DNA मराठी

Ahilyanagar

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Ahilyanagar News : प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली. या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील १४ तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण २०२१ वाहनांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्या ४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या ६ लाख ४६ हजार रुपये दंडापैकी ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. “जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश

Nilesh Lanke: केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

ahilyanagar events

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

Ahilyanagar Events :   कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ व कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन व थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. महोत्सवात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कृषी यांत्रिकीकरण व निविष्ठांचे सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यात जामखेडची ज्वारी, अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ, हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू, कडधान्य, फळे व भाजीपाला यांसह विविध कृषी प्रक्रिया पदार्थांची विक्री व प्रदर्शन करण्यात येईल. कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेता महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपाययोजना व काटेकोर शेती याविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल असणार आहेत. यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसह विविध पारंपरिक गावरान खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येईल. या महोत्सवाच्या कालावधीत आयोजित कृषी परिषदेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित अधिकारी व विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित केली असून त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी या जिल्हा कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation: महापौर निवडीसाठी नाशिकसह, धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला निवडणूक

Ahilyanagar Municipal Corporation : नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तर मालेगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धुळे महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांच्या प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींचे पालन करुन सभेचे कामकाज पार पाडावे तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: महापौर निवडीसाठी नाशिकसह, धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला निवडणूक Read More »

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच? जलसंपदा–मृद व जलसंधारण प्रकरणात कारवाईला टाळाटाळ

Devendra Fadnavis: राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कायद्याच्या चौकटीत कार्यरत आहे की सत्तेच्या आणि पैशाच्या दबावाखाली, असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून पदोन्नती देण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. या प्रकरणाकडे लक्ष वेधत नागपूरचे आमदार संदीपची दिवाकरराव जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, “उशिराने विकल्प सादर केलेल्या अधिकाऱ्यांचे समावेशन” असा चुकीचा उल्लेख करून, यापूर्वी समावेशनास नकार देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट मार्गाने मृद व जलसंधारण विभागात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमदार जोशी यांच्या मते, आठ अधिकाऱ्यांचे समावेशन नियमबाह्य असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे, तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. या संदर्भात, उपविभागीय जलसंधारण अधिकारी या संवर्गासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आवश्यक असताना, श्री. सिद्धेश्वर खंडप्पा कंजारे (BE यांत्रिकी, M.Tech – मटेरियल) यांना या पदावर नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून ३० जून २०२१ रोजी पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सेवाप्रवेश नियमांमध्ये जाणीवपूर्वक “स्थापत्य अभियांत्रिकी” या अर्हतेचा उल्लेख टाळण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या अधिकृत नोंदीत आठ अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागातील समावेश नियमबाह्य असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. जलसंपदा विभागाची पूर्वपरवानगी न घेता हा समावेश करण्यात आल्याचे मान्य असतानाही, अद्याप कोणतीही चौकशी, निलंबन किंवा जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, आमदार जोशी यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पुढील प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात हे आदेश अंमलात आले नसल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कक्ष अधिकारी श. हा. खरोडे हे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे. नियमबाह्य समावेश व पदोन्नतीसाठी मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू असली, तरी शासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. या प्रकाराचा थेट फटका मृद व जलसंधारण विभागातील मूळ अधिकाऱ्यांना बसत असून, नियमबाह्य समावेशामुळे त्यांच्या हक्काच्या पदोन्नती संधी हिरावल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विभागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई होणार का, की हे प्रकरणही नेहमीप्रमाणे फाईल आणि शेर्‍यांपुरतेच मर्यादित राहणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच? जलसंपदा–मृद व जलसंधारण प्रकरणात कारवाईला टाळाटाळ Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूमिसंपादनाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. या रेल्वे मार्गासाठी तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, आदी गावांतील अत्यंत सुपीक शेतीजमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील बहुतांश शेतजमीन नदीकाठालगत असून कालव्यांद्वारे नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या जमिनींवर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते. रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमिसंपादनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचवून भूमिसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला, ज्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार Read More »

fb img 1768476069352

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांचा स्फोट

Ahilyanagar Municipal Corporation Elections: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात लोकशाहीवर थेट घाला घालणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संशयित इसमांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ३ चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय येथील केंद्रावर काही व्यक्तींकडे बनावट आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्रे आढळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले की, संबंधित इसमांना तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. सध्या पोलिसांमार्फत या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांचा स्फोट Read More »

fraud

Shrirampur Crime : श्रीरामपूर पोलिसांची ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर कारवाई ; जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका

Shrirampur Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ या कंपनीमार्फत अल्पवधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. कारवाईचा तपशील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर (ता. श्रीरामपूर) येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत संदिपराज मोहिणीबाई कपाटे (रा. हनुमानवाडी, भोकर शिवार) याच्या घरातून लोकांकडून पैसे स्वीकारल्याबाबतची कागदपत्रे, पासबुक, चेकबुक, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीकडे ठेवी स्वीकारण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळून आलेला नाही. नागरिकांना आवाहन सदरच्या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीमध्ये ज्या नागरिकांनी जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवले असतील, त्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुलभ होण्यासाठी त्वरित श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा असे आवाहन श्रीरामपूर पोलिसांनी केले आहे.

Shrirampur Crime : श्रीरामपूर पोलिसांची ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर कारवाई ; जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका Read More »

mpsc exam

MPSC Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 4 जानेवारी रोजी पूर्व परीक्षा‌; जिल्ह्यातील 45 उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश

MPSC Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५’ दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील ४५ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार २९५ उमेदवार बसणार आहेत. या कामकाजासाठी ११ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, २ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथकातील अधिकारी, ४५ उपकेंद्रप्रमुख (वर्ग-१ अधिकारी), १३४ पर्यवेक्षक, ५८४ समवेक्षक, समन्वय अधिकारी व भरारी पथकांचे १३ सहायक, १३५ लिपीक, ४५ केअरटेकर, ४५ बेलमन, १७९ शिपाई, १३३ पाणी वाटप कर्मचारी व ५६ वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना बंदी परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणणे व परीक्षा केंद्र परिसरात बाळगणे निषिद्ध आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घ्यावीत; दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जाणार नाहीत. तसेच, परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व एस.टी.डी. बुथ, फॅक्स व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

MPSC Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 4 जानेवारी रोजी पूर्व परीक्षा‌; जिल्ह्यातील 45 उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश Read More »