DNA मराठी

Ahilyanagar Update

img 20260330 wa0005

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता, एक व्यक्ती घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून १० गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटार मशीन तसेच पाच लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत आरोपी हा साद अन्वर खान (रा. मुकुंदनगर, सध्या फरार) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणताही परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांची धोकादायक पद्धतीने साठवणूक करून स्वतःचे व नागरिकांचे जीवित धोक्यात घालून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत Read More »

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »

shevgaon

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Shevgaon News: भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा बोधेगाव (ता. शेवगांव) येथील पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदाराची तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय 34) यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच 11 ते 15 टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 24.75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar : मोठी बातमी; श्रीरामपूर हादरले, बंटी जहागीरदारवर भरदिवसा गोळीबार

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबाळ झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बंटी जहागिरदार यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून बंटी जहागीरदार यांना 3 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज (30 डिसेंबर) दुपारी एका अंत्यविधीतून परत येत असताना त्यांच्यावर शहरातील जर्मन हॉस्पीटल समोर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत दोन्ही आरोपी फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांना उपचारासाठी शहरातील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आता पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगरमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिस आरोपींचा शोध घेत असून सोशल मीडियावर आरोपींचे फोटो व्हायरल झाले आहे.

Bunty Jahagirdar : मोठी बातमी; श्रीरामपूर हादरले, बंटी जहागीरदारवर भरदिवसा गोळीबार Read More »

cold wave

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून, अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला असून, जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ​नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना उबदार कपड्यांचा वापर : हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे तसेच शाल, चादर यांसारख्या उबदार कपड्यांचा पुरेसा वापर करावा. आहार व आरोग्य : शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पेय आणि पौष्टिक आहार घ्यावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. प्रवास व निवारा : थंडीची लाट असताना शक्यतो घरातच राहावे. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. घर आणि परिसर उबदार राहील याची दक्षता घ्यावी. ​लहान मुले व वृद्धांची काळजी : घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ​वैद्यकीय सल्ला : थंडीत दीर्घकाळ राहिल्याने त्वचा निस्तेज किंवा बधीर होत असल्यास, तसेच शरीराचा थरकाप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे (Hypothermia) लक्षण असू शकते पशुधनाची काळजी : नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना थंड वाऱ्यापासून वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. ​आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा ‘108’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही Read More »

img 20250830 wa0006

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!”

