  भिंगार येथे सकल मराठा  समाजाचे वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा Read More »

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली..

Sujay Vikhe :  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे अहमदनगर मार्केट कमिटीने शेतकरी आणि मार्केट कमिटीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते. नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.  यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्या कडून घेतली होती.   केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत 31 मार्च 2024 अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांग्लादेशातही 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली.. Read More »

Kamalnath In BJP : काँग्रेसला पुन्हा धक्का! कमलनाथसह ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?

Kamalnath In BJP : गेल्या काही दिवसांपासून देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के लागत आहे. अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहे. यातच आता आणखीन एक मोठा नेता पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी करत असल्याची माहिती समजली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यानंतर पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील काँग्रेस खासदार मनीष तिवारी भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मनीष तिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार ? अफवा सुरू असून तिवारी काँग्रेससोबतचे नाते संपवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे कमलनाथ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता असून, हा काँग्रेसला मोठा धक्का असेल. तथापि, मनीष तिवारी यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या भाजपशी संबंध असल्याबद्दलची अटकळ “मूर्खपणा” आहे कारण ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत.  काँग्रेसच्या एका सूत्राने सांगितले की, ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी काम करत आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अंदाज खोटा आणि निराधार आहे. कमलनाथही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या आवडत्या लोकसभा मतदारसंघ छिंदवाडाला भेट देऊन दिल्ली विमानतळावर पोहोचले. यापूर्वी, काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्याचे राज्य भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांच्या एका पोस्टने कमलनाथ भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवांना आणखी खतपाणी घातले होते. सलुजाने शनिवारी कमलनाथ यांचा मुलगा नकुलसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “जय श्री राम.” नकुलनाथ यांच्या बायोमधून काँग्रेस हा शब्द काढला याव्यतिरिक्त, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या बायोमधून ‘काँग्रेस’ हा शब्द काढून टाकला आहे. तथापि, असे असेल याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अनेक नेत्यांनी यापूर्वीच काँग्रेसला धक्का दिला  लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी काँग्रेस सोडल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल. त्याच वेळी, गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, मिलन देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी पक्ष सोडला.

Kamalnath In BJP : काँग्रेसला पुन्हा धक्का! कमलनाथसह ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश? Read More »

Sujay Vikhe News: 28 व 29 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा

Sujay Vikhe News : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.  हा मेळावा 28 व 29 फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान, अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यानुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.  “नमो महारोजगार मेळावा” संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे, उपायुक्त राणी ताटे, तहसिलदार कुंदन हिरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रविंद्र मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक इंद्रशाम काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, धुळे मनोजकुमार चकोर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. महसूल मंत्री श्री.विखे पाटील पुढे म्हणाले की, या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या “नमो महारोजगार” मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.  जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन, विविध औद्योगिक संस्था, नाशिक विभागातील सर्व विद्यापीठे यांचा देखील समावेश करण्यात यावा. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र तयार करावे. रोजगार मेळाव्याबाबत विविध माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी करावी व नोंदणीसाठी डिजीटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करणे व सदर लिंक जिल्हा परिषद, महानगरपालिका समाज कल्याण विभाग व इतर विभागाच्या पोर्टलवर लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी व आपल्या पोर्टलवरील नोंदणीकृत असलेले उमेदवार व उद्योजक/आस्थापना यांना मेळाव्यास सहभागी होणेसाठी प्रोत्साहित करावे असे, असेही श्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील रोजगार मेळव्याच्या तयारीबाबतची माहिती महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना सादर केली. यावेळी श्री.गमे यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्यात एकूण 200 पेक्षा अधिक आस्थापना सहभागी होणार असून 30 हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच प्राथमिक निवड मध्ये 15 हजार उमेदवारांची निवड होऊन 10 हजार उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी यांचेशी वेळोवेळी संपर्क साधून मेळव्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात येत असल्याचे, श्री. गमे यांनी सांगितले. महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय मेळाव्याच्या तयारीची माहिती दिली.

Sujay Vikhe News: 28 व 29 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा Read More »

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »