DNA मराठी

DNA Marathi News

Maharashtra Police

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली. सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल Read More »

mla kashinath date

Kashinath Date : ड्रग्स माफियांविरोधात आमदार दाते आक्रमक

Kashinath Date : पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी राज्याच्या अधिवेशनात पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय सभागृहात मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यात विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मॅफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीबाबत त्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती सभागृहात दिली. आमदार दाते यांनी विचारलेल्या प्रश्नात पुणे जिल्ह्यातील शिरूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व पारनेर परिसरात एमडी या अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे या प्रकरणात काही पोलिस कर्मचारीही सहभागी असल्याचे तपासातून समोर आले असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून शासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी शिरूर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीकडून १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा सुमारे २ कोटी १० लाख रुपये किमतीचा मॅफेड्रोन (एमडी) जप्त केला आहे. पुढील तपासात हा अंमली पदार्थ पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील व्यक्तीकडून विक्रीसाठी घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधितांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वी जप्त केलेल्या मुद्देमालातील अंमली पदार्थ काढून त्याऐवजी मैदा भरल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या या गुन्ह्यातील पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली आहे. सन २०२५ मध्ये राज्यात १३४०.४१ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ५२३.१७ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पारनेर नगर मतदारसंघासाठी बजेटच्या माध्यमातून ४१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे, जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नही विधानसभेत प्रभावीपणे मांडुन, विकासकामांसोबतच समाजातील तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचविण्याचा ठाम प्रयत्न सातत्याने करत आहे, तपासादरम्यान आणखी मोठा साठा उघडकीस आला असून पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे ९ किलो ६५५ ग्रॅम वजनाचा सुमारे १९ कोटी ३१ लाख रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सहभागही निष्पन्न झाला आहे अस आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

Kashinath Date : ड्रग्स माफियांविरोधात आमदार दाते आक्रमक Read More »

Jayant Patil

Jayant Patil : निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढले पण… जयंत पाटलांची राज्य सरकारवर सडकून टीका

Jayant Patil: सरकार सगळ्या निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढवते. पण वस्तूस्थिती काय तर यांचे मेन इंजिनच फेल होत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सरकार सगळ्या निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढवते. पण वस्तूस्थिती काय तर यांचे मेन इंजिनच फेल होत आहे. केंद्र सरकारने जे बजेट एस्टीमेट दिले होते, त्यात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आपल्या बजेटमध्ये देखील 20 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडून येणे अपेक्षित आहे. केंद्र शासनाने मागच्या वर्षी आणि यावर्षी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणत कपात केली आहे. यासाठी मी केंद्र शासनाचा नियतव्ययच घेउन आलो आहे. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देणार असे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितले होते, पण वस्तुस्थिती काय तर 2021 ते 2026 या कालावधीत मंजूर घरांपैकी फक्त 12.8% पूर्ण झाली आहेत आता केंद्र सरकारकडून पण या योजनेच्या निधी मध्ये मोठ्याप्रमाणात कपात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 3500 कोटी रु. अर्थसंकल्पिय तरतूद होती ती Revised Estimate मध्ये 300 तर ग्रामिणची 54,832 कोटी तरतूद 32500 कोटी केली आहे असं जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्राचे जलजीवन मिशनचे 2025-26 मध्ये 67 हजार कोटीचे बजेट एस्टीमेट होते आणि revised estimate 17 हजार कोटीचे केले आहे. म्हणजे डायरेक्ट 50 हजार कोटींची कपात आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 19 हजार कोटीवरुन 11 हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. आमच्या गुलाबराव पाटलांनी त्या दिवशी सभागृहातच कबूल केले की आम्ही काय केंद्र शासनावर अवलंबून नाही. गुलाबरावांना जे कळाले ते सरकारला पण लवकरच कळेल अशी आशा करतो असं म्हणतं त्यांनी राज्य सरकारला टोला लावला.

Jayant Patil : निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढले पण… जयंत पाटलांची राज्य सरकारवर सडकून टीका Read More »

ayatollah mojtaba khamenei

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणची कमांड आता अयातुल्ला मोज्तबा खमेनीकडे; इस्रायलवर डागले पहिले क्षेपणास्त्र

