DNA मराठी

ताज्या बातम्या

Pratap Sarnaik

Dharmveer Anand Dighe : मोठी घोषणा! धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे उभारल्या जाणार 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’

Dharmveer Anand Dighe : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून, बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. “भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे उद्यान या उद्यानामध्ये वृक्षाची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. सबब , वाहतुकीच्या नियमाबरोबरच नागरिकांना पर्यावरणाचे धडे देखील तिथे दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या ई -वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. हे उद्यान त्यामुळे अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Dharmveer Anand Dighe : मोठी घोषणा! धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे उभारल्या जाणार 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय

Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात यशस्वी संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही संघटन बांधणीसाठी दौरे केले होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींवर भर देत त्यांनी कार्यकर्त्यांकडून सूचना, मते आणि स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत निवडणूक रणनीती आखली होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी अशा संवाद दौऱ्यांना महत्त्वपूर्ण मानले जाते. याच पद्धतीने आता पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दौरा असा असेल – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र

Harshwardhan Sapkal: देशात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र Read More »

img 20260508 wa0012

Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : ठेवीदारांची फसवणूक; स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याने संताप

Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : “भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा शेवगाव” या संस्थेमार्फत ठेवीदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पीडित गुंतवणूकदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संस्थेकडून ११ ते १८ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांकडून मुदत ठेव स्वरूपात लाखो रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना ना मूळ रक्कम परत मिळाली, ना व्याज अदा करण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे. तक्रारदारांनी सांगितले की, घरबांधणी, शेती, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कौटुंबिक गरजांसाठी साठवलेली आयुष्यभराची पुंजी या संस्थेत गुंतवली होती. मात्र पैसे परत मागितल्यावर संस्थेकडून केवळ टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे आणि मानसिक त्रास दिला जात आहे. या प्रकरणात संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक यांनी विश्वास संपादन करून जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेवीदारांनी एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी करत शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. विशेष म्हणजे, आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर कार्यालयातून शेवगाव पोलिस स्टेशनला लेखी पत्र पाठवून सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. तरीही स्थानिक पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. “आर्थिक गुन्हे शाखेचे आदेश असूनही पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत, मग सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल पीडित गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे. वेळेत कारवाई झाली नाही, तर आणखी अनेक ठेवीदार पुढे येतील आणि मोठे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : ठेवीदारांची फसवणूक; स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याने संताप Read More »

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

img 20260508 wa0009

Madhya Pradesh Jailer : जन्मठेपेच्या कैद्यावर जेलरलाच प्रेम; तुरुंगात जुळलं नातं, समाजाच्या विरोधात जाऊन केलं लग्न

Madhya Pradesh Jailer : तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी आलेला एक कैदी आणि त्याच्यावर प्रेम करणारी त्याच तुरुंगातील उपजेलर ऐकायला चित्रपटातील कथानक वाटावं, पण ही घटना मध्यप्रदेशातील सतना केंद्रीय कारागृहातील असल्याचं सांगितलं जात आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारी अधिकारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी यांच्यात निर्माण झालेलं नातं अखेर विवाहबंधनात अडकलं. फिरोजा खातून या सतना केंद्रीय कारागृहात उपजेलर म्हणून कार्यरत होत्या. शिस्त, कर्तव्य आणि कायद्याचं काटेकोर पालन ही त्यांची ओळख. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह हा कैदी शिक्षा भोगत होता. 2007 मध्ये नगरपरिषद उपाध्यक्षाच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातील वॉरंट शाखेची जबाबदारी फिरोजा खातून यांच्याकडे होती. धर्मेंद्र कागदपत्रांच्या कामात मदत करत असल्याने दोघांचा संपर्क वाढला. कामापुरतं सुरू झालेलं बोलणं हळूहळू मैत्रीत बदललं आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 2022 मध्ये धर्मेंद्रच्या वर्तणुकीत सुधारणा झाल्याचं लक्षात घेऊन त्याची वेळेपूर्वी सुटका करण्यात आली. 14 वर्षांचा तुरुंगवास संपल्यानंतर तो बाहेर आला, मात्र फिरोजासोबतचं नातं अधिक दृढ झालं. अखेर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. या लग्नासमोर अनेक अडथळे होते. धर्म वेगळा, सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे समाजाचा विरोध. मुस्लिम महिला अधिकारी आणि हिंदू माजी कैदी यांचा विवाह कुटुंबीयांना मान्य नव्हता. फिरोजा यांच्या घरच्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, दोघांनीही समाजाच्या दबावापेक्षा आपल्या नात्याला प्राधान्य दिलं. 5 मे रोजी छतरपूर येथे हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे, फिरोजा यांच्या कुटुंबीयांनी साथ न दिल्याने बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढे येत कन्यादानाची जबाबदारी स्वीकारल्याची चर्चा आहे. वैदिक मंत्रोच्चारात, अग्नीला साक्षी ठेवून उपजेलर फिरोजा खातून यांनी धर्मेंद्र सिंहसोबत सात फेरे घेतले. कायद्याच्या रक्षकाने जन्मठेपेच्या कैद्याला जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याने ही प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेम खरंच आंधळं असतं का, की माणसातील बदल ओळखण्याची ताकद त्यात असते? एका माजी गुन्हेगाराला समाजाने आणि कायद्याच्या रक्षकाने अशी दुसरी संधी देणं योग्य आहे का, यावर आता विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.

