DNA मराठी

मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तात्काळ मदतीची Vijay Wadettiwar यांची मागणी

Vijay Wadettiwar : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, “ज्वारी, कपाशी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पशुधनाचाही फटका बसला आहे. अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळच्या अतिवृष्टीचे नुकसानभरपाईचे पैसे अजून मिळाले नाहीत, त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचे हातचे पिक हिरावून घेतले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “एकीकडे सरकार कर्ज काढत आहे, मग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लागेल तर अजून कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे.”

शिवभोजन थाळी व अन्य योजना रखडल्या

राज्यात शिवभोजन थाळी या योजनेचे सात महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत, ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. “गरीबांसाठीच्या योजना बंद केल्या जात आहेत. ज्यांनी मेहनत केली त्यांचे पैसे रोखून ठेवले आहेत. सरकार त्यांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगावरही टीका

पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “देशात मतचोरी सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे दिल्यानंतर आयोगाने पत्रकार परिषद घेतली, पण प्रश्नांना उत्तर दिले नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सीसीटीव्ही फुटेज मागितले, अनेक पत्रे लिहिली, तरी आयोगाने उत्तर दिले नाही. उलट राहुल गांधी यांच्याकडून पुरावे मागणे हे गजब आहे. निवडणूक आयोग स्वायत्त राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल ते “माफी मागणार नाहीत.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *