DNA मराठी

latest news

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी शरद पवार गट 32, शिवसेना ठाकरे गट 24 आणि काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असून ज्या ठिकाणी डबल एबी फॉर्म दिले गेले ते विथड्रवाल करणार येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये युतीची घोषणा झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमधून बाहेर होण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती मात्र जागावाटपावरून मतभेद झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे एमआयएम आणि मनसे देखील अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर Read More »

gmail

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा

Gmail Update: अनेकांना दिलासा देण्यासाठी आता गुगल एक मोठा नियम बदलण्याची तयारी करत आहे.कंपनी एक नवीन फीचर आणत आहे जे वापरकर्त्यांना त्यांचा @gmail.com ईमेल ॲड्रेस बदलण्याची परवानगी देईल. पहिल्यांदाच जीमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय आतापर्यंत, गुगलने फक्त थर्ड-पार्टी ईमेल ॲड्रेसने तयार केलेल्या खात्यांसाठी ईमेल बदलण्याची परवानगी दिली होती. जीमेल ॲड्रेस असलेल्या खात्यांमध्ये हे फीचर नव्हते, परंतु गुगल सपोर्ट पेज सूचित करते की कंपनी आता जीमेल वापरकर्त्यांना त्यांचा ईमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय देत आहे. जुने जीमेल एक उपनाम बनेल नवीन फीचर अंतर्गत, जेव्हा वापरकर्ता नवीन जीमेल ॲड्रेस निवडतो तेव्हा जुना पत्ता हटवला जाणार नाही. गुगल जुना जीमेल ॲड्रेस उपनाम म्हणून वापरेल. याचा अर्थ असा की वापरकर्ते जुन्या आणि नवीन दोन्ही ईमेल ॲड्रेससह गुगल सेवांमध्ये लॉग इन करू शकतील. इतकेच नाही तर जुन्या जीमेल ॲड्रेसवरील ईमेल पूर्वीप्रमाणेच प्राप्त होत राहतील. गुगलने स्पष्ट केले आहे की या बदलाचा फोटो, मेसेज, ईमेल आणि इतर डेटावर परिणाम होणार नाही. काही निर्बंध लागू होतील तर दुसरीकडे या वैशिष्ट्यासह काही मर्यादा देखील असणार आहे. गुगलच्या मते, ईमेल पत्ता बदलल्यानंतर, वापरकर्ते एका वर्षासाठी नवीन गुगल खाते तयार करू शकणार नाहीत. शिवाय, वापरकर्ता त्यांचा जीमेल पत्ता एकूण तीन वेळाच बदलू शकतो. सर्वांसाठी उपलब्ध नाही गुगलने असेही म्हटले आहे की हे वैशिष्ट्य अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी लाइव्ह नाही. ते हळूहळू आणले जात आहे, म्हणून काही वापरकर्त्यांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. सुरुवातीला, हा पर्याय मर्यादित संख्येच्या खात्यांवरच दिसेल. हा बदल का महत्त्वाचा? बऱ्याच वापरकर्त्यांनी वर्षांपूर्वी घाईघाईत किंवा तरुण वयात जीमेल आयडी तयार केले होते, जे आता व्यावसायिक किंवा वैयक्तिक गरजांसाठी योग्य वाटत नाही. म्हणूनच, गुगलच्या या हालचालीमुळे वापरकर्त्यांना नवीन खाते तयार न करता त्यांची डिजिटल ओळख सुधारण्याची संधी मिळेल.

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा Read More »

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल. यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »

dhananjay munde on manoj jarang

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Dhananjay Munde on Manoj Jarang : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा.. नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधीही जात पाहून राजकारण केलेले नाही. गेले 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. परळीत आंदोलन झालं, त्याला जागा देण्यासाठी मी जरांगेंना मदत केली. मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, असे मनोज जरांगेंना वाटते. मी 17 तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही. मराठा समाजाला खरंच ओबीसी की EWS मध्ये जाऊन फायदा आहे का? यावर उत्तर द्या असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा. आमची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरणाची चौकशी सरकारनं नाही तर, सीबीआयने करावी अशी देखील मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर Read More »

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आता पुण्यातील कायदे सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाळात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या यानंतर गणेश काळे वर कोयत्याने वार करण्यात आला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू Read More »

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »

devendra fadnavis

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग

Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »