DNA मराठी

Ahilyanagar news

img 20251120 wa0007

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी

Vikhe Patil – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची वाटचाल सांगताना काही नावे अनिवार्यपणे उच्चारावी लागतात. त्यांमध्ये सर्वात प्रखर ठसा उमटवलेले नाव म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. सहकार म्हणजे केवळ आर्थिक संघटना नव्हे, तो ग्रामीण समाजाचा विकासमार्ग आहे, ही भूमिका ज्या व्यक्तींनी आपल्या कामाने सिद्ध केली त्यापैकी अग्रगण्य व्यक्तिमत्त्व हेच. आज, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव मिळाला आहे, तेव्हा हा प्रवास केवळ एका घराण्याचा नाही. तर महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व, सहकार आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या सातत्याचा दस्तऐवज ठरतो. पहिली पायाभरणी- विठ्ठलराव विखे पाटील यांचे राष्ट्रपतींकडून झालेले पहिले गौरव 1950 च्या दशकात भारत स्वराज्याच्या पहिल्या श्वासांसोबत पुढे जात असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अस्थिर होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मध्यस्थांची पकड होती, कर्जपुरवठ्याची व्यवस्था बळकट नव्हती. त्याच काळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपच बदलले. हे केवळ एका उद्योगाची कथा नव्हती ही होती शेतकऱ्याला उद्योगाचा ‘हिस्सेदार’ बनवण्याची नवचेतना. त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पद्मश्री देऊन गौरवताना सहकार चळवळीच्या मूलभूत मूल्यांना मान्यता दिली. आजही हा पुरस्कार केवळ सन्मान नसून भारतीय सहकाराच्या क्रांतिकारी युगाची सुरुवात मानला जातो. नवी वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रीय योगदान सहकाराच्या घराण्यात जन्मलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारण, शिक्षण आणि सहकार या त्रिसूत्रीला वेगळा आयाम दिला. सहकार क्षेत्राचा विस्तार, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांची प्रमुख कामगिरी. 2010 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दिलेला पद्मभूषण हा पुरस्कार राज्य आणि केंद्राच्या धोरणनिर्मितीत त्यांच्या प्रभावी योगदानाची दखल होता. हेही लक्षात घ्यावे लागेल की बाळासाहेब विखे यांचे कार्य केवळ सहकारपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रामीण समाजातील सामाजिक भान आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा एक नमुना म्हणून ते राष्ट्रीय नेतृत्वात स्वीकारले गेले. समकालीन परंपरा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलव्यवस्थापन आजच्या महाराष्ट्रात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. हवामानबदल, वाढती मागणी, सिंचनातील असमानता आणि जलसंपत्तीचे अव्यवस्थापन यांमधून मार्ग शोधताना परिणामकारक प्रशासन, वैज्ञानिक धोरणे आणि जलसाक्षरता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. 2024 मध्ये केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेला “बेस्ट स्टेट कॅटेगरी” राष्ट्रीय पुरस्कार हा या व्यापक बदलांचा सरकारी शिक्का आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा पुरस्कार व्यक्तीगत कामगिरीचा नसून संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरावा आहे, आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वातील धोरणात्मक स्थिरतेचे प्रतीकही. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या — महाराष्ट्राची सहकार परंपरा जगाच्या नकाशावर एका घराण्याच्या तीन पिढ्यांना राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणे, हे अपवादात्मक आहे. पण या सन्मानांमागे घराणेशाही नसून सातत्यपूर्ण समाजकार्य, सहकार विचारांची परंपरा आणि ग्रामीण विकासाचे अधिष्ठान आहे. डॉ. विठ्ठलराव – सहकाराची क्रांती बाळासाहेब – सहकार + शिक्षण + राजकीय नेतृत्व राधाकृष्ण – आधुनिक प्रशासन, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित धोरण ही परंपरा एका घराण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजशास्त्राचा आराखडा ठरते. विखे पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या हे सिद्ध करतात की विकास हा योगायोग नसतो तो दृष्टिकोन, कष्ट आणि मूल्ये यांची सलग परंपरा असते. आज जेव्हा महाराष्ट्र जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान मिळवतो, तेव्हा या परंपरेची बाजू अजूनही मजबूत असल्याचे दिसते. राजकीय मतभेद असोत वा सहकारातील नवनवे आव्हान महाराष्ट्राची ग्रामीण परिवर्तनाची गाथा लिहिताना विखे पाटील कुटुंबाचा उल्लेख अपरिहार्य राहणार आहे. सन्मान ही केवळ मानाची पाऊलवाट नाही तर ग्रामीण भागाचा आत्मविश्वास वाढवणारी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी, हीच आजच्या संपादकीयाची मुळ भूमिका.