Madhya Pradesh Jailer : जन्मठेपेच्या कैद्यावर जेलरलाच प्रेम; तुरुंगात जुळलं नातं, समाजाच्या विरोधात जाऊन केलं लग्न Read More »

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

uday samant

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय

Uday Samant : अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे थंडावलेले काम पाहता सामंत यांनी हे बदल केले असून येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी पावले उचलले जातील असं सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंत हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बनवतात मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची सुरू असलेली शिथिल वाटचाल यावर मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारणी बरखास्त करून केवळ जिल्हाप्रमुख नितीन अवताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील असे स्पष्ट आदेश दिले आहे. नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत अवतडे हेच काम पाहतील दरम्यान आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे राजकीय बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

img 20260507 wa0027

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ

Matka King : पहिल्या पर्वाच्या ऐतिहासिक यशानंतर, ज्याने प्रदर्शित झालेल्या आठवड्यात १७ देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आणि ३७ देशांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान पटकावले, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे या गाजलेल्या मूळ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. प्राइम व्हिडिओ या भारतातील लोकप्रिय मनोरंजन व्यासपीठाने आज जाहीर केले की त्यांची गाजलेली मूळ नाट्यमालिका ‘मटका किंग’चे दुसरे पर्व सध्या निर्मिती प्रक्रियेत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित या उच्च-दावांच्या नाट्यमालिकेने महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि ओळख यांची कथा प्रभावी अभिनय आणि जिवंत कथनशैलीतून मांडत प्रेक्षकांशी घट्ट नाळ जोडली. पहिले पर्व गेल्या दोन वर्षांत या व्यासपीठावरील सर्वाधिक पाहिले गेलेले नवीन लिखित स्वरूपातील मालिका ठरले. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच आठवड्यात ३७ देशांतील अव्वल दहामध्ये स्थान मिळवत १७ देशांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की मातीतल्या आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा भारतीय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करतात. ‘मटका किंग’च्या पहिल्या पर्वाची निर्मिती आणि लेखन अभय कोराणे यांनी केले असून नागराज पोपटराव मंजुळे यांनी निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिडवानी आणि आशीष आर्यन यांनी याची निर्मिती केली आहे. आठ भागांच्या या मालिकेत विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जदावत आणि गुलशन ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. तसेच भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्त्याक खान, संजीव जोतांगिया आणि सिमरन अश्विनी यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने कथेला अधिक वास्तव आणि खोली दिली आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेले ‘मटका किंग’चे पहिले पर्व प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये विशेष स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मटक्याचा खेळ अजून संपलेला नाही आणि बृज भाटीचे राज्यही कायम आहे. ‘मटका किंग’च्या दुसऱ्या पर्वात खरे डाव सुरू होणार आहेत.

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ Read More »