DNA मराठी

ताज्या बातम्या

devendra fadnavis

Ahilyanagar News : आठ महिन्यात 22 हजार जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण; विद्यार्थी व अर्जदारांना दिलासा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत २२ हजार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली आहेत. समितीच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्याना व अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सुयोग्य व्यवस्थापन यामुळे प्रमाणपत्रांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, त्रुटी पूर्तता शिबिरे, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. यामध्ये आता १७ सप्‍टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या समितीमध्ये अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) रेश्मा माळी, सदस्य तथा उपायुक्त राकेश पाटील, व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांची त्रिस्तरीय समिती जातवैधता पडताळणीचे काम जलद गतीने करत आहे. त्यामुळेच १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण २५ हजार २७९ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी २२ हजार ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जात (SC) वर्गातील ३ हजार १५१ पैकी २ हजार ८५८, विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJNT) वर्गातील ५ हजार १३० पैकी ४ हजार २८७, इतर मागासवर्गीय (OBC) वर्गातील १४ हजार ३०८ पैकी १२ हजार ६८६, विशेष मागासवर्गीय (SBC) वर्गातील ८२० पैकी ६४३, तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) वर्गातील १ हजार ८७० पैकी १ हजार ५३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अर्जदार स्तरावर त्रुटी पूर्ततेसाठी १ हजार ५७७ प्रकरणे प्रलंबित असून १ हजार ६९६ प्रकरणे निर्णय प्रक्रीयेत आहेत. सद्यस्थितीत जिल्हा समिती परिपुर्ण जातदाव्याच्या प्रकरणांवर ३५ ते ४० दिवसांच्या आत निर्णय घेत आहे. ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाबत ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या असून अर्जदारांनी त्रुटी पुर्ततेची कागदपत्रे प्रत्यक्ष समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात समक्ष जमा केल्यानंतर सदर जातदाव्याचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही केली जात आहे. अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, जातदाव्याचे प्रकरण दाखल करतांना अर्जदारांनी विहित नमुन्यात नमुना 3 आणि नमुना १७ चे शपथपत्र कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावा. मोडीभाषेतील पुरावे शासन मान्यता प्राप्त मोडी लिपी वाचकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावे. साध्या पेपरवर टंकलिखीत केलेले शपथपत्र देखील समिती ग्राह्य धरत असल्यामुळे शपथपत्रासाठी स्टँम्प पेपरची आवश्यकता नाही. अर्जात नमूद केलेल्या वंशावळ शपथपत्रानूसार महसुली व शालेय पुराव्यांच्या प्रमाणित प्रती अर्जदाराने प्रस्तावासोबत उपलब्ध करुन दिल्यास संबंधित प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येते. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित अर्जदार व पालकांना आवाहन करण्यात येते की, सन 2025-2026 या वर्षाअखेरीस CET व्दारे प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदारांनी वेळेवर धावपळ करण्याऐवजी तात्काळ महाविद्यालयांमार्फत प्रकरणे समिती कार्यालयाकडे जमा करावीत, जेणेकरुन व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी समितीवर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन अर्जदारांना देखील वेळेत जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करणे सुलभ होईल. महाविद्यालयांना सूचना महाविद्यालयांनी जातदावा प्रकरणांसाठी विहीत फार्म नंबर १५ A वर महाविद्यालय प्राचार्यांची सही व शिक्यासह देण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमावा. विद्यार्थ्यांना जातदाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. समितीच्या वतीने दिलेल्या सुचना व माहिती पत्रकांची १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन सर्व पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज जमा करुन घ्यावे. जेणेकरुन १२ वी विज्ञान अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना व पालकांना पुढील शैक्षणिक हित साध्य करणे सुलभ होईल. ही कागदपत्रे जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज, प्राचार्यांची स्वाक्षरी असलेला फॉर्म 15 A व महाविद्यालयाचे चालु वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, अर्जदार, वडील, आजोबा यांचे शालेय दाखले/ जातीविषयक महसुली पुरावे, जातदाव्यासाठी निश्चित केलेला मानीव दिनांकापुर्वीची कागदपत्रे, ज्यामध्ये अनुसूचित जाती करीता सन 1950, विजाभज साठी सन 1961, इमाव व विमाप्र करीता सन १९६७ पुर्वीचे जातनोंदी असलेले अहिल्यानगर जिल्ह्रयातील पुरावे, मोडी भाषेतील पुरावे असल्यास मोडी लिपीवाचकाकडून लिप्यांतर केलेले नोंदणीकृत शपथपत्र, वारसनोंदीसाठी 7/12 उतारे, फेरफार किंवा कडईपत्रक उतारे, नमुना 3 व नमुना 17 चे नोंदणीकृत मुळ शपथपत्र, जात पडताळणी ऑनलाईन अर्जासाठी भरावे लागणारे ऑनलाईन शुल्क जात वैधता पडताळणीच्या शैक्षणिक प्रकरणासाठी शुल्क १०० रुपये, सेवाविषयक व निवडणूक कामासाठी ५०० रुपये शुल्क ऑनलाईन भरुन त्याची पावती व ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांचा सर्व जातीविषयक पुराव्यांची कागदपत्रे प्रस्तावासोबत समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. जातवैधता पडताळणीसाठी परिपूर्ण कागदपत्रे जमा केल्यास विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळते.

Ahilyanagar News : आठ महिन्यात 22 हजार जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण; विद्यार्थी व अर्जदारांना दिलासा Read More »

satara crime

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार

Satara Crime: शिरवळ (ता. खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली असून गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार शिरवळच्या विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रासोबत बोलत असताना दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला. या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ झाली. त्याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद गोळीबाराचा हा थरार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना पूर्ववैमन्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. गोळीबारामुळे मुख्य रस्त्यावर पळापळ शिरवळच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांची पळापळ झाली. गोळीबाराच्या घटनेवेळी शालेय विद्यार्थी घरी जात होते. त्याचचवेळी हा थरार घडला. सुदैवाने विद्यार्थी अथवा नागरिकांना गोळी लागली नाही. मात्र कायदा, सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ शिरवळकरांवर आली आहे. संशयित आरोपींची नावे कळली, तपास पथके रवाना झाली आहेत. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शिरवळ पोलीस तपास करत आहेत. जखमी तरुणाचा जबाब घेतला आहे. हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार Read More »

bharat gogawale

‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरील कलर फेक प्रकरणावर Bharat Gogawale भडकले

Bharat Gogawale : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कलर फेकण्यात आल्याची घटना घडली असून यावर आता ठाकरे गटाचे नेते व पदधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याघटनेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्या कोणत्या नराधमाने हा प्रकार केला आहे. आमच्या मां साहेबांच्या पुतळ्यावर कलर टाकण्यात आला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासन सीसीटीव्हीची तपासणी करत आहे. मीनाताई या आम्हाला शिवसैनिकांसाठी मा साहेबच होत्या. त्यांनी आम्हा कोणाला कधीही चुकीची वागणूक दिली नाही. मात्र ज्या कोणी हे कृत्य केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही करण्यात यावी अशी मागणी यावेळी मंत्री भरत गोगवले यांनी केली.

‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरील कलर फेक प्रकरणावर Bharat Gogawale भडकले Read More »

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. स्वतःच्या चमकोगिरीमुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान होत आहे,असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी महाराजांचा असा अवमान का केला जात आहे? जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथे पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मुद्दाम केले गेले आहे का? असा प्रश्न विचारून रा. स्व. संघ व भाजपच्या नेत्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक अपमान केला ते पाहता हे मुद्दाम केले गेले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या प्रतिमेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ लावणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ Read More »

img 20250918 wa0001

Sawedi Plot Scam: सावेडी भूखंड प्रकरणः खरेदी झाली पण…, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी…?