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी Read More »

fb img 1763353276214

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण

Ahilyanagar News: चार वर्षे चालत आलेल्या शेतरस्त्याच्या वादाला शेवटी तोडगा निघाला. महसूल विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांच्या समन्वयातून समुपदेशनाच्या माध्यमातून मार्ग काढत रस्ता खुला करण्यात आला. तहसीलदारांच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असतानाच मंडळाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने फेरपालटाने जमिनींची अचूक माहिती समोर आली, त्यातून वादी–प्रतिवादींमध्ये सामंजस्य घडून आले. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने झाडी-झुडपे हटवण्याचा निर्णय घेतला आणि फक्त चार तासांत रस्ता खुला झाला. महसूल अधिकाऱ्यांनीही या सकारात्मक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. एकजुटीने काम केल्यास कोणतेही आव्हान सोपे होते, याचे उत्तम उदाहरण. चर्चेत सहभागी असणारे भाऊसाहेब मतकर, विक्रम मतकर, नारायण मतकर, सुरेश मतकर, राजेश मतकर, वसंत मतकर, रेवजी कराळे, कमलाकर जाधव, संदीप जाधव, म्हातारदेव जाधव, आदिनाथ जाधव, हरिश्चंद्र मतकर, रमेश मतकर, जैनोद्दीन शेख, मन्सूर शेख, पोपटराव कराळे (संचालक, खरेदी-विक्री संघ) आदी

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण Read More »

auto

Ahilyanagar News : ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करा

Ahilyanagar News : राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी सभासद म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे. मंडळामार्फत चालकांना जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण योजना आदी विविध लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार आणि पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करून आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. कार्यालयाकडून पडताळणी केल्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जाईल. अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदाराला मोबाईलवर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबत संदेश प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर आपली नोंदणी स्थिती तपासूनच पुढील प्रक्रिया करावी. सभासद नोंदणी शुल्क ₹५०० आणि वार्षिक सभासद शुल्क ₹३०० अशी एकूण ₹८०० रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाले आहात” असा संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही कळविण्यात आले आहे.

Ahilyanagar News : ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करा Read More »

img 20251105 wa0026

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने ५ नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकाचे नेतृत्व भारत सरकारच्या सहसचिव आर. के. पांडे यांनी केले. त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, तसेच गृह मंत्रालयाचे आशिष गौर, उपस्थित होते. पथकासोबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते. पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसाचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकाने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शेतकरी बबनराव दानवे यांच्या संत्रा फळबागेची व पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी पथकाने भविष्यात अशा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर पथकाने देवराई येथील बंधारे व पारेवाडी येथील पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत पथकाने आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सोमठाणे खुर्द येथील शेतकरी मोहन शिदोरे यांच्या शेतातील तूर व बाजरी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून पथकाने संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या तातडीच्या मदतीची माहितीही जाणून घेतली. केंद्रीय पथकाने संपूर्ण पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

scientific balloon flying from hyderabad

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

Ahilyanagar News :  हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील. या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर , बीड, नांदेड, धाराशिव , परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर  या जिल्ह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. त्या पॅकेजवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास माहिती नष्ट होऊ शकते. संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई देणार आहे. या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना Read More »

farmers

Farmers Relief Fund : साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Farmers Relief Fund : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावसह जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो घरांची पडझड झाली होती. तर आता नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांना एकूण ₹८८०२३.६६ लाख रुपये (म्हणजेच सुमारे ₹८८०.२३ कोटी) भरपाई मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया दिली. तसेच बँकांनी ही भरपाई रक्कम कर्ज किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बँकांना दिला आहे. ५.७६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ तालुक्यांतील १,३११ गावांवर अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभं आहे. भरपाई वाटप प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही असं देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात घरांची पडझड (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर): एकूण – ५,६९७ घरे 🔹 पाथर्डी – १,०२० 🔹 शेवगाव – ९२१ 🔹 जामखेड – ९०६ 🔹 नगर – ५२२ 🔹 नेवासा – ५६५ 🔹 राहुरी – ३९६ 🔹 संगमनेर – २२७ 🔹 राहाता – २०३ (इतर तालुके : अकोले, कर्जत, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर) जनावरे व कुक्कुटधन हानी : 🔸 १,०५९ जनावरे दगावली 🔸 १३,८७९ कोंबड्या मृत 🔸 आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

Farmers Relief Fund : साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय Read More »

doctor

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News : कोरोना काळात रुग्णाच्या मर्जीविरुद्ध उपचार करून घेतल्याचा, अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा स्फोटक आरोप शहरातील पाच नामांकित डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणं दिसल्याने त्यांना न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने अॅडमिट करण्यात आलं, आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आली, आणि जाणूनबुजून जास्त प्रमाणात औषधं देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारण्यात आलं, असा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे. परंतु सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. “कोरोना काळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला याबाबत काहीच माहिती दिली नाही. आम्ही वारंवार संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.” संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून, वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणामुळे रुग्णांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांकडून आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत आहे.

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल Read More »

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »

img 20251009 wa0004

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता

Manoj Jarang : गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नगर जिल्ह्यात मागच्या 2024 वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी 11 गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत. त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलिसांद्वारे सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प व श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर कोतवाली, शेवगाव व श्रीरामपूर पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, मागे घेण्यास पात्र 11 गुन्हे वगळता अन्य गुन्हेही मागे घेण्याबाबत समितीद्वारे तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने तसा निर्णय घेतला व हैदराबाद गॅझेटीयरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुंबई उपोषणाच्या सांगतेच्यावेळी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्रिस्तरीय समिती स्थापन करून दाखल गुन्ह्यांची तपासणी करण्यात आली व या तपासणीनंतर 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरवले गेले आहे. 2024 मध्ये दाखल या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे. भारतीय दंड विधान कलम 341, 143, 188 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) 135, 37 (1) (3) 135 व 37 (1) (3) आदी कलमांन्वये हे गुन्हे दाखल होते. मागे घेण्यास पात्र ठरलेल्या 11 गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे (क्रमांक 85-2024), कोपरगाव शहर पोलिस ठाणे (84-2024), कोपरगाव तालुका पोलिस ठाणे (52-2024), भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (171-2024) व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (172-2024), कोतवाली पोलिस ठाणे (213-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (171-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (172-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (215-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (216-2024) व शेवगाव पोलिस ठाणे (155-2024) या गुन्ह्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने केली चर्चा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याच्या वेळी सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दिलेल्या शब्दाप्रमाणे आंदोलनादरम्यान मराठा समाजातील बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील सर्व मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी त्रिसदस्य समिती गठीत करून गुन्हे माघारी घेण्याची प्रक्रिया केली आहे व त्यानुसार जिल्ह्यातील साधारण 11 पोलिस ठाण्यांतील गुन्हे तपासून माघारीची प्रक्रिया सुरू आहे व बाकीच्या राहिलेले गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती दिली. या कार्यवाहीबद्दल सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली. या शिष्टमंडळात अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड गजेंद्र दांगट, अ‍ॅड हरीश भामरे यांच्यासह मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे, अभय शेडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप, प्रमोद कोरडे, सिद्धांत पानसरे, भारत भोसले, रमेश मुंगसे, सागर भोसले, जगन्नाथ निमसे, सोमनाथ गुंड, राम सातपुते आदी उपस्थित होते.

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता Read More »

img 20251006 wa0000

Ahilyanagar News : सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर; अध्यक्षपदी सचिन चोभे

Ahilyanagar News : स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठीचे नियोजन मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठीच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी लेखक सचिन मोहन चोभे यांची, तर कार्याध्यक्षपदी सिद्धनाथ मेटे महाराज आणि समन्वयक पदावर लेखक रामदास कोतकर यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५) झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. याबद्दलची माहिती आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आजच्या तिसऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींनी समक्ष तर अनेकजणांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत हजेरी लावली. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून त्यानुसार संमेलनात महिला, नवसाहित्यिक, दिव्यांग आणि वंचित घटकांना सहभागी करून घेऊन संमेलन यशस्वी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. रमेश आमले यांनी संयोजन समितीचा ठराव मांडला. त्यास आनंदा साळवे यांनी अनुमोदन दिले. संयोजन समितीच्या सह समन्वयक पदावर कवयित्री स्वाती पाटील यांची निवड करण्यात आली. निमंत्रण समितीमध्ये शब्बीरभाई शेख, हेमलता पाटील, रमेश आमले, सुभाष सोनवणे, अमोल इथापे, शेख रज्जाक, ऋतिक लोंढे आदींची निवड करण्यात आली. तर, व्यवस्थापन समितीमध्ये संदीप गेरंगे, भानुदास कोतकर, वसंत कर्डीले, नामदेव लोंढे, प्रा. शरद दारकुंडे, ॲड. सचिन चंदनशिव, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रा. अमोल सायंबर, अजिंक्य काटकर, मेहेक वाणी, राजेंद्र खुंटाळे, देविदास बुधवंत यांनी सर्व जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. संमेलनाचे प्रसिद्धीप्रमूख म्हणून ॲड. राहुल ठाणगे व मकरंद घोडके यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. लवकरच साहित्य संमेलनाची तारीख आणि संमेलनाध्यक्ष निवड करण्यात येईल अशी माहिती गवळी यांनी दिली.

Ahilyanagar News : सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर; अध्यक्षपदी सचिन चोभे Read More »