DNA मराठी

Ashok Kharat

ashok kharat

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र

Ashok Kharat Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. ३ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करीत आहे. तसेच ३ गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलीस करीत आहेत. २ गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास SIT चे मार्फतीने करणेबाबत आदेश केल्यामुळे २० मार्च पासून या व इतर १०, अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास SIT करीत आहे. या विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून २ पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून ३ पोलीस निरीक्षक, ३ सहा. पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक व ६ पोलीस अंमलदार असे एकूण २४ पोलिसांचे पथक कार्यरत आहे. SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे. तसेच अशोक खरात याने साक्षीदारांविरूद्ध खोटा खंडणीचा १ गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याने फिर्यादीवर दबाव टाकून साक्षीदाराविरूद्ध १ गुन्हा दाखल केला होता, असे २ गुन्हे आहेत. उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास संबंधीत घटक करत आहेत. अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व ८ गुन्हे व फसवणुकीचा १ गुन्हा SIT तपास करीत आहे. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे व पीडितांकडे केलेल्या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती व कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रूद्राक्ष, पुजा, विधी आदी माध्यमातून त्यांचेकडून पैसे उकळत होता, तसेच महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये, हात चलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत होता, याबाबत आरोपी विरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक पुरावा असे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्या अनुशंगाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. महिलांशी संबंधीत गुन्ह्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषोरापपत्र दाखल करणे आवश्यक असते. अशोक खरात विरोधात लैंगीक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला. त्या नंतर आठवडा भरात इतर सात गुन्हे दाखल आहेत. आज रोजी एकुण लैंगिक अत्याचारांचे गुन्ह्यांपैकी अशोक खरात विरोधातील एकूण २ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरीत गुन्ह्यांचे देखील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येतील. SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडीओच्या १३ हजार १७५ लिंक्स SIT च्या सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने SIT ने काढून टाकल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारे ४५१ अकाऊंट देखील कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहेत. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी आतापर्यंत २ गुन्हे दाखल केले गेले आहेत. गुन्हयातील आरोपी अशोककुमार एकनाथ खरात हा एकूण ४९ दिवस वेगवेगळ्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाचे कस्टडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. सध्या तो इतर ठिकाणच्या गुन्ह्यात अटक आहे. आज पावेतो दाखल गुन्हयांचे तपासामध्ये प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असले तरीही वरील गुन्ह्यांचा तपास पुढे सुरूच राहणार असुन अधिकचे पुरावे प्राप्त होताच ते न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रासह दाखल करण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर एकच महिन्यात पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल केले आहे. यात बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर एक महिन्यात राज्यात एकून 15 गुन्हे दाखल झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषता यात महिलांचे शारीरिक शोषण, आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड रंजना गवांदे , सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून केले आहे. “खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे यावे, असे आवाहन अंनिस करत आहे “ -संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस गेल्या एक महिन्यातील दाखल गुन्हे: 1) अशोक कुमार खरात , नाशिक 2) गडगेबाबा ( राजेंद्र गडगे) , संगमनेर , अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी ( मूर्तिजापूर, अकोला ) 4) पंकज देवराम घोलप, (येडगांव, पुणे ) 5) मनोहर मामा भोसले, (कुरुडवाडी , सोलापूर ) 6)नाना बर्डे , (आळे फाटा , पुणे ) 7) ऋषिकेश वैद्य ( वसई .मुंबई ) 8) अल्ताफ रईस खान ( मालाड, मुंबई) 9) रिधम पांचाळ ( मालाड, मुंबई ) 10) गणेश शिंदे ( श्रीरामपुर, अहिल्यानगर ) 11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई 12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13)किसन तळपे मंदोशी, खेड 14 ) महेशगिरी ( महेश काकडे) निफाड,नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या राज्याचे माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही Read More »

img 20260410 wa0013

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

Ashok Kharat: पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे संतप्त झालेल्या खरातने त्या वेळेपासूनच खेमनर यांच्याविरोधात वैयक्तिक आकस ठेवला असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खरात याने आपल्या काही हस्तकांच्या माध्यमातून पत्रकार खेमनर यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचे प्रकारही केल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारामुळे खेमनर यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला.या सततच्या छळाला कंटाळून अखेर पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ची परवानगी घेतल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांविरोधात पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे तसेच अब्रूनुकसानी संदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.या घटनेमुळे पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी कायदेशीर संरक्षण किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दबावाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल Read More »

ashok kharat

Ashok Kharat: वादात असलेली ‘ती’ जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