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र अयातुल्ला मोजतबा खमेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर लगेचच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ल्यांचा पहिला टप्पा सुरू केला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या सरकारी प्रसारक, IRIB ने घोषणा केली की अयातुल्ला सय्यद मोजतबा खमेनी यांच्या नेतृत्वाखाली व्यापलेल्या प्रदेशांवर क्षेपणास्त्रांचा पहिला टप्पा डागण्यात आला आहे. इस्रायलने जारी केलेली धमकी काही काळापूर्वी, इस्रायली सैन्याने X वर एक पर्शियन संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये असा इशारा देण्यात आला होता की अली खमेनी यांच्या कोणत्याही संभाव्य उत्तराधिकारीचा पाठलाग केला जाईल. इस्रायलने स्पष्टपणे सांगितले होते की, जो कोणी नवीन सर्वोच्च नेते बनण्याचा प्रयत्न करेल किंवा नियुक्ती प्रक्रियेत सहभागी असेल त्याला लक्ष्य केले जाईल. इराणची धार्मिक संस्था, तज्ज्ञांची सभा, पुढील सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार असताना हे विधान आले. अमेरिका युरेनियमवर विशेष कारवाईची योजना ? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणचे युरेनियम जप्त करण्यासाठी विशेष लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. तीन राजनयिक अधिकाऱ्यांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्स असे सूचित करतात की या योजनेअंतर्गत, अमेरिका इराणमध्ये जमिनीवर विशेष सैन्य तैनात करू शकते, ज्यांचे प्राथमिक उद्दिष्ट बॉम्ब-ग्रेड समृद्ध युरेनियमवर नियंत्रण मिळवणे असेल. तीन सदस्यीय समितीने कमांड स्वीकारली अयातुल्ला अली खमेनी यांनी ३७ वर्षे इराणवर राज्य केले आणि २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यात ते मारले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर, एका आठवड्यासाठीही कोणताही नवीन नेता निवडला गेला नाही, ज्यामुळे तीन सदस्यीय समितीने देशाची सूत्रे हाती घेतली. या विलंबामुळे काही इराणी गटांमध्ये असंतोष वाढत आहे.

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणची कमांड आता अयातुल्ला मोज्तबा खमेनीकडे; इस्रायलवर डागले पहिले क्षेपणास्त्र Read More »

team india

IND vs NZ: भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’! फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव

IND vs NZ : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताने टी 20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 255 धावांचा मोठा आकडा उभारला. प्रत्युत्तरादाखल, किवीज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. अभिषेक आणि संजूची आक्रमक फलंदाजी भारतीय सलामीवीरांनी किवी कर्णधार मिशेल सँटनरचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले. अभिषेक शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला आणि केवळ 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 21 चेंडूत 52 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या जाण्यानंतर, संजू सॅमसनने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारत संघाची जबाबदारी घेतली. पॉवरप्लेच्या सहा षटकांत भारताने एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या होत्या. सॅमसन आणि किशनची स्फोटक कामगिरी संजू सॅमसनने स्पर्धेत आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि सलग तिसरा अर्धशतक झळकावला. त्याने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि अखेर 89 धावा केल्या. त्याला इशान किशनने 23 चेंडूत 54 धावा केल्या. कर्णधार सूर्या नाबाद राहिला आणि हार्दिकने 18 धावा केल्या, तरी शिवम दुबेने अखेर फक्त आठ चेंडूत 26 धावा करून संघाचा धावसंख्या 255 पर्यंत नेली. तर दुसरीकडे 256 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. संघाने तिसऱ्या षटकात त्यांची पहिली विकेट गमावली. सलामीवीर फिल अॅलन फक्त नऊ धावा करू शकला, तर रचिन रवींद्र फक्त एका धावेवर बाद झाला. ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन देखील दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये किवी संघावर इतका दबाव आणला की ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. सेफर्टने 26 चेंडूत 52 धावांची खेळी किवी संघाकडून टिम सेफर्टने 26 चेंडूत 52 धावांची जलद खेळी केली, परंतु दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणतीही साथ मिळाली नाही. जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने किवी फलंदाजीला धक्का दिला. बुमराहने एकूण चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही उत्कृष्ट कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या. किवी संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि 19 षटकांत पूर्णपणे बाद झाला. भारताचे ऐतिहासिक वर्चस्व संपूर्ण किवी संघ 19 षटकांत फक्त 159 धावांतच गुंडाळला गेला. या विजयासह, भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.

IND vs NZ: भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’! फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव Read More »

eknath shinde

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

Eknath Shinde : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दारुण पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला ९६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. या विजयानंतर आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले?

