DNA मराठी

ताज्या बातम्या

ranpati shivray swari agra

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार

Ranpati Shivray Swari Agra : शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.  कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत  मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे.  रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे  आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची  जबाबदारी  समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे  यांनी सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार Read More »

pune crime

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय?

Pune Crime: पुण्यात आईच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः आईनेच आपल्या ११ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली तर १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वाघोली येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ रोड परिसरात ही घटना घडली आहे. सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तिने आपला ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, कामानीनिमित्ताने ते वाघोली येथे स्थायिक झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय? Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation: महापौर निवडीसाठी नाशिकसह, धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला निवडणूक

Ahilyanagar Municipal Corporation : नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तर मालेगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धुळे महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांच्या प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांमधून मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींचे पालन करुन सभेचे कामकाज पार पाडावे तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: महापौर निवडीसाठी नाशिकसह, धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला निवडणूक Read More »

img 20260129 wa0003

Arvind Patkar Death: ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन

Arvind Patkar Death : मनोविकास प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे आज पहाटे दोन वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता पुण्यातील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अरविंद पाटकर यांनी तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती. गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षातून बाहेर पडल्यानंतर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. त्या टप्प्यावर अभिवन प्रकाशनचे वा. वि. भट यांनी त्यांना मोलाची मदत केली. पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकरांना आधीपासूनच होता. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली. पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा वाचकांशी थेट संवाद वाढत गेला. मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाउस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले. अखेर ४ एप्रिल १९८४ रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकासचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. ‘मनोविकास प्रकाशन’ हे नावही एका सहजसुंदर क्षणातून साकार झाले. कोकणातील कुडाळ येथे पुस्तक प्रदर्शनासाठी गेले असताना शेजारी राहणाऱ्या बबन पाटकर यांनी ‘विकास बुक सेंटर’ हे नाव सर्वसामान्य वाटते असे सांगत त्यामागे ‘मनो’ जोडण्याची सूचना केली. त्यातूनच ‘मनोविकास प्रकाशन’ या नावाचा जन्म झाला. १९८५ मध्ये वा. वि. भट यांच्या पाठिंब्याने मनोविकास प्रकाशनचे पहिले पुस्तक ‘शाहीर’ प्रकाशित झाले. त्यानंतर वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक पुस्तकांच्या माध्यमातून मनोविकासने स्वतंत्र ओळख निर्माण केली. २००५ पासून अरविंद पाटकर पुण्यात स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांनी प्रकाशन कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेले.

Arvind Patkar Death: ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन Read More »

ajit pawar

Ajit Pawar Death: शब्द अंतिम असायचा, म्हणूनच तो नेता वेगळा ठरला

Ajit Pawar Death: बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. पाटील (आबा) यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या राहिलेल्या पोकळीची जाणीव आधीच तीव्र होती. त्या परंपरेतील अजित पवार यांचे जाणे ही केवळ एका नेत्याची अनुपस्थिती नाही, तर एका विशिष्ट राजकीय संस्कृतीचा अस्त होत चालल्याची खंत आहे. ही खंत अधिक बोचरी ठरते कारण अशा नेतृत्वाचा पर्याय आजच्या राजकारणात सहज दिसत नाही. एक काळ असा होता की राजकीय भाषण ऐकण्यासाठी सर्वसामान्य माणूस स्वतःच्या पैशातून प्रवास करून मैदानात येत असे. त्या भाषणांतून केवळ घोषणा नव्हे, तर विश्वास आणि दिशा मिळायची. आज भाषणे होतात, गर्दीही जमते; मात्र त्या गर्दीचे रूपांतर विश्वासात आणि मतांमध्ये होताना दिसत नाही. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आजही आहेत. त्यांच्या भाषणांना मोठी गर्दी होते, पण राजकीय समीकरणे जुळवण्यात आलेल्या मर्यादांमुळे ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. वक्तृत्व आणि सत्तेची गणिते यातील ही दरी आजच्या राजकारणाचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे नेतृत्व वेगळ्या ठिकाणी उभे राहते. ते भाषणांपेक्षा कामातून ओळखले गेले. कामातील तत्परता, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्णयक्षमतेचा ठामपणा ही त्यांची ओळख होती. कार्यक्रमाचा वेळ म्हणजे वेळ कुणी उपस्थित असो वा नसो, काम ठरलेल्या क्षणीच सुरू होणार, हा त्यांचा स्वभाव होता. राजकारणात जिथे शब्द फिरवणे आणि भूमिका बदलणे सहज स्वीकारले जाते, तिथे अजित पवार यांचे स्पष्ट आणि थेट बोलणे अनेकांना अस्वस्थ करणारे ठरले. अजित दादा हे राजकारणात स्पष्ट आणि खरं बोलणारे नेते होते. मात्र आजच्या राजकारणात एवढी प्रामाणिकता अनेकदा अडचणीची ठरते. इथे कपटी शब्दांची, अर्थ बदलण्याची आणि मनात एक-ओठांवर एक ठेवण्याचीच चलती असते. अजित पवार यांना त्यांच्या खरं बोलण्याचा फटका अनेकदा बसला. मनात एक आणि बाहेर दुसरे असे वागणे त्यांना कधी जमले नाही. त्यामुळे तोटा होतो आहे, याची जाणीव असूनही त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. राजकारणात फायदा-तोट्याच्या गणितांपेक्षा कामाला आणि शब्दाला महत्त्व देणारा हा स्वभाव आज दुर्मीळ झाला आहे. याच प्रामाणिकपणामुळे ते ‘महाराष्ट्राचे न झालेले मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले गेले. पद मिळाले नाही, पण लोकांचा ओघ कधी थांबला नाही. मंत्रालयात गर्दी दिसली, तर सहज समजायचे – अजित पवार आपल्या कार्यालयात आहेत. सत्तेच्या खुर्चीशिवायही प्रभाव निर्माण करणारा नेता म्हणजे काय, याचे ते जिवंत उदाहरण होते. अजित पवार यांचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि विशेषतः सर्वसामान्य माणसासाठी मोठे नुकसान आहे. आजचे राजकारण प्रतिमा, प्रचार आणि तात्कालिक फायद्यांभोवती फिरत असताना, शिस्त, स्पष्टता आणि शब्दाची किंमत ही मूल्ये मागे पडत चालली आहेत. म्हणूनच हा प्रश्न व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही; तो काळाचा आणि राजकीय संस्कृतीचा आहे. आजच्या राजकीय वास्तवात असा नेता पुन्हा घडेल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे, आणि हीच या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

Ajit Pawar Death: शब्द अंतिम असायचा, म्हणूनच तो नेता वेगळा ठरला Read More »

Vijay Wadettiwar

विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी

Vijay Wadettiwar on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. पहाटेपासून कामात व्यग्र असणारे, प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते “दादा” होते. एकदा शब्द दिला की ते काम पूर्ण करणारे, प्रामाणिक आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्रासाठी अजून मोठे कार्य त्यांच्या हातून व्हायचे असताना नियतीने हा घात केला. अजित दादा यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे धैर्य लाभो. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी Read More »

sanjay raut

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये घेऊन जाणारे विमान अपघात बातमी समजली. ⁠दुर्दैवाने ही बातमी कानावर आली. त्यांची गरज आज महाराष्ट्राला होती मात्र आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल. रोखठोक दिलखुलास कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. बारामती आणि त्यांच नात होत त्याच बारामती मध्ये मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. ⁠उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे कॅबिनेट ला पूर्ण अभ्यास करून येणार नेता. ⁠शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. ⁠त्या नेत्याचा असा अकाली मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ⁠त्यांच्या कामाची दृश्य नेहमी पाहायली उत्तम वक्ते होते रोख ठोक बोलणारे मिश्किल टिपणी करून आपलेसे करणे असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उमद्या वयात असे नेते अनेक गेले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा होती. ⁠दुर्दैवाणे मुख्यमंत्री झाले नाही. महाराष्ट्राला अजून काय पहाव लागेल माहिती नाही. टीका आम्ही एकमेकांवर करत होतो मात्र त्यांनी शांत राहून उत्तर दिले. ⁠महाराष्ट्राला अजून त्यांच्याकडून काम करून घेता आले असते. ⁠काका पुतण्या एकत्र लढतात याचा आनंद होता मात्र तो फार काळ टिकला नाही. पवार कुटुंबावरच हा मोठा आघात आहे.

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले? Read More »

ajit pawar

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बारामती येथे झालेल्या या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार बारामतीला जात असतात हा अपघात झाला. विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान शेतात कोसळले. सुरुवातीला या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती तर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क होणार माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार.पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता) कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म (TReDS Platform) . सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा. (सार्वजनिक बांधकाम) धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. (वस्त्रोद्योग) वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

Maharashtra Cabinet Decisions: शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क होणार माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

shevgaon

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Shevgaon News: भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा बोधेगाव (ता. शेवगांव) येथील पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदाराची तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय 34) यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच 11 ते 15 टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 24.75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल Read More »