DNA मराठी

ताज्या बातम्या

team india

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात

IND vs WI: आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली होती.मात्र भारताकडून संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकतेचे उत्तम मिश्रण दाखवले. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला, जिथे आता इंग्लंड आव्हान देईल. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोस्टन चेस आणि शाई होप यांच्या भागीदारीने वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. दोघांनी 68 धावा जोडल्या. होप 32 धावांवर बाद झाला. बुमराहने एकाच षटकात दोन विकेट घेतले. पॉवेल आणि होल्डरने आक्रमक फलंदाजी केली. अर्शदीपने एका षटकात 24 धावा दिल्या. वेस्ट इंडिजने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. तर दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्ये 53 धावा केल्या पण दोन विकेट गमावले. अभिषेक शर्मा 10 आणि इशान किशन 10 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. तिलक वर्माने 27 धावांची उपयुक्त खेळी केली. यानंतर संजू सॅमसनने जबाबदारी सांभाळली. त्याने नाबाद 97 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने 17 धावा केल्या. सॅमसनमुळे भारताने 19.2 षटकात 5 बाद 199 धावा करून विजय मिळवला. हा विश्वचषकातील भारताचा सर्वात मोठा पाठलाग होता. उपांत्य फेरीची तयारी या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आता त्यांचा सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल.

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Rohit Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान  अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही पुरावे सादर करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई आणि बारामती येथे त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांची एफआयआर दाखल करून घेतली नाही. यानंतर आता रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात मदतीची मागणी केली आहे. तर आता रोहित पवार यांच्या  समर्थनात मनसे प्रमुख राज ठाकरे उतरले असून त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. अनेक संशयाची भूत फिरत आहे. अपघात हा धोक्याचे झाला का? हे समजत नाही. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की 3 ठिकाणी एफआयआर द्यायला गेले पण ती घेतली नाही इथे संशयाची सुई निर्माण झाली. मरीन ड्राइव्ह येथे एफआयआर टाईप करताना DCP येऊन  नाही म्हणतात. जर घरच्या संशय आहे तर मग का एफआयआर नाही? असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  सुनेत्रा वहिनी यांचे पती होते. मग त्यांनी पण याबाबत पुढाकार घ्यायला हवे. काय काळ बेर आहे ? याबाबत संशय निर्माण होत आहे. जर काही संशय आहे तर चौकशी व्हायला हवी ब्लॅक बॉक्स बाबत पण कळले नाही. सरकार संशयाची भूत नाचवत आहे असे दिसून येत. एफआयआर का नोंदवून घेतले नाही. हा मुळात प्रश्न आहे. रोहित पवार यांचा एफआयआर नोंदवून गेला जात नसेल तर सामान्य माणसाचे काय? त्रुटी काही असतील ते मांडले जात नसेल तर काय उपयोग. सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर यात संशयाची भूत या ठिकाणी नाचवली जात आहेत असे वाटत आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

Jayant Patil : कृत्रिम फुलांवर प्रभावीपणे बंदी घाला ; जयंत पाटलांची विधानसभेत मागणी

Jayant Patil :  राज्यभर नैसर्गिक फुलांचे भाव घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमागे कृत्रिम फुलांचा वाढता वापर हे प्रमुख कारण आहे. याच संदर्भात पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे सांगितले मात्र त्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केला. जयंतराव पाटील यावर म्हणाले की, फुल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाऊस उभारून नैसर्गिक फुलांची लागवड करतात. त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते. मात्र बाजारपेठेत कृत्रिम फुलांचा वाढता वापर झाल्याने त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. यापुढे शंभर टक्के कृत्रिम फुलांची विक्री थांबवण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची गरजेचे आहे असे ते म्हणाले. नुकतेच दादर फुल मार्केट येथील फुल विक्रेत्यांना महानगरपालिकेने हटवले. या निषेधार्थ मुंबईतील फुल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. प्रशासनाने या सर्व घडामोडींकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देत फुल विक्री सुरळीत सुरू करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत  असे त्यांनी सुचित केले. बायोडिग्रेडेबल नसलेल्या कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतराव पाटील यांना उत्तर देताना सांगितले तसेच अशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि संबंधित आस्थापने यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात येईल. फुल मार्केट पूर्ववत सुरू करण्याबाबत महानगरपालिकेला तातडीने आदेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil : कृत्रिम फुलांवर प्रभावीपणे बंदी घाला ; जयंत पाटलांची विधानसभेत मागणी Read More »