Sawedi Plot Scam: अहिल्यानगर जिल्ह्यातील सावेडी तालुक्यातील स. न. २४५/ब १.३५ हे जमिनीचे खरेदी विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. महाराष्ट्र महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या प्रकरणात एकतर खोट्या खरेदी दस्तावेजांचा वापर करून जमिनीचे व्यवहार घडवून आणले गेले आहेत किंवा संबंधित अधिकारी प्रांताधिकारी, अपर तहसिलदार, मंडळ अधिकारी यांनी नियमांचे उल्लंघन करत या जमिनीच्या फेरफाराला न्याय्यतेचा मुखवटा दिला आहे, असा आरोप उभा राहिला आहे. दुसरे खरेदी खत झाले त्याबद्दल वाद नाही पण संशयित खरेदी खतावर कारवाई कधी, हा प्रश्न उभा राहिला आहे, अशा खरेदी खातांना पाठबळ मिळाले तर येणार कला सर्वसामान्य नागरिकांसाठी घोक्याची घंटा आहे. प्रकरणाचा तपशील सदर प्रकरण मौजे सावेडी ता. जि. अहिल्यानगर येथे स. नं. २४५/ब२ मधील फेरफार क्रमांक ७३१०७ मंजूर दिनांक १७/०५/२०२५ या संदर्भात सुरू आहे. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ०.६३ हे. आर असून, दुय्यम निबंधक अहमदनगर दक्षिण यांच्या दस्तावेज क्र. ४३०/१९९१, दिनांक १५/१०/१९९१ अन्वये घेतलेले खरेदी दस्तावेज खोट्या असल्याचे दिसून आले आहे. उप विभागीय अधिकारी अहिल्यानगर भागाकडे अर्ज दाखल करण्यात आला असता त्यानुसार चाचणी करण्यात आली. खरेदी देणार अब्दुल अजिज डायाभाई (वडील) आणि खरेदी घेणार पारसमल मश्रीमल शहा यांच्या दरम्यान व्यवहार घडवून आणला गेला, तरीही वाटपाच्या प्रमाणाप्रमाणे व चुक दुरुस्ती लेखाबाबत शंका निर्माण झाली आहे. कायद्याचे खुले उल्लंघन महत्त्वाची बाब म्हणजे, महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५०(२) नुसार नोटीस बजावणी न करता फेरफार केले जाणे पूर्णपणे अनियमित ठरते. अप्पर तहसिलदारांनी आणि संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी नोटीस टपालाद्वारे बजावणी न करता अत्यंत तातडीने, फक्त २० दिवसांत नोंद प्रमाणित करण्याची कारवाई घडवून आणली. यामुळे प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच, खरेदी दस्त क्र. २८८५४/२००२ व फेरफार क्र. २७०१८ प्रमाणे अजिज डायाभाई व साजिज डायाभाई यांना मिळकत दिल्याचे दाखवले आहे. मात्र, वाटपामध्ये व चुक दुरुस्तीमध्ये नावे भिन्न दाखवले गेले आहेत. यामुळे आता या प्रकरणामध्ये दस्तऐवज बनावट असल्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. अप्पर तहसिलदारांची गुप्त कारवाई सर्वसामान्य नागरिकांना सरकारी व्यवहारात नोटीस बजावणी करणे अनिवार्य असताना, अप्पर तहसिलदार स्वप्निल ढवळे यांनी प्रकरण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे चर्चेसाठी पोहोचण्याऐवजी, स्वतःच एकाच दिवशी (१४/०८/२०२५) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तसेच सह दुय्यम निबंधकांना पत्र मारून व्यवहार पुढे नेण्याची कारवाई केली. ही कारवाई प्रकरणाचा फेरफेर करण्याऐवजी त्यात अधिकच संशयास्पदपणा निर्माण करते. याच वेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी वेळकाढू धोरण अवलंबून प्रकरणात कोणतीही तातडीने कारवाई न करता उलट जाणीवपूर्वक विलंब केला. या विळख्यात जमीन घोटाळा करणाऱ्या संशयित व्यक्तींना पाठबळ दिल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाची भूमिका : दोषपूर्ण आणि ढासळलेली उप विभागीय अधिकारी अहिल्यानगर भाग व अपर तहसिलदार यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई प्रस्तावित केली नाही. तसेच, कारवाई प्रस्ताव न सादर करणे म्हणजे घोटाळ्याची स्वीकार्यता मानण्यासारखेच ठरते. याव्यतिरिक्त प्रकरणी सुशासन आणि पारदर्शकतेचे पूर्ण उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८ अन्वये पुनर्विलोकनात घेऊन प्रकरणाची योग्य चौकशी व निर्णयाची गरज अधोरेखित करते. जनतेचा विश्वास फाटला सदर प्रकरणाच्या सतत मिडिया ट्रायलमुळे जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात सरकारच्या प्रशासनावर विश्वास हरवला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांनी बळकट आवाज उठवायला हवा. मात्र, प्रशासनाने स्वतःच अशा व्यवहारांमध्ये सामील होऊन परिस्थिती अजूनच विकृत केली आहे. तत्पर कारवाई आणि गंभीर पुनरावलोकन आवश्यक सावेडी भूमाफिया प्रकरणातील भ्रष्टाचाराची जमीनीवरची खोली समजून शासनाने तत्काळ कारवाई करावी लागेल. नियमांचे पालन, पारदर्शकता व समाजाची हितवृत्ती हा प्रत्येक अधिकाऱ्याचा कर्तव्य असले पाहिजे. शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रभावशाली व्यक्ती व भूमाफियांचा दबाव टाळून शासनाच्या न्यायालयीन प्रक्रियेला पूर्णपणे प्राधान्य द्यावे. “भूमी ही लोकांच्या सुरक्षिततेची दागिना असते, ती कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्यापासून मुक्त राहिली पाहिजे.” अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुनावणी पूर्ण करून दोषी अधिकार्यांविरुद्ध कडक कारवाई करणे अत्यावश्यक ठरेल, अन्यथा शासनाची कायदा अंमलबजावणीची प्रतिमा पूर्णपणे धूसर होण्याचा धोका निर्माण होईल.