Sawedi Land Scam : ” सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले चौकशी करा, जिल्हाधिकारी यांच्याकडेही चौकशी सुरू असताना अप्पर तहसीलदार यांनी मात्र निबंधकार्यालयाला पत्र देऊन टाकले, याचा अर्थ पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही मोठे पद अप्पर तहसीलदारांचे आहे का? अहिल्यानगर – शहरातील सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणाने महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुनावणी प्रलंबित असताना व्यवहार थांबवण्याचे आदेश सह निबंधकांनी दिले होते. मात्र, आश्चर्यकारक घडामोडीत याच प्रकरणात अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात उलट पत्र काढत व्यवहार सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनाही जे जमले नाही, ते अप्पर तहसीलदारांनी करून दाखवल्याने या प्रकरणामागे ” ₹” प्रभाव आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहेत. मौजे सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या प्रकरणाने जिल्हा प्रशासन आणि महसूल खात्याच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तक्रारदार रमाकांत सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले. कायद्याने सुनावणी सुरू असताना संबंधित जमिनीवर कुठलेही व्यवहार होऊ नयेत, असा नियम असतानाही व्यवहार रोखण्याऐवजी वेगळ्याच दिशेने हालचाली झाल्याने प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांविषयी संशय गडद होत आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सुरुवातीला याबाबतचा अहवाल अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांच्याकडे मागवला. त्यांनी तो सावेडी सर्कल अधिकाऱ्यांकडे पाठवून, वारस व इतर भागधारकांना नोटिसा बजावल्या. यानंतर सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर यांनी सुनावणी संपेपर्यंत कोणताही खरेदी-विक्री व्यवहार नोंदवू नये, असे स्पष्ट पत्र जारी केले. कायद्याच्या दृष्टीने ही भूमिका योग्य ठरत होती. मात्र, या पत्रामुळे नाराज झालेल्या पारसमल मश्रीमल शहा यांच्या वतीने गणेश शिवराम पाचर्णे यांनी उलट मागणी पुढे केली. अप्पर तहसीलदारांनीच अहवाल तयार करावा, असा आग्रह धरला. यानंतर प्रांत अधिकारी स्तरावर हा अहवाल पोहोचण्यास जाणीवपूर्वक 15 ते 20 दिवस उशीर लावण्यात आला, त्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. याच दरम्यान पाचर्णे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली. पालकमंत्र्यांनी खुलासा मागवला, मात्र त्यावर कुठलीही सुनावणी झाली नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे, 14 ऑगस्ट रोजी पाचर्णे यांनी अप्पर तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांनी उपनिबंधकांना पत्र पाठवले. या पत्रात महसूल विभागाला खरेदी-विक्री थांबविण्याचा अधिकार नाही, तो फक्त दिवाणी न्यायालयाचा आहे, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे या पत्राचा अर्थ असा निघतो की यावर खरेदी विक्री करण्यास कुठलाही अडचण महसूल ची नाही असे स्पष्ट होते, यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली की, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना जे जमले नाही ते अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात कसे केले? सामान्य माणसाला साध्या पत्रासाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागतात, पण सावेडीच्या या वादग्रस्त जमिनीवर मात्र एका दिवसात अर्ज, त्यावर निर्णय आणि आदेशही निघाला. हा वेग “…₹….” (गाळलेली जागा तुम्ही भरा) च्या जोरावर आला की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. सावेडी सर्कल अधिकाऱ्यांनी दिलेले पहिले पत्र कायदेशीरदृष्ट्या अधिक भक्कम होते. कारण सुनावणी सुरू असताना कोणताही व्यवहार न होणे, हा कायद्याचा गाभा आहे. मात्र, अप्पर तहसीलदारांच्या तातडीच्या हालचालींनी संबंधित आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका लोकांमध्ये वाढली आहे. प्रश्न असे की पालकमंत्री यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी किंवा निर्णय नाही? जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी प्रलंबित असताना अप्पर तहसीलदारांनी एवढ्या घाईने आदेश का दिला? एखाद्या सामान्य अर्जदाराला महिनोनिमहिनो दार ठोठावावे लागते, मग या प्रकरणात एका दिवसात आदेश का? सुनावणी असतानाही व्यवहार मोकळे ठेवण्याचा निर्णय कसल्या आधारे घेतला गेला? या घडामोडीमुळे महसूल विभागाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लक्ष्मीचा प्रभाव अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेवर मात करतोय का, असा संशय नागरिकांमध्ये बळावतो आहे. एकंदरीत, सावेडीतील जमीन वाद हा केवळ मालकीचा प्रश्न नसून ‘लक्ष्मी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत’ या गंभीर शंकेने ग्रासलेला आहे.

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!” Read More »

Sawedi land Scam सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

Sawedi land Scam : अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे. सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय? आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते. यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो.. कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.

Sawedi land Scam सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात! Read More »