Ashok Kharat: भोंदू अशोक खरात याच्या विरोधात उघड होत असलेल्या विविध प्रकरणांनी आता गंभीर वळण घेतले आहे. महिलांचे शोषण, आर्थिक फसवणूक, तसेच सावकारकीसारखे अनेक गुन्हे आधीच त्याच्यावर दाखल झालेले असताना, आता जमीन व्यवहारातील नवे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगमनेर शहरालगत अकोले बायपास शेजारी आणि गुंजाळवाडी हद्दीत असलेल्या सर्व्हे नंबर १३५/१६७ मधील सुमारे १७ गुंठे जागा अशोक खरात याने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ही जमीन मणियार यांची असल्याचे सांगितले जात असून ती सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांना विकण्यात आल्याचे समजते. या व्यवहारात सुनील नावाच्या व्यक्तीने एजंट म्हणून भूमिका बजावल्याचेही उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित जमिनीवर आधीपासूनच वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही खरात याने ही जमीन खरेदी केल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे हा व्यवहार जाणूनबुजून केला गेला का, याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुंड नावाच्या व्यक्तीने या जमिनीवर दावा करत मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी या ठिकाणी अशी कोणतीही जमीन अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जमीन अस्तित्व, मालकी हक्क आणि व्यवहाराची वैधता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप जोडला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे गुन्ह्यांची मालिका आणि दुसरीकडे वादग्रस्त जमीन व्यवहार — अशा दुहेरी संकटात सापडलेल्या अशोक खरात याच्याभोवतीचे वर्तुळ अधिकच घट्ट होत चालले आहे. येणाऱ्या काळात या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही कधीही अशोक खरात याला पाहिलं नाही.. त्याला आम्ही ओळखत नाही. एका मध्यस्तीने व्यवहार केला. खरात आणि त्याची मुलगी स्वतः खरेदीला आले होते. गुंजाळवाडी शिवारात जागा आहे. ७० लाखांचा तो व्यवहार झाला आहे. – सतिश मणियार, जागा मालक मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात संगमनेरमध्ये जागा असल्याचे म्हटले होते त्यावर मी शोध घेतला असता सर्व्हे नं १३५ हा खूप मोठा परिसर असून ९ ते १० किलोमीटरचा परिसर आहे. वडिलोपार्जित जागा असताना देखील तिथे अशोक खरात याने त्याची मुलगी सृष्टी हिच्या नावावर मणियार यांच्याकडून १७ गुंठे जागा विकत घेतल्याचे समजले. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की, अशी कोणतीही जागा याठिकाणी उपलब्ध नसताना देखील हे खरेदी झाली कशी तसेच ज्याने कोणी मध्यस्थी केली असेल किंवा ज्याने खरेदी करून दिली याची चौकशी करावी. – संगीता पुंड, छावा संघटना

Ashok Kharat: वादात असलेली ‘ती’ जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: CA ललित पोफळेला वाचवण्याचा प्रयत्न?

Ashok Kharat Case: नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत असल्याने हा प्रकरण आता राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर येत आहे.पुण्यातील हाय प्रोफाइल सीए ललित पोफळे खरात प्रकरणातील खरा मास्टर माईंड असल्याची चर्चा आता पुढं येऊ लागलीय. सीए सलित पोफळे खरातच्या शिवनिका ट्रस्टचा ट्रस्टी होता. त्यामुळे या प्रकरणात त्याची देखील चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे खरात प्रकरणात ललित पोफळे हा मास्टर माईंड असल्याची चर्चा आहे. खरातचे अर्थिक व्यवहार पोफळेच्याच माध्यमातुन झाल्याचा आरोप होतोय. पोफळेच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. यातुन खरातचे अर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणे आवश्यक आहे. खरातची प्रगती होत असताना इकडे पोफळेची ही प्रगती झाल्याचं दिसतंय. कोरेगाव पार्क मधील कोट्यावधी रुपये किमत असलेला हा ललित पोफळेचा बंगला त्याची साक्ष देतोय. एव्हढ संगळं दिसत असताना आणि पोफळेवर संशयाची मुख्य सुई असताना देखील एसआयटी ने मात्र पोफळेला चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाही. हे विशेष. उलट पोफळेची तक्रार घेऊन खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु असल्याची सूत्राची माहीती आहे. त्यासाठी काल म्हणजेच 30 मार्चला पोफळे नाशिकला गेला होता. त्याने खरातच्या विरोधात फसवणुकीची तक्रार देखील दिली असल्याची माहीती पुढे आली आहे. म्हणजेच पोफळेची चौकशी करण्याऐवजी त्याला फिर्यादी बनवुन वावचले जात आहे का असा सशंय निर्माण होतो आहे.

Ashok Kharat Case: CA ललित पोफळेला वाचवण्याचा प्रयत्न? Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Ashok Kharat:  … तर खरात परदेशात पळून जाणार होता; CM फडणवीसांचा मोठा खुलासा

Devendra Fadnavis on Ashok Kharat: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा करत अशोक खरात विदेशाला पळून जाण्याची तयारी करत होता असा खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले, आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तो पळून गेला असता, तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलन्स जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना १० मार्च २०२६ रोजी सादर केला व एअर अथॉरिटीने तत्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली. वावी पोलिस स्टेशन व शिर्डी पोलिस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, वावी व शिर्डी येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी १३ मार्च २०२८ विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना विशेष पोलिस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. महिलेच्या तक्रारीने फुटले खरातचे बिंग मुख्यमंत्री म्हणाले, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशन तक्रार दिली की, अशोक खरात याने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र, तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलावून, तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन, गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन, तिला संमोहित करून, तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन, तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून, तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला. अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे ७३/२०२६ बीएनएस कलम ६४-१ ७४ ३५१ २ महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम ३ (१) व (२) प्रमाणे दाखल करून, आरोपी अशोक खरात यास दिनांक १७ मार्च २०२६ रोजी २३ वाजून ५९ मिनिटांनी तत्काळ अटक करण्यात आली.

Devendra Fadnavis on Ashok Kharat:  … तर खरात परदेशात पळून जाणार होता; CM फडणवीसांचा मोठा खुलासा Read More »

ashok kharat

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातमुळे महिलांचे शोषण; मंत्री, अधिकारी यांना सहआरोपी करा

Ashok Kharat : पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला भोंदूगिरीचा बाजार आणि त्याला मिळणारे राजकीय व प्रशासकीय संरक्षण ही राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याने धर्माच्या नावाखाली मांडलेला हैदोस आणि त्याला साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी व मंत्री यांना या प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगनच्या माध्यमातून केली. स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशोक खरातचे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. अशा भोंदू बाबांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जात आहे. या बाबाने महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. या खरात वर कारवाई होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी बैठक घेत होते, ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. महसूल आणि पोलिस अधिकारी देखील खरातची अटक होऊ नये प्रयत्न करत होते. त्यामुळे या प्रकरणात केवळ भोंदू बाबाच नाही, तर त्याला आश्रय देणारे IAS, IPS आणि महसूल विभागाचे अधिकारी सामील आहेत. हे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, मात्र प्रत्यक्षात भोंदू बाबांच्या पाया पडताना दिसतात. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात अनेक महिलांची फसवणूक झाली आहे,असे वडेट्टीवर विधानसभेत म्हणाले. केवळ SIT नेमून हे प्रकरण शांत होणार नाही, तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा आणि अधिकाऱ्यांचे निलंबन होणे आवश्यक आहे. संबंधित सर्व आरोपींचे आणि संशयित अधिकाऱ्यांचे CDR तपासावे. ज्या मंत्र्यांनी आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी या भोंदू बाबाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांना सहआरोपी करावे,अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगनच्या माध्यमातून विधानसभेत केली.

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातमुळे महिलांचे शोषण; मंत्री, अधिकारी यांना सहआरोपी करा Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Ashok Kharat : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो.  ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा ‘गीतारहस्य’ सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब ‘तीर्थ’ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.  महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.  हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.  या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं.  गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.  पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.  राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : चाकणकर यांचा राजीनामा झाला पण अनेक मोठ्या माशांवर कारवाई नाही

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे असं काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची बसलेल्या रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देणे अपेक्षित होते पण त्यांनीच एका भोंदू बाबाचे मानसिक गुलामगिरी पत्करली ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्योतिष आणि अनिष्ट प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती महिलांना काय न्याय देणार?त्यांचा राजीनामा हा केवळ दिखावा नसून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असं वडेट्टीवार नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. लिंगपिसाट खरात याच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘नवरत्नांचा’ आणि मंत्र्यांचा CDR तपासला पाहिजे. खरातकडे असलेली अफाट संपत्ती आणि त्याला मंत्र्यांनी दिलेला राजाश्रय पाहता, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. पोलिसांवर दबाव टाकून मोठे मासे वाचवण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केला. एकीकडे खरातसारख्या व्यक्तीचे पाय धुतले जात आहे, तर दुसरीकडे कीर्तनकारांकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्माच्या नावाखाली सुरू असलेला हा अधर्म थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. अरविंद शिंदे या काँग्रेसच्या नेत्यांनी चाकणकर प्रकरणी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे पक्षाची नाही असं ही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सातारा येथील निवडणुकीत बहुमत असतानाही शंभूराजे देसाई पालकमंत्री असताना त्यांच्याच सहकाऱ्यांना पळवून नेण्यात आले.यात मंत्री जखमी झाले. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जात आहे आणि ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन कोणत्या दिशेने जात आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. मित्र पक्षातील मंत्री निधीवरून नाराज आहेत आणि एकमेकांची जिरवण्याच्या नादात जनतेचे नुकसान महायुती सरकार करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : चाकणकर यांचा राजीनामा झाला पण अनेक मोठ्या माशांवर कारवाई नाही Read More »