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं झालेल्या अपघाती निधनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना भेटणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि इतर नेत्यांना भेटणार. अजित पवार यांचा घातपातच झाला असे आमचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे 2023 ला डावोसला जाताना विमान पाण्यात आले असते, त्यावेळी अपघात झाला असता, याच व्हिएसआर कंपनीचे विमान होते, इराण इराक ने हे वाटले असते तर विमान पाडले असते. दादांच्या अपघातबाबत कायम लढत राहणार DGCA चे सस्टेटमेंट सीआयडीकडे आले नाही असे म्हणत आहेसीआयडी बाबत काही पद्धत चुकीची पद्धत आहे. मराठी अधिकाऱ्याला अजित पवार यांच्या विमान अपघात तपास द्यावा, बिहार मध्ये सुशांत सिंग प्रकरणात तपासात अधिकारी बदलल्यानंतर लगेच तपास झाला होता, व्हि के सिंग बोलू नये यासाठी माहिती होते, व्हि के सिंग प्लॅनिंग सांगू शकतो,त्याला वाचवले जाते. अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पंतप्रधान यांना जाऊन परवा भेटणार असल्याची माहिती आहे. असं रोहित पवार म्हणाले. माध्यमांशी बोलताना पुढे रोहित पवार म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी झाली पाहिजे त्याचा तपास केला जाईल. सगळ्याची वेगवेगळी स्टाईल असेल, काकी आणि पार्थ पदामुळे बोलत नाही, जय राजकरणात नसल्यामुळे बोलत आहे. आम्ही सत्तेत असतो आम्ही सत्तेला लाथ मारली असती असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले? Read More »

harshvardhan sapkal dna

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र २०४७ ची कल्पना व १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षात भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यावरील कर्ज व कर्जाची हमी मिळून १२ लाख कोटींच्या आसपास बोजा आहे. कर्जाच्या हप्त्यापोटी ६५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे व प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात प्रचंड तफावत आहे. गेल्या अर्थससंकल्पात अनुसुचित जातींच्या योजनांसाठी २२ हजार ६५८ कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात ६ हजार २०० कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या योजनांवर अर्थसंकल्पात मोठ मोठे आकडे जाहीर केले जातात पण प्रत्यक्षात ते खर्च केले जात नाहीत. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यासमोर सर्वात मोठे संकट बेरोजगारीचे असताना अर्थसंल्पात केवळ ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या मेगा भरतीचा भाजपा सरकारचा इतिहास पाहता ही सुद्धा एक फसवी घोषणाच वाटते. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे सांगितले असले तरी २१०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा फसवणूक केली आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फडणवीस सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाखो शेतकरी आजही कर्जमाफीच्या लाभापासून वंचितच आहेत, हे पाहता आजच्या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरु नये. लबाडाचे आवताण जेवल्याशिवाय खरे नाही असे या सरकारचे वागणे आहे. शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केलेल्या आहेत पण अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारापुढे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याचीच भिती जास्त आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अर्थसंकल्पातील घोषणा पुरेशा नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही राज्याचे सिंचन क्षेत्र ५६ लाख हेक्टरवरून कमी होऊन ३९ लाख हेक्टरपर्यंत आले आहे. सिंचनासोबतच पेरणीयोग्य क्षेत्रातही घट झाली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर हे अदानी व अंबानी यांच्या हितासाठी आहे, यातून सामान्य जनतेला काही फायदा होणार नाही. सरकारचे सौरउर्जा धोरणही फसवे आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर दिलासा नाही तर प्रति युनिट २६ पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. स्मार्टमीटरमुळे अगोदरच वीजबिलात प्रचंड वाढ झालेली आहे. दावोसमधून २०२२ ते २०२५ पर्यंत ५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा करण्यात आला पण आर्थिक पाहणी अहवालानुसार तर राज्यात फक्त ६ लाख कोटी रुपयांचीच गुंतवणूक आलेली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले Read More »

Vijay Wadettiwar 1

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका

Vijay Wadettiwar: विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता, यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी टोला लगावला. या अर्थसंकल्पातील मुख्य त्रुटींवर बोट ठेवताना विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि MMR क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही, अस वडेट्टीवार म्हणाले. २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, पण आज हे कर्ज वाढले आहे.हे सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना वडेट्टीवार म्हणाले, तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare :   अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा अर्थसंकल्प – सुनिल तटकरे

Sunil Tatkare :  यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. बळीराजाला कर्जमाफी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, सामाजिक लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प, उद्योग आणि रोजगारासह जागतिक शिक्षणांच्या संधी देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे अजितदादांच्या महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा दृढ संकल्प आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. देशात विविध क्षेत्रात अव्वलस्थानी असणाऱ्या महाराष्ट्राला जगाच्या स्पर्धेत आधुनिक आणि विकसित महाराष्ट्र म्हणून ओळख देणारा अर्थसंकल्प म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याकडे पाहतो आहे. २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डाॅलर करण्याचा निर्धार आणि आत्मविश्वास या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आला आहे ही महाराष्ट्राच्या जमेची बाजू आहे. सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अजितदादांच्या अनुपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. पण, अजितदादांच्या संकल्पनेतील आणि करड्या आर्थिक शिस्तीसह महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दृष्टीकोनाची छाप या अर्थसंकल्पात उमटली असल्याचे समाधान आहे. या अर्थसंकल्पाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनिल तटकरे यांनी धन्यवाद दिले आहेत.

Sunil Tatkare :   अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा अर्थसंकल्प – सुनिल तटकरे Read More »