DNA मराठी

DNA Marathi News

Ram Shinde 1024x683

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता

Ram Shinde : जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. २१.१३ लाख खर्च मंजूर असून, तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केला जाणार आहे. यामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होईल व पाणी साठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळेल. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर) येथे सुमारे रु. १२०९ कोटींचा बृहद विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात चौंडी परिसरातील ऐतिहासिक व पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे. ६ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत “श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यास” मंजुरी देण्यात आली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा शासन दरबारी मंजूर झाला. यामध्ये सिना नदी सुशोभीकरण, नदीपात्र स्वच्छता, शुद्धीकरण व दोन बुडीत बंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. विकास आराखड्याचा निधी तपशील :- चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन – रु. ६८१ कोटी ३२ लाख चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे – रु. ३६० कोटी सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे – रु. ५० कोटी एकूण – रु. १०९१ कोटी ३२ लाख या निर्णयाचे स्थानिक नागरिक, विविध समाजघटक व सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेशी अशी चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी होईल व सिना नदीवरील बुडीत बंधारे प्रकल्पामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”

Ram Shinde : सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता Read More »

landslide

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी

Mumbai Rain: शुक्रवार रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी 16 व 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी Read More »

rain alert

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी

Mumbai Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. 16 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज ( 16 ऑगस्ट) रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत. पर्जन्‍य जलवाहिनी यंत्रणा, मलनि:सारण व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. तथापि,महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी Read More »

manoj jarange

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

img 20250814 wa0010

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल

Jalna Crime : जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतल. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल Read More »

prakash ambedkar

Prakash Ambedkar यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र पण…

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 10 ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पत्राच्या 4 दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अ‍ॅड. आंबेडकर यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते.  परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी सांगितले की, यापूर्वी 16 जानेवारी 2025 रोजी त्यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खरगे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, जर राहुल गांधी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे “गुप्त” आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असे त्यांनी सुचवले आहे. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, “आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे.” अ‍ॅड. आंबेडकरांच्या या पत्रानंतर, कॉंग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Prakash Ambedkar यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र पण… Read More »

job

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत

Maharashtra Police: नोकरीच्या पदावर कायम राहताना, महाविद्यालयात जाऊन पूर्णवेळ (फुलटाईम) शिक्षण घेतल्याचे खोटे दाखले सादर करून पदोन्नती व वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने चांगलीच नजर रोखली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरलं झाला असून कर्मचाऱ्यांना थेट इशारा देणारा ठरला आहे. व्हायरल झालेला वाहतूक विभागाच्या परिपत्रका नुसार , चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध पदांवरील काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता मिळवताना नियम धाब्यावर बसवले. नियमानुसार, पूर्णवेळ शिक्षण घेण्यासाठी नोकरीवरून सुटी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी नोकरी करतानाच फुलटाईम पदवी घेतल्याचे दाखवून लाभ मिळवला. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, नियुक्ती प्रक्रियेनंतर घेतलेली पदवी नियमबाह्य पद्धतीने मिळवलेली असल्यास ती वैध मानली जाणार नाही. तसेच अशा शिक्षणावर आधारित पदोन्नती, वेतनवाढ किंवा अन्य लाभ तत्काळ रद्द केले जातील. अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आले आहे की, संशयास्पद प्रमाणपत्रांसह पदोन्नतीसाठी अर्ज आले तर त्यांची काटेकोर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. यामुळे बनावट शैक्षणिक दाखल्यांच्या बळावर गोडीगुलाबीने पदोन्नती मिळवणाऱ्यांचे दिवस आता मोजकेच उरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या हालचालीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, ‘कोणाच्या गळ्यात कारवाईची घंटा वाजणार?’ हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेत आहे.

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत Read More »

harshvardhan sapkal dna

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, वन नेशन वन लिडर संकल्पना आणून एकच नेता, एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता 15 ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे. कबुतरांसाठी लोढा-अदानींनी विशेष टॉवर बांधावे कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांचे पंख व विष्टेपासून फुप्फुसाचे गंभीर आजार होतात यात काहीजणांना जीवही गमवावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे, पण भाजपा सरकारने जाणीव पूर्वक कबुतर जिहाद सुरु केला आहे. सरकारने अदानीला अर्धी मुंबई देऊन टाकली आहे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले. भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही. NSUI च्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनात पार पडला. मावळते अध्यक्ष आमीर शेख यांनी अध्यक्षपदाची सुत्रे साळुंके यांच्या हाती दिली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी, माजी अध्यक्ष अमीर शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाच्या लेनी जाधव वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

Crime

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »