DNA मराठी

ahmednagar news

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट

Amit Shah: राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत.  मागील आठवड्यातच खा.सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. तर गुरुवारी पुन्हा खा.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली असून ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.  तसेच यावेळी शहा यांनी विखे पितापुत्रां सोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा  यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर,नाशिक,पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत यावर चर्चा झाली. यावेळी अमितभाई शाह यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल, यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शाह यांनी मंत्री विखे आणि खा.विखे यांना आश्वासीत केले आहे. दरम्यान या भेटी वेळी शहा यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.  विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या चुळबुळी सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.  अशात खा.सुजय विखेंच्या  पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शहांसोबत सातत्याने भेटी होत असून आज गुरुवारी खा.विखेंच्या सोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहा यांची भेट घेत कांदा प्रश्नासह राज्यातील विविध विषयांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट Read More »

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा

Maharashtra News: दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे. नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी येथे विविध खेळांचे मैदानी व इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण आज दर्जेदार होत आहे. याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड देखील दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात १०० व यावर्षी २०० डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  यासोबतच विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतामध्ये त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आणि सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण काय विकासरुपी कायापालट करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा Read More »

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड

Maharashtra News : अहमदनगरमध्ये  स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर यांच्या मार्फत दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी  जिल्हास्तरीय स्पर्धेतून १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.   दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्पेशल ओलंपिक भारत  राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा ही नागपूर येथिल “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” येथे पार पडल्या असून या  राज्यस्तरीय स्पर्धेत ०४ सुवर्ण, ०५ रोप्य व २ रजत असे एकून ११ पदकांची कमाई केली.  त्यामध्ये वयोगट २२ ते २९  चि. बाबू यांनी ५० मी. व २५  मी फ्रीस्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात, प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदकांची कमाई केली.  चि.जयसिंग यादव यांनी वयोगट २२ ते २९ मध्ये २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. चि. दिपक पावरा याने १९  ते २१ या वयोगटात १००  मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळविले. तसेच त्याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची कमाई केली. चि. वैभव जाधव यांनी २२ ते २९ या वयोगटात २०० मी. धावणे या  क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाची कमाई केली.  चि. कृष्णा याने १६ ते १८ या वयोगटात १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकांची कमाई केली. चि. दिपेंद्र ढमाले याने २२ ते २९ या वयोगटातील २५ मी. फ्रीस्टाईल जलतरण या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. कुमारी मादुरे महंडुळे हिने २२ ते २९ या वयोगटातील १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची मानकरी ठरली.  चि. अजय काकडे याने २२ ते २९ या वयोगटातील २०० मी. धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. चि. रज्जाक गोच्चू याने १६ ते २१ या वयोगटात २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकाचा मान मिळवला. कुमारी प्रेरणा भाटिया हिने १०० मी. धावणे स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून सहभाग नोंदवला.  या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, स्विमिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धा होत्या. या स्पर्धेत एकूण ३६ जिल्ह्यांतील एकूण ६००   विद्यार्थ्यांनी व १५० प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.  या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे बक्षीस वितरण करण्यासाठी  डॉ. सौ. मेधा सोमय्या (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र), मा. श्री. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर), मा. श्री. भगवान तलवारे (क्षेत्र संचालक महाराष्ट्र), मा. श्री. जितेंद्र ढोले (क्रीडा संचालक SOB), मा. श्री. उदय गोजमगुंडे (संचालक) आदि मान्यवर उपस्थित होते.     अहमदनगर येथील सर्व विजेत्या खेळाडूंचे दक्षिण अहमदनगरचे खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील, तसेच मा. श्री. राधाकिसन देवढे  (समाज कल्याण अधिकारी अहमदनगर)     सौ. धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर) व मा. श्री. डॉ. अभिजीत दिवटे (उपाध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर), यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.   मार्गदर्शन करणारे मा. श्री. डॉ. दिपक अनाप, मा. श्री. डॉ. अभिजीत मेरेकर, व मा. श्री. डॉ. किरण आहेर यांनीदेखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  तसेच या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या स्पर्धक खेळाडूंना त्यांचे  क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री संदीप राहणे सर, श्री हर्षल वाणी, श्री. अमोल चौधरी,  श्री शिरसाट सर, श्री. दत्तात्रेय कोलते सर, सौ. सुशीला जाधव मॅडम इ. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही खेळाडूंचे  अभिनंदन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड Read More »

Ahmednagar News: न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रीया पूर्ण करा:-ना. विखे पाटील

Ahmednagar News:  राहूरी येथील कृषी विद्यापीठासाठी संपादीत केलेल्या जमिनीमुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई मंत्रालय दालनात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासवेत विशेष बैठक बोलावत त्यांनी भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनांचे पालन करून भरती प्रकिया ठराविक कालावधीत पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.  मंगळवारी राहुरी कृषी विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीतील उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या भरती बाबत बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी  कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अनुप कुमार, कृषी परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भांगडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत राहुरी येथील प्रकल्पाच्या भरतीच्या बाबत सखोल चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यात यावा अशा सुचना महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. मदत व पुनर्वसन, कृषी आणि महसूल विभागाने तत्परतेने ठराविक कालावधीमध्ये भरती प्रक्रिया राबवून ही भरती पूर्ण करावी असे विखे पाटील म्हणाले.  प्रकल्पग्रस्तांना आपली सहानभुती असून ह्या प्रकरणी शासनाकडून कोणतीही दिरंगाई न करता, कमीत कमी वेळेत ही भरती पूर्ण करावी असे कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी सांगितले. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

Ahmednagar News: न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रीया पूर्ण करा:-ना. विखे पाटील Read More »

Ahmednagar News:  नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर..

Ahmednagar News: केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुक्यासाठी १७ कोटी व नगर तालुक्यासाठी २३ कोटी तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केले की, हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आहे. या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील भरीव निधी मंजूर झाला असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि माझ्या प्रयत्नांतून ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून काष्टी – खरातवाडी – पेडगावर रस्ता प्रजिमा – ६४ (गौते वस्ती-पेडगाव) आणि चिंबळा – वांगदरी – काष्टी – शिपळकरवाडी कौठा प्रजिमा – ०३ ते अजनुज खरातवाडी रस्ता प्रजिमा – २३७ (वांगदरी-काष्टी) या रस्त्यांचे काम होणार आहे.  तसेच नगर तालुक्यातील रस्ते विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि माझ्या प्रयत्नांतून २३ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीपैकी निंबळक – चास – खंडाळा – वाळुंज – नारायणडोह – पिंपळगाव उज्जैनी – पोखर्डी रस्ता प्रजिमा – १ (कापूरवाडी-पोखर्डी) साठी १५ कोटी रुपये तर टाकळी काझी – भातोडी ते बीड रस्ता प्ररामा – १६ (टाकळी काझी -भातोडी -मदडगाव हद्द) करिता ०८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या कामांना देखील झळाळी मिळाली आहे.  यासोबतच पारनेर तालुक्यातील रस्ते विकासासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माझ्या प्रयत्नांतून १७ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीतून रामा ६९ ते वडनेर हवेली – राळेगण सिद्धी रोड प्रजिमा – २१८ रस्ता (वडनेर हवेली ते गटेवाडी) करिता १० कोटी रुपये तर राहाता – लोहारे – मांडवे – पारनेर – श्रीगोंदा रस्ता रामा – ६७ (कुंभारवाडी -सोबळेवाडी, पारनेर, पानोली -राळेगण सिद्धी) साठी ०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांचे काम देखील मार्गी लागणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. या रस्त्यांना गती मिळाल्याने निश्चितच जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जनतेच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू असे मत देखील यावेळी खासदार विखेंनी व्यक्त केले.

Ahmednagar News:  नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर.. Read More »

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावताळे कुरुडगाव ( भिमवाडी ) येथे सोमवार दि. १२ रोजी भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभाग अंतर्गत तालुक्यातील श्रद्धावान उपासक, उपासिका, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य यांच्या सहकार्याने महिला उपासिका शिबिर आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावताळे कुरुडगाव ग्राम शाखेचे अध्यक्ष सुधाकर निळ होते.  बैठकीमध्ये शिबिराच्या आयोजन संबंधी सविस्तर चर्चा झाली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अरुण भोंगळे यांनी शिबिरासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महासचिव बाळासाहेब गजभिव, बौद्धाचार्य तथा जिल्हा संघटक विजय हुसळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी बाळासाहेब नीळ, सिद्धार्थ सोनवणे, रवींद्र निळ, माजी श्रामनेर विनोद घाडगे, माजी श्रामनेर निवृत्ती नीळ, आजिनाथ निळ, रोहिदास निळ, प्रतीक नीळ, अलका निळ, आकांक्षा नीळ, वंदना नीळ इत्यादी श्रद्धावान उपासक-उपासिका या बैठकीसाठी उपस्थित होते.  तसेच येणाऱ्या दि. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी परवानगी व केंद्रीय शिक्षिकेच्या मागणीचे पत्र जिल्हा शाखेकडे पाठविण्यात आले तसेच या शिबिराचा शेवगाव तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक अरुण भोंगळे यांनी केले आहे.

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे Read More »

Sujay Vikhe News: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: स्वयंरोजगारातून व आर्थिक दृष्टीकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग व स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले. पालकमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कनगर (ता.राहुरी) येथील आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्राथमिक स्वरूपात महिला बचत गटांना धनादेश, स्टॉल तसेच फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात करण्यात आले.  महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास व जलसंधारण विभाग नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रतिभा लोकसंचित साधन केंद्र व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राहुरी अंतर्गत आणि ग्रामीण स्वंयरोजगार निर्मिती अंतर्गत स्वंयरोजगार विक्रीकेंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजार बँक, गटातील महिलांना बँक कर्ज वितरण सोहळा खासदार डॉ. सुजयविखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झाला. दीड दोन वर्षांपूर्वी आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रामाणिक आणि नैतिकतेने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कामाचा सपाटा सुरू केला आहे.  आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून 500 बचत गटांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम आज जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत व सदरील उपक्रमांच्या अंतर्गत विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामे देखील चालू आहेत. यातून अनेक रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते असे मत सुजय विखेंनी यावेळी मांडले. या अगोदर अनेक पालकमंत्री झाले, पण नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पहिले असे पालकमंत्री आहेत की ज्यांच्या प्रयत्नांनी डीपीडीसीच्या माध्यमातून पैशाचा वापर महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना रोजगार मिळवण्यासाठी करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सुमारे 500 गटातील महिलांना दहा लाख रुपयांचे साहित्य वाटप होत आहे. ही वाटचाल अशीच सुरू राहील आणि पुढील पाच वर्षात संधी भेटल्यास महिलांना अनेक रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली.  तसेच महिलांना कांदा ड्रायर उपलब्ध करून देणार व सडका कांदा घरपोच देऊन त्याचे प्रोसिजर करून तोच कांदा आपण परत घेऊ. अशा पद्धतीने प्रत्येक बचत गटातील महिलांना महिना दहा ते बारा हजार रुपये कमाई चालू होईल असे देखील मत त्यांनी मांडले. यासोबतच निळवंडेच्या पाण्यापासून गावांच्या रस्त्यापर्यंत दिलेल्या शब्द देखील आम्ही पूर्ण केला असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.

Sujay Vikhe News: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News: कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 20,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल चालु असुन कत्तलीकरीता काही गौवंशीय जनावरे आणल्याची माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून दराडे यांनी रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी, अंमलदार यांना नमुद ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पोलिसांनी 02.15 च्या सुमारास छापा टाकुन कारवाई केली. पोलीसांनी पंचासमक्ष तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुन 20,55,000 रु किं.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.  या प्रकरणात पोलिसांनी 1) अरबाज खलील शेख, वय 23 वर्षे, रा. कोठला, अहमदनगर, 2) फैजल अस्लम शेख, वय 20 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर, 3) सलीम शब्बीर कुरेशी, 4) फैजान अब्दुल कुरेशी, रा. झेंडीगेट, अहमदनगर यांचेविरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.कलम 269, महा. प्राणी रक्षा अधि सन 1995 चे सुधारीत सन 2015 चे कलम 5 (अ), 5 (क ), 9, 9(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास पोना/ए पी इनामदार हे करीत आहेत.

Ahmednagar News: कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल Read More »

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा

Maratha Reservation: गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सूरू केला आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.  यासाठी आज संघटनेकडून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.   या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.  सर्व सामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उ‌द्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे.

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा Read More »

Ahmednagar News: पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, तयार होणार टंचाई नियोजनाचा आराखडा : विखे पाटील

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश जिह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.  जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित  करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे आ.श्रीमती मोनिकताई राजळे, आमदार श्री. लहू कानडे, आमदार श्री. प्राजक्त तनपुरे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  पालकमंत्र्यांनी येणाऱ्या टंचाई काळात जिल्ह्यातील पाणीसाठा, जनावरांचा चारा, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सुचना आणि तक्रारी ऐकुन घेत त्यांचे निसरन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा इतर अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने टंचाई निवारण आराखडा करण्यासाठी सांगितले.  पालकमंत्र्यांनी सांगितले की, टंचाई काळात पाण्याचे नियोजन नीट करण्यात यावे तसेच पाण्याचा अपव्यय  टाळावा, शहर तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना आखाव्यात, ज्या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्या ठिकाणी तातडीने टॅंकरने पाणी पुरवठा वाढवावा, तसेच ग्रामीण भागात जिथे टॅंकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही त्या ठिकाणी बैलगाड्यांच्या सहाय्याने  पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी.  प्रभावीत गावात पाण्यासाठी पाणी संचय टाक्या उभारण्यात याव्यात. नवीन पाणी पुरवठा योजना राबविताना कार्यरत असलेला पुरवठा प्रभावित होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहू नये, त्यासाठी शहरी तथा ग्रामीण भागातील पाणी साठ्याची पाहणी करून त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी नियोजन करावे असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.  टंचाई निवारण संदर्भात आवश्यक असेलल्या सर्व शासकीय परवानग्या, निविदा प्रक्रिया तातडीने पुर्ण करून टंचाई निवारण आराखडा पुर्ण करावा त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे मागणी करावी. या सर्व प्रक्रिया तातडीने पार पाडून नागिराकंना दिलासा द्यावा असे पालकमंत्री म्हणाले.  या बैठकीत जिल्ह्यात जनावरांसाठी चारा आणि पाणी कमी पडणार नाही यांनी याची सुद्धा काळजी प्रशासनाने घ्यावी. त्याच बरोबर सततचा पाऊस, गारपिठ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सुद्धा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. बैठकीत उपस्थित असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भोसपुरी 16 गावांच्या पाणी पुरवठा योजना पार्थर्डी, शेवगाव येथील पाणी पुरवठ्याच्या बाबत प्रश्न उपस्थित करून तातडीने या गावातील पाण्याची समस्या मार्गी लावण्याची सूचना बैठकीत केली.

Ahmednagar News: पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, तयार होणार टंचाई नियोजनाचा आराखडा : विखे पाटील Read More »