“सावेडी जमीन घोटाळा : साक्षीदार म्हणतात ‘मी तो नव्हे’; प्रशासनाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह”

land Scam Sawedi : अहिल्यानगरच्या सावेडी भागातील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाच्या जमिनीची नोंदणी तब्बल 35 वर्षांनंतर अचानक होते आणि त्यानंतर उडते धूळधाण. या संशयास्पद नोंदणीमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. खरी धक्का देणारी बाब म्हणजे जमिनीच्या खरेदीखतावर असलेले साक्षीदार कारण ज्यांची नावं या दस्तावर आहेत, तेच पुढे येऊन सांगत आहेत की “आम्ही त्या व्यवहाराचे साक्षीदार नाहीच.” हा प्रकार केवळ खाजगी व्यक्तींमधील जमीन व्यवहाराचा प्रश्न राहिलेला नाही. ही बाब थेट प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर आणि यंत्रणेच्या पारदर्शकतेवर बोट ठेवणारी ठरते. एकीकडे डिजिटल सातबारा, ऑनलाईन फेरफार अशा गोंडस घोषणांचा गजर होत असताना, दुसरीकडे तब्बल तीन दशके झोपलेल्या नोंदी एकाएकी कोणाच्या वरदहस्ताने जाग्या होतात, हेच समजत नाही. या प्रकरणातील साक्षीदारांच्या नकारामुळे संपूर्ण दस्ताऐवजाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामध्ये केवळ नोंदणी कार्यालयच नव्हे, तर महसूल यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. कोणत्याही खरेदीखताची वैधता साक्षीदारांवरही ठरते. मग हे साक्षीदार न सांगता, न बोलता नोंदीत कसे सामील झाले? आज सावेडी प्रकरण हा एका मोठ्या व्यवस्थात्मक अपयशाचा आरसा बनला आहे. भूमाफियांना जमीन बळकावण्याचे असे प्रकार म्हणजे सामान्य जनतेच्या हक्कांवर थेट गदा आहे. प्रश्न असा आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग आणि महसूल प्रशासन आता तरी या प्रकरणात कठोर आणि पारदर्शक कारवाई करणार का? शहरातील नागरिक आणि मूळ हक्कधारक आज एकाच प्रश्नाने व्यथित आहेत “भूमाफियांचे हे जाळे कधी फाटेल?” आणि “अशा बनावट साक्षींवर आधारलेल्या नोंदी रद्द होतील का?” आता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि पुढील कृतीच यंत्रणेच्या निष्ठेची खरी कसोटी ठरणार आहे. अन्यथा सावेडी प्रकरण आणखी एका फाईलमध्ये धूळ खात पडून राहील आणि भूमाफियांचे बस्तान अधिकच घट्ट होईल.

“सावेडी जमीन घोटाळा : साक्षीदार म्हणतात ‘मी तो नव्हे’; प्रशासनाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह” Read More »

Ahilyanagar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ जून ते ११ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!”

Ahilyanagar News: नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाच्या मुरूम संबंधित कामात तलाठी व अप्पर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून अक्षरशः एक लाख रुपयांचा ‘हंटर’ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार इतका संगनमताने पार पडला की सर्कलला बायपास करून तलाठी आणि ‘कडक’ साहेबांनीच आपापसात वाटणी केली. सदर व्यावसायिकाने मुरूम वाहतुकीसाठी शासकीय पावती भरून अधिकृत मुरूम उचललेला असतानाही, नव्याने आलेल्या अप्पर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या दरम्यान, “35 ते 40 लाखांचा दंड होईल,” असा धाक दाखवून तलाठी साहेबांनी तो व्यावसायिक थेट गाऱ्हाणीच्या स्थितीत आणला. यानंतर प्रकरण एका लाखात मिटवण्यात आलं. यातील काही हिस्सा खिलाडी साहेबांचा तर काहीसा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्टपणे एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. “साहेब फार कडक आहेत, मी तुमचं काम करून देतो… कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील!” अशा सज्जड दमासह ही रक्कम स्वीकारण्यात आली. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – हे सर्व ‘पंचनामा’ करून अधिकृतपणे मांडल्याचा देखावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात पैसे ‘खाल्ले’ गेले. रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं – “फर्स्ट पणे साहेबांसाठी एक लाख द्या… लवकर द्या…” कारवाई होणार का? हा प्रकार उघडकीस येताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “निव्वळ दमदाटी करून भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल तयार केले आहे काय?” असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!” Read More »