img 20260227 wa0010

Radhakrishnan Vikhe Patil: पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य; लाँग मार्च स्थगित

Radhakrishnan Vikhe Patil: अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या उर्वरित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघाला असून, आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च काढण्यात येत होता. या मोर्चामध्ये आदिवासी शेतकरी, कामगार, पोषण आहार तयार करणाऱ्या मदतनीस, वैद्यकीय क्षेत्रातील अर्धवेळ परिचर आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेर येथून निघालेला लाँग मार्च काल सायंकाळी निझर्णेश्वर येथे पोहोचला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलकांशी सातत्याने संपर्क साधून मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन आंदोलक व विविध विभागांचे मंत्री यांच्यात यशस्वी संवाद घडवून आणला होता. या बैठकीमध्ये आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, शालेय शिक्षण व कामगार विभागाशी संबंधित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. निझर्णेश्वर येथे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी अरुण उंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर उर्वरित मागण्याही सरकारने मान्य केल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची प्रशासनाची विनंती आंदोलकांनी मान्य केली. अर्धवेळ परिचारकांच्या मानधनात सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, शालेय पोषण आहार मदतनिसांचे मानधनही वाढविण्यास सरकारने हिरवा कंदील दिला आहे. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी आदिवासी भागाला मिळावे म्हणून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणाला दिलेल्या आदेशाचे आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले आहे. बांधकाम कामगारांना आता आरोग्य विमा योजनेतून सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे सुकर झाला आहे. आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आंदोलकांना दिलासा दिला. या निर्णयाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, तसेच आंदोलकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

Radhakrishnan Vikhe Patil: पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य; लाँग मार्च स्थगित Read More »

pratap sarnaik

महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य ‘ लॉजिस्टिक्स गेटवे ‘बणविण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर; मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik: महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ऑल इंडिया लॉजिस्टिक वेल्फेअर असोसिएशन ‘ आयोजित समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे . मुंबईतून औषधे, ताजी कृषी उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची मजबूत उपस्थिती आहे. महाराष्ट्राला मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सारख्या द्रुतगती मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला असून संपूर्ण राज्यातील मालवाहतुकीला वेग मिळाला आहे. PM गतिशक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारसोबत समन्वय साधत बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ आणि परिणामकारक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय Messe Muenchen India आयोजित ‘Air Cargo India’ आणि ‘Transport Logistics India’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे उद्योग नेते, धोरणकर्ते, जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकाच व्यासपीठावर येत असून सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना मिळत आहे. “महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे ठामपणे सांगत मंत्री सरनाईक यांनी राज्याला देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवण्याचा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य ‘ लॉजिस्टिक्स गेटवे ‘बणविण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर; मंत्री प्रताप सरनाईक Read More »

mva

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक ; कुणाला मिळणार संधी?

