Ajit Pawar: येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.
महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असं या वेळी अजित पवार म्हणाले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
पक्ष प्रवेश करणार्यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले.
पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.