Ajit Pawar: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले.
शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये सरकारचे दुमत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेल असेही स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळवाट काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे असेही अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.