Rajya Sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीबाबतचर्चा करण्यात आली. बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आला आहे. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपली मते मांडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, तर शिवसेनेनेही आपली भूमिका स्पष्ट करतील अस वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वजण आपापल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जागेसाठी आग्रह धरला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल. राज्यसभा अर्जासाठी 5 मार्चपर्यंत वेळ आहे. त्यामुळे मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मालेगाव प्रकरणी प्रश्न विचारला असताना विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये, परंतु सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद केला जात आहे, हे पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे. समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांना देखील सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक ; कुणाला मिळणार संधी? Read More »

whatsapp

मोठी बातमी! 1 मार्चपासून अनेकांचे WhatsApp होणार बंद; जाणून घ्या कारण

WhatsApp New Rules: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप वापरण्याच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहे. 1 मार्चपासून अनेकांना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, सिम-बाइंडिंग नियमात कोणताही बदल किंवा शिथिलता येणार नाही. हा नियम व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल मेसेजिंग अँप्सना लागू होतो. हा नियम 1 मार्चपासून लागू होईल आणि कंपन्यांना त्याचे पालन करावे लागेल. सरकारच्या मते, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वापरला जाणारा नंबर खरा आणि सक्रिय आहे याची पुष्टी करण्यासाठी हे अँप्स सतत सक्रिय सिम कार्डशी जोडलेले असले पाहिजेत. जर सिम काढून टाकले किंवा डिएक्टिव्ह केले तर अ‍ॅपच्या सेवा त्या डिव्हाइसवर कार्य करणार नाहीत. सिम-बाइंडिंग म्हणजे काय? तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबर तुमच्या फोनवर सक्रिय राहिला पाहिजे. जर ते सिम तुमच्या फोनमध्ये नसेल किंवा डिएक्टिव्ह केले असेल तर व्हॉट्सॲप योग्यरित्या कार्य करणार नाही. आतापर्यंत, मेसेजिंग अँप्स तुम्ही लॉग इन केल्यानंतर 6-अंकी ओटीपी टाकून सिमची उपस्थिती सतत तपासत नव्हते. नवीन नियम हे बदलण्यासाठी सेट केला आहे. सिम कार्ड आता सक्रिय आणि फोनमध्ये नेहमीच उपस्थित असले पाहिजे. डिजिटल फसवणूक, बनावट नंबरचा गैरवापर आणि सायबर गुन्हे रोखण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सरकारने हा बदल केला आहे. जेव्हा प्रत्येक खाते सत्यापित सिमशी जोडले जाईल, तेव्हा फसवणूक आणि बनावट खाते ओळखणे सोपे होईल. 1 मार्च 2026 नंतर कोणतीही सवलत नाही दूरसंचार विभागाने (DoT) 28 नोव्हेंबर 2025 रोजी सिम-बाइंडिंग नियम जारी केला आणि कंपन्यांना तो लागू करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मना 1 मार्च 2026 पर्यंत ही प्रणाली लागू करावी लागेल. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की सहा तासांचा ऑटो-लॉगआउट नियम वेगवेगळ्या डिव्हाइसवर लॉग इन केलेल्या वेब किंवा डेस्कटॉप खात्यांवर देखील लागू होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही संगणक किंवा वेबवर व्हॉट्सॲप वापरत असाल, तर तुम्हाला दर सहा तासांनी QR कोडद्वारे पुन्हा लॉगिन करावे लागेल. सर्वसामान्यांवर होणार परिणाम जर तुमचा नंबर ऍक्टिव्ह असेल आणि तुमच्या फोनमध्ये तेच सिम असेल, तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमचे व्हॉट्सॲप सामान्यपणे कार्य करत राहील. मात्र जर तुम्ही तुमच्या फोनमधून सिम काढला किंवा दुसऱ्या फोनमध्ये घातला तर तुमचे व्हॉट्सॲप तात्पुरते डीएक्टिव्ह होईल. शिवाय, जर तुमचा नंबर बंद झाला (रिचार्ज अयशस्वी झाल्यामुळे), तर व्हॉट्सॲप पुन्हा पडताळणीसाठी विचारू शकते किंवा अगदी बंद देखील करू शकते.