Sawedi Plot Scam: सावेडी भूखंड प्रकरणः खरेदी झाली पण…, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी…? Read More »

Maharashtra Crime: विसापूर–शिरूर मार्गावर एसटी चालक-वाहकावर हल्ला

Maharashtra Crime : विसापूरवरून शिरूरकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात इसमांकडून हल्ला झाल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेत असं घडलं की, देवदैठण गावाच्या शिवारातून जाताना पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे शिंतोडे बसच्या चाकांमधून उडून बाजूने जाणाऱ्या कारवर गेले. यावरून कारचालक आणि एसटी चालक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यावेळी कारचालकाने धमकीवजा शब्द उच्चारत चालकाला इशारा दिला. यानंतर काही अंतरावर कारचालकाने आपल्या मित्राला बोलावून एसटी कंडक्टरला मारहाण केली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra Crime: विसापूर–शिरूर मार्गावर एसटी चालक-वाहकावर हल्ला Read More »

img 20250917 wa0004

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Ahilyanagar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील कत्तलखाने बंद करा आणि कोठला परिसरात गोमांस फेकणाऱ्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन 16 सप्टेंबर रोजी केला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार किंमतीची मोपेड गाडी देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक Read More »

fb img 1758080430876

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil: अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपीके, फळपीके, बंधारे, रस्ते, घरे, ओढे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमवेत संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. नुकसानीची माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उप विभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, सायली पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे तसेच अक्षय कर्डीले यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पुलाची तसेच ग्रामस्थांच्या घराची, किराणा दुकानाची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली. मौजे देवराई, मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेवगाव तालुक्यातील मौजे अमरापूरकर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे लेखी निवेदन स्वीकारली. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. मागील अनेक वर्षात झाला नाही एवढा पाऊस या भागामध्ये झाला आहे. पावसामुळे नाले, ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे. नागरिकांच्या घरांची, दुकानांचे तसेच शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. या पावसामुळे साधारणपणे १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे, असेही त्यांनी सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या नागरिकांची घरे संपूर्ण उध्वस्त झाली असतील अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात येईल तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील Read More »

crime

Odisha Crime: व्हिडिओ बनवला अन् पैशांची मागणी; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 जणांना अटक

Odisha Crime : ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बलात्काराच्या संदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली आहे आणि या घटनेत सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी ब्रह्मगिरी पोलिस स्टेशन परिसरातील बलिहरचंडी मंदिराजवळ घडली जेव्हा मुलगी आणि तिचा पुरुष साथीदार काही वेळ घालवण्यासाठी मंदिराजवळील एका ठिकाणी गेले होते. व्हिडिओ बनवला आणि पैसे मागितले स्थानिक तरुणांच्या एका गटाने दोघांचे फोटो काढले आणि त्यांचे व्हिडिओ बनवले आणि त्यांच्याकडून पैसे मागितले. पुरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) प्रतीक सिंह यांनी पीडितेने ब्रह्मगिरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरचा हवाला देत सांगितले की, जेव्हा तिने (पीडितेने) पैसे देण्यास नकार दिला तेव्हा गटातील दोन पुरुषांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, गटातील इतर सदस्यांनी सामूहिक बलात्कारापूर्वी पीडितेच्या पुरुष साथीदाराचे हात बांधले होते. त्यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी घडली असली तरी, लैंगिक अत्याचाराच्या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेने सोमवारी संध्याकाळी एफआयआर दाखल केला. एसपींनी सांगितले की, महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही घटना 15 जून रोजी गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुसऱ्या बलात्काराच्या घटनेसारखीच आहे. त्या सामूहिक बलात्काराप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Odisha Crime: व्हिडिओ बनवला अन् पैशांची मागणी; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 जणांना अटक Read More »

Ahilyanagar IMD Alert: नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी; जाणून घ्या सर्वकाही

Ahilyanagar IMD Alert : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून १००० क्युसेक, घोड धरणातून ८००० क्युसेक, सीना धरणातून १५०१ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ११० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके झाकून घ्यावे. जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करावे. पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ahilyanagar IMD Alert: नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी; जाणून घ्या सर्वकाही Read More »