मोठी बातमी! 1 मार्चपासून अनेकांचे WhatsApp होणार बंद; जाणून घ्या कारण Read More »

Manoj Jarange: अंमलबजावणी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange : काही दिवसांपूर्वी परभणीच्या सहजपूर जवळील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात महसूल आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. या विरोधामुळे शेतकऱ्यांवर पोलीस बळ वापरल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर शेतकरी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषण स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची की नाही हे ठरवावे. आम्ही महसूल मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.” अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर परिवाराचे म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.” मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने जीआर काढला, पण अधिकारी- कर्मचारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत, परंतु प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारने परिपत्रक काढून मराठा कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिली पाहिजेत. तसेच सातारा व औंध गॅझेटची अंमलबजावणी करावी आणि शहीदांच्या कुटुंबीयांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटवावा.” मनोज जरांगे पाटील यांनी इशाराही दिला की, “जून पर्यंत सरकारने काय केले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मराठा समाजाने भाजपला सत्तेत बसवले आहे, जर सन्मान दिला नाही तर 2029 मध्ये पायउतार करावा लागेल.”

Manoj Jarange: अंमलबजावणी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा Read More »

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

Nitesh Rane: जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.त्यापैकीच मुंबई आणि कोकणाला जल वाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम आहे. त्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्चपासून पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले, मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला मार्ग रो रो सेवेचा असेल.येणाऱ्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे वेगवेगळे मार्ग यामध्ये वाढवणार आहोत असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बोट सेवेची संपूर्ण माहिती आणि तिकीट चे दर काय आहेत. याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे. चांगला प्रतिसाद या तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रोरो सेवेला मिळत आहे. कोकणात शिमगोत्सव सुरू होणार आहे. या शिमगोत्सवाला कोकणात जाण्यासाठी, सिंधुदुर्ग कोकणची जनता मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. हे तिकीट बुकिंग च्या माध्यमातून दिसत आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबई कोकण किंबहुना मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण करत आहोत.कोकणात जाण्यासाठी जेव्हा साडेचार ते पाच तासात कोकणात जाऊ शकू तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो.आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार. रो रो सेवा संदर्भात सुरक्षिततेच्या सर्व परवानगी मिळाल्यानंतरच काही ट्रायल केल्यानंतर हि सेवा सुरू करत आहोत. १ मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील. आपण त्या बोटीवर काही डॉक्टर सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून काही लोकांना समुद्र प्रवासाचा होणारा त्रास झाल्यास उपचार मिळेल.पर्यावरण पूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र

Prajakt Tanpure :  नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्या पासून पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमावे लागले आहे आता याच धर्तीवर ती राहुरी मध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला असून शेतकरी व नागरिकांनी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. सरकारने यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर हा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांना बळी गेला आहे प्रशासनाकडून केवळ नुकसान भरपाई दिली जात असली मात्र नागरिकांचा बळी जात असल्याने आता असंतोषाची भावना तयार होत आहे. राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर शेतकरी हे एकवटले व केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा तातडीने बदल करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्या करण्यात आलेली पत्र थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे कुत्रंप्रमाणे बिबटेही रस्त्यावर फिरतील बिबट्यांची वाढती संख्या पाहता ज्याप्रमाणे रस्त्यावरती कुत्रे फिरत आहेत तर येणाऱ्या काळात बिबटे ही तसेच रस्त्यावर फिरतील सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व बिबट्यांबाबत ठोस कारवाई कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुरीचे माजी आमदार तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेला आहे. बिबट्याला घेऊन आंदोलन बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची जीवन अत्यंत धोक्यात आले असून या व्यथा मांडण्यासाठी राहुरी मध्ये आंदोलन पुकारण्यात आले यावेळी बिबट्याची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांना घेऊन शहरातून मिरवणूक काढण्यात आली दरम्यान हा केवळ प्रतीकात्मक बिबट्या आहे उद्या खराब बिबट्या घराशीला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित शेतकऱ्यांनी केला यामुळे केंद्राने यावरती तातडीने निर्णय घ्यावा यासाठी थेट मोदींना पत्र पाठवण्यात आलेली आहे यावर आता काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